Total Pageviews

Sunday 21 August 2011

DONT CONVERT DAHI HANDI IN TO DANGEROUS GAME

. तो व्यक्त करण्यासाठी आज दहीहंड्या रस्तोरस्ती लावल्या जाणार. त्या फोडण्यासाठी गोविंदांची पथके अहमहमिकेने सरसावणार, त्या पथकांमध्ये तरुणांच्या बरोबरीने महिलांचीही पथके सामील होणार आणि त्या साऱ्याच पथकांचे कसब पाहण्यासाठी लोक गर्दी करणार!

ही गर्दी प्रेक्षकांचीच नसणार; तर गोविंदाच्या पथकांच्या पाठीराख्यांचीही असणार. ते ज्या मंडळाचे असतील, त्या मंडळाच्या सभासदांचीही असणार. या गदीर्ची एकच आस असेल; दहीहंडी फोडणे! ही दहीहंडी फोडणे हा आजच्या उत्सवाचा मुख्य भागच आहे. त्यामध्ये निखळ आनंद असावा, जिवावर बेतणारी स्पर्धा नसावी, अशी अपेक्षा आहे. ही अपेक्षा आता जाहीरपणाने व्यक्त करण्याची वेळ आली आहे. याचे कारण गेल्या काही वर्षांमध्ये हंडीची उंची वाढतच जात आहे. त्या हंडीमध्ये ठेवल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतही वाढ होत आहे. साहजिकच दहीहंडी फोडण्यातल्या कसबाचा, खेळाचा, आनंदाचा भाग मागे पडून त्याला जीवघेण्या स्पधेर्चे रूप येऊ लागले आहे.

दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी होण्याच्या दुर्घटनांतही वाढ होऊ लागली आहे. आणि तीच चिंताजनक गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्षांनी गणेशोत्सव असो की दहीहंडी; त्यामध्ये कमालीचा रस घेण्यास सुरुवात केली आहे. या सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या लोकसमूहाला आपलेसे करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होत असतो. त्याचा एक भाग म्हणूनच दहीहंडीतल्या बक्षिसाची रक्कम वाढत जात आहे. या वाढीव बक्षिसाचा एक परिणाम म्हणून गोविंदांच्या पथकांना यंदा फुटीचे ग्रहण लागले आहे. यंदा गोविंदांची सुमारे नवीन १२५ पथके दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. एकाअर्थाने दहीहंडी फोडण्याच्या या खेळाला आता अवांछित स्पर्धेचे रूप येऊ लागले आहे. तसे ते यापूवीर्च आले होते; ते हंडीच्या वाढत्या उंचीमुळे. हंडी जितकी जास्त उंच, त्यातील बक्षिसाची रक्कम जितकी अधिक तितकी आपली प्रतिष्ठा मोठी, असे काही समीकरण यामागे असावे. याचे कारण राजकीय पक्षांच्या जोडीने जाहिरातदार आणि बिल्डरही या खेळात उतरू लागले आहेत.

या सार्वजनिक उत्सवामध्ये त्यांनी भाग घेण्यामध्ये वावगे काही नाही. मात्र कोणत्याही कृतीच्या मागे र्कत्याचा हेतू काय आहे, हे तपासणे आवश्यक असते. हा हेतू कृष्णजन्मानंतर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या खेळात सहभागी होऊन गोविंदा पथकांना उत्तेजन देणे असा असेल तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. मात्र अलीकडच्या काळामध्ये या खेळात निर्माण होणारी स्पर्धा आणि त्यातील राजकीय पक्षांचे आणि आयोजकांचे वर्चस्व हे या खेळाला वेगळाच रंग आणणारे ठरत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून महिलांची गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी पुढे येत आहेत. या महिलांची पथके सुरुवातीला चारच थर लावत होती; यंदा काही पथके सात थर लावण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी सराव करण्यास गुरूपौर्णिमेपासूनच काही पथकांनी सुरुवात केली आहे.

यंदा गोविंदाच्या पथकांना विम्याचे संरक्षण देण्याची, पथकाबरोबर डॉक्टर ठेवण्याची खबरदारी काही मंडळांनी घेतली आहे. काहीजणांनी तर हॉस्पिटलात जागाही राखून ठेवल्या आहेत आणि प्रेक्षकांनाही विम्याचे संरक्षण मिळेल, अशी काळजी घेतली आहे. काहीजणांनी तर यंदा गिर्यारोहकांची मदत घेतली आहे, असे सांगितले जाते. पर्वतारोहणामध्ये आणि रॅपलिंगमध्ये संबंधिताच्या कमरेला दोरी बांधली जाते आणि आरोहण करताना त्याचा हात किंवा पाय सटकला तरी तो खाली न पडता दोरीच्या मदतीने अधांतरी लोंबकळत राहू शकतो. आता मानवी मनोऱ्याच्या शेवटच्या काही थरांवरील गोविंदांसाठी हेच तंत्र वापरले जाणार आहे. संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवून आवश्यक ती काळजी घेणे हे उत्तम नियोजनाचे आणि हाती घेतलेल्या कार्याच्या यशस्वीतेचे एक गमक असते, हे खरे आहे. त्यादृष्टीने गोविंदा पथकांनी आणि त्यांच्या मंडळांनी उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.

मात्र त्यामुळे सात-सात थरांचे मानवी मनोरे रचावे लागून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्याचे समर्थन होऊ शकत नाही. असे थर रचणे चित्तथरारक असले आणि त्यामध्ये कसबही असले, तरी ते एकअर्थाने अमानवी असून जिवाशी खेळणे आहे. त्यामुळेच दहीहंडीच्या खेळाला अमानुष स्पधेर्चे रूप आणून त्याची मजा घालवू नये, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. गोविंदाची पथके हे भान ठेवतील, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment