Total Pageviews

Saturday 14 December 2019

माओवाद्यांचे आव्हान: सध्याची परिस्थिती आणी उपाय योजना- ब्रिगेडियर हेमंत महाजन,युध्दा सेवा मेडल ,रोचक व संग्राह्य पुस्तक


माओवाद्यांचे आव्हान: सध्याची परिस्थिती आणी उपाय योजना-हे  ब्रिगेडियर  हेमंत महाजन यांचे, भारतीय विचार साधना,पुणे यांनी प्रकाशित केलेले,नक्षली  चळवळीचे, इतिहास, आजचे स्वरुप, रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.ब्रिगेडियर  हेमंत महाजन यांना संरक्षण दलामधील ३७ वर्षांच्या सेवेची पार्शभूमी आहे. तसेच विविध दैनिक आणि मासिकांसाठी त्यांनी हजार हून जास्त लेखही लिहिलेले आहेत. विषयज्ञान तर त्यांना आहेच पण नेटक्या शब्दांध्ये ते कसं मांडावे, याची जाणीव सुद्धा या पुस्तकात दिसून येते.ब्रिगेडियर  हेमंत महाजननी बराच रिसर्च करून हे पुस्तक लिहिले आहे. स्वत: युध्द पत्रकार असल्यामुळे पुस्तकाची भाषा बाळबोध पण ओघवती आहे. मनाची पकड घेणारे वर्णन असल्यामुळे पुस्तक रोचक झाले आहे.  पुस्तकाची रचना सुसंगतवार आहे.
आधीच्या सरकारांच्या दशकात माओवाद्यांची संख्या वाढली .सरकारचे माओवादविरोधी अभियान हा निष्प्रभ पांढरा हत्ती होता. मागच्या अनेक वर्षांत सरकारने या अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी अभियानाच्या कार्याची फलनिष्पत्ती फ़ारशी नव्हती.
त्या काळात 35-40% भागावर माओवाद्यांचे आधिपत्य होते. दरवर्षी 1500-1600 माओवादी हल्ले होत होते. प्रत्येक वर्षी 550-1000  माणसे हिंसाचारात मारली जात होती. प्रत्येक वर्षी माओवादी हजारो कोटी रुपयांची खंडणी वसूल करीत होते. त्या काळात माओवाद्यांनी 35,000-50,000 कोटी रुपयांची भारतीय संपत्ती बरबाद केली.
मोदी सरकारचे आक्रमक माओविरोधी धोरण
मे २०१४-मे २०१९ मध्ये गृहमंत्रालयांनी माओवादाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार हे आक्रमकरीत्या माओवाद्यांविरूध्द  कारवाई करा, असे सांगत होते. मात्र अंमलबजावणी करण्याची  जबाबदारी ही पोलिस आणि अर्धसैनिक दलांची आहे. यामध्ये कमतरता आहे. पोलिस आणि अर्धसैनिक दलाचे बहुतेक नेतृत्व हे ऑफिस मुख्यालय किंवा कंट्रोल रूमध्ये बसून जवानांचे नेतृत्व करते. त्यामुळे जवान जंगलामध्ये जाण्याकरीता पुरेसे तयार नसतात.
दंडकारण्य जंगलात माओवाद्यांचे खंडणी राज्य अजूनही सुरू आहे. त्यांना पैशाची काही कमतरता नाही. याशिवाय , त्यांना दारूगोळ्याची मदत केली जाते.शस्त्रधारी माओवाद्यांची संख्या दोन ते तीन हजार एवढी असावी. म्हणजेच पैसे, शस्त्र, दारूगोळा याबाबत माओवाद्यांना सध्या कोणतीही कमी नाही.
जंगलातील शस्त्रधारी माओवाद्यांपेक्षा शहरी माओवादी हे अधिक धोकादायक आहेत. अनेक संस्था माओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार शहरात करतात. सरकारवर दबाव आणण्यासाठी, वैद्यकीय मदतीसाठी, अर्थ व्यवस्थापनासाठी, माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, परदेशी संपर्कासाठी माओवाद्यांना शहराशी असणारा हा संबंध उपयोगी पडतो. शहरी माओवादी गटातील काही म्होरक्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे समाजाला लागलेली ही कीड संपेल अशा भ्रमात कुणीच राहू नये. कारण ही पाच-सहा मंडळी म्हणजे हिमनगांची टोके आहेत. त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
माओवादाविरुध्द सरकारचे बहुआयामी अभियान सुरु केले. नियोजन उत्तम होते, पण अंमलबजावणी असमाधन कारक होती.
सरकारला माओवाद संपवायचा असेल तर त्यांना सर्वसमावेशक उपाययोजना कराव्या लागतील. माओवाद्यांचा बीमोड करण्याकरता त्यांचे डावपेच, संघटना आणि लढण्याच्या पद्धतीविषयी पूर्ण माहिती असणे जरुरीचे आहे. माओवाद्यांची बलस्थाने काय आहेत, त्यांच्या कमजोऱ्या काय आहेत, माओवाद्यांचे प्रमुख तळ कुठे आहेत, त्यांचा दारूगोळा, अन्नधान्य व पैशाचा पुरवठा थांबवायला काय केले पाहिजे, हे सगळे समजून घेतले पाहिजे.ज्या जंगलात लढाई करायची, त्याविषयी अचूक भौगोलिक माहिती देखील आवश्यक आहे.
माओग्रस्त भागामध्ये सामाजिकआर्थिकराजकीयमनोवैज्ञानिक तसेच सुरक्षाविषयक स्तरावर विविधांगी उपाययोजना करूनच माओवादाच्या समस्येचा मुकाबला करावा लागेल. त्यांचा शस्त्रे आणि दारूगोळा पुरवठा थांबवण्यासाठी सुरक्षा अभेद्य , सतर्क बनवावी लागेल. याशिवाय माओवादी,  दहशतवादी आणि ईशान्य भारतातील बंडखोर यांच्यातील संगममत तोडावे लागेल. आज सुरक्षा दलाची संख्या  कमी नाही. पण दोन लाखाहून जास्त ताकद असलेल्या जवानांनी आणि पोलिसांनी एकत्र एकाच वेळेस आक्रमण केले पाहिजे. त्यांनी जंगलाच्या आत जाउन तिथे असलेल्या  माओवाद्यांचा शोध घ्यायला हवा.  जिथे माओवादी लपले आहेत अशी माहिती मिळते, तिथे त्या गावांना किंवा वस्त्यांना वेढा घालून शोध मोहीम राबवली पाहिजे.  माओवाद्यांच्या जंगलात होणार्या कारवाया थांबवण्याकरीता त्यांच्या ट्रेनिग कॅपवरती ,अॅडमिनस्ट्रेटिव्ह कॅंपवर हल्ले करावे लागतील.
माओवादाचे आव्हान देशासमोर अनेक वर्षे असणार आहे.माओवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईला २०२१ पर्यंत अपेक्षित यश न मिळाल्यास या मोहिमेची सूत्रे लष्कराच्या हाती देण्यात यावीत.
ही पुस्तिका सर्व संबंधियांनी आणि इतरांनीही वाचावी. व्यूहरचनात्मक आणि डावपेचात्मक संशोधन करून सुरक्षा संबंधियांनी अभियानाची गुणवत्ता सुधारण्याकरता, सर्व संबंधियांत माहितीपूर्ण चर्चा घडून याव्यात म्हणून ही पुस्तिका लिहिली आहे.ह्यात माओवादाच्या विविध पैलूंवर विस्ताराने चर्चा केली आहे. ही पुस्तिका, भारताच्या माओवादीविरोधी अभियानासंबंधीच्या आकलनांची व ऊपाययोजनांची विस्तृत जाण; लोकांत, माध्यमांत, सरकारी संस्थांत,पोलिस,अर्ध सैनिक दलांत आणि देशातही निर्माण करेल. सुरक्षा दलांच्या निरनिराळ्या भूमिकांसाठी त्यांना एक सशक्त पाया हवा असतो, दृष्टिकोन प्रस्थापित करणारे स्पष्ट विधान हवे असते, योजना हवी असते आणि कर्तव्याचे नेमके निर्धारणही हवे असते. माओवादावरील ही पुस्तिका, मुख्य विषयाचे विस्तृत वर्णन करून, संकल्पना स्पष्ट करून, हाच आधार पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.ही पुस्तिका, माओवादाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना उपयुक्त ठरेल.तद्न्य, विचारवंत, बुद्धिवंत, ह्या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी; लेखक सुचवीतात की की देश सुरक्षित करण्याच्या ह्या प्रयत्नात सर्वांनी सहभागी व्हावे. 
ह्या पुस्तिकेत, अनेक प्रश्नांची ठोस आणि समाधानकारक उत्तरे दिली आहेत,अनेक व्यवहार्य आणि संभवनीय शिफारशी केलेल्या आहेत, ज्यांमुळे सुरक्षा अभियानाच्या गुणवत्तेत भर पडेल.
माओवाद संपवण्याकरिता ह्या पुस्तकामुळे सर्व संबंधियांत माहितीपूर्ण चर्चा सुरू व्हावी, हेच या पुस्तिकाचे मुख्य ऊद्दिष्ट आहे.ह्या पुस्तिकेचे नक्कीच चांगले स्वागत होईल. भारतविरोधी विघटनकारी आणि उपद्रवी कारवाया करणार्या शक्तिविषयी जनमानस जागृत करण्यासाठी काही वाटा उचलावा अशी लेखकाची अपेक्षा आहे. ती या पुस्तकाद्वारे किती यशस्वी झाली हे  वाचकांनी ठरवायचे.  

पाने-१३२,मूल्य-१२०/-,प्रकाशक- भारतीय विचार साधना,पुणे
भाविसा भवन,१२१४/१५,पेरुगेट भावे हायस्कुल जवळ,
पुणे-४११०३०,फ़ोन-०२०-२४४८७२२५


No comments:

Post a Comment