Total Pageviews

Tuesday 22 October 2019

लष्कराची अभिनंदनीय कारवाई!-TARUN BHARAT-22-Oct-2019



एयर स्ट्राईकआणि सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्यामुळे, भारताने रविवारी पुन्हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी गुलाम काश्मीरच्या नीलम आणि लिपा घाटीत लष्करी कारवाई केली. या धडाकेबाज कारवाईत पाकिस्तानचे 10 जवान आणि हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मदचे जवळपास दोन डझनावर अतिरेकी मारले गेले. या कारवाईत लष्कराने चार लॉन्चिंग पॅडही उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे या भागात भारतीय लष्कराने सात दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई होती. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असताना भारताने लष्करी कारवाई करत, देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकारने ही लष्करी कारवाई केल्याचा आरोप करायलाही काँग्रेस आता मागेपुढे पाहणार नाही. पण, मोदींसाठी निवडणुकीतील विजयापेक्षा देशाची एकता आणि अखंडता महत्त्वाची आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज पडेल, मोदी पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाहीत. मग, त्या वेळी निवडणुका असो वा नसो. कारण, निवडणुकीतील विजयापेक्षा मोदींसाठी देशहित जास्त महत्त्वाचे आहे. 


भारतात घातपाती कारवाया करण्याचे पाकिस्तान थांबवत नाही, गुलाम काश्मीर भागातून भारतात घुसखोर घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. त्यासाठी युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत पाकिस्तानने शनिवारी रात्रीपासूनच भारताच्या हद्दीत गोळीबार सुरू केला होता. नियंत्रण रेषेवरील उरीच्या तंगधार भागात, या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानवर ही लष्करी कारवाई केली, ती योग्यच म्हटली पाहिजे. भारताकडून वारंवार मार खावा लागत असतानाही पाकिस्तानला शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तानची वागणूक कुत्र्याच्या शेपटीसारखी आहे, कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, अगदी नळीत जरी घातले, तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही, वाकडे ते वाकडेच राहते, तसेच पाकिस्तानचे झाले आहे.


मुळात भारताशी थेट युद्ध करण्याची धमक पाकिस्तानात नाही. आतापर्यंत भारताशी केलेल्या सर्व युद्धांत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. आजही दोन-तीन दिवसांच्या युद्धात भारत पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकतो. भारताविरुद्धच्या थेट युद्धात आपण िंजकू शकत नाही, हे माहीत असल्यामुळे, दहशतवादी कारवाया करत भारताला त्रास देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यामुळेच पाकिस्तान चवताळल्यासारखा वागत आहे. भारताचे काहीही बिघडवण्याची ताकद नसताना, भारताचे बिघडवण्याच्या प्रयत्नात आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहे. पायावर धोंडा पडल्यामुळे छोटी जखम होत नाही, तर पाकिस्तानचा पूर्ण पायच फॅक्चर होत आहे, तरीसुद्धा पाकिस्तानचे डोळे उघडत नाहीत.


आपल्या भारतद्वेषाचे प्रदर्शन पाकिस्तानने आतापर्यंत अनेक जागतिक व्यासपीठांवर करण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याच देशाकडून त्याला सहानुभूतीचे दोन शब्दही मिळाले नाहीत. उलट, प्रत्येक देशाने त्याला झिडकारून लावले, त्याला त्याची जागा दाखवून दिली. पण शहाणपण येईल तो पाकिस्तान कसला? एफएटीएफमध्ये पाकिस्तान एकदा पडला, काही अटींची पूर्तता केली नाही, तर पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भारतविरोधी कारवायांमुळे पाकिस्तानी जनतेत असंतोष उफाळून आला आहे, इम्रान खान यांचे सरकार डळमळीत झाले आहे.


पाकिस्तानी लष्कराची मर्जी आहे, तोपर्यंत इम्रान खान पंतप्रधानपदावर राहू शकतात, म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या तालावर नाचायची तयारी आहे, तोपर्यंत इम्रान खान यांचे पंतप्रधानपद राहणार आहे. ज्या क्षणी ते पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात जातील, त्याच्या दुसर्‍या क्षणी त्यांना एकतर तुरुंगात वा पाकिस्तानबाहेर निर्वासिताचे जीवन जगावे लागेल. सध्या इम्रान खान यांची भूमिका ही पाकिस्तानी लष्कराच्या तालावर नाचण्याची आहे. मात्र, अशी भूमिका घेत इम्रान खान पाकिस्तानचे आणि पाकिस्तानच्या जनतेचे अपरिमित नुकसान करत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय खराब आहे. भीक मागून आणलेल्या पैशावर कशीबशी पाकिस्तानची गुजराण सुरू आहे. मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावी पाकिस्तानी जनतेला हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. विकास तर दूरदूरपर्यंत दिसत नाही.


पाकिस्तानने भारताशी नेहमीच शत्रुत्वाची वागणूक ठेवली आहे. भारताला आपला शत्रू समजून भारताचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान स्वत:चेच नुकसान करून घेत आहे. भारताने नेहमीच पाकिस्तानसमोर मैत्रीचा आणि मदतीचा हात केला आहे आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानने भारताचा मैत्रीचा हात झिडकारून लावला. मुळात पाकिस्तान ज्या देशांना आपले मित्र समजून भारताशी शत्रुत्व घेत आहे, ते देश पाकिस्तानचे खरे मित्र नाहीत, तर मित्रत्वाचा भास निर्माण करत आपला स्वार्थ साधणारे कोल्हे आहेत. पण, पाकिस्तानला म्हणण्यापेक्षा पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आपले हित कशात आहे, ते समजत नाही वा समजत असले, तरी पाकिस्तानी लष्करापुढे ते हतबल आहेत. जोपर्यंत पाकिस्तानी राज्यकर्ते लष्कराच्या इशार्‍यावर नाचत राहतील, तोपर्यंत पाकिस्तानात यापेक्षा वेगळे काही होऊ शकणार नाही.


मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 35-ए आणि 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान पिसाळल्यासारखा झाला आहे. मुळात या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे पाकिस्तानला काही कारण नव्हते. कारण, भारताने पाकिस्तानवर अतिक्रमण केले नव्हते वा हल्लाही केला नव्हता. त्यामुळे राजकीय शहाणपणा म्हणजे मुत्सद्देगिरी दाखवत पाकिस्तानने चूप बसायला पाहिजे होते. पण, पाकिस्तानच्या नेतृत्वात याच राजकीय शहाणपणाचा अभाव आहे.


आधी अटलबिहारी वाजपेयी सरकारने आणि आता नरेंद्र मोदी सरकारनेही पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. अटलबिहारी वाजपेयी तर बस घेऊन पाकिस्तानात गेले होते. पण, पाकिस्तानने त्याची जाणीव कधी ठेवली नाही. भारत हा आपला शत्रू असल्याचा चष्मा पाकिस्तानने आपल्या डोळ्यांवर चढवला आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या डोळ्यांवरून हा चष्मा काढत नाही, तोपर्यंत त्याला भारताने समोर केलेला मैत्रीचा हात कधीच दिसणार नाही. दोष पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या चष्म्यात आहे. या सदोष चष्म्यामुळे पाकिस्तानला जे खरे मित्र आहे, ते शत्रू वाटतात आणि जे शत्रू आहेत, ते मित्र वाटतात. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आपल्या डोळ्यांवरून हा चष्मा काढण्याची गरज आहे. हा चष्मा काढल्यावर त्यांना नेमकी वस्तुस्थिती काय आहे, आपल्या देशाचे हित कशात आहे, याची जाणीव होईल. पाकिस्तान भारताविरोधात ज्या दहशतवादी संघटनांचा वापर करत आहे, त्या भस्मासुरासारख्या पाकिस्तानच्याच मुळावर उठल्या आहेत. भारताचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान स्वत:चे नुकसान करून घेत आहे. पण, पाकिस्तानला याची जाणीव नाही, हे दुर्दैव आहे.


Monday 21 October 2019

काश्मीरचे वास्तव-Source:तरुण भारत6 Oct 2019-एनयूजे (आय) प्रतिनिधी मंडळ |-MUST READ



काश्मीरहून दिल्लीला पाठविण्यात येणार्‍या बातम्या हमखास एकतर्फी आणि फुटीरतावाद्यांची बाजू घेणार्‍या असल्याचे दिसून येते. कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर अनेक प्रसिद्धिमाध्यमांनी तिथल्या पत्रकारांच्या हवाल्याने तिथे ‘गंभीर परिस्थिती’ असल्याच्या बातम्या देशभरात प्रसारित केल्या. त्यात किती तथ्यांश होता आणि खरेच का सर्वसामान्य काश्मिरी भयाच्या सावलीत जगत आहे, या बाबींची शहानिशा करण्यासाठी एनयूजे (आय)च्या प्रतिनिधी मंडळाने श्रीनगरचा दौरा केला. त्यातून काश्मीरचे जे वास्तव त्यांना दिसले, ते या लेखात मांडले आहे. या प्रतिनिधी मंडळात- हितेश शंकर, मनोज वर्मा, हर्षवर्धन त्रिपाठी, राकेश आर्य, सचिन बुधौलिया व आलोक गोस्वामी हे पत्रकार सहभागी होते.
कलम ३७० च्या बेडीतून मुक्त झाल्यानंतर काश्मीर कसा दिसतो, हा प्रश्‍न सामान्य भारतीयांप्रमाणेच आमच्याही मनात होता. आंतरराष्ट्रीय मीडिया ते दिल्लीत बसलेले लोक सांगत आहेत की, काश्मीरमध्ये प्रत्येक गोष्टीवर जवळपास बंधन आहे, तेव्हा शंका येणे स्वाभाविकच होते. या अशाच शंकांमुळे नॅशनल जर्नलिस्टस् युनियन (इंडिया) म्हणजे एनयूजे (आय)ने ठरविले की, श्रीनगरला जाऊन तिथली परिस्थिती आपल्या डोळ्यांनी बघणे आवश्यक आहे. तसेही, अफवांवर विश्‍वास ठेवण्याची आम्हाला इतकी वाईट सवय आहे की ‘कावळा कान घेऊन उडाला’सारखी अफवा दुसर्‍याच्या कानात सांगण्याआधी आम्ही स्वत:च्या कानाला हात लावूनही बघत नाही. अशाच अफवांचे हे तंत्र आणि मानसिकता यांना ध्यानात घेऊन आम्ही ठरविले की श्रीनगरला गेले पाहिजे आणि श्रीनगरला जाण्यासाठी आम्ही १० सप्टेंबरचा दिवस निश्‍चित केला. दोन दिवसांच्या या दौर्‍यात आमचा प्रयत्न होता की, कमीतकमी श्रीनगरच्या प्रत्येक सडकेवर जाऊन आम्ही तिथली परिस्थिती बघावी. सोबतच जे लोक भेटू शकतील त्यांना भेटावे.
थोडी भीतीही होती की, कदाचित आम्हाला अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि इतर फुटीरतावाद्यांसारखे श्रीनगरमध्ये नजरकैदेतच राहावे लागेल की काय! दिल्लीत काही पत्रकारांनी तर पत्रकार परिषद घेऊन ठोकून दिले होते की, खोर्‍यात वृत्तपत्रेदेखील निघत नाही आहेत. यावर एक याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली की, खोर्‍यात पत्रकारांना काम करू दिले जात नाही. आमची काळजी याच दोन्ही गोष्टींवरून वाढली होती की, खरेच काश्मिरी घरांमध्ये बंद आहेत? खरेच का संपूर्ण काश्मीरला तुरुंगात परिवर्तित करण्यात आले आहे? आणि खरेच का पत्रकारांना त्यांचे काम करू दिले जात नाही? सरतेशेवटी मोहर्रमच्या दिवशी एनयूजे (आय)चे सहा सदस्यीय प्रतिनिधी मंडळ श्रीनगरला जाण्यास निघाले. दिल्ली विमानतळावरील सकाळी ६ वाजताच्या उड्डाणाचे दृश्यच आमच्या सर्व शंकाकुशंकांचे निवारण करणारे होते. या उड्डाणातील जवळपास ७० टक्के जागा भरल्या होत्या. खरेतर, दिल्ली आणि चेन्नईहून प्रकाशित होणार्‍या काही वृत्तपत्रांनी मोहर्रमच्या दिवशी संचारबंदीची बातमी छापली होती. परंतु, विमानातील ७० टक्के जागा भरलेल्या पाहून आम्हाला एवढी तर खात्री झाली की, सामान्य काश्मिरी बंधक नाही आहेत. परंतु, पत्रकार म्हणून लगेच मनात शंका आली की, काश्मिरींना खोर्‍यातून परताना कुठली मोठी समस्या तर नाही ना! कारण आम्ही तर आता दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानात बसलो होतो. असो.
श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचे विमान निर्धारित वेळी पोचले. वैमानिकाने हिंदी-इंग्रजीत उद्घोषणा केली की, हा लष्करी विमानतळ असल्याकारणे येथे कुठल्याही प्रकारचे छायाचित्र अथवा चलचित्रण घेण्याची परवानगी नाही. विमानातून बाहेर पडणार्‍या एका सज्जनाने विचारूनच घेतले- ‘‘फिरण्यासाठी आलात का?’’ मी म्हटले- ‘‘हो.’’ उत्तराची वाट न बघता ते म्हणाले- ‘‘आनंदात फिरा. हरताळ असल्यामुळे दुकाने वगैरे बंद सापडतील, परंतु बाकी सर्व व्यवस्थित आहे. काश्मिरी लोक पर्यटकांचे खूप आदरातिथ्य करतात.’’ दिल्लीत उत्पन्न झालेल्या आमच्या शंकांना हा दुसरा झटका होता. जे सज्जन भेटले त्यांचे नाव होते फारुख. एक एनजीओ चालवितात. दिल्ली-श्रीनगर येत-जात असतात. फारुख यांना आम्ही पत्रकार आहोत, हे काही सांगितले नाही. त्यांच्यासोबत आम्ही एक छायाचित्र काढले आणि विमानतळातून बाहेर आलो.
शंकांचे निरसन
विमानतळातून बाहेर येताच आमचे स्वागत करणारा हसर्‍या अमिताभ-रेखा यांचा जुना मोठा फोटो दिसला. बाहेर पडल्यावर लक्षात आले की, दिल्लीहून श्रीनगरचे अंतर विमानाने भलेही दीड तासाचे असले, तरी दिल्लीहून श्रीनगर जसे दिसत होते आणि विमानतळाहून बाहेर निघताच जे श्रीनगर आम्ही पाहिले, त्यात कुठलेच साम्य नव्हते. बाहेर फडकणार्‍या तिरंग्यासमोर शेकडो लोक आपल्या परिचितांना-मित्रांना घेण्यासाठी, दिल्ली किंवा देशातील इतरही विमानतळावर ज्याप्रमाणे हातात फलक घेऊन अथवा न घेता उभे असतात, तसेच इथेही उभे होते. आम्ही जम्मू-काश्मीरच्या एका पोलिस जवानाला विचारले- ‘‘इथे छायाचित्र काढू शकतो का?’’ त्याने हसत उत्तर दिले- ‘‘खुशाल काढा.’’ आम्ही छायाचित्र काढले आणि शहराकडे निघालो. विमानतळावर सुरक्षेची प्रचंड व्यवस्था होती. आम्ही या आधीही श्रीनगरला आलो होतो. अशी सुरक्षा व्यवस्था या विमानतळावर सामान्य बाब आहे. सकाळी ८ वाजता श्रीनगरच्या रस्त्यांवरून, इतर शहरात दिसतात तशा, दूध, ब्रेडच्या गाड्या फिरत होत्या. बर्‍याच फ्लाय ओव्हरच्या खाली आणि चौकात सामान्य काश्मिरी सकाळच्या मखमली उन्हात गप्पा करतानाही दिसत होते. श्रीनगरच्या रस्त्यांवरून फिरताना आमचा शंकारूपी फुगा फुटला होता. वातावरणात अथवा कुठल्याही काश्मिरीच्या चेहर्‍यावर, कुठेही, जराशीही भीती अथवा शंका आम्हाला दिसली नाही. आम्ही मोहर्रमच्या दिवशी श्रीनगरला पोचलो होतो, हे लक्षात ठेवा.
पर्यटक जात आहेत
श्रीनगरच्या दौर्‍यात गेलेल्या एनयूजे (आय)च्या प्रतिनिधी मंडळात सहभागी आम्हा पत्रकारांचा प्रयत्न होता की, समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधी समूहाशी आमची भेट व्हावी आणि आश्‍चर्य म्हणजे, आमची भेट त्या वर्गाशीही झाली जो काश्मीरचा अभिन्न अंग आहे. मोहर्रमच्या दिवशी त्या वर्गाशी आमची भेट होऊ शकेल याची आम्हाला अजीबात कल्पना नव्हती. श्रीनगर शहरात आम्हाला वाटले की, ज्या शंकराचार्य पहाडावरून संपूर्ण श्रीनगर दिसते, सर्वात आधी तिथल्या शंकराचार्य मंदिरात जावे. मंदिरात आम्हाला कर्नाटकाहून आलेल्या मित्रांचा गट भेटला. या गटात महिला व पुरुष दोन्ही होते आणि सर्व लहानपणीचे मित्र होते, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर भेटले होते. सर्व एकत्र श्रीनगर फिरायला आले होते. कुठल्याही अडथळ्याविना, भीतीशिवाय पृथ्वीवरील या स्वर्गाचा आनंद घेत असलेल्या त्या पर्यटकांना आम्ही विचारले- ‘‘काही कुठे त्रास झाला का?’’ त्यांचे उत्तर होते- ‘‘दुकाने बंद दिसलीत, हीच एक अडचण आहे. बाकी सर्व ठीक आहे. तसेही आम्हाला फिरविणारा इथलाच आमचा एक मित्र आहे.’’
कर्नाटकच्या पर्यटकांना फिरविणार्‍या त्या काश्मिरी मुसलमानाने, दिल्लीत बसून श्रीनगरची स्थिती इतकी खराब का दिसते, ते स्पष्ट केले. आमच्या एका मित्राने श्रीनगरच्या स्थानिक मुसलमानाचे बोलणे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तर तो नाराज होऊन म्हणू लागला- ‘‘दिल्लीच्या सरकारांप्रमाणे तुम्हीदेखील आमचा विश्‍वास तोडत आहात. आम्ही तुम्हाला मित्राप्रमाणे सर्व सांगत आहोत आणि तुम्ही आमचे बोलणे रेकॉर्ड करत आहात?’’ आम्ही लगेच त्याचे रेकॉर्ड केलेले बोलणे तिथल्या तिथे त्याच्या समोरच मिटवून टाकले. म्हणून आम्ही इथे त्याचे नावदेखील लिहिले नाही. परंतु, खोर्‍यातील पहाड आणि रायसीना पहाड (दिल्ली) यांच्यातील हे असे काहीसे नाते गेल्या ७० वर्षांत तयार करण्यात आले होते. कलम ३७०, नात्याच्या त्या कटुतेला अधिक कटु बनविणारे बनले होते आणि याचा वापर फुटीरतावादी, दहशतवादी आणि परिवारवादी नेते मोठ्या खुबीने करत होते. श्रीनगरमध्ये आम्ही विद्यार्थी-विद्यार्थिनी, सरपंच, अल्पसंख्यक तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींशी भेटलो. त्यांची गोष्ट आम्ही नंतर करू, परंतु आधी आमचा काश्मीर प्रेस क्लबचा अनुभव सांगतो.
पत्रकारांची अडचण
प्रतिनिधी मंडळाने खोर्‍यातील पत्रकारांची स्थिती, ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची माहिती घेतली. आम्ही काश्मीर प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना भेटलो. रोजच्या बातम्या मिळविण्यासाठी परिस्थिती कशी आहे, ते जाणून घेतले. खोर्‍यातील पत्रकारांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, याचा एक दुसरा पैलू हादेखील आहे की, परिस्थिती कुठलीही असो, वृत्तपत्रे छापली जात आहेत आणि दुसर्‍या माध्यमांच्या मार्फत काम करणारे लोकदेखील आपापल्या बातम्या सतत लोकांपर्यंत पोहोचवीत आहेत. काश्मीर प्रेस क्लबमध्ये काही पत्रकारांनी आमचे आदरातिथ्य केले. परंतु, कुणास ठाऊक कुठल्या शंकेने, आम्ही दिल्लीला पोहोचताच फोन आला- ‘‘आमची छायाचित्रे छापू नका.’’ यावरून, खोर्‍यातून येणार्‍या प्रत्येक बातमीपत्रावर किती दबाव असेल, याचा अंदाज लावता येईल.
तिथल्या पत्रकारांचे म्हणणे होते की, कमीतकमी मान्यताप्राप्त पत्रकारांना तरी संचार साधने उपलब्ध असावीत. परंतु, आम्हाला तिथेच समजले की, सूचना आणि जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत कुठलाही पत्रकार विनाअडथळा आपली बातमी पाठवू शकतो. पत्रकारांना होत असलेल्या त्रासाची सर्व माहिती, प्रतिनिधी मंडळाने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिली आणि त्यांनी आश्‍वासन दिले की, बातम्या गोळा करण्यात काही अडचणी येत असतील तर त्या दूर केल्या जातील.
एनयूजे (आय)च्या प्रतिनिधी मंडळाने, शेवटी श्रीनगर आणि खोर्‍याच्या अन्य भागांतील परिस्थिती कशी आहे आणि त्यात कशी सुधारणा होत असल्याचे दिसत आहे किंवा मग कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिनिधी मंडळाला एक मोठी समस्या तिथल्या शाळा बंद असल्याची दिसली. विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्पष्ट मानणे आहे की, कलम ३७० समाप्त तर झाले आहे आणि आता त्याच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे. परंतु, सोबतच हाही प्रश्‍न होताच की, ३७० अंतर्गत त्यांना जे अधिकार मिळाले होते, ते त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत का? विद्यार्थी-विद्यार्थिनींशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली की, स्थानिक नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी काश्मीरच्या लोकांमध्ये ३७० च्या बाबतीत गैरसमजुती निर्माण करून ठेवल्या आहेत आणि या कारणामुळेच त्यांना वाटते की, ३७० समाप्त झाल्यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा आली आहे. परंतु, आमच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांना सांगितले की, आता तुम्हाला जास्तीचे अधिकार मिळत आहेत, तर ही त्यांच्यासाठी नवीन माहिती होती. सोबतच, विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये केंद्र सरकारपेक्षा अधिक क्रोध मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबावर होता. स्थानिक नेत्यांवरचा त्यांचा विश्‍वास तर केव्हाचाच उडाला आहे.
सरपंचांची भूमिका
एक प्रश्‍न मनात होता की, अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवल्यानंतर, खोर्‍यातील राजकीय प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली आहे का? याचे उत्तर जम्मू-काश्मीर पंचायत राज चळवळीच्या सदस्यांकडून मिळाले. चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्टच सांगितले- ‘‘आम्ही तर तेव्हाही फुटीरतावाद्यांशी लढलो, त्यांच्याविरुद्ध आणि हिंदुस्थानसोबत उभे राहिले. परंतु, मुख्य धारेतील राजकीय पक्षांनी (पीडीपी व नॅकाँ) मात्र पंचायत निवडणुकांवर बहिष्कार घातला होता.’’ जम्मू-काश्मीरमधील सरपंचांनी तसेच पंचांनीच लोकशाही व राजकीय प्रक्रियेला अधिक मजबूत केले आहे. म्हणून काश्मीरच्या जनतेसोबत संवाद साधण्यासाठी, मुफ्ती व अब्दुल्ला कुटुंबापेक्षा खोर्‍यातील पंच आणि सरपंचच अधिक कामी पडू शकतात. जम्मू-काश्मीर पंचायत राज चळवळीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, आतापर्यंत सर्वाधिक जीव पंचांनी गमविले आहेत. खोर्‍यात १२० हून अधिक पंचांना दहशतवाद्यांनी मारले आहे. राजकीय कार्यकर्ता गुलाम मोहिउद्दीन सोफी यांनी, प्रशासनात पंचांची भूमिका वाढविण्याची मागणी केली आणि म्हटले की, केंद्र सरकारला हिंदुस्थानासोबत उभे राहिलेल्या पंचांना आणि सरपंचांना विश्‍वासात घेऊनच कुठलेही काम करायला हवे. त्यांनी म्हटले की, कोण हिंदुस्थानसोबत आहे आणि कोण राष्ट्रविरोधी याची ओळख सरकारने पटवायला हवी. पंचायत राज चळवळीचे आघाडीचे नेते आणि २० वर्षांपासून सरपंच असलेले बशीर मलिक यांचे म्हणणे होते की, हिंदुस्थानाचे भक्त असलेल्या सरपंचांच्या भूमिकेकडे केंद्र सरकारने कानाडोळा करायला नको.
एक गोष्ट मात्र साफ लक्षात आली की, काश्मीरच्या लोकांना आताही प्रशासनाचा सहयोग मिळत नाहीये आणि काही ठिकाणी तर प्रशासनात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले नोकरशाह, केंद्र सरकारच्या योजनांची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करीत आहेत. काश्मिरींना भयभीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून, अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या या अधिकार्‍यांना हटविले पाहिजे आणि त्यांच्या जागी नवे व काम करणार्‍या अधिकार्‍यांना आणले पाहिजे. हे आवश्यक आहे. आम्ही ही बाबदेखील राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या ध्यानात आणून दिली. त्याचा परिणाम असा झाला की, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.
प्रतिनिधी मंडळाला आश्‍चर्यचकित करणार्‍या बर्‍याच गोष्टी समजल्या. जसे, बर्‍याच ठिकाणच्या शाळेतील अध्यापकच, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या मदतीने शाळा बंद करू इच्छितात. कारण, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या ‘युती’ची इच्छाच नाही की शाळा सामान्य रीतीने सुरू राहव्यात. बर्‍याच ठिकाणी तर मुले शाळेत जातानाही दिसले; परंतु अध्यापक वर्ग मात्र, संचारबंदी, हरताळ किंवा फुटीरतावाद्यांच्या खोट्या भीतीचे कारण सांगून शाळेत येण्याचे टाळत आहेत.
शिखांच्या वेदना
प्रतिनिधी मंडळ खोर्‍यातील अल्पसंख्यक शिखांनाही भेटले. शिखांचा कारभार आताही व्यवस्थित सुरू आहे. असे असले तरी, बहुतेकांचा असलेला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आता बराच कमी झालेला आहे. त्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, फुटीरतावाद्यांनी शीख ट्रकमालकांना नेहमीच त्रास दिला आहे. आता खोर्‍यातील अल्पसंख्यकांना, नव्या जम्मू-काश्मिरात त्यांची सुरक्षितता हवी आहे. सोबतच त्यांना आशा आहे की, पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरची मूळ संस्कृती परत येईल. सेवानिवृत्त इंजिनीअर कुलदीप सिंग, बारामुलाचे ठेकेदार हरजितसिंग, बडगामचे विक्रम सिंग आणि त्राल येथील दारासिंग, शीख प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत होते. त्यांनी सांगितले की, खोर्‍यात आजही सुमारे ७० हजार शीख आहेत. येथे सत्तेत असलेल्या सरकारांनी अल्पसंख्यकांचे कधीच हित बघितले नाही. याचे एक उदाहरण देत त्यांनी सांगितले की, फतहकदल गुरुद्वाराची जमीन २००३ च्या आधीच्या सरकारने अधिग्रहित केली आहे. त्यांनी सांगितले की, आतादेखील लष्करासोबत काम करणारे बहुतांश ट्रान्सपोर्टर शीखच आहेत. परंतु, आज त्यांची मुले दुसर्‍या व्यवसायाच्या शोधात आहेत आणि सुमारे पाच हजार मुले पदव्युत्तर पदवी घेतलेले आहेत. शीख प्रतिनिधी मंडळाचे स्पष्ट म्हणणे होते की, अस्सल काश्मिरी संस्कृती आणण्यावर केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे. त्यांनी सांगितले की, जेव्हा काश्मिरी पंडितांना खोर्‍यातून हाकलण्यात आले, त्या वेळी सुमारे १४ हजार शिखांनाही घर सोडून पळावे लागले होते. ते गावांतून पळून श्रीनगरला आले होते.
सध्या काश्मीर खोर्‍यात ज्या काही थोड्या काश्मिरी पंडितांची घरे वाचली आहेत, त्यांच्यातील प्रत्येक वस्तू दहशतवादी घेऊन गेले आहेत. त्या वेळीदेखील शिखांनी फुटीरतवाद आणि दहशतवादाचा सामना केला होता; परंतु आज शिखांची स्थितीदेखील काश्मिरी पंडितांसारखी होत आहे. कारण कुठल्याही प्रकारच्या संधी त्यांना मिळत नसल्याने त्यांची तरुण पिढी खोर्‍यातून बाहेर जात आहे. काश्मीरला मिळणार्‍या पॅकेजमध्ये शीख लोक हिस्सा मागत आहेत. ३७० हटल्यानंतर असे वाटत आहे की, भारत सरकारचे राज्य आले आहे, असे शिखांचे मानणे आहे.
एनयूजे (आय) प्रतिनिधी मंडळाला लक्षात आले की, खोर्‍यातील लोकांना ३७० बाबत खरी माहिती देण्याचे कामच झाले नाही. त्याचा भावनात्मक मुद्दा बनवून ठेवण्यात आला. आता त्यातील बहुतेक लोकांना हे समजून येत आहे, ही चांगली बाब आहे. खोर्‍यातील तरुण, ३७० हटल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याच्या विकासात आणि पुढे जाणार्‍या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित आहेत आणि त्याची इच्छा आहे की, खोर्‍यातील परिस्थिती लवकरात लवकर सुधरावी. येथे नवे उद्योग यावेत, शिक्षण संस्था याव्यात, विद्यापीठे उघडली जावीत आणि खोर्‍यातील वातावरण पुन्हा एकदा चांगले व्हावे. खोर्‍यातील लोकांची इच्छा आहे की, कमीतकमी केंद्र सरकारकडून तरी, जमीन आणि त्यांच्या अधिकारांबाबत एक स्पष्टता यावी.
शियांना आहे तक्रार
मोहर्रमच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबरला आम्ही श्रीनगरच्या, ज्याला डाऊनटाऊन नावाने ओळखले जाते, त्या वस्तीत गेलो. बातम्यांच्या संदर्भात दिल्ली श्रीनगरपासून किती दूर चालली जाते, याचा अंदाज आम्हाला श्रीनगरच्या शिया मुसलमानांशी झालेल्या चर्चेनंतर आला. १४ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिया मुसलमानांचे राज्य सरकारप्रशासनात कुणी प्रतिनिधीच नाही, याचा आपण विचार करू शकतो का? कारस्थान करून, राज्यातील सर्व सरकारांनी शिया मुसलमानांना प्रत्येक ठिकाणाहून बाहेर काढले, अगदी वक्फ बोर्डातूनही. शियांना त्यांचा स्वतंत्र मुस्लिम औकाफ ट्रस्ट हवा आहे. शिया मुसलमानांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या करीनेदार कलाकारी, नक्काशी, पेपरमैशे उद्योगांना कसे पद्धतशीर उद्ध्वस्त करण्यात आले, याची वेदनामय कहाणी सांगितली. कोट्यवधी रुपयांची निर्यात होणार्‍या शाल बनविण्याच्या कलेलाही उद्ध्वस्त करण्यात आले. डल सरोवरात शिया मुसलमानांची एकही हाऊसबोट नाही. या गोष्टी क्वचितच दिल्लीच्या मुख्य धारेतील मीडियात आल्या असतील. मोहर्रमच्या दुसर्‍या दिवशी आम्ही शहराच्या मध्यवस्तीतून डाऊनटाऊनला गेलो होतो. संपूर्ण रस्त्यात, देशातील दुसर्‍या एखाद्या शहरात असते तशीच साधारणत: रहदारी होती. रैनावाडीत तर आमची गाडी जाममुळे फसलीदेखील होती. आम्ही सर्वांनी याचा व्हिडीओ बनविला आहे.
व्यवहार सुरू आहे
आमचे असे मत झाले की, सध्याची राजधानी श्रीनगरला एक मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करून, सरकारने नवी राजधानी निर्माण करण्यावर विचार केला पाहिजे. चिनाबवरील पुलाने जोडले तर काजीगुंडसारखे स्थानही नव्या राजधानीसाठी उपयुक्त होऊ शकते. आमच्या वाटेवर अनेक दुकाने जवळपास बंद होती, परंतु औषध, जनरल स्टोर्सची उघडी दुकाने आशा जागवीत होती. सर्व एटीएम सुरू होते आणि त्यात पैसेदेखील होते. सडकेच्या बाजूला भरणारे पटरी बाजार, इतर शहरांप्रमाणे व्यवस्थित सुरू होते. प्रत्येक दुसर्‍या चौकात टेलिफोन बूथची सोय होती. बंदच्या काळात काश्मिरींनी व्यवसायाचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. बंद शटरसमोर बसलेले तरुण, मागणी केली तर दुकानाचे शटर उघडून सामान देतात आणि नंतर लगेच शटर बंद करून पुन्हा दुकानासमोर बसून राहतात. अशाच एका शटर बंद असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही भोजन घेतले. रेस्टॉरंटमध्ये त्यावेळी सुमारे २५-३० जण कुटुंबासह भोजन घेत होते.
३७० नंतर
खोर्‍यातील अधिकांश लोक मानतात की, केंद्र सरकारच्या घोषणा येथे क्रियान्वित होत नाहीत. म्हणून केंद्र सरकारने पंचायतींची मदत घेतली पाहिजे. काश्मिरी लोक शांतीने राहू इच्छितात आणि फुटीरतावाद्यांनी काश्मिरींच्या या सौम्य प्रवृत्तीचा फायदा घेतला. भावनात्मक मुद्दे समोर करून त्यांचे दोहन केले. सोबतच, स्थानिक सरकारी नोकरशाहीलादेखील परिस्थिती सुधरावी असे वाटत नाही. कलम ३७० तर समाप्त झाले, परंतु ७० वर्षांत लोकांच्या मनात जे भरवले गेले ते समाप्त करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात तळागाळातील लोकांपर्यंत अभियान सुरू करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावात आणि अंतर्गत भागात फलके लावून वस्तुस्थिती सांगण्याची गरज आहे. ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांपुढे किती संधी मोकळ्या झाल्या आहेत, हे सांगण्याची आवश्यकता आहे. एकूणच, प्रतिनिधी मंडळाच्या स्पष्टपणे लक्षात आले की, खोर्‍यातील जनजीवन सामान्य होत आहे आणि बहुतांश लोक कलम ३७० ला हटविण्याच्या घटनेला मागे टाकून पुढे निघून गेले आहेत.
(नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट (इंडिया) श्रीनगरहून परतल्यावर

Sunday 20 October 2019

मोकळे गुन्हेगार अन् दुर्दशेत बंगाल-तरुण भारत20 Oct 2019-हितेश शंकर |



याच वर्षी १९ मे ते २१ जून कालावधीत पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय-वैचारिक हिंसा आणि संघर्षाच्या १५० घटना घडल्या आहेत. काही लोक यालाही सर्वच राजकीय पक्षांचा एकत्रित गोंधळ सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा अहवाल सांगतो की हिंसेत ज्या १६ लोकांचा जीव गेला त्यात १५ जण संघ-भाजपाचे कार्यकर्ते होते. आजच्या स्थितीत लोकांना ममता बॅनर्जींकडून काहीच अपेक्षा नाही. प्रश्‍न आहे, इतर राजकीय पक्ष, विशेषत: बंगालमधील भाजपाच्या सर्व खासदारांच्या मतदारसंघातील रक्ताचे अश्रू ढाळणार्‍या जनतेला कसा दिलासा देणार.
उत्सवी वातावरणात विरजण कसे पडते, हे पश्‍चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील पाल परिवाराच्या परिचितांना विचारावे! कुठे दिवाळीसाठी दिवे लावण्याची तयारी सुरू होती अन् कुठे कुळातील सर्व दीपक एकसाथ विझून गेले!
मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या जियागंज पोलिस ठाण्याच्या कांजीगंज भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बंधुप्रकाश पाल, त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आणि गर्भवती पत्नी यांची निर्घृण हत्या, बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती बेलगाम आहे हे दाखविण्यास पुरेशी आहे.
बंधुप्रकाश एवढ्यातच संघाशी जुळलेले उत्साही आणि आघाडीचे कार्यकर्ता होते. ते आणि त्यांचे कुटुंब कुठल्या कारणाने, कुणा लोकांच्या डोळ्यात खटकत होते, हेतर अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु या घटनेच्या ४८ तासांनंतरही दिशाहीन राहिलेल्या पोलिसांची तत्परता बघता, या एवढ्या नृशंस घटनेनेदेखील शासन-प्रशासनाची सुस्ती गेली नाही, हे मात्र दिसून आले.
सर्वच घटनांची नाळ एकमेकांशी जुळो वा न जुळो, घटनांची संख्याच इतकी आहे की लोक याला विशिष्ट वैचारिक टोळीला, उन्मादी व गुंड तत्त्वांना तृणमूल काँग्रेसच्या राज्यात मिळत असलेल्या राजकीय आश्रयाशी जोडू बघत आहेत. राज्य सरकारकडून सतत उपेक्षा, असुरक्षा झेलणार्‍या या समाजाचा हा असा निष्कर्ष अस्वाभाविकही म्हणता येणार नाही. एका पाठोपाठ दुसरी, सतत घडत असलेल्या अशा अनेक घटना, ममता बॅनर्जींच्या राज्यात पोसलेल्या अशा हिंसक असहिष्णुतेच्या साक्षीदार आहेत ज्या भारत, भारतमाता, राम-दुर्गा, संघ-भाजपा सारखे शब्द जिभेवर येताच चाकू-सुर्‍यांना सहाणेवर घासणे सुरू करतात.
ज्या राज्याची मुख्यमंत्री सडकेवर रामनामाचा जयघोष करणार्‍या मुलाबाळांवर ओरडत-किंचाळत धावून जात असेल, त्याच राज्यात ६ जुलैला २४ वर्षीय कृष्णा देवनाथची, केवळ त्याने‘जय श्रीराम’चा नारा लावला म्हणून उन्मादींच्या जमावाने घेरून हत्या केली जाते. याला काही योगायोग म्हणता येणार नाही. भारतमाता की जय म्हणणारे बंधुप्रकाश किंवा जय श्रीराम म्हणणारे कृष्णा, या काही एकट्या-दुकट्या घटना नाहीत, हे लक्षात ठेवा. याच वर्षी ६ एप्रिलला नैहाटी, बीरभूममध्ये ललटू दास याने सायकलवर हिंदू ध्वज लावला म्हणून पोलिस त्याला पकडण्यास गेले. पोलिस पाहून घाबरलेला ललटू दास सडकेवर पडला तर मागून आलेल्या ट्रक खाली चिरडला गेला. ७ ऑक्टोबरला नानूर (बीरभूम) येथे भाजपा कार्यकर्ता अनिमेष चक्रवर्तीची हत्या देखील तृणमूल काँग्रेसच्या गुंडानीच केली होती. परंतु, बंगालमध्ये (किंवा बाहेरही) ज्यावेळी रा. स्व. संघ, भाजपा किंवा राष्ट्रीय विचार मानणार्‍या लोकांना माथेफिरू राजकीय गुंड लक्ष्य करतात, तेव्हा हे ‘लिबरल’ कुठल्या ढोलीत लपून बसतात, कळत नाही. आणि… मजहबी माथेफिरू गुंड जे करतात तेच कृत्य एखाद्या राज्यातील पोलिस देखील कसे काय करू शकतात? मग फरकच काय गुंड आणि प्रशासनात? प्रशासन आहे कुठे? या प्रकारच्या घटनांना कोण लगाम घालणार?
बंगालच्या या दुर्दशेवर स्थानिक मीडियाने भले ही संकोचाने का होईना पण अनेक घटनांच्या बातम्या दिल्या आहेत; परंतु स्वत:ला मुख्य धारा म्हणवून घेणारा मीडिया, या राज्याच्या सतत ढासळत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर चर्चा करण्यास घाबरत आहे. फक्त एक अपवाद आहे. मीडिया घराण्यांनी नाही, तर देशाचे जुने-प्रतिष्ठित पत्रकार संघटन- नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (इंडिया)ने बंगालमधील राजकीय हिंसा आणि संघर्षाच्या घटनांचा मुळातून शोध घेतला आणि त्याचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार याच वर्षी १९ मे ते २१ जून कालावधीत पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय-वैचारिक हिंसा आणि संघर्षाच्या १५० घटना घडल्या आहेत. काही लोक यालाही सर्वच राजकीय पक्षांचा एकत्रित गोंधळ सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा अहवाल सांगतो की हिंसेत ज्या १६ लोकांचा जीव गेला त्यात १५ जण संघ-भाजपाचे कार्यकर्ते होते. संघर्षात जखमी होणार्‍या १५६ लोकांमध्ये तृणमूल काँग्रेसचे केवळ १६ कार्यकर्ते होते. आजच्या स्थितीत लोकांना ममता बॅनर्जींकडून काहीच अपेक्षा नाही. प्रश्‍न आहे, इतर राजकीय पक्ष, विशेषत: बंगालमधील भाजपाच्या सर्व खासदारांच्या मतदारसंघातील रक्ताचे अश्रू ढाळणार्‍या जनतेला कसा दिलासा देणार?
निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पश्‍चिम बंगालमधील सातत्याने हिंसक होत असलेल्या परिस्थितीची देश-समाज, राजकारण आणि मीडियाने दखल घेणे, काळाची गरज आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची ही जबाबदारी आहे की पश्‍चिम बंगालकडेही त्याने पावले उचलावीत. हत्या व ‘मॉब लिंचिंग’च्या आकड्यांचा पहाड उभा करणार्‍या गटानेही याची दखल घ्यावी

Saturday 19 October 2019

आरोग्यम् धनसंपदा : वृद्धत्वातील आहार-सुकेशा सातवळेकर-OLD AGE DIET -LOKSATTTA-


बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि त्यानंतर येणारं वार्धक्य या जीवनक्रमातील अतिशय नैसर्गिक शारीरिक अवस्था आहेत. तरुणपणी आहार आणि जीवनशैली चुकीची असेल तर नंतरच्या काळात कितीही प्रयत्न केले तरी झालेलं नुकसान भरून काढणं म्हातारपणी शक्य होत नाही.  उतारवयात शरीराची वाढ आणि विकास थांबलेला असतो. शरीरपेशींची वाढ होत नाही; पण झीज भरून काढून दुरुस्तीची क्रिया चालू असते. त्यामुळे योग्य प्रमाणात, संतुलित आणि परिपूर्ण आहाराची गरज या वयातही असते.
काय असावा परिपूर्ण आहार..
‘‘अरे, मला नको सांगू. तुझ्यापेक्षा दोन पावसाळे जास्त पाहिलेत मी. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ म्हणत अश्रू ढाळत बसणाऱ्यांपैकी मी नाही. पुराच्या पाण्यात उडय़ा टाकून पोहलोय. उदबत्ती लावून जोरबठका मारल्यात. व्यायाम झाला, की चांगलं शेर-दोन शेर बदामाचं दूध प्यायचो आणि मग कामाला लागायचो.’’ वयाची जवळ-जवळ आठ दशकं पूर्ण केलेल्या दोन मित्रांमधला प्रेमळ संवाद कानावर पडत होता. ‘‘अरे, हो हो माहित्येय. माझे पण काळ्याचे पांढरे काही रंगपंचमीच्या रंगाने नाही झालेत बरं. आयुष्यातील चढ-उतारांना सामोरं जाऊन, निधडय़ा छातीवर सुखंदु:खं झेललीत. तब्येतही सांभाळलीय, अजूनही ताठ चालतोय. रोज पळत टेकडी चढत होतो, थंडीतही घामाच्या धारा लागायच्या. शुद्ध, सात्त्विक, चारीठाव खाणं-पिणं असायचं. झोपणं, उठणं, कामधाम, व्यायाम सगळं नित्यनेमाने, अगदी घडय़ाळाच्या काटय़ाबरहुकूम..’’ अशा संवादातून अगदी सहज या ज्येष्ठांच्या तब्येतीचं रहस्य उलगडलं.
खरंच, आनंदी वृद्धत्वाची गुरुकिल्ली, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीमध्ये दडलेली आहे. आरोग्यपूर्ण वार्धक्यासाठी, तारुण्यात तब्येत आणि स्वास्थ्य व्यवस्थित सांभाळायला हवं, हो ना? तरुणपणी आहार आणि जीवनशैली चुकीची असेल तर पुढच्या काळात कितीही प्रयत्न केले तरी झालेलं नुकसान भरून काढणं म्हातारपणी शक्य होत नाही. स्वास्थ्यपूर्ण जीवनशैलीच्या तारुण्यातल्या गुंतवणुकीचा परतावा वार्धक्यात उपभोगायला मिळतो.
बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि त्यानंतर येणारं वार्धक्य या जीवनक्रमातील अतिशय नैसर्गिक शारीरिक अवस्था आहेत. साधारणत: वयाच्या पासष्टीनंतर वार्धक्यात प्रवेश होतो. वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि आधुनिक उपचारपद्धतींची उपलब्धता यांच्या प्रभावी वापरामुळे संपूर्ण जगात, वार्धक्यात पोचणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. जीवनमान उंचावलंय, प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपचारांचा आणि अँटिबायोटिक्स(प्रतिजैविकां)चा वापर वाढलाय. त्यामुळे माणसाचं वयोमान वाढलंय; पण त्याबरोबरच आरोग्याच्या समस्यांचा परिघही वाढलाय. स्थूलत्व, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारख्या व्याधींचं प्रमाण वृद्धांमध्ये वाढलेलं दिसतं.
उतारवयात शरीराची वाढ आणि विकास थांबलेला असतो. शरीरपेशींची वाढ होत नाही; पण झीज भरून काढून दुरुस्तीची क्रिया चालू असते. त्यामुळे योग्य प्रमाणात, संतुलित आणि परिपूर्ण आहाराची गरज या वयातही असते. आहार व्यवस्थित नसेल तर शरीर पेशींची झीज जास्त प्रमाणात झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते, हाडांची, स्नायूंची ताकद कमी होते, हाडं ठिसूळ होतात, थकवा जाणवतो, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. हालचाली मंदावतात आणि त्यांचं प्रमाणही कमी होतं. शरीरात चयापचयाचा वेग मंदावल्यामुळे, पचनशक्ती कमी होते. आतडय़ांच्या स्नायूंची कार्यशक्ती कमी झाल्यामुळे मलावरोधाची शक्यता वाढते. वृद्ध लोक काही वेळा नराश्याने ग्रासलेले दिसतात. काही व्याधी-विकार सुरू झाले असण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेचदा आहार प्रमाणाबाहेर कमी केला जातो; पण आहाराचे प्रमाण कमी करण्यापेक्षा पदार्थाची निवड महत्त्वाची आहे. आरोग्यपूर्ण पदार्थ योग्य प्रमाणात रोजच्या आहारात अवश्य हवेत.
खाण्यापिण्याच्या वेळा आणि प्रमाण नियमित असावं, म्हणजे अन्नाचं पचन व्यवस्थित होईल. अन्नघटकांचं पूर्ण शोषण होऊन योग्य वापर होईल. दिवसातून फक्त दोनच वेळा भरपेट जेवण्याऐवजी ५-६ वेळा थोडं थोडं खावं. पचायला हलका आहार घ्यावा. पचनसंस्थेवर ताण येईल असे पदार्थ शक्यतो नकोतच. असे पदार्थ खायची वेळ आलीच तर प्रमाण अगदी कमी ठेवायला हवं. उतारवयात स्नायूंचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रोजच्या आहारात प्रथिनांची नितांत गरज असते. दूध/ दही/ पनीर/ मिक्स डाळींचं वरण/ शिजवलेली मोडाची कडधान्यं/ तेलबिया/ सुका मेवा/ सोयाबीन/ राजगिरा आहारात योग्य प्रमाणात वापरावा. अंडय़ाचा पांढरा भाग, वाफवलेले मासे यांतूनही भरपूर प्रथिनं मिळतील.
चमचमीत पदार्थ खावेसे वाटले तरी ते पोटभर/ प्रमाणाबाहेर खाऊ नयेत. नेहमीचं खाणं-पिणं घेऊन; कधी तरी अध्ये-मध्ये थोडंसं, बदल म्हणून चमचमीत खायला हरकत नाही. खाण्यापिण्याची काही पथ्यं पाळायला हवी. वेळी-अवेळी चहा, कॉफी पिणं; मसालेदार, तिखट, आंबट, खारट पदार्थ, उपासाच्या  कुपथ्यकारक पदार्थाचा अतिरेक; तेलकट, तुपकट पदार्थ, मिठाई, पक्वान्नं यांचं अतिरेकी प्रमाण टाळायला हवं. मीठ, साखर, मदा यांचा अतिवापर; मद्यपान, धूम्रपान टाळायला हवं.
वार्धक्यात शरीर पेशींच्या ऑक्सिडेशनमुळे शरीरात ‘फ्री रॅडिकल्स’चं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे जीवनसत्त्व ‘ई’, ‘क’, ‘अ’ देणारे म्हणजेच अँटिऑक्सिडंटस पुरवणारे; नैसर्गिक विविधरंगी पदार्थ आहारात हवेत. हिरव्या भाज्या, पालेभाज्या, पिवळ्या नारिंगी रंगांच्या भाज्या आणि फळं आहारात आवर्जून हवीत. भाज्या आणि फळांतील तंतुमय पदार्थामुळे मलावरोधाचा त्रास कमी होईल. उतारवयातही प्यायच्या पाण्याचं खूप महत्त्व आहे. या सुमारास तहानेची जाणीव कमी होते. तसंच वरचेवर लघवीला जावं लागू नये म्हणून पाणी कमी प्यायलं जातं; पण अन्नपचनासाठी, शरीरक्रियांसाठी, शरीरात तयार झालेली दूषित द्रव्यं बाहेर टाकण्यासाठी; किमान ७-८ ग्लास पाणी प्यायची गरज असते. आवश्यक पाण्याचं प्रमाण, हवामानानुसार आणि काही विकार असतील तर त्यानुसार बदलतं. लघवी रंगहीन होत असेल तर प्यायच्या पाण्याचं प्रमाण योग्य आहे असं समजावं. दिवसभर थोडय़ा-थोडय़ा वेळाने पाणी प्यावं; पण संध्याकाळनंतर जास्त पाणी पिऊ नये. जेवणाच्या आधी, जेवताना आणि जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. नुसतं पाणी प्यायलं जात नसेल तर सुयोग्य पातळ पेयांचं प्रमाण वाढवावं.
उतारवयात बऱ्याच जणांना दात खराब झाल्यामुळे किंवा पडल्यामुळे अन्न व्यवस्थित चावता न येण्याचा त्रास होतो. अशा वेळी खाण्यापिण्यात काही आवश्यक बदल करावे लागतात. मऊ शिजवलेले पदार्थ – मऊ भात, मऊसर शिजवलेली मुगाची खिचडी, उकड, उपीठ, मुठीया, इडली, ढोकळा, दूध-दही पोहे किंवा दुधातून/ दह्य़ातून लाह्य़ा खाता येतील; पण चावायला लागत नाहीत म्हणून चहा किंवा दुधाबरोबर बिस्किटं/ खारी मात्र खाऊ नये. काही दाटसर पातळ पदार्थ, जसे नाचणी/ ज्वारी पिठाची आंबील किंवा कांजी, भाताची पेज चालेल. एकत्रित डाळी मऊ शिजवून; मीठ, जिरेपूड, तूप, लिंबू पिळून सूप करून प्यावं. मोडाची कडधान्यं शिजवून; त्यांच्यावरच्या पाण्यात ताक घालून, कढण करून प्यावं. पालेभाज्या किंवा इतर भाज्या वाफवून, मिक्सरमधून काढून सूप करता येईल. फळं आणि सॅलडच्या भाज्या एक तर बारीक किसणीने किसून किंवा थोडय़ा प्रमाणात वाफवून घ्याव्यात. फळांचा शेक किंवा ज्यूस चालेल. पोळी, भाकरीसारखे पदार्थ चावता येत नाहीत म्हणून, मिक्सरमधून बारीक करण्यापेक्षा आमटी/ ताक किंवा भाजीच्या रसात बुडवून ठेवून, कुस्करून, मऊ करून खावेत.
बरेच वृद्ध लोक फक्त दूध-पोळी किंवा दूध-भाकरीच खाताना दिसतात. त्यांनी आमटी, भाजीसुद्धा पुरेशा प्रमाणात खाल्ली तरच पोषण व्यवस्थित होईल. पोळी/ भाकरी/ थेपला/ पराठा/ थालीपिठाचं पीठ भिजवताना दही किंवा दूध घालावं म्हणजे पदार्थ मऊ होऊन प्रथिनांचं प्रमाणही वाढेल. पदार्थ मऊ होण्यासाठी खूप जास्त वेळ शिजवू नका, अन्नघटकांचं प्रमाण कमी होईल.
परवा माझ्या आईची वयोवृद्ध मत्रीण म्हणाली, ‘‘अगं, घरी आम्ही दोघंच असतो. मी स्वयंपाक करते, पण सकाळी एकदाच. रात्री आम्ही पूर्ण जेवण घेत नाही, थोडंसं काही तरी खातो, तेवढं पुरतं आम्हाला. नाही तरी या वयात आहार कमीच हवा ना. त्यात दोघांनाही मधुमेह आणि उच्च रक्तदाब सुरू झालाय.’’ मी म्हटलं, ‘‘मावशी, खरं आहे, रात्री परत सगळा स्वयंपाक करणं तुला शक्य नाही. एखादाच पदार्थ तयार केलास तरी त्यातून सगळे अन्नघटक मिळतील असं बघ हं मात्र. म्हणजे दलिया किंवा रवा किंवा शेवयांचा उपमा केला तर त्यात शिजतानाच एखादी भरपूर भाजी, गाजर, बीट, दुधी/तांबडा भोपळा, एखादी पालेभाजी किंवा दुसरी कोणतीही आवडती भाजी घालायची आणि मुगाची भिजवलेली डाळ किंवा थोडे मोडाचे मूग घालायचे; उपम्याबरोबर थोडं अधमुरं दही घ्यायचं, की झाला चौरस आहार. मावशी, तुला तर असे पौष्टिक पदार्थ खूप सुचतील आणि तू ते मस्त चविष्ट करशील, मला खात्री आहे.’’
वार्धक्यात बहुतेकांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब सुरू झालेला असतो. अशा सर्वानी सकस, समतोल आहार नियमितपणे चार-पाच वेळा विभागून घ्यायला हवा. कुठलंही खाणं-पिणं चुकवू नये. आहारात चघळचोथायुक्त पदार्थ वाढवायला हवेत. गोड पदार्थ, पक्वान्न, तळलेले, तेलकट पदार्थ मर्यादेतच खावेत. त्यांच्याऐवजी जेवणातील पोळी किंवा भात नेहमीपेक्षा कमी खावा. मिठाचा वापर जपून करावा. भाजी, आमटीतील मिठाशिवाय वरून कच्चं मीठ घेऊ नये. दिवसभरात एका माणसासाठी एकच चमचा मीठ वापरावं. सर्व तेलं आलटून-पालटून वापरावीत. माणशी अर्धा ते एक चमचा घरी तयार केलेलं साजूक तूप दिवसभरात वापरावं. जवस, मेथ्या, सूर्यफूल/ तांबडय़ा भोपळ्याच्या बिया, एखादा अक्रोड/बदाम, मासे या ओमेगा ३ पुरवणाऱ्या पदार्थातील एखाद्या तरी पदार्थाचा वापर रोजच्या आहारात असावा.
आरोग्याच्या तक्रारी असतील तर डॉक्टरांबरोबरच डायटिशियन (आहारतज्ज्ञाचा) सल्ला जरूर घ्यावा. वजन प्रमाणाबाहेर जास्त किंवा खूपच कमी असेल तर, तसंच हृदयविकार, मूत्रिपडाचे विकार, कर्करोग असल्यास; रक्तातील साखर किंवा रक्तदाब अनियंत्रित असेल तर आहारातील बदल समजून घ्यावेत तसंच बाजारात मिळणारी फूड सप्लीमेंट्स, पावडर घेण्याआधीही सल्ला घ्यावा.

Thursday 17 October 2019

मोदी-जिनपिंग भेटीचे फलित...TARUN BHARAT- दिनांक :14-Oct-2019



चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत भेटीचे फलित काय, असा प्रश्न सहज निर्माण होतो. त्याचे कारण आहे. सध्याच्या घडीलाच नव्हे, तर अगदी चीनने भारतावर 1962 साली आक्रमण केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध हे तणावाचे राहिले आहेत. त्यात भर पडली ती अक्साई चीनचा भाग चीनने गिळंकृत करणे, लडाख आणि अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणे, मध्यंतरी डोकलामचा तिढा निर्माण होणे आणि नुकतीच 370 कलमावर चीनने पाकिस्तानची कड घेणे. 370 कलमावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत अक्साई चीन आणि गुलाम काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठासून सांगणे आणि चीनने त्यावर आक्षेप घेणे. तिकडे अमेरिकेने चीनच्या आर्थिक नाड्या आवळणे आणि चीनसोबत व्यापारात आयात-निर्यातीत मोठी तफावत निर्माण होणे. अशा अनेक प्रश्नांची जंत्री समोर असताना, शी जिनपिंग यांचे भारतात आगमन झाले.

सध्या अमेरिकेच्या अवाढव्य आयात करामुळे चीनमधील 35 लाख रोजगार समाप्त झाले आहेत. उत्पादनक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. अशा स्थितीत मोदी आणि शी जिनपिंग हे अनौपचारिक बैठकीनंतर निवेदन जाहीर करतील अशी अपेक्षा होती. पण, तसे काही झाले नाही. दोन्ही देशांनी आपापली वेगळी निवेदने प्रसृत केली आणि परस्परसंबंधांबाबत भूमिका विशद केली. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे पाकिस्तान ज्या बाबीकडे कान टवकारून बसला होता, त्या काश्मीर प्रश्नावर जिनपिंग यांनी मोदींसोबतच्या बैठकीत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे पाकिस्तानने संताप व्यक्त केला. चीनचे नाव पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतले नाही, पण केवळ भारत ही मोठी बाजारपेठ असल्याने कोणताही देश पाकिस्तानची बाजू ऐकण्यास तयार नसल्याचे सांगून आपला जळफळाट व्यक्त केला. इम्रान यांनी तर प्रसिद्धिमाध्यमांवरही तोंडसुख घेतले. जगातील सार्‍या वाहिन्या हॉंगकॉंगमधील आंदोलनाच्या बातम्या सातत्याने दाखवीत आहेत, पण काश्मिरातील जनतेवर अन्याय होत असताना, त्याची साधी बातमीदेखील देत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

भारताकडून परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी, दोन दिवसांच्या बैठकीत काय बोलणी झाली, याची माहिती देताना, काश्मीर प्रश्नाचा उल्लेखदेखील जिनपिंग यांनी केला नाही, पण इम्रानच्या चीन भेटीचा उल्लेख मात्र त्यांनी केला, असे स्पष्ट केले. भारताने 370 मुद्यावर आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चीनलाही हे माहीत आहे की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पण, त्याचा विस्तारवादी राक्षस नेहमी चीनलगतच्या सर्व प्रदेशांना गिळण्याच्या प्रयत्नात असतो, हे लपून राहिलेले नाही. चीनमध्ये सध्या उईघुर मुसलमानांवर होणार्‍या अत्याचाराचा प्रश्न अमेरिकेने उचलून धरला आहे आणि जगभरात आता हा प्रश्न चर्चिला जात आहे, हेही जिनपिंग यांना माहीत असणार. चीनला भारतासोबत फक्त व्यापार करायचा आहे. भारत-चीन सीमावादाबाबत त्याची जुनी आडमुठी भूमिका कायम आहे आणि ती पुढेही राहणारच आहे. राहिला प्रश्न दहशतवादाचा. दोन्ही देशांनी दहशतवाद आणि कट्‌टरतावाद यांना विरोध दर्शवून या नापाक शक्ती, मानवजातीची गुंफण असलेल्या बहुसांस्कृतिक धाग्याला, बहुपंथीय, बहुधर्मीय समाजजीवनाला धक्का पोचविता कामा नये, यावर मोदी आणि जिनपिंग यांचे मात्र एकमत झाले.

 


चीनसमोर निर्यातीचे फार मोठे संकट सध्या निर्माण झाले आहे. अमेरिकेने चीनमधून येणार्‍या वस्तूंवर अवाढव्य कर लावल्यामुळे चीनची अमेरिकेतील निर्यात सुमारे 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याऐवजी अमेरिकेने भारतीय वस्तूंची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या वस्तू या अमेरिकेत महाग असून भारताच्या वस्तू त्या तुलनेत बर्‍याच स्वस्त आहेत. याचीही मोठी चिंता चीनला लागून आहे. भारताच्या वाणिज्य विभागाकडून अशा 203 वस्तूंची निर्यात अमेरिकेला करण्यात येणार आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शरदकुमार सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून भारताकडे अभियांत्रिकी वस्तू, खेळणी, पादत्राणे व विविध वस्त्रे या वस्तूंची मागणी वाढत आहे. वर्षाला दहा लाख पादत्राणांचे जोड पाठविण्याची मागणी अमेरिकेतील व्यापारजगताने भारताकडे केली आहे. ही सर्व निर्यात आगामी काळात 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. चीनने ही स्थिती लक्षात घेता आपल्या वस्तूंचे दर चार ते पाच टक्क्यांनी कमी केले असले, तरी त्याचा कोणताही लाभ त्या देशाला झालेला नाही. प्रतिनिधिस्तरीय बैठकीत यावर विचार झाला, पण त्याचा फायदा चीनला होण्याची सुतराम शक्यता नाही. भारताने आयात-निर्यातीबाबत आपले धोरण आणखी कठोर केले आहे. मलेशियाने 370 कलमाबाबत पाकिस्तानची बाजू घेतल्याने या देशासोबत व्यापार न करण्याचा विचार भारत करीत आहे. चिनी वस्तूंबद्दल भारतात आधीच असंतोष आहे. डोकलाम तिढा निर्माण झाला असताना, चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आंदोलन भारतात सुरू असताना, चिनी वस्तू या भारताला घेण्याशिवाय पर्याय नाही, अशी शेखी याच चीनने मिरविली होती. काळ कसा सूड घेतो, त्याचा अनुभव सध्या चीन घेत आहे.

दुसरी मोठी डोकेदुखी चीनसाठी ही आहे की, भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या पाच मोठ्या देशांनी दक्षिण चीन समुद्र आणि उत्तर कोरियाच्या आडमुठेपणाचा संघटितपणे विरोध करण्यासाठी एक नवे व्यासपीठ तयार केले आहे. या गटाची बैठक 2017 साली मनीला येथे झाली होती. यावर चीनच्या वृत्तपत्रांनी त्या वेळी, चीनसोबत व्यापार हाच मुद्दा पुढे करून, आम्ही नाकेबंदी करू शकतो, असा इशारा दिला होता. पण, आता मात्र चीनने या गटाची धास्ती घेतलेली दिसते. त्याचे कारण अमेरिका. चीनकडून आयात न करता, भारताकडून आयात करणे हा निर्णय अमेरिकेने घेतल्यामुळे आपला सारा व्यापार भारताकडे वळू शकतो, ही ती धास्ती. विशेष म्हणजे, फिलिपिन्स, व्हिएतनाम या देशांनीही या पाच देशांच्या गटाचे समर्थन केले आहे. जपानमधील उत्पादने थोडी महाग असली, तरी ती जगात सर्वाधिक दर्जेदार म्हणून ओळखली जातात. जपानसोबत भारताचा व्यापार ऑटोमोबाईल क्षेत्रात फार मोठा आहे. आज अमेरिकेने आयात बंद केली, उद्या जर या देशांनीही चीनच्या आयातीवर बहिष्कार घातला अथवा तो कमी केला तर आपले काय, या विवंचनेत सध्या चीन आहे. भारताचे सर्वच देशांसोबत अतिशय सलोख्याचे संबंध असल्याने, आयात-निर्यात या क्षेत्रात भारताला चिंता करण्याचे कारण नाही. परराष्ट्र धोरणाचे काय सकारात्मक आणि दूरगामी परिणाम असू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण. अशा सगळ्या परिस्थितीत शी जिनपिंग हे भारतात आले होते. चीनसोबत तणावाचे वातावरण निवळावे, हा भारताचा या भेटीच्या मागे प्रमुख उद्देश होता, तो सफल झाला. जिनपिंग यांनी मोदींना चीनमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आणि मोदींनी ते स्वीकारलेही. येणार्‍या दिवसांत चीन भारताविषयी कोणती भूमिका घेणार आहे, हे यथावकाश कळेलच.