Total Pageviews

Monday 25 April 2011

ANNA HAJARE मी एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर...

ANNA HAJARE INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 87
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/मी एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर...शोषण करून केलेला विकास हा विकास नव्हे. त्याचा कधीतरी विनाश होणार आहे, असे महात्मा गांधींनीच सांगून ठेवले. आज काय चित्र आहे? खेड्यापाड्यातले पाणी संपले, उद्या पेट्रोल, डिझेलदेखील संपेल. पुढच्या पिढ्यांचे काय, याचा आम्ही विचार करणार आहोत की नाही?
आपण एक दिवस मुख्यमंत्री झालाच तर काय कराल या प्रश्नावर अण्णांनी आपली ग्रामविकासाची संकल्पनाच विषद केली. अण्णा म्हणाले, '' पहिला निर्णय घेणार गाव हा घटक मानून तेथे शास्त्रशुध्द पध्दतीने पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा कार्यक्रम राबविणे. शेतमालाच्या मार्केटिगचा विचार करून त्या पध्दतीने पिकपध्दती (क्रॉपींग पॅटर्न) राबविणे. ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न करणे. भ्रष्टाचार कसा निपटून काढणार याबाबत ते म्हणाले की, मी भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्याला करून देणार नाही ऐवढे पथ्य पाळले तरी चालेल. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे अण्णा... ग्रामस्वराज्यासाठी झटणारे अण्णा... पाणलोट क्षेत्र विकासासाठी प्रयत्नशील असणारे अण्णा आणि आदर्श गाव उभे करणारे अण्णा,
पत्रकारितेची मूल्ये जपली गेली पाहिजेत, यासाठी ते आग्रही आहेत. वाइटावर प्रहार करत असतानाच समाजातील चांगल्या बाबीदेखील समोर आल्या पाहिजेत. त्यासाठी यशोगाथा प्रसिद्ध केल्या पाहिजेत. भ्रष्टाचाराच्या बातम्या देत असताना सबळ पुरावा हाती असला पाहिजे, असा मूलमंत्रही त्यांनी दिला.लोकसंख्यावाढ, पर्यावरण, सामाजिक असमतोल आणि भ्रष्टाचार हे आजचे ज्वलंत विषय असून, पत्रकारांनी या विषयांचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी संपादक म्हणून मांडली.वर्तमानपत्रांना कोणत्याच विषयाचे वावडे नको. माहिती, ज्ञान आणि प्रबोधनाबरोबरच मनोरंजनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून चित्रपटांच्या वार्ता देण्यात वावगे काहीच नाही, असे त्यांचे मत.प्रसारमाध्यमांनी केवळ प्रश्न उपस्थित न करता उपायदेखील सुचविले पाहिजेत, अशी भूमिका मांडून त्यांनी आदर्श गाव योजनेतील त्यांच्या कृतिशील सहभागाचे उदाहरण दिले. नि:स्पृह वृत्तीने मी आधी माझे गाव उभे केले म्हणून आज देश माझ्या पाठीशी उभा आहे. केवळ भाषणबाजी करून अथवा नुसते लेख लिहून भागणार नाही, तर कृतीदेखील तितकीच महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला.अतिथी संपादक म्हणून भूमिका बजावत असताना अण्णांनी राजकीय विषयावर समतोल भूमिका मांडली. देशातील सगळेच राजकारणी भ्रष्ट नाहीत, काही चांगले लोकदेखील आहेत. सगळ्याच पक्षांत बरेवाईट लोक असतात, शिवाय कोणताच पक्ष इतरांहून वेगळा नाही, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.अण्णांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे पत्रकार आता चांगले माहीत झाले आहेत. पत्रकारांच्या अनुभवाविषयी त्यांच्याकडे बरेच किस्सेदेखील होते. 'पत्रकार चांगलेच आहेत; पण सगळ्यांनाच चांगले म्हणता येणार नाही', अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. दिल्लीतील पत्रकारांनी सुरुवातीला मला उंचीवर नेले; पण आंदोलन मागे घेताच त्यांचा सूर बदलला.इच्छा असूनही समाजातील प्रत्येकालाच या भ्रष्टाचार विरोधी लढ्यात योगदान देता येईल असे नाही. पण किमान आपल्या कुटुंबात 'मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कुणाला करू देणार नाही' एवढे तत्त्व पाळण्याची आवश्यकता आहे.

सध्या चौफेर नजर टाकल्यास असे एकही क्षेत्र दिसत नाही, की जेथे भ्रष्टाचार नाही. कोठेही गेले तरी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसाला आपले जीवन जगणे कठीण झाले आहे. चरकात घातलेल्या उसाप्रमाणे तो पिळून निघत आहे. केवळ हातावर पोट असलेल्या व मोलमजुरी केल्याशिवाय ज्यांची चूलही पेटत नाही, अशा माणसांनी कसे जगावे? हा खरा प्रश्न आहे. राज्यातील आणि देशातील विकासकामांसाठी देण्यात येणाऱ्या प्रत्येक रुपयातील दहा पैसेही प्रत्यक्षात खर्च होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचाराच्या गळतीमुळे विकास प्रक्रियेला मोठी खीळ बसली आहे, हे नाकारून चालणार नाही. परिणामी गरीब आणि श्रीमंतामधील विषमतेची दरी अधिकच वाढत चालली आहे. वाढता भ्रष्टाचार आता सर्वसामान्य जनतेला अगदी नकोसा झाला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात देशातील नागरिकांच्या मनात किती चीड आहे, याचा अनुभव जंतरमंतरच्या आंदोलनाच्या निमित्ताने आला. असे असले तरी मुळात भ्रष्टाचार का वाढतो आहे, यावर चितन होण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भ्रष्ट प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी अस्तित्वात असणारे कायदे निष्प्रभ आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना कायद्याची भीती वाटत नाही. परिणामी गल्लीपासून दिल्लीपर्यंत साखळी पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचार करणारे विविध क्षेत्रांतील लोक स्वार्थाने एवढे धुंद झाले आहेत, की त्यांना देश व समाजाच्या हिताची आठवण राहिलेली नाही. प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. त्यासाठी येनकेन मार्गाने पैसा जमवणे हेच उद्दिष्ट झाले आहे. पण खरे सुख हे पैसा किबहुना संपत्तीत नाही, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कितीही संपत्ती कमावली तरी मृत्यू अटळ असल्याने शेवटी सर्व काही इथेच सोडून जायचे आहे. खरे सुख मालमत्ता किवा पैसा यात असते तर वातानुकूलित घरांत राहणाऱ्या लोकांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज पडली नसती. आमच्या साधुसंतांनी आणि राष्ट्रीय महापुरुषांनी हाच संदेश दिलेला आहे. तुम्हाला खरे सुख हवे असेल तर प्रथम इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करायला हवा. पण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या नशेत आमचे राजकारणी बेहोष झाले आहेत. त्यामुळे त्यांना समाजाप्रति आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. शिवाय भ्रष्ट मार्गांचा अवलंब करताना आपण या देशाला, या समाजाला कोठे घेऊन चाललो आहोत, याचेही भान त्यांना राहिलेले नाही. त्यामुळेच वाढत्या भ्रष्टाचाराने देशाला पोखरले आहे. पण हे कोठेतरी थांबलेच पाहिजे. त्यासाठी एक व्यापक दीर्घ लढा उभारण्याची गरज आहे. गेली वीस वर्षे आम्ही त्यासाठी सातत्याने संघर्ष करीत आहोत. आता कुठे या संघर्षाला एक निर्णायक स्वरूप येत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही राज्यस्तरावर छेडलेल्या आंदोलनामुळे काही सकारात्मक परिणाम दिसून आले. ३३ जिल्ह्यांतील २५२ तालुक्यांत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन उभे राहिले आहे. मागील अनेक आंदोलनांच्या फलनिष्पत्तीतूनच माहितीचा अधिकार, ग्रामसभेला अधिकार, दप्तरदिरंगाई, बदल्यांचा कायदा यांसारखे महत्त्वपूर्ण व व्यवस्था बदलणारे प्रभावी कायदे अस्तित्वात आले. आज देशभरात जे कोट्यवधी रुपयांचे महाघोटाळे बाहेर येत आहेत ते माहितीच्या अधिकारामुळेच. मात्र, त्यासाठी अनेक वर्षे खडतर संघर्ष करावा लागला आहे. मी सैन्यात असताना पाकिस्तान व बांगलादेशविरुद्धच्या युद्धात भाग घेतला होता. आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहे. पण, बाहेरील शत्रू विरोधातील लढाईपेक्षा भ्रष्टाचारविरोधी लढा खूपच कठीण आहे. कारण इथे आपलीच माणसे दुश्मन झाली आहेत. शिवाय त्यांच्याकडे सत्ता, पैसा व गुंडांच्या टोळ्याही आहेत. हे सर्व काही मी अनुभवले आहे. इथे मरण हातावर घेऊनच लढावे लागत आहे. पण एवढ्यावर ही लढाई संपणार नाही. आता देशपातळीवर मोठे संघटन उभे करावे लागले. त्यासाठी नुकत्याच झालेल्या आंदोलनात देशासाठी निर्भयपणे पुढे आलेले लाखो तरुण पुढील काळात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतील, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. सनदशीर मार्गाने देशातील तरुणांनी हा लढा हाती घेतला तर भ्रष्टाचार गाडून टाकणे अशक्य नाही; मात्र त्यासाठी देशातील तमाम नागरिकांनी या लढ्यात उतरले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांवर बालपणापासूनच चांगले संस्कार केले पाहिजेत. जेणेकरून त्यातून भ्रष्टाचारविरोधी विचार असलेले नागरिक घडतील. संस्कारांची शिदोरी अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या तरुण मित्रांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या बलिदानाची आठवण ठेवून आता भ्रष्टाचारविरोधी लढाईत उतरले पाहिजे. मात्र, केवळ संघर्ष करून भ्रष्टाचारविरोधात यश मिळणार नाही. त्यासाठी शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन व जीवनात काहीसा त्याग असे चारित्र्यवान तरुण कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत. कारण भ्रष्ट प्रवृत्तींवर मात करायची असेल तर त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याला नैतिक पाठबळ मिळायला हवे; तरच हा लढा पुढे जाईल. इच्छा असूनही समाजातील प्रत्येकालाच या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात योगदान देता येईल असे नाही. पण, किमान आपल्या कुटुंबात 'मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कुणाला करू देणार नाही' एवढे तत्त्व पाळण्याची आवश्यकता आहे. घरातील प्रत्येक गृहिणीने आपल्या घरात येणारा पैसा कसा येतो यावर जागरूकतेने नजर ठेवल्यास भ्रष्टाचाराला मोठा आळा बसू शकेल. देशपातळीवरील भ्रष्टाचारविरोधी लढ्याला आता तोंड फुटले आहे. अर्थात ही केवळ सुरुवात आहे. भ्रष्टाचाराचा समूळ नाश करण्यासाठी सुरू झालेला हा सर्वसामान्यांचा संघर्ष म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. ती जिकली तरच देशवासीयांना खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल. आता भ्रष्टाचार हा खरा शत्रू आहे. म्हणूनच ही प्रत्येकाची लढाई आहे. चला, उठा... जनशक्तीच्या रेट्याने भ्रष्टाचाररूपी राक्षसाला गाडून टाकण्यासाठी सज्ज व्हा 
निर्णायक लढा!

No comments:

Post a Comment