Total Pageviews

Thursday 7 June 2018

जलसंकट June 4, 2018, 7:56 PM IST अतुल पांडे-mata -ढगातून येणारे पावसाचे पाणी अडवावे लागेल, मुरवावे लागेल, जिरवावे लागेल. तसा प्रयत्न काही हात करीत आहेत, त्यांना गरज आहे आणखी काही हातांची. त्यात दोन हात आपलेही असू देत

मागील वर्षी लातूर पाण्याच्या एका एका थेंबासाठी आतूर झाले होते. या वर्षी यवतमाळने पाण्याचा दुष्काळ अनुभवला. पुढच्या वर्षी आणखी कुठल्या तरी गावात अशीच स्थिती असेल. तहानेसाठी डोळ्यात पाणी येऊ नये असे वाटत असेल तर ढगातून येणारे पावसाचे पाणी अडवावे लागेल, मुरवावे लागेल, जिरवावे लागेल. तसा प्रयत्न काही हात करीत आहेत, त्यांना गरज आहे आणखी काही हातांची. त्यात दोन हात आपलेही असू देत.
उन्हाळ्याचे दोन महिने चटके देणारे असतात.  तापणारं उन्हं बाहेर पडू देत नाही आणि  न सोसणारी तहान घरात बसू देत नाही.  हा अनुभव दरवर्षी वेगवेगळी शहरे घेत असतात. नावे बदलतात फक्त. कधी त्या शहराचं नाव अकोला असते तर कधी असते लातूर.  यावेळी यवतमाळ शहराने तर कहरच अनुभवला. तेथील नळाला तब्बल २३ दिवस पाणीच आले नाही. काय केलं असेल तेथील लोकांनी. मुलांच्या परीक्षा होईपर्यंत कसे -बसे थांबले, त्यानंतर सगळा परिवार नातेवाईकांची घरे शोधू लागला. घरमालकालाच पाणी पुरेना, त्याने भाडेकरूला घरातून काढून दिले. तो चाकरमनी राहील कुठे? माणसं इकडे जातील, तिकडे जातील, जनावरांनी कुठे जावे? कुठले पाणी प्यावे?  डोळ्यात पाणी आणणाऱ्या अनेक गोष्टी यवतमाळने अनुभवल्या.  कुठल्या तरी गावात कुणी फिरायला जात असताना हातात पिशवी घेऊन जात असेल, कुणी पर्स घेऊन जात असेल. यवतमाळमध्येही तसेच चित्र असते, तिथे प्रत्येकाच्या हातात असते एक कॅन.  सायकल असो की चार चाकी त्यात पाण्याची डबकी असतेच असते.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या कॅचमेंट एरियात पाणी पडलं नाही, त्यामुळे शहराचं पाणी आटलं.  विहिरी आटल्या. पंपांना पाणी नव्हते. या सगळ्या अनुभवातून केवळ यवतमाळनेच नव्हे सगळ्यांनीच शिकणे गरजेचे आहे. यवतमाळपेक्षा वाईट स्थिती अनुभवलेल्या गावांनी भर उन्हाळ्यात आपल्या विहिरी तुडुंब भरून ठेवल्या आहेत. मात्र हा बदल रडण्याने झालेला नाही, अश्रूंच्या थेंबांनी झालेला नाही. तो झाला आहे पराकोटीच्या परिश्रमाने, जिद्दीने मेहतीने आणि  घामाच्या थेंबांनी.
नगरपासून काहीच अंतरावर असलेल्या हिवरेबाजारच्या हिरव्या कथा आज आपण ऐकतो. काही वर्षांपूर्वी कसं होतं ते. पोपटराव पवारच सांगतात, ‘आमच्या गावात कुणी मुलगी द्यायला तयार नव्हते.’ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी नातं सांगणारं हे गाव. जिथे हत्ती आणि घोड्यांचा बाजार भरायचा असे म्हणतात. म्हणजे तेथील समृध्दीची तुम्ही कल्पना करा.  नंतर ते गाव दुष्काळाशी नाते सांगू लागले. संकट आलं की धैर्य येते, धाडस येते. त्यातून तेथील गावकऱ्यांचे हात एकमेकांच्या हातात गुंफले गेले. झाडं लागली, स्मृतिवन उभे झाले. पाझर तलाव तयार झाले.  पावसाचे पाणी साठवले जाऊ लागले. तळाला गेलेली पाण्याची पातळी काही फुटावर आली. शेतं हिरवी दिसू लागली, जनावरं दुधाळ झाली. पिके वाढली, दूध वाढले. आदर्श ग्राम पुरस्काराचे अधिकाधिक सन्मान पटकावून त्यांनी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. ती प्रेरणा कोरड्या गावांनी, आटलेल्या विहिरींनी का घेऊ नये?
धुळे जिल्ह्यातील शिरपूरची तरी काय कथा होती. तेथे काळ्या मातीच्या थरानंतर रेतीचा थर लागत होता, त्यानंतर लागत होता पिवळ्या मातीचा थर. पाण्याचा निचरा होणार कसा? ते जमिनीच्या पोटात जाणार कसे?  पाऊस आला की सगळे पाणी तापी नदीच्या पोटात जायचे. तेथे शिरपूर पॅटर्न तयार झाला. पाणी आडविण्याचे, मुरविण्याचे नवे तंत्र शोधले गेले. तेथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले. इच्छा असेल तर मार्ग निघतोच.
पाण्याची साठवणूक असो की पाण्याचा वापर आपल्याला नव्याने फारसं सांगण्याची गरज नाहीच. सातव्या शतकाच्या नोंदी तपासल्या तर कावेरीच्या उगम भागात पाणी वापराच्या संस्था असल्याचे उल्लेख सापडतात.  सिंचनाची फड पध्दती साडेतीनशे वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. कालवा पध्दती होतीच, विश्वेश्वरैय्यांनी नवे मार्ग शोधले. नव्या उपायांसाठी, नित्यनवे प्रयत्न सुरूच आहे. त्याची पाहिजे तशी गती नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिला जलसिंचन आयोग गठीत झाला, तो आपल्या जलसिंचनाचा आढावा घेण्यासाठी. तो बर्वे आयोग म्हणून सुध्दा प्रसिध्द आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सिंचनाची अपेक्षा  २७ टक्के व्यक्त केली.  आपण तेव्हाच सावध व्हायला हवं होतं.  वेगवेगळ्या उपायांवर चर्चा करायला हवी होती.  आपल्याकडे छोट्या मोठ्या मिळून ४०० च्या आसपास नद्या आहेत. सरासरी पर्जन्यमान १०६७ इतके सांगितले जाते. ते आपलं हक्काचं पाणी आपण आडवत नाही, खुशाल समुद्रात जाऊ देतो. पुन्हा  जमिनीतून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. १९९८ साली २५ लाख कृषीपंप होते,  सध्याच्या घडीला राज्यात ४५ लाख पंप आहेत, ते पुढच्या दहा बारा वर्षात  ८० लाख इतके होतील.  किती पाणी उपसले जाईल याचा अंदाज लावा आणि  तुम्ही समजून जा काय होणार ते.
जलयुक्तचा आधार
जलसंधारणाची कामे सरकारच्या माध्यमातून केली सातत्याने केली जातात. कृषी विभागाची वेगळी योजना, पाटबंधारे विभागाची वेगळी योजना. वेगवेगळे विभाग जलसिंचनासाठी १३ योजना राबवित होते. फडणवीस सरकारने या सगळ्या योजनांचे एकत्रीकरण करून त्याची जलयुक्त शिवार अशी एकच योजना केली. त्यात लोकसहभागाचा सहारा घेतला आणि त्याची व्यापक प्रसिद्दी केली. त्यामुळे  प्रथमदर्शनी ते काम सरकारी न  वाटता,  लोकांना आपले वाटले.  सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षात साडेसोळा हजार गावात पाच लाख कामे प्रस्तावित केली गेली. त्यापैकी पावणेपाच लाख कामे पूर्ण झाली.  कुठे नवे तलाव तयार झाले. कुठे तलावातला गाळ काढला गेला, कुठे नाल्यांचे खोलीकरण झाले. पाणी थांबून रहावे, जमिनीच्या पोटात जमा व्हावे, पाण्याची पातळी वाढावी म्हणून वेगवेगळे प्रयत्न झाले.  अनेक ठिकाणी त्याचे परिणाम दिसून आले. जिथे संयम पाळला गेला, नियम पाळले गेले तिथे चांगली कामे झाली. काही ठिकाणी त्याला गालबोट सुध्दा लागले. काही ठिकाणी तर ही योजना पोकलेन आणि जेसीबीने हायजॅक केल्याचे आरोप झाले. अनेक ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये  नजरेला पाणी दिसले.  कुठे शेतकऱ्यांना दुसरे पीक घेता आले. हे  त्या योजनेचे ते यश म्हणावे लागेल.  त्यातील लोकसहभाग ही जनतेची कळकळ समजावी लागेल. ती उत्तरोत्तर वाढणे गरजेचे आहे. त्याचे काटेकोर मूल्यमापन करावे लागेल. पाणी कागदावर जिरण्यापेक्षा ते जमिनीच्या  उदरात जिरवावे लागेल.
वॉटर कप.. एक उमेद
स्पर्धा ही खूपदा वाईट असते, पण पाणी वाचविण्यासाठी गावोगावी चाललेली वॉटर कपची स्पर्धा ही निकोप आणि तेवढीच वेगळी आहे. त्यात हरत कुणीच नाही.  या स्पर्धेत जिंकणारा जिंकतोच, त्या गावाला पैसे मिळतात. हरणारा सुध्दा पाणी वाचवून, साठवून जिंकलेलाच असतो.
अमीरखानच्या  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या वॉटर कप स्पर्धेने गावांचा स्वभाव बदलला, चित्र बदलले. त्याच्या कथा जेवढ्या हृदयस्पर्शी आहेत, तेवढ्याच त्या प्रेरणादायी आहेत.
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील राणीतांडा नावाचं गावं.  दारूच्या भट्टीचं गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द.  तरुणांपासून तर वृध्दापर्यंत अनेक जण नशेत. वॉटरकपची गोष्ट तिथवर पोहचली. आधी तर दारू सोडण्याची स्पर्धा झाली. त्यात ९ लोकांनी दारूला रामराम ठोकला आणि ते पाण्याची चिंता वाहू लागले.  ‘ ओ मितवा’ गाण्यावर ठेका धरून टिकासी जमिनीच्या उरात घुसू लागल्या.  पाणी साठविण्यासाठी खड्डे तयार होऊ लागले. आधी तिथे दारू साठवली जात होती, आता तिथे पाणी साठवले जाते. दारूसाठी बदनाम असलेलं गाव जर पाण्यासाठी प्रसिध्द होऊ शकते तर इतर चांगलं नाव असलेल्या आदर्श गावांनी पाणी वाचविण्याचा आदर्श का घेऊ नये?
गावं जेवढी चांगली असतात, तेवढीच ती वाईट सुध्दा होतात जेव्हा तिथे राजकारण शिरतं. त्यामुळे जेवढं छोटं गाव तेवढं ते राजकारणी असते असं म्हणतात. त्यातल्या त्यात गावातील गटबाजी, राजकारण, एका एका मतांसाठी चालणारी स्पर्धा या कहाण्या मोठ्या रंजक आणि रोचक असतात.  विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर नावाच्या गावातील लोकांनी मात्र चमत्कारच केला. त्यांनी  पाण्यासाठी राजकारणाच्या भिंती तोडल्या.  सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना एकत्र आणले आणि निवडणूक लढावी  त्या हिरीरीने ते लोकं पाण्यासाठी खड्डे खोदू लागले. मतासाठी दिल्या जाणाऱ्या जयभवानी जय शिवाजीच्या घोषणा पाण्यासाठी दिल्या गेल्या.  त्याच भागात करंजी नावाचं एक गाव आहे. तिथे गावातील दोन गटात इतकं जबरदस्त राजकारण होतं की, असा एकही महिना जात नव्हता, ज्या महिन्यात त्या गावात पोलिस आला नसेल.  वॉटरकप मिळविण्यासाठी ते सगळं गाव एका दिलानं कामाला लागलं आणि तेव्हापासून त्यांनी पोलिस ठाण्याचे तोंड बघितले नाही. जलसंधारणाच्या सोबतीने होणारे हे मनसंधारण,  बदनाम होत चाललेल्या राजकारणासाठी नक्कीच आशादायी ठरणारे आहे.
वर्धा जिल्ह्यातील काकडदरा हे पूर्णत: आदिवासी गाव. ते सुध्दा उतारात वसलेलं. कधी तिथं तलाव होते, जे अतिवृष्टीने वाहून गेले. वरून पाणी यायचं आणि खाली वाहून जायचं, थांबतच नव्हतं. ७० घरांच्या आदिवासी गावाने, मेहनतीने, परिश्रमाने गावाचे चित्र बदलले. आता एप्रिल महिन्यात एक हँडल मारलं की हापशीला लगेच पाणी येते.. या गावाची प्रेरणा घेऊन आजुबाजूच्या चार गावात आता अशीच कामे सुरु झाली आहेत.
वॉटरकपमध्ये आता २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यातील ४०२५ गावे सहभागी आहेत. तेथील जनता लोकसहभागातून पाणी साठवणुकीचे, पाणी बचतीचे उपक्रम राबवितात. टळटळीत उन्हात श्रमदान करतात. वर्धा जिल्ह्यात बजाज फाऊंडेशनची कामे चालतात. तामसवाड्यातील पूर्तीचे सिंचन  बघण्यासारखे आहे.  काही ठिकाणी तरुण स्वयंप्रेरणेने जलसिंचनाची कामे करतात. उमरखेड तालुक्यात लोकांनी अंबोना तलाव खोदून काढला. प्रेरणेचा स्रोत पसरत चालला आहे. प्रारंभी दोन किंवा तीन लोकांनी सुरू केलेली पाणी बचतीची चळवळ हळूहळू गावाची चळवळ बनत चालली आहे. आपल्या मुलाबाळांसाठी पैसा अडका, संपत्ती  जपून  ठेवण्यापेक्षा पाणी वाचवून ठेवले तर… हा विचार आता मूळ धरू लागला आहे. त्या विचाराचा वटवृक्ष्र व्हावा, त्या विचाराच्या फांद्या गावोगावी पोहचाव्या,  त्याला हजारो हातांचे बळ लाभावे. असे झाले तर पाणी डोळ्यातून नाही, ढगातून बरसेल… कुणी तहानलेले असणार नाही

No comments:

Post a Comment