Total Pageviews

Thursday 7 June 2018

पाण्याची पातळी आणि गंभीर आव्हान-महा एमटीबी 05-Jun-2018- तुषार ओव्हाळ





भारतात अनेकवेळा अनेक दशके एकत्र नांदतात असं म्हटलं जातं. कारण एकाच वेळी एका ठिकाणी दुष्काळ असतो एका ठिकाणी पाऊस जोरात पडत असतो. भारतात एक जागा सुजलाम सुफलाम झालेली आहे तर एका ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही. नुकतंच एका अभ्यासानुसार समोर आले की जमिनीखालील पाण्याचा उपसा हा अमेरिका आणि चीन या दोन देशांत मिळून जितका होतो त्याहून अधिक भारतात होतो. जगात हे प्रमाण १/४ इतके आहे. देशातील १ कोटी ६३ लाख लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. त्यात ग्रामीण भागाचे प्रमाण हे १५% इतके आहे तर शहरी भागात हे प्रमाण ७% इतके आहे.

जमिनीखाली पाण्याची पातळी कमी होण्याचे प्रमाण उत्तर आणि मध्य भागात जास्त आहे. याची मुख्य कारणे ही नैसर्गिक आहेत. त्यात हवामान बदल, दुष्काळाचे वाढते प्रमाण, पाऊस न पडणे अशी आहेत. मानवी कारणे अशी की जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाणी साठवण्याचे नियोजन हे केलेच जात नाही. निसर्ग हा जरी लहरी असला तरी मानवाने निसर्गाच्या कलाने घेतले पाहिजे. तहान लागली की विहिर खंदण्याची ही मानवी वृत्ती ही मानवाच्याच मूळावर येऊ पाहत आहे.

राष्ट्रपती कोविंद यांनी हवामान बदलाचे आव्हान पेलण्यासाठी तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर व्हावा असे सुचवले होते. आपल्या हाती काय नाही यापेक्षा आपल्या हाती काय आहे याचा विचार आता करणे गरजेचे आहे. पाणी साठवण्याचे नव नवे तंत्रज्ञान आपण शोधूनही काढले आहे. त्यात कमी पैशांत पाणी साठवण्याचेही तंत्रज्ञानाचा समावेश आहे. आज जमिनीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे हे आव्हान असून पुढील येणार्‍या पिढीसाठी धोकादायक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आज पानी फाऊंडेशन, नाम आणि सरकारी संस्था मिळून महाराष्ट्रात चांगले कार्य करत आहे. शहरी भागातहीनव्या इमारतींसाठे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा नियम केला आहे पण नियम केला म्हणून करण्याची वृत्ती अयोग्य. पाणी वाचवण्यासाठी आत्मीयता हवी. अन्यथा ग्रामीण आणि शहरी भाग वाळवंटात रुपांतरित होतील
राज्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळविण्यात यश आले. एकीकडे अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणे आणि त्याला जलयुक्त शिवारांची जोड यामुळे महाराष्ट्र येत्या दोन-तीन वर्षांत दुष्काळमुक्त होण्यास मोठाच हातभार लागणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे उदाहरण घेतल्यास,
270 गावांतील 550 खेड्यात जलयुक्त शिवारांची कामे पूर्ण झाली असून यंदाच्या वर्षी 241 गावांची निवड करण्यात आली. ही सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. शिवारात भरपूर पाणी जमा झाल्याने आताच 1 लाख92 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. 96 हजार टीएमसी पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. गावातील पाणी गावातच अडविल्यामुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. 300 प्रकल्पांतील गाळही काढण्यात आल्यामुळे तेथे 511 टीएमसी एवढा वाढीव पाणीसाठा निर्माण झाला आहे. संपूर्ण नगर जिल्हा जलसंधारणाच्या कामांना लागला आहे. हे एकट्या नगर जिल्ह्याचे चित्र आहे काही शेतकर्‍यांनी तर एका एका एकरात जलयुक्त शिवार घेतल्यामुळे चोहोबाजूच्या जमिनी सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाल्या आहेत. शिवाराच्या परिसरात सावली देणारे वृक्ष लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी या यशाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे आणि आपल्या शेतातही जलयुक्त शिवार घेतले पाहिजे. मान्सूनची चाहूल लागली आहे. तेव्हा पावसाच्या अंदाजाकडे सातत्याने लक्ष देऊन शेतकर्‍यांनी नियोजन केले पाहिजे. त्यासाठी डीडी किसानचे अॅप आहेत. त्याचा वापर केला पाहिजे. मोठ्या बंधार्‍यांची वाट न पाहता आपल्या शेताच्या फायद्याचे काय याचा विवेक बाळगून पुढची पावले टाकली पाहिजेत. केवळ शासनाने प्रत्येक गोष्ट माफ केली पाहिजे या मानसिकतेतून आता बाहेर आले पाहिजे. तरच शेतकर्‍यांचे ‘अच्छे दिन’ आलेअसे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment