Total Pageviews

Sunday 10 June 2018

रोहिंग्यांचे मात्र तसे मुळीच नाही. त्यांना कुठलाही देश स्वीकारायला तयार नाही; ज्या बांगलादेशाशी त्यांचे वांशिक संबंध आहेत; तोही त्यांना आपले मानत नाही, त्या ठिकाणी आपण हा धोंडा गळ्यात का बांधून घ्यावा? देशाच्या यंत्रणांवर ताण येण्यापूर्वी आणि या विस्थापितांनी देशात अस्थिरता निर्माण करण्यापूर्वीच त्यांना आळा घालणे गरजेचे आहे. टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे

a

त्यांनी आमच्या गावातल्या सगळ्या पुरुषांना ठार केलं. आम्हाला सांगितलं वळून पाहूदेखील नका. आम्ही जवळपासच्या झुडपांचा आडोसा घेऊन लपून बसलो. त्यांच्याकडे चाकू, भाले आणि लोखंडी सळ्या होत्या. माझे वडील, काका, भाऊ… सगळ्यांना माझ्या डोळ्यांदेखत ठार केलं गेलं. जेमतेम १८ वर्षे वय असलेल्या राजकुमारी या हिंदू युवतीची ही कहाणी. म्यानमारच्या राखाईन राज्यात ऑगस्ट २०१७ ला रोहिंग्यांकडून हिंदूंची जाहीर कत्तल करण्यात आली. गेले वर्षभर ही सामूहिक हत्या कोणी केली याबाबत काहीच ठोस पुरावे नव्हते. म्यानमारच्या सैन्याकडून या हत्या रोहिंग्या मुसलमानांनी केल्याचे सांगण्यात आले असले तरी रोहिंग्यांनी मात्र हे आरोप धुडकावून लावले होते. मात्र सत्य कधी लपत नसते; त्यानुसार या निर्घृण हत्या रोहिंग्यांनीच केल्याचे आता समोर आले आहे. अम्नेस्टी इंटरनॅशनलने या प्रकरणाचा शोध घेतल्यावर हे सारे सत्य बाहेर आले. या संस्थेच्या स्रोतांनी सारे सत्य गेल्या महिन्यात जगासमोर आणले आणि रोहिंग्यांच्या हैदोसाच्या क्रूर चेहर्‍यावरील बुरखा फाटला.
२५ ऑगस्ट २०१७ रोजी रोहिंग्यांनी म्यानमारच्या लष्करी ठाण्यावर आक्रमणे केली. याच दिवशी हिंदूंवरही आक्रमण करण्यात आले. या संपूर्ण प्रांतातून सुमारे ४५ मृतदेह मिळाले असून, हजाराहून अधिक हिंदू गायब असल्याचे स्थानिकांचे सांगणे आहे. या सार्‍या हत्याकांडात २० पुरुष, १० स्त्रिया आणि २३ लहान मुलांचे बळी गेले. यांतील लहान मुले तर वयाच्या आठ वर्षांखालील होती. महिलांवरील अत्याचार तर माणुसकीला काळिमा फासणारे असेच होते. संयुक्त राष्ट्रांनी लैंगिक हिंसा या विषयावर एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार; अतिरेकी लोक स्त्रियांना बंदी बनवतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात, कित्येकदा त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध त्यांचे धर्मपरिवर्तन केले जाते, कित्येकदा त्यांचा व्यापार होतो आणि त्यांना गुलाम बनवले जाते. ज्या एकोणवीस देशांतील एकंदर परिस्थिती अभ्यासून हा अहवाल तयार करण्यात आला; त्यांच्यात म्यानमारचादेखील समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार; फेब्रुवारी २०१७ मध्ये म्यानमारमधील किमान १०० महिलांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार झाले असल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. राखाईनमध्ये झालेल्या अत्याचारांतही महिलांना ठार करण्यापूर्वी त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबासमोरच बलात्कार करण्यात आला. कित्येक महिलांना बळजबरी धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले. यांतील कित्येक धर्मांतरित महिला आजही बांगलादेशमधील विस्थापित छावण्यात जिवंत आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार; त्यांचे कुंकू पुसले गेले, बांगड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले व त्यांना जिवंत राहायचे असल्यास धर्मांतर करण्याची सक्ती केली गेली.
अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात बाहेर आलेली तथ्ये ही अंगावर काटा आणणारी आहेत. मात्र त्याहीपेक्षा भयानक असलेली बाब म्हणजे बहुसंख्य हिंदू असलेल्या देशातील प्रशासन व तथाकथित बुद्धिवाद्यांचे याबाबतीतले मौन आणि रोहिंग्या विस्थापितांना मानवतेच्या गोंडस आवरणाखाली दडवून आपल्या देशात आसरा देण्याची आत्मघातकी वृत्ती. एकीकडे या रोहिंग्यांनी म्यानमारमधील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराबद्दल आणि कत्तलीबद्दल अवाक्षरही न काढणारे लोक या विस्थापितांच्या मानवाधिकारांवर बोलतात याहून मोठा दांभिकपणा काय बरे असेल? आपल्याच देशातील विस्थापित काश्मिरी पंडितांचे दु:ख त्यांना दिसत नाही; रोहिंग्यांच्या वेदनांनी मात्र त्यांना अचानक करुणेचा पाझर फुटतो! अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच बांगलादेशच्या कॉक्स बझारमधील रोहिंग्या विस्थापित छावणीला भेट देऊन आली. त्यानंतर या भेटीबद्दल आणि तेथील लहान मुलांच्या स्थितीवर वगैरे तिने आपल्या समाजमाध्यमांतील विविध मंचावरून विपुल लेखन केले. या बाईंना त्याच छावणीतील धर्मांतरित हिंदू महिलांचा आक्रोश ऐकायला मिळाला नसेल का? किमान त्याचा उल्लेखही तिने कुठे केल्याचे दिसले नाही. मानवाधिकार हे सोयीस्कर असतात. हिंदूंना मात्र प्रत्यक्षात कोणताही अधिकार नसतो. त्यांची बाजू घेऊन बोलणारे कोणीही नसते; चुकून कोणी बोललेच तर ते धर्मांध ठरवले जातात. याच सोयीस्कर भूमिकांचा खेळ खेळत हिंदूंच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्याचा एककलमी कार्यक्रम गेली कित्येक वर्षे आपल्या देशात सुरू आहे.
म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर झालेल्या आक्रमणाचे नेतृत्व केलेला आशीन विरथू हा बौद्ध भिक्खू म्हणाला होता; तुम्ही प्रेम आणि दयेने पुरेपूर भरलेले असू शकता. मात्र या प्रेमापायी तुम्ही पिसाळलेल्या कुत्र्याशेजारी झोपण्याचा निर्णय घेत नसता. अहिंसा आणि करुणेचा संदेश देणार्‍या पंथाचा धर्मगुरूदेखील जेव्हा इतके रोखठोक बोलतो; तेव्हा त्यामागील परिस्थिती समजावून घेणे गरजेचे असते. हिंदुस्थानात विस्थापित झालेले रोहिंगे पूर्वनियोजित छावणीतच राहतील याकडे लक्ष द्या, त्यांना आधार कार्ड वगैरे ओळखपत्रे मिळू नयेत याकडेही लक्ष द्या आणि त्या सार्‍यांचे बायोमेट्रिक्स काढून ठेवा असे आदेश केंद्र शासनाने नुकतेच संबंधित राज्यांना दिले आहेत. मात्र यातील कित्येक विस्थापित हे यापूर्वीच आधार इत्यादी मिळवून या छावण्यातून निसटले नाहीत याची खात्री आहे काय? आपल्या म्यानमारमधील पंथ-भावंडांच्या दु:खात सामील असलेले आणि त्यांना मदत करण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवणारे त्यांचे एतद्देशीयपंथबांधव याबाबत त्यांना मदत करीत नसल्याची वा करणार नसल्याची काही शाश्‍वती आहे काय? संयुक्त राष्ट्रसंघाने रेफ्युजी क्रायसिस नावाची परिभाषा वापरली आहे. गृहयुद्ध वा अन्य कारणाने विस्थापित झालेले लोक ज्या देशांत आश्रय घेतात तेथील यंत्रणांवर बहुतेक वेळा ताण येतो. शिवाय, कित्येकदा या देशांतही अंतर्गत कलह सुरू होतात असे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांनी नोंदवले आहे. सायप्रस, लेबनॉन, सीरिया इत्यादी अनेक उदाहरणांवरून या विस्थापितांनी जन्माला घातलेल्या समस्यांची प्रकर्षाने जाणीव होते. सव्वाशे कोटींची लोकसंख्या पार केलेला हिंदुस्थान हा यापूर्वी तिबेटी शरणार्थींसाठी धर्मशाला बनलाच आहे. किमान आजवरचे त्यांचे धोरण सभ्यपणाचे आहे. रोहिंग्यांचे मात्र तसे मुळीच नाही. त्यांना कुठलाही देश स्वीकारायला तयार नाही; ज्या बांगलादेशाशी त्यांचे वांशिक संबंध आहेत; तोही त्यांना आपले मानत नाही, त्या ठिकाणी आपण हा धोंडा गळ्यात का बांधून घ्यावा? देशाच्या यंत्रणांवर ताण येण्यापूर्वी आणि या विस्थापितांनी देशात अस्थिरता निर्माण करण्यापूर्वीच त्यांना आळा घालणे गरजेचे आहे. याकरता; छावण्यांतच मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यापेक्षा हे लोक जिथून आले आहेत तिथेच यांचे गाठोडे बांधून तात्काळ परत पाठवले पाहिजे!

No comments:

Post a Comment