Total Pageviews

Saturday 2 June 2018

भारत-नेपाळ सीमेवर बेधडक चालतोय कोकेन-अमली पदार्थांचा व्यापार, मानव तस्करीही सुरू शशी भूषण, प्रवीण वर्मा, अतुल उपाध्याय



बिहारच्या भागातील भारत-नेपाळच्या नियंत्रण रेषेवर (लाइन ऑफ कंट्रोल) कोणाचे नियंत्रण आहे? सशस्त्र सीमा दलाचे, नेपाळच्या सशस्त्र पोलिस दलाचे, कस्टमचे, आयबीचे, सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलिसांचे की यापैकी कोणाचेही नाही? वस्तुस्थिती अशी आहे की, नियंत्रण रेषेवर पूर्ण नियंत्रण यापैकी कोणाचेही नाही. कायदेशीरदृष्ट्या पश्चिम चंपारणच्या वाल्मीकीनगरपासून किशनगंज गलगलियापर्यंत भारत-नेपाळदरम्यान अनेक व्यापारी रस्ते आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की, खुल्या सीमेवर असंख्य चोरदरवाजे आहेत. दोनशेपेक्षा जास्त नदी-नाले आहेत.

नेपाळने ते उघडले आहेत. दिव्य मराठीचा चमू येथे पोहोचला तेव्हा मित्रराष्ट्रांच्या जनतेच्या अडथळ्याविना सुरू असलेल्या येण्या-जाण्याच्या नावाने या रस्त्यांच्या भरपूर फायदा असामाजिक तत्त्वे घेत आहेत. ७२९ किमी लांबीच्या या सीमेची दिव्य मराठीच्या चार चमूंनी पाच दिवस संपूर्ण पडताळणी केली. चमूंना असे आढळले की, सीमेवर तस्करीने व्यवसायाचे रूप धारण केले आहे. अमली पदार्थ, जनावरे, शस्त्रास्त्रे आणि मानव तस्करीसाठी ही खुली सीमा धोकादायक झाली आहे. तस्करीच्या यादीत बिहारमध्ये दारूबंदीनंतर दारू आणि पंधरवड्यापासून डिझेल-पेट्रोल या नव्या वस्तू आहेत. सीमा सुरक्षा दलाजवळ (एसएसबी) रायफल, दुर्बीण आणि नाइट व्हिजन डिव्हाइसशिवाय काहीही नाही. दुचाकी तर सोडा, सायकलही नाही. चर्चेत एसएसबीचे अधिकारी मान्य करतात की, सद्य:स्थितीत सीमा फुलप्रूफ बनवणे अशक्य आहे. दोन्ही देशांत रोटी-बेटीचे नाते आहे. सीमेवरील अनेक लोकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. लोकांची शेती दोन्ही बाजूंकडे आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याच्या सुस्ता येथून वाल्मीकीनगरकडून रक्सौलपर्यंतच्या खुल्या नेपाळ सीमेचा १२० किमीचा रस्ता नदी-नाले, घनदाट जंगल आणि पहाडांतून जातो.
तेथे स्मगलिंग जोरात सुरू आहे. दिव्य मराठीच्या पाच दिवसांच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, जंगल तस्करीचे ग्रीन कॉरिडॉर बनले आहे. हजारो गुप्त मार्ग आणि पायवाटा आहेत. घनदाट जंगलात वाहनांच्या चाकांच्या खुणाही दिसतात. या भागात गंडक नदीच दोन्ही देशांची सीमा आहे. नदीमार्गे दररोज तस्कर सुस्ता येथून भारतीय सीमेत घुसतात. सुस्ता गावाची सीमा ओलांडण्याची परवानगी आपले पोलिस आणि एसएसबीला नाही.
आणि सीमाही कशी आहे? फक्त एक-दोन फूट इंच कुंपण आहे. ते रहुआटोला (भारत) आणि सुस्ताच्या लोकांनी परस्पर सहमतीने बनवले आहे. गंडक नदीचा मार्ग जनावरांच्या तस्करीसाठी वापरला जातो. भारताच्या बाजूने नदीकिनारी असलेल्या गावांच्या मदतीने तस्करांनी काही म्हशींना असे प्रशिक्षित केले आहे की, त्या चरता-चरता इतर जनावरांना नदीच्या पलीकडे घेऊन जातात.
या प्रशिक्षित म्हशींची ओळख म्हणजे त्यांच्या गळ्यात बांधलेली घंटा. तस्करांच्या जगात त्यांना टीम लीडर म्हटले जाते. नदी तीरावर चालताना आमचा सामनाही तस्करांशी झाला. ते नेपाळहून येत होते, पण सोबत चालत असलेले एसएसबीचे गस्त पथक पाहून त्यांनी पुन्हा नेपाळच्या बाजूला पळ काढला. सुस्तातील अनेक लोकांकडे भारत आणि नेपाळे या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. सुस्ताच नाही तर किशनगंजच्या गलगलिया सीमेवरील भद्रपूरपर्यंतच्या (नेपाळ) अनेक लोकांकडे दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.
सीमेवर चालतो व्याजाचा बाजार, रक्सौलमध्येच ८० केंद्रे
रक्सौल कस्टम कार्यालयासमोरून रेल्वे गुमटीच्या पलीकडे मनी एक्स्चेंजचे स्टॉल रांगेत आहेत. स्टॉलवर ५००, २००, १००, ५०, १० रु. च्या नव्या नोटांची गड्डी ठेवली होती. आम्हाला नेपाळमधून परतलेले भारतीय समजून मनी एक्सचेंजरने नोट बदलण्यासाठी बोलावले. कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकला तेव्हा सर्व स्टॉल बंद करू लागले. असे समजले की, सर्व अवैधरीत्या येथे मनी एक्स्चेंजचे काम करतात. १०० रुपयांसाठी ४ रुपये कमिशन घेतात. नियमानुसार नेपाळच्या वीरगंजमधील नेपाळ राष्ट्र बँकेतच नोटा बदलल्या जातात. पण तेथे ५००० पेक्षा जास्त भारतीय चलन दिले जात नाही. मनी एक्स्चेंजच्या स्टॉलवर तशी मर्यादा नाही. नेपाळ राष्ट्र बँकेत १६० रु. ची नेपाळी नोट दिल्यानंतर १०० रु. ची भारतीय नोट मिळते. रक्सौलमध्ये अवैधपणे उघडलेल्या सेंटरवर १६४ रु. ची नेपाळी नोट दिल्यावर १०० रु.ची भारतीय नोट दिली जाते. येथे अशी ८० केंद्रे आहेत.
मानवी तस्करीचा नवा मार्ग, या वर्षी अशा २३ घटना
खुटौना विभागाची लौकहा पंचायत भारत-नेपाळ सीमेजवळच आहे. अधिकृत मार्गाने येथे भारतातून सफरचंद, द्राक्षे, धान जाते. थोड्याच अंतरावर भुतही बलान नदी आहे. सध्या तिला पाणी नाही. हा नेपाळ आणि भारतादरम्यानचा नवा मार्ग आहे. आठवडाभराआधी नेपाळहून भारतात आणलेल्या सहा मुलींना एसएसबीने नदी भागात पकडले. लौकहापासून सहा महिन्यांपूर्वी दिल्लीसाठी बससेवा सुरू झाल्यानंतर तस्करी वाढली आहे. सध्या नेपाळहून जास्त मानवी तस्करी सीमा भागातील भारतीय गावांतून इतर शहरांत होते. ती रोखण्यासाठी एसएसबीने सोनबरसा, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी आणि जोगबनीत जागृती बस सुरू केली आहे. २०१८ मध्ये येथे मानवी तस्करीच्या २३ घटना समोर आल्या.

नेपालमधून स्वस्त पेट्रोल आणून भारतात करतात विक्री
नरकटियागंजच्या जवळ सीमेवर गावागावांत पेट्रोलची दुकाने आहेत. नेपाळहून पेट्रोल येते. तेथे पेट्रोलचा दर ६७.५० रुपये आहे आणि डिझेल ५५ रुपये लिटर. गम्हरिया गावातील पेट्रोल पंपचालकाने सांगितले की, गावातील बहुतांश लोक नेपाळ सीमेत जाऊन पेट्रोल भरतात. माझ्याकडे येथे १२,५०० लिटरच्या टाकीतील पेट्रोल २०-१५ दिवसांत विकते. कधी-कधी दीड महिनाही लागतो. गावातील अनेक लोक दिवसभर नेपाळच्या बाजूने पेट्रोल आणून विकतात. अशी अनेक दुकाने संपूर्ण सीमेवरील वस्त्यांत आहेत.

अशी होते कपड्यांची तस्करी
रक्सौलमध्ये रेल्वेमार्ग ओलांडल्यानंतर सिसवा नदीवर पूल आहे. पुलाच्या दुसरीकडे नेपाळ सीमेच्या नो मॅन्स लँडवर काही महिला गटागटांत दिसतात. महिलांनी आपल्या शरीराच्या चारही बाजूंनी कपड्याचे गठ्ठे बांधले होते. या सर्व जणी साडी, सलवार-सूटचे कापड नेपाळच्या वीरगंज बाजारात नेत आहेत, असे समजले. गठ्ठे उघडण्यास सुरुवात केली तेव्हा त्या शिव्या देऊ लागल्या. म्हणाल्या-तीन सेट कपड्याने काय होणार? येथे तर कोट्यवधींची हेराफेरी होत आहे.
८ सेट कापडाचे गठ्ठे सोडवण्यासाठी १० हजार मागत आहात? रक्सौलमध्येच एका महिलेला आणले होते. तिला सिकटात ४ किलो चरससोबत पकडण्यात आले होते. तिने हे चरस नेपाळमधून कमरेला बांधून आणले होते. सिकटा येथून बेतियाला जाणाऱ्या बसमध्ये ती बसली होती. तेव्हाच गुप्त माहितीच्या आधारे एसएसबीने तिला पकडले आणि रक्सौलला पाठवले. तिथे एसएसबीची महिला शाखा आहे.

सीमेवर दारूची तस्करी जोरदार सुरू
रक्सौल ब्लॉकच्या महदेवा गावात एसएसबीची छावणी आहे. एका जवानाने दारू तस्करीच्या नव्या पद्धतीविषयी सांगितले. मुसहरवा सीमेच्या नो मॅन्स लँडवर दोन्ही देशांतर्फे प्राथमिक शाळा आहेत. चहाच्या दुकानात तस्करांचे सिंडिकेट एक मोठी डील करत होते. या सीमा मार्गाने भारतातून नेपाळला ब्राऊन शुगर पोहोचवली जाते, असे सांगण्यात आले. नो मॅन्स लँडवर नेपाळच्या बाजूने असलेल्या झोपड्यांत दारूचे अड्डे होते.
आदापूर ब्लॉकच्या बेलदरवा छावणीच्या पलीकडे नीलकंठवा गाव आहे. नो मॅन्स लँडवरील एका खासगी भारतीय शाळेत नेपाळची अनेक मुले शिकतात. मुरतिया सीमेवरून जनावरांची तस्करी बेधडक सुरू आहे. कोरैया सीमेच्या पलीकडेही कोरैया गाव आहे. कोरैया आणि चंद्रमन सीमेवर तस्कर दारू आणि खत यांचे आदान-प्रदान करताना दिसले.

जनावरांच्या तस्करीसाठी लाई खोखर बदनाम
सीमेत लाई खोखर नावाचे गाव आहे. जनावरांच्या तस्करीसाठी ते कुख्यात आहे. तेथे एसएसबीचे जवान आणि ग्रामस्थ यांच्यात अनेकदा संघर्षही झाला आहे. एकदा तर ग्रामस्थांनी जवानांना ढकलून देत नेपाळच्या सीमेत पोहोचवले होते. जवान कसे तरी जीव वाचवून तेथून पळून आले. तेथे शस्त्रांसह सीमा ओलांडण्यास मनाई आहे.

प्रणाम सर हाही एक कोड वर्ड
सीमेवरील मुलांना असे प्रशिक्षण दिले की, एसएसबीच्या जवानांना पाहताच ते प्रणाम सरअसे म्हणतात. आम्ही एसएसबीच्या एका अधिकाऱ्याला म्हटले की, गावांतील मुले तुमच्याकडे आदराने पाहतात. तेव्हा तो अधिकारी म्हणाला की, हा आदर नाही. एसएसबी गस्त घालत आहे असा अवैध व्यापारात सामील लोकांसाठी दक्षतेचा इशारा आहे.


No comments:

Post a Comment