Total Pageviews

Tuesday 6 November 2018

मी टू’चा सोयिस्कर अर्थ काढणारे महाभाग! Source:तरुण भारत6 Nov 2018 चारुदत्त कहू |



विदेशातून आलेले ‘मी टू’चे फॅड थांबण्याची काही चिन्हे नाहीत. भारतातही त्याचे लोण पसरत चालले आहे. सिनेअभिनेत्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना ‘मी टू’चा फटका बसला आहे. कोणत्याही क्षेत्रात अथवा कार्यालयात वरिष्ठाने अथवा सहकार्‍याने केलेल्या लैंगिक छळाविरुद्ध सोशल मीडियाद्वारे आपबिती कथन करणार्‍या या चळवळीच्या खरे-खोटेपणाबद्दल समाजात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन मतप्रवाह यात बघायला मिळत आहेत.  दुसरा मतप्रवाह या महिलांची बाजू घेणारा आहे. वर्षानुवर्षे प्रतिष्ठितांच्या हुद्यामुळे, समाजातील त्याच्या स्थानामुळे, त्यांच्या लैंगिक चाळ्यांविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत न झालेल्या महिला या निमित्ताने व्यक्त होत आहेत, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध जनतेच्या न्यायालयात न्याय मागत आहेत, ही बाब योग्य ठरविणारा हा मतप्रवाह आहे. वकिलीबाण्यातून बघितले तर कुठलाही एक मतप्रवाह पूर्णपणे खरा आणि उभय बाजूंना न्याय देणारा ठरू शकत नाही. कारण सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणार्‍या महिला आणि कथित अत्याचार करणार्‍या व्यक्ती यांच्यातील वैयक्तिक आचरणातून हे प्रकार घडलेले असल्याने, त्यातील खरे-खोटेपणाबद्दल त्या दोन व्यक्तींशिवाय दुसरी व्यक्ती मत व्यक्त करण्यास सक्षम समजली जाऊ शकत नाही. पण, असे म्हणून आपण सरसकट ‘मी टू’द्वारे व्यक्त झालेल्या महिलांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेऊ शकत नाही. जगाचा विचार केला तर अर्धे विश्‍व महिलांचे आहे आणि या विश्‍वातील सार्‍याच महिला ‘मी टू’द्वारे व्यक्त झालेल्या नाहीत. त्यातील अनेक पीडितांची अजूनही व्यक्त होण्याची भीती गेलेली नाही. त्यांच्यातील अनेकींना व्यक्त होण्याची इच्छा असूनही सामाजिक दडपणाखाली त्या आजही अव्यक्तच आहेत. अनेकींनी देवच अपराध्यांना योग्य तो धडा शिकवेल, अशी भूमिका घेऊन अबोल राहण्यालाच पसंती दिली आहे. या सार्‍या ‘मी टू’ प्रकाराची शहानिशा कुठल्या मार्गाने करायची, याचा मार्ग अजूनतरी दृष्टिपथात नसला, तरी त्याच्या तडाख्यात ‘मी टू’ फेम महिलांनी उल्लेख केलेल्या पुरुषांबद्दल संशयाचे जाळे निश्तिचच निर्माण झाले आहे. या संशयाच्या जाळ्याचा चक्रव्यूह कसा भेदायचा, हे ज्याचे त्यालाच ठरवायचे असले, तरी समाजानेही पुढाकार घेऊन या प्रकरणातील खरेपणा शोधून काढण्यासाठी आणि उगाच तर कुणी यात भरडले जात नाही ना? हे शोधून काढण्याची गरज आहे. ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ जितके लवकर होईल तितकी लवकर न्याय मिळाल्याची भावना अन्यायकर्त्याच्या मनात निर्माण होईल. अभिनेते नाना पाटेकर यांनी याबाबत काहीही मत व्यक्त न करण्याची भूमिका घेतली आहे; तर एम. जे. अकबर यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या मार्गाने तडीस नेण्याच्या निर्धार केला आहे. भारतात तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून या चळवळीला वेग आला. या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यास सुरुवात केली. चरित्र अभिनेता आलोक नाथ यांच्यावरही अत्याचाराचे आरोप झाले. पण, ‘मी टू’ प्रकरणाने बळी घेतला तो भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व प्रख्यात पत्रकार एम. जे. अकबर यांचा! त्यांच्याविरुद्ध एक-दोन नव्हे, तर तब्बल डझनभर महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. पण, एक बाब ध्यानात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे ‘मी टू’ चळवळ थंडावली नसली, तरी एम. जे. अकबर यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर या अभियानाची गती मंदावली आहे. एक मतप्रवाह असा आहे की, बिशप फ्रँको मुरक्कल यांच्यावर ननने केलेल्या बलात्काराच्या आरोपावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘मी टू’ चळवळ सुरू केली गेली. आणि ज्या वेळी या चळवळीच्या सूत्रधारांचे मित्र आणि नातेवाईक यात अडकू लागले, तेव्हा आपसूकच या चळवळीची गती धिमी करण्यात आली. आतातर डाव्या विचारांचे पत्रकार विनोद दुआ यांच्यावरही आरोप झाल्याने, ‘मी टू’ थंडबस्त्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली. ‘मी टू’ चळवळीला चालना देण्याचे काम विशिष्ट वृत्तवाहिन्यांनी आणि काही महाभागांनी अहमहमिकेने केले, हे आपण जाणतोच. यात वायर नावाची बेवसाईट आणि एनडीटीव्ही ही वृत्तवाहिनी आघाडीवर होती, हेदेखील नमूद करायला हवे. मोदी सरकारविरुद्ध कोणते मुद्दे चर्वितचर्वणासाठी मिळतात, एवढेच शोधून काढणे आणि त्यावर काथ्याकूट करणे, एवढेच लक्ष्य या माध्यमांनी निर्धारित केले आहे. सरकारविरुद्ध लिहावे, बोलावे हे लोकशाहीत अध्याहृतच आहे. पण, कुठल्याही विचारांबद्दल, व्यक्तीबद्दल कावीळ झाल्यासारखी आपली भूमिका नसावी, हेही तेवढेच खरे! पण, त्याचे तारतम्य या माध्यमांना राहिलेले नाही, हेच याबाबतच्या चर्चामधून जगजाहीर झाले.
‘मी टू’ चळवळीमागे बिशप मुरक्कल यांच्याबाबत आणि ख्रिस्ती धर्माबद्दल सुरू असलेल्या चर्चेला विराम देण्याचा हेतू असल्याची जी चर्चा आहे, त्याला पाठबळ देणारे पुरावेदेखील आहेत. मुरक्कल यांच्याविरुद्ध साक्ष देणार्‍या कोरियाकोस या पादरीची तर हत्याच करण्यात आली. यानंतर चर्चमधील लैंगिक अत्याचाराचे आणखी एक प्रकरण चर्चेला आहे. मेघालयातील एका खासी युवतीवर ब्रदर फ्रान्सिस गाले आणि ब्रदर मस्कट यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे हे प्रकरण बरेच चर्चिले गेले. ही खासी महिला आज ४० वर्षांची आहे. ती ५ वर्षांची असताना या दोन ख्रिस्ती धर्मगुरूंनी तिला त्यांच्या लैंगिक अत्याचाराचे शिकार बनविले आणि वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत हा प्रकार सुरू होता. यामुळेही चर्चची बदनामी होऊ लागल्याने ‘मी टू’चा आधार घेतला गेला, असा एक मतप्रवाह आहे.
‘मी टू’ प्रकरणात एम. जे. अकबर यांच्याबाबत न्यायालये काय म्हणतात, समाजातील लोकांच्या त्याबाबत काय प्रतिक्रिया आहेत, शासनातील लोक काय म्हणतात हे ऐकून न घेता ‘वायर’ने त्यांना दोषी ठरविण्यासाठी कोणकोणते मुद्दे आहेत, यावर खुली चर्चा सुरू करून दिली. हा प्रकार नीतिमत्तेला धरून निश्‍चितच नव्हता. एकीकडे अकबर यांचे वस्त्रहरण करण्याची एकही संधी न सोडणार्‍या ‘वायर’ने, विनोद दुआ यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केल्याबद्दल दुआ यांची माफी मागितली, यातून काय निष्कर्ष काढायचा?
चित्रपट निर्माती निष्ठा जैन यांनी जोवर त्यांचे नाव घेतले नाही, तोवर विनोद दुआ ‘मी टू’ चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते होते. देश-विदेशातील महिलांनी ‘मी टू’ सांगत व्यक्त केलेले अनुभव त्यांनी वृत्तवाहिन्यांवर सचित्र रंगविले. लोकांनाही चर्चेला वाव दिला आणि आरोपित व्यक्तींविरुद्ध (विशेषतः आपल्या विचारांचे पुरस्कर्ते नसलेल्यांविरुद्ध) संशयाचे धुके कसे गदड होईल, याची पूर्ण काळजी त्यांनी चर्चेला बोलावलेल्या व्यक्तींकडून योग्य ते वदवून घेतली. खरेतर ‘मी टू’ चळवळीमार्फत महिला त्यांच्याविरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोलायला लागल्या, ही धाडसी बाबच म्हटली पाहिजे. पण, त्या महिलांच्या आडून विरोधकांना, वैचारिक शत्रूंना धराशाही करण्याच्या या महाभागांच्या प्रयत्नांचे समर्थन कसे होऊ शकेल? आरोप करणार्‍या आणि ज्याच्यावर आरोप झालेला आहे त्या व्यक्तींना युक्तिवादाची संधी मिळायलाच हवी. पण, डाव्या विचारांच्या मंडळींना हे आमान्य आहे. ‘आपला तो बाळ्या आणि दुसर्‍याचं ते कार्टं!’ या न्यायाने डाव्यांनी अकबर यांची बदनामी करताना दुआ यांच्यासह आपल्या सहविचारकांना मात्र ‘क्लीन चिट’ देण्याचे प्रयत्न केले. याच विनोद दुआंनी, तनुश्री दत्ता यांनी दहा वर्षांपूर्वीच त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडल्याची वाच्यता करून, त्या वेळी तिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही, असे सांगून ‘मी टू’ चळवळीची तोंडभरून प्रशंसा केली होती. पण, आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना त्यांनी ‘द वायर’चे संस्थापक-संपादक सिद्धार्थ भाटिया यांच्यावर भारती शुक्ला आणि रीमा संन्याल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून झालेल्या आरोपांबद्दलही मतप्रदर्शन करायला हवे होते. पत्रकार रवीश कुमार यांच्या भावावर झालेल्या आरोपांबाबत तसेच त्यांच्या वैचारिक मित्रांबाबत उपस्थित झालेल्या सवालांबाबतही दुआ यांनी साधलेली चुप्पी बरेच काही सांगून जाणारी आहे

No comments:

Post a Comment