Total Pageviews

Saturday 24 November 2018

मरिनाचा प्रकल्प मुंबईच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा -जयंत होवाळ, Maharashtra Times |


पूर्वेकडे नवी पहाट !
मुंबईत आता पर्यटनस्थळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहेत. जी काही आहेत, त्यांच्यात काळानुरूप सुधारणा झालेली नाही. राणीच्या बागेची रया गेली आहे. पश्चिम किनारे गलिच्छ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्व किनारपट्टीवर नवी पहाट उगवत आहे. आगामी काळात पूर्व किनारपट्टी मुख्य आकर्षण ठरेल, अशी चिन्हे आहेत.


पूर्वेकडे नवी पहाट !
मुंबईचा समुद्रकिनारा म्हटले की गेट वे ऑफ इंडिया, दादर -गिरगाव चौपाटी, जुहू आणि वर्सोवाहे वर्षानुवर्षीचे समीकरण! गेट वे ऑफ इंडियावर रोज हजारो पर्यटक येतात. जलवाहतुकीच्या माध्यमातून आसपासच्या पर्यटनस्थळी फेरफटका मारतात. मरिन ड्राइव्हला तिथल्या कट्ट्यावर बसून विशाल पसरलेल्या सागराचे रूप न्याहाळतात. समुद्राच्या लाटांशी खेळायचे असेल, तर मग गिरगाव, दादर चौपाटी किंवा जुहू वर्सेावा बीचकडे पावले वळतात. प्रामुख्याने मुंबईचा पश्चिम किनारा हाच आतापर्यंत चर्चेत राहिला आहे. पूर्व किनारा त्या तुलनेत दुर्लक्षितच राहिला. पण येत्या तीन वर्षांत पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व किनाराच जास्त चर्चेत आणि पर्यटकांना आकर्षित करणारा ठरू शकेल. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट अर्थात एमबीपीटीचा व्याप गेल्या काही वर्षात खूपच कमी झाला आहे. मुंबईत बंदरातून होणारी कोळशाची वाहतूक थांबली आहे. काही मोजका मालच आता बंदरात येतो. कामाचा व्याप कमी झाल्याने एमबीपीटीच्या कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यामुळे एमबीपीटीची ओळख पुसल्यासारखी झाली होती. मात्र एमबीपीटीच्या शेकडो एकर मोकळ्या जागेचा विकास करण्याची योजना आखण्यात आल्यापासून चित्र एकदम बदलून गेले आहे. केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांची 'व्हीजन' व एमबीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांची कार्यक्षमता या दोन्हींचा मेळ बसल्याने मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर विकासाचा सूर्य उगवणार आहे. पूर्व किनारपट्टीसाठी गडकरी प्रकल्पांचा धडाका लावत विशेष लक्ष घातले आहे. तर, प्रत्येक प्रकल्प झपाट्याने मार्गी लावण्यासाठी भाटिया प्रचंड मेहनत घेत आहेत.

मुंबईचा पूर्व किनाऱ्यावर अर्थात एमबीपीटीच्या मोकळ्या जागेवर तब्बल २५ प्रकल्प आकारास येत असून त्यासाठी साडेचार हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे प्रकल्प फक्त कागदावरच नाहीत, तर त्यापैकी दोन मोठे महत्त्वाचे प्रकल्प पूर्णही झाले असून उर्वरित प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत, तर काही प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. मुंबई बंदरातील क्रूझ व्यवसायाला चालना देण्यासाठी डोमेस्टिक व आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल उभारले जात आहे. त्यापैकी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल कार्यान्वित झाले असून पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टर्मिनलही सुरू होईल. आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे यापुढे महाकाय अशा देशी तसेच परदेशी क्रूझ थेट मुंबईत बंदरातूनच प्रवासाला सुरूवात करतील. क्रूझ सेवा महागडी असल्याने सर्वसामान्यांना त्याचा काय उपयोग असा सवाल केला जातो. मात्र त्या माध्यमातून मुंबईकडे अधिक पर्यटक येऊन महसूल मिळेल, ही बाबही महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय किंवा डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल क्रूझ व्यवसायाला अपेक्षप्रमाणे प्रतिसाद मिळाला, मोठ्या संख्येने क्रूझ येऊ लागल्या, तर आणखी एक टर्मिनल इमारत बांधण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

जलवाहतुकीला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने भाऊचा धक्का ते मांडवा व नेरूळ या त्रिकोणात प्रवासी तसेच वाहनांची ने आण करणारी रोरो सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पाची जेट्टी बांधून तयार आहे. फक्त आता या सेवेसाठी ग्रीसमधून जहाज मुंबईत येण्याची प्रतिक्षा आहे. येत्या दोन महिन्यात ही वाहतूक सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ दोन तासाने वाचेल.

मुंबई पोर्ट वॉटर फ्रंट या प्रकल्पात अॅम्फिथिएटर, स्केटिंग रिंग, मुंबईकरांसाठी वॉकर्सवे, जॉगिंग ट्रॅक, साकलिंग ट्रॅकची सुविधा असेल. त्यामुळे समुद्राच्या लगतच विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होईल. १७ हजार चौरस मीटर क्षेत्रात हा वॉटर फ्रंट आकारास येणार आहे. यातील वॉकवे समुद्रालगतच असल्याने मरिन ड्राइव्हच्या धर्तीवर आनंद घेता येईल. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या समुद्रात दोन तरंगती रेस्टॉरन्ट सुरू झाली आहेत. ही रेस्टॉरन्ट महागडी असल्याने सर्वसामान्य माणूस तेथे जाण्यास धजावणार नाही. मात्र वॉटर फ्रंट प्रकल्पात सी-साइड रेस्टॉरन्ट सुरू केले जाणार असल्याने अगदी समुद्रात नाही, पण समुद्रालगतच्या रेस्टॉरन्टमध्ये जाण्याचा आनंद घेता येईल. हे रेस्टॉरन्ट वाजवी दरातील असेल, अशी अपेक्षा आहे.

मरिनाचा प्रकल्प मुंबईच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. हा प्रकल्प विशेष करून यॉटसाठी आहे. एका वेळी ३१० यॉट पार्क करण्याची सुविधा आहे. यॉटची सफर वाजवी ठेवली तरी सर्वसामान्याना परवडू शकेल. प्रत्येक वेळी बाहेरचे पर्यटक डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पाची आखणी केली पाहिजे असे नाही. तर मुंबईकरांनाही मुंबईतच आणखी पर्यटन स्थळे उपलब्ध झाली, तर नक्कीच आवडेल. कान्होजी आंग्रे बेट हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक बेटाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी, यादृष्टीने हे बेट विकसित केले जात आहे. या ठिकाणी वॉटर स्पोर्टसची सुविधा असेल. मुंबईपासून हे बेट १३ नॉटिकल मैलावर असल्याने मुंबईकरांना तेथे सहज जाता येईल.

मरिन ड्राइव्ह हा गजबजलेला परिसर. समुद्रालगतचा कट्टा कायम वर्दळीने गजबजलेला असतो. पण थेट समुद्राशी लगट करता येत नाही. या ठिकाणी जेट्टी बांधली जाणार आहे. येथे दहा आसनी सी-प्लेन, पॅसेंजर लॉंचसेवा तसेच वॉटर स्पोर्टसची सुविधा असेल. जेट्टीमुळे या ठिकाणी पॅसेंजर टर्मिनल सुरू करता येईल. साहजिकच गेटवेऑफ इंडियाला पर्याय मिळेल.

शिवडी ते एलिफंटा रोप वे पूर्व किनारा विकासातील आणखी एक महत्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास थोडा अवधी आहे. साधारणपणे तीन ते चार वर्षाचा कालावधी गृहित धरण्यात आला आहे. आठ किलोमीटर लांबीचा, तब्ब्ल ८०० कोटी रूपयांचा हा प्रकल्प दळवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात मोलाचा ठरणार आहे. प्रवासी वाहून नेणाऱ्या ३६ ट्रॉल्या एकाचवेळी रोपवेवरून येजा करतील. याशिवाय ससून डॉकचे नूतनीकरण, बीपीटीच्या कर्मचाऱ्यांसह अन्य मुंबईकरांनाही वैद्यकीय सुविधा पुरवणारे अद्ययावत हॉस्पिटल, जहाज दुरूस्ती केंद्र, इंदिरा डॉकचे नूतनीकरण, ऑटोमोबाईल हब टर्मिनल, जहाजातून येणाऱ्या मालाला गोदामापर्यंत पोहचवण्यासाठी कोस्टल रोड, आदी २५ प्रकल्प राबवले जात आहेत.


No comments:

Post a Comment