Total Pageviews

Sunday 4 November 2018

खातरजमा केल्याशिवाय तरुणांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करु नये - ब्रिजेश सिंह महा एमटीबी

फेसबुक, व्हाटसअॅप ही समाज माध्यमे आज जागतिक राजकारण बदलत आहेत. समाजमाध्यमांकडून आलेल्या पोस्टची कोणतीही खातरजमा न करता आपण ती पुढे पाठवित असतो. अशा अफवा पसरविणाऱ्या पोस्टमुळे समाजातील वातावरण बिघडते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी समाज माध्यमांवरील पोस्ट दुसरीकडे पाठविताना (फॉरवर्ड) सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून त्याची खातरजमा करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ‘संसदीय लोकशाही पुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान आणि अफवांचे पीक, व्यवस्थेला धोका’ या विषयावरील परिसंवाद सिंह बोलत होते. यावेळी नागपूर शहराचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी नक्षलवादी चळवळीची माहिती दिली.
 
समाज माध्यमांमध्ये फिरणाऱ्या अफवांचे वास्तव विशद करून सिंह म्हणाले, समाज माध्यमे येण्यापूर्वी अफवा पसरविण्यासाठी व्यक्तिचा थेट सहभाग असायचा व त्यासाठी वेळ लागत असते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे व सहज उपलब्ध असणाऱ्या समाज माध्यमांमुळे (सोशल मीडिया) काही क्षणात अफवा पसरविता येतात. आज कोणतीही खातरजमा न करता व्हाटसअॅपवर आलेली पोस्ट पुढे पाठविली जाते. समाजातील महापुरुष, जाती, धर्म, शासनविरुद्धची खोटी माहिती आदी पोस्टची खातरजमा न करता फॉरवर्ड करणे घातक होते. पारंपरिक माध्यमे ही प्रत्येक माहितीची खातरजमा करूनच ती प्रसिद्ध करत असतात. परंतु समाज माध्यमांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे खातरजमा होत नाही. एखाद्या पोस्टबद्दल तक्रार करण्याची सुविधा फेसबुकमध्ये असली तरी व्हाटसअॅपवर ती सोय नाही. अफवा पसरण्यापासून रोखणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे तरुणांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी ती घटना, पोस्ट खरी आहे का याची खातरजमा करावी. त्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी.
 
शहरी भागातील नक्षलवादी चळवळीचा धोका या विषयावर नागपूर शहराचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे बोलताना म्हणाले, गेल्या काही वर्षात केंद्रीय पोलीस दल, राज्य शासनाचे सी ६० पोलीस दल यांच्या माध्यमातून जंगलातील नक्षल चळवळीचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळींने आता शहरी भागाकडे लक्ष वळविले आहे. देशातील २१ राज्यात नक्षल चळवळ असून त्यातील १४ राज्यात ते सक्रिय आहे. देशातील सिलिगुडी ते केरळ अशा सर्वच भागात सक्रिय आहेत. राज्यातील गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील जंगलांमध्ये नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. पोलीसांच्या विशेष पथकांनी गोंदियामधील चळवळीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविले आहे. सध्या राज्यातील सुमारे विविध ५२ संघटना या नक्षल चळवळीला पाठिंबा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून हिंसक कारवाई करण्याचे काम ही चळवळ करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्यांपासून व हिंसा घडविण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन देखील बोडखे यांनी केले.
 
यावेळी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी प्रास्ताविक केले तर ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी परिसंवादाचे विश्लेषण करून आभार मानले.

No comments:

Post a Comment