Total Pageviews

Sunday 18 February 2018

नौदलाचे महत्त्व जाणणारा राजा- छत्रपती शिवराय-कर्नल अनिल आठल्ये

नौदल ही कोणत्याही
साम्राज्याची स्वतंत्र ताकद आहे.
ज्याच्याकडे नौदल आहे,
तो लाटांवर राज्य करतो.
 
रामचंद्रपंत अमात्य,
छत्रपती शिवरायांचे अमात्य.
गुजरातमधील लोथल येथे प्राचीन बंदर आणि जहाजबांधणीची जी जागा आढळून आली आहे, ती आपल्याला इसवी सनाच्या एक हजार वर्षे मागे घेऊन जाते. जहाजबांधणीच्या कलेत भारतीय लोक प्राचीन काळापासून निपुण आणि अग्रेसर होते, हे यावरून लक्षात येते. भारतीयांनी भूमी गमावल्यानंतर सागरी व्यापार आणि जहाजांची संख्या कमी झाली आणि ही पोकळी नंतर अरबांनी भरून काढली. अरबस्तानातून येणार्‍या व्यापार्‍यांच्या वसाहती लवकरच भारताच्या पश्‍चिम तटावरील बहुतांश महत्त्वाच्या बंदरांजवळ उभ्या राहू लागल्या.अशा काळात सागरी शक्‍तीची जाणीव असलेले जे मोजके राज्यकर्ते त्या काळी झाले, त्यापैकी शिवाजी महाराज हे एक होत. त्यांनी दौलतखान आणि मायनाक भंडारी यांची नौदलाचे संयुक्‍त प्रमुख म्हणून नियुक्‍ती केली. लढाऊ नाविक दलाला पाठबळ देण्यासाठी अनेक सागरी किल्ले बांधले. मुंबईपासून 150 किलोमीटर दक्षिणेला महाराजांनी आपला मुख्य नाविक तळ उभारला. ही जागा पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्दीच्या नौदल तळांपासून सुरक्षित अंतरावर होती. मालवणपासून दोन किलोमीटर पाण्यात असलेल्या खडकावर उभारलेला हाच तो सिंधुदुर्ग किल्ला होय. स्थानिक मच्छीमारांना शिवाजी महाराजांनी नौदलात भरती करून घेतले. त्यानंतरच्या काही वर्षांत एकंदर 58 किल्ले शिवरायांनी वापरात आणले. विजयदुर्ग आणि अलिबागजवळील कुलाबा हे त्यातील महत्त्वाचे किल्ले होत. 
फेब्रुवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या नाविक दलाच्या ताकदीची चाचणी घेण्याचे ठरविले. दोन मोठ्या जहाजांसह 88 नौकांच्या ताफ्यासह चार हजारांचे सैन्य घेऊन मराठ्यांच्या नौदलाने बसरूर या बंदरावर हल्ला चढविला. हा ताफा बसरूरकडे निघाला असताना गोव्याजवळ पोर्तुगीजांच्या नौदलातील सैनिकांनी पाहिला; परंतु अत्यंत प्रबळ असे मराठा नौदल पाहून पोर्तुगीजांनी शहाणपणाने या ताफ्यापासून दूरच राहणे पसंत केले. 1680 पर्यंत मराठा नौदल खूपच शक्‍तिशाली बनले होते. मराठा नौदलाकडे त्या काळी 300 टन वहनक्षमता असलेली 45 मोठी जहाजे होती, तर 150 छोट्या नौका आणि सुमारे 1100 गलबते या ताफ्यात होती. ब्रिटिश व्यापार्‍यांचा भारतातील कावा ओळखणार्‍या मोजक्या भारतीय राजांपैकी शिवाजी महाराज हे एक होत. ब्रिटिश हे सामान्य व्यापारी वा सावकार नव्हेत. त्यांच्या पाठीशी तेथील राज्यकर्त्यांची प्रचंड ताकद आहे. ते इतके धूर्त आहेत की, तुमच्या जवळपासचे काहीही ते तुमच्या नकळत चोरून नेऊ शकतील. त्यांच्याशी व्यवहार करताना पुरेशी सावधगिरी बाळगा,” असे पत्र शिवरायांनी त्यांच्या एका प्रमुख अधिकार्‍याला लिहिले होते. 
मुंबईजवळ जंजिरा येथे ब्रिटिशांनी सिद्दीला दिलेला आश्रय हे ब्रिटिश आणि मराठे यांच्यातील पहिल्या संघर्षाचे कारण ठरले. मराठ्यांच्या नौदलाशी सिद्दीची गाठ पडली, तेव्हा तो पुरता घाबरला आणि मुंबई बंदराजवळ त्याने आश्रय घेतला. हे ठिकाण तोपर्यंत ब्रिटिशांचे पश्‍चिम किनारपट्टीवरील मुख्य व्यापारी केंद्र बनले होते. परदेशी ताकदीला आणि सिद्दीला शह द्यायचा असेल, तर मुंबईकडे येणारा त्यांचा मार्ग बंद करायला हवा आणि त्यासाठी तसा एक किल्ला बांधायला हवा, हे शिवरायांनी ओळखले. 1672 मध्ये शिवरायांनी मुंबईच्या दक्षिणेला असलेले खांदेरी हे छोटे बेट ताब्यात घेतले. हे बंदर मुंबईकडे सागरी मार्गाने येणार्‍या शत्रूला थोपविण्यास योग्य होते आणि त्याच्या साह्याने ब्रिटिशांना शह देता येईल, हे शिवाजी महाराजांनी ओळखले. अत्यंत काळजीपूर्वक सर्व जुळवाजुळव करून त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये शिवरायांनी या बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली.
दौलतखान आणि मायनाक भंडारी या शिवरायांच्या दोन प्रमुख नौदल अधिकार्‍यांनी या बांधकामाची सूत्रे सांभाळली. खांदेरी हे बेट म्हणजे मुंबई द्वीपसमूहाचाच एक भाग आहे आणि त्यामुळे ती आमच्या अखत्यारीत येतात, असा दावा ब्रिटिशांनी केला. ब्रिटिश आणि सिद्दी यांनी मराठा सैन्यावर एकत्रितपणे हल्ला करण्याची धमकी दिली. त्यावेळी शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर होते आणि त्यामुळे या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्यास मराठ्यांना वेळ नव्हता. सात वर्षांनंतर जेव्हा शिवाजी महाराजांना या परिसराकडे लक्ष देण्यास सवड मिळाली, तेव्हा या बेटावरील किल्ल्याच्या बांधणीचे काम 2 सप्टेंबर 1679 रोजी पुन्हा सुरू करण्यात आले. पोर्तुगीजांनी या घटनाक्रमाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले. ब्रिटिशांवर पुरेसा दबाव आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबई बंदराची घेराबंदी जमिनीवरील फौजेच्या साह्याने करण्याचे ठरविले. मुंबईवर हल्ला करण्यासाठी कल्याण परिसरात त्यांनी चार हजार जणांचे प्रबळ सैन्य गोळा केले. सुरतेवर मराठ्यांनी केलेल्या प्रचंड हल्ल्याच्या आठवणी ताज्या असल्यामुळे मुंबईमध्ये घबराट पसरली. अखेर मराठ्यांनी पाचशे जणांचे दल खांदेरी बंदरावर उतरविले आणि किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. यातील दोनशे लोक बांधकाम मजूर होते, तर तीनशे जण सैनिक होते. या तुकडीची रसद तोडून त्यांना शरण येण्यास भाग पाडण्याचे ब्रिटिशांनी ठरविले. याकामी चार मोठी जहाजे मुंबईहून सोडण्यात आली; परंतु या तुकडीला रसद पोहोचविण्याचे काम मराठ्यांनी छोट्या नौकांच्या साह्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन सुरूच ठेवले. 
19 सप्टेंबर रोजी ब्रिटिशांनी या बेटाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु दक्ष असलेल्या मराठा सैनिकांनी तो हाणून पाडला. अखेर ऑक्टोबरमध्ये ब्रिटिशांनी या तुकडीची रसद रोखण्यासाठी आणखी काही जहाजे समुद्रात पाठविली आणि त्याचा परिणाम मात्र जाणवू लागला. 22 सप्टेंबरला उभय नौदलांमध्ये मोठा संघर्ष झाला आणि आकाराने लहान असलेल्या मराठा नौदलाचे मोठे नुकसान झाले. रसद तोडण्याचा ब्रिटिशांचा डाव तीन महिने सुरू होता. डिसेंबर 1679 मध्ये ब्रिटिशांनी बेटावरील तुकडीला निरोप पाठविला आणि शरण येण्यास सांगितले; परंतु शिवरायांनी त्यांच्या सैनिकांना अखेरच्या क्षणापर्यंत निकराची झुंज देण्याच्या सूचना दिल्या होत्या. जानेवारी 1680 मध्ये शिवरायांनी ब्रिटिशांच्या राजापूर येथील वखारीवर कारवाई केली आणि तेथील ब्रिटिशांना कैद केले. अखेर 8 जानेवारी 1680 मध्ये ब्रिटिशांना तह करण्यास भाग पडले. या तहांतर्गत ब्रिटिश आणि मराठा यांच्यात 30 जानेवारी रोजी एक करार झाला आणि खांदेरी बेटाची ब्रिटिशांनी केलेली कोंडी अखेर फुटली. खांदेरी बेटावरील मराठ्यांचा किल्ला ही ब्रिटिशांना भविष्यात कायमची डोकेदुखी ठरणार होती. मराठ्यांनी बचावात्मक पद्धतीने मिळविलेला हा मोठा विजय ठरला. या संघर्षानंतर अवघ्या दोन महिन्यांनी शिवाजी महाराजांचे देहावसान झाले. नौदलाच्या माध्यमातून ब्रिटिशांशी दिलेली झुंज ही त्यांनी केलेली अखेरची लढाई ठरली, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना आणखी आयुष्य लाभले असते, तर त्यांनी नौदल अधिक प्रबळ केले असते आणि किनारपट्टीकडे लक्ष केंद्रित केले असते, हे नक्‍की. 
मराठ्यांनी मस्कतबरोबर व्यापार सुरू केला होता. प्रामुख्याने मिठाचा व्यापार ते करीत असत. सुपारीच्या व्यापारातही मराठ्यांची मक्‍तेदारी प्रस्थापित व्हावी, अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती. अत्यंत किफायतशीर अशा मसाल्यांच्या व्यापारावरही त्यांची नजर होती. दक्षिणेच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी पश्‍चिमेकडील बहुतांश समुद्रकिनार्‍यांवर हुकूमत प्रस्थापित केली होती. शिवरायांचा मृत्यू ही इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना ठरली. कारण, अत्यंत महत्त्वाकांक्षी मुघल सम्राट औरंगजेब याला दक्षिणेकडे येऊन मराठ्यांचा पूर्ण पराभव करणे आता शक्य असल्याचे वाटू लागले होते. तोपर्यंतच्या सर्व मुघल सम्राटांनी हे दुःसाहस टाळले होते. मुघल सम्राटांशी सातत्याने जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरू असल्यामुळे मराठ्यांना ब्रिटिशांच्या धोक्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळही मिळाला नव्हता; परंतु त्यानंतरच्या 70 वर्षांपर्यंत ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये तुलनेने शांततामय वातावरण राहिले. मराठ्यांची ताकद क्षीण होत असल्याचा फायदा ब्रिटिशांनी फारसा घेतला नाही. कारण, तोपर्यंत कान्होजी आंग्रे या पराक्रमी दर्यावर्दीने मराठा नौदलाची सूत्रे हाती घेतली होती. त्याने मराठा नौदलाची ताकद अशा प्रकारे विकसित केली, की ब्रिटिश कान्होजींना कर देत होते आणि पश्‍चिमेकडील समुद्रातून मालाची ने-आण करण्यासाठी कान्होजींचा पासगरजेचा ठरला होता. 
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय अत्यंत योग्य असून, मराठा नौदलाचे स्मरण त्यानिमित्ताने होईल आणि आपल्या नौदल परंपरेलाही उजाळा मिळेल. पश्‍चिम किनारपट्टीवर नौदलाची फेरउभारणी करण्याचे श्रेय निःसंशय छत्रपती शिवाजी महाराजांचेच!


No comments:

Post a Comment