Total Pageviews

Monday 3 October 2016

पाकची ६२ टक्के विमाने युद्ध लढण्यास अक्षम!


पाकची ६२ टक्के विमाने युद्ध लढण्यास अक्षम! हे खरे आहे. उद्या जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले, तर पाकिस्तानची वायुसेना युद्ध लढण्यास सक्षम नाही. कारण, पाकिस्तानी वायुसेनेत असलेली ६२ टक्के विमाने युद्धात भाग घेण्यास अक्षम आहेत, असे दस्तुरखुद्द पाकिस्तानचे एअर चीफ मार्शल सोहेल अमान यांनीच म्हटले आहे! ही धक्कादायक माहिती नुकतीच बाहेर आली आहे. पाकिस्तानी वायुसेनेजवळ असलेली सर्वात भरवशाची विमाने म्हणजे अमेरिकानिर्मित एफ-१६! पण, ही विमाने पाकिस्तानने १९८२ साली म्हणजे ३४ वर्षांआधी खरेदी केली होती. अशी ७४ विमाने ताफ्यात आहेत. पण, त्यापैकी ५० विमाने अशी आहेत, ज्यांचे सुटे भागच उपलब्ध नाहीत! आता पाकिस्तानने एक निविदा काढून या विमानांच्या दुरुस्तीसाठी सुट्या भागांचे कंत्राट साडेसात कोटी डॉलर्सला तुर्कीला दिले आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताजवळ असलेली रशियानिर्मित सुखोई-३० ही विमाने कितीतरी चपळ आणि कार्यक्षम आहेत. अशी २७२ सुखोई विमाने भारताजवळ आहेत आणि ती २००४ साली खरेदी केली गेली आहेत. या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार सतत बदलप्रक्रिया सुरू असते. कारण, भारताजवळ ती यंत्रणा आहे. पाकिस्तानजवळ ही यंत्रणाच नाही! पाकिस्तानने युद्ध छेडण्याची आगळीक केली, तर केवळ सुखोई विमानेच पाकिस्तानच्या मोठ्या भागाचा भुगा करण्यास सक्षम आहेत. शिवाय भारताने फ्रान्सनिर्मित राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे आणि ही विमाने वेळेपूर्वीच भारताच्या वायुदलात सामील होतील, अशी माहिती नुकतीच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे. पाकिस्तान वारंवार अणुयुद्धाची धमकी का देतो, त्याचे कारण त्याच्या वायुदल ताफ्यात समाविष्ट विमानांची खस्ता हालत! भारताची तिन्ही दले सर्व सोयींनी इतकी सुसज्ज आहेत की, पाकिस्तानचा जमीन, वायू आणि जल या तिन्ही माध्यमातून धुव्वा उडवू शकतील! अगदी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अमेरिकेकडून सेकंडहॅण्ड आठ एफ-१६ विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. त्यासाठी आधी ३० टक्के रक्कमच पाकने दिली होती. पण, भारताने आपला तीव्र विरोध दर्शविल्यामुळे अमेरिकेने अशी भूमिका घेतली की, शंभर टक्के रक्कम भरल्याशिवाय विमाने देणार नाही. रशियानेही आपला आखडता हात घेतला आहे. ज्या क्षणी पाकिस्तानने उरीतील लष्करी तळावर हल्ला केला, त्या क्षणी रशियाने आपला युद्धाभ्यास तेथेच थांबविला व आपण भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेचे समर्थक असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. आता पाकिस्तान चीनकडे भीक मागत आहे. चीनने काही विमाने पाकिस्तानला देण्याचे आश्वा सन दिले आहे. भारताने तर आतापासूनच आगामी काळाचा वेध घेत, सुपर सुखोईची आधीच ऑर्डर देऊन टाकली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी गेल्या १५ दिवसांत, आम्ही वेळ पडल्यास अण्वस्त्रहल्ला करू, अशी दोनदा धमकी दिली आहे. या धमकीवर अमेरिकेने तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. पाकिस्तानने अशा धमक्या देणे सोडून द्यावे. पाकिस्तानचे हे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे असून, हा आमच्यासाठी अतिशय चिंतेचा आणि गंभीर विषय आहे, अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले आहे. ‘‘तुम्ही जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याच्या भूमिकेला प्रतिसाद दिला नाही, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा पाकिस्तान हा जगात एकाकी पडेल.’’ हे निरीक्षण नोंदविले आहे, वॉल स्ट्रीट जर्नलने! ‘‘जर तुम्ही लष्कराच्या मदतीने दहशतवाद्यांना मदत देण्याचे धोरण सुरूच ठेवले आणि त्यांना भारतात दहशतवादी कारवायांसाठी पाठविले, तर पंतप्रधान मोदी यांनी केलेली कोणतीही कारवाई आंतरराष्ट्रीय पातळीवर उचित ठरेल. दहशतवाद्यांना मदत करण्याच्या तुमच्या धोरणाचे कुणीही समर्थन करणार नाही, हे पाकिस्तानने ध्यानात ठेवावे,’’ असा इशाराही वॉल स्ट्रीटने दिला आहे. ‘‘आजपर्यंत, आधीच्या कॉंग्रेस आणि भाजपाच्या सरकारांनी अतिशय संयम पाळला. पण, नवे सरकारही तोच संयम पाळेल, अशी अपेक्षा पाकिस्तानने करू नये,’’ असाही सल्ला वॉल स्ट्रीटने दिला आहे. याच निरीक्षणात वॉल स्ट्रीटने म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या, दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या ठाम भूमिकेेचे आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वागत केले आहे. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचेच धोरण ठरविले, तर हा देश एकाकी पडल्याशिवाय राहणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाविरुद्ध कशा प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याचे उदाहरण म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलचे निरीक्षणांअंती झालेले मत! अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार, माजी संरक्षणमंत्री हिलरी क्लिटंन यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, पाकिस्तानातील अण्वस्त्रे ही अतिशय असुरक्षित आहेत. अमेरिकेने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आमची पाकिस्तानातील अण्वस्त्रांच्या सुरक्षेवर नजर आहे. तिकडे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद नरक ओकत आहे व वारंवार भारताला धमक्या देत आहे. हाफीजला ‘युनो’ने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार घोषित करावे, या भारताच्या ठरावावर १५ पैकी १४ जणांनी संमतिदर्शक स्वाक्षरी केली. पण, चीनने व्हेटो पॉवर वापरून हाफीज सईद या दहशतवाद्याचा बचाव केला. हा बचाव अर्थातच पाकिस्तानच्या आग्रहावरूनच केला गेला, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. पण, चीनच्या या भूमिकेवरून चीन हाही दहशतवादाला पाठिंबा देणारा देश आहे, अशी प्रतिमा ‘युनो’मध्ये तयार झाली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनीच, चीनला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व द्यावे, अशी मागणी केली होती. त्याचे भोग आता आपल्या देशाला भोगावे लागत आहेत. भारताने उरी हल्ल्यानंतर गुलाम काश्मीरमध्ये घुसून ५० अतिरेक्यांना कंठस्थान घातले. यामुळे पाकिस्तान चवताळला आहे. आता भारतानेही अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून, लष्कराला कारवाई करण्यासाठी पूर्ण सूट दिली आहे. तरीही बारामुल्लात स्थानिक स्लीपर सेलच्या (दहशतवाद्यांना मदत करणारे) मदतीने छोटा हल्ला झालाच. हे अपेक्षितही होते. पण, आता आम्हाला आमच्या सीमांवर डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस पहारा द्यावा लागणार आहे. तिकडे पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांना मदत करण्याच्या भूमिकेवर पाक प्रसिद्धिमाध्यमे टीका करीत आहेत. पाक अशाने एकाकी पडेल आणि मग काहीच हाती लागणार नाही, अशी भावना तेथील माध्यमे आणि वृत्तपत्रेही व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार हसन निसार यांनी तर थेट आरोप करीत, दुनिया न्यूजशी बोलताना म्हटले आहे की, ‘‘भारताशी लढण्याएवढी ताकद तरी पाकमध्ये आहे काय? उद्या युद्ध झालेच तर पाकिस्तानचे नामोनिशान मिटल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तान यह पागलों का हुजूम है!’’ ते पुढे म्हणतात, ‘‘या मूर्खांना हे माहीतच नाही की, ऍटमबॉम्ब काय असतो ते! त्याचा पाकने वापर केला तर भारताचे फार नुकसान होणार नाही. पण, भारताने अण्वस्त्रहल्ला केला तर पाकिस्तान हा जगाच्या नकाशातूनच पुसला जाईल! पाकिस्तानने ऍटमबॉम्ब तर बनविला, पण आपल्या देशातील मुलांच्या हाती ते पुस्तकदेखील देऊ शकले नाहीत!’’ हसन निसार यांची ही जळजळीत प्रतिक्रिया पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे भारतमैत्रीचा पर्याय भारतीय सैन्याने गुलाम काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल अटॅकमुळे पाकिस्तानचा तिळपापड होणे स्वाभाविकच होते. विंचवाची नांगी ठेचावी तसा भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. या हल्ल्यामुळे बावचळलेला पाकिस्तान आपल्या प्रशिक्षित दहशतवादी हिरव्या पिलावळीसह भारतात हिंसक कारवाया करील, अशी शक्यता संरक्षण क्षेत्रातील चिंतक व्यक्त करीतच होते. फक्त असे हल्ले कधी होतात याचीच वाट होती. तसा भ्याड हल्ला करून भारताला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा पहिला मनसुबा भारतीय लष्कराने उधळून लावला आहे. भारतीय सैन्याची टेहळणी, डोळ्यात तेल घालून सीमेवर रक्षण करण्याची तत्परता, युद्धनीती आणि शत्रूची खेळी ओळखण्याच्या कौशल्याचा हा विजय आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ४६ राष्ट्रीय रायफल्सच्या मुख्यालयावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. नागरी वस्तीमुळे भारतीय लष्कराला प्रत्युत्तर देण्यात अडचणी आल्या, तरीदेखील त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून दहशतवाद्यांना पळवून लावले. या कारवाईत देशासाठी लढता लढता बीएसएफच्या एका जवानाला वीरमरण आले आले, ही दु:खाची बाब आहे. तथापि, यापुढे एकाही भारतीय सैनिकाचे वीरमरण वाया जाणार नाही. कारण भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तसे आदेशच लष्कराला दिलेले आहेत. पलीकडून झालेल्या एका गोळीचे प्रत्युत्तर दहा गोळ्यांनीच देण्याचा खुला परवानाच अधिकार्यांेना व जवानांना मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी आदेशासाठी सरकारच्या निर्देशांची गरजच उरलेली नाही. सीमेवर प्रसंगी गोळीबाराचा निर्णय सदसद्विवेकबुद्धीने घेण्याचे कर्तव्य तेवढे लष्करी अधिकार्यां ना पार पाडायचे आहे. त्या आदेशांचा अमल देखील सुरू झालेला आहे. उरी येथे लष्करी तळावर हल्ला करून पाकिस्तानने दहशतवादाचा जो क्रूर चेहरा दाखवला, त्याचे प्रत्युत्तर भारताने सर्जिकल हल्ल्याने दिलेलेच आहे. तरीदेखील कुत्र्याच्या वाकड्या शेपटीप्रमाणे पाकिस्तानचा तिरसटपणा कमी व्हायचे नाव नाही. गेल्या १५ दिवसांत पाकिस्तानच्या हेकेखोर, भ्याड अधिकार्यां नी आणि हाफीज सईद या दहशतवाद्यानेही भारताला अण्वस्त्रांची भीती दाखवून झाली आहे. आमची अण्वस्त्रे दिखाऊ नाहीत, असे त्यांच्या लष्करप्रमुखांनीही म्हणून झाले आहे. पाकिस्तान जे बोलतो ते करतोच असे नाही. पण ही माथेफिरू मंडळी काय करील याचा कुठलाच नेम नाही. त्यामुळेच भारताने सावध राहाणे हेच शहाणपणाचे. बावचळलेला पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो, हे गृहीत धरून पंजाब सीमेवरील १० किलोमीटरचा भाग रिक्त करण्याचे आदेश गावकर्यां ना देण्यात आले आहेत. सीमेपासून जवळ असलेल्या पठाणकोट येथील ग्रामीण रुग्णालय रिक्त करून, ते सैनिकांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज करण्यात आलेले आहे. युद्धाच्या स्थितीत कोणाचे पारडे जड राहील, याबाबत विशेषज्ञ आपली मते मांडत आहेत. त्यांच्या मते युद्ध झाल्यास पाकिस्तानचे कंबरडे पुरते मोडल्याशिवाय राहाणार नाही. पाकिस्तानने यापूर्वी चार वेळा युद्ध पुकारले आहे, पण एकदाही त्याला विजय मिळालेला नाही. उभय देशांना स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली. आज दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. १९७१च्या लढाईनंतर पाकिस्तानने आपली शस्त्रसज्जता आणि लष्करी ताकद वाढविण्यासाठी कितीतरी देशांची मदत घेतली. देशातील दैनंदिन समस्यांकडे दुर्लक्ष करून सैन्यबळ वाढविण्यावरच लक्ष केंद्रित केले. अर्थसंकल्पातील मोठा निधी लष्करावर खर्ची घातला. पण त्याची ताकद भारतापेक्षा वाढू शकली नाही. आज पाकिस्तानची लोकसंख्या १८ कोटींच्या आसपास आणि भारताची लोकसंख्या १२५ कोटींच्या आसपास आहे. लोकसंख्येचा विचार करता हा देश भारताशी कुठल्याही स्थितीत स्पर्धा करू शकत नाही, हे स्पष्टच आहे. जगाच्या बदलत्या राजकारणाचा विचार करता आज युद्ध हे जमिनीवर, पाण्यावर अथवा हवेत न लढता ते आर्थिक पातळीवर लढण्याकडे सार्‍यांचा कल आहे. विरोधी देशांच्या अर्थिक नाड्या आवळण्याची खेळी प्रारंभी खेळली जाते. त्यामुळे उभय देशांमध्ये आज तरी युद्धाची कुठलीच शक्यता नाही. तरीदेखील दोन्ही देशांच्या सैन्याची तुलना करून टाकणे गरजेचे वाटते. भारतीय सेनेत १३ लाख सैनिक असून, त्या तुलनेत पाकिस्तानकडे केवळ ६ लाख सैन्य आहे. भारताजवळ २२९५ रणगाडे असून, पाकिस्तानकडील नव्या आणि जुन्या रणगाड्यांची संख्या ३६२० आहे. भारताजवळ ६०० लढाऊ विमाने, तर पाकिस्तानजवळ ४०० लढाऊ विमाने आहेत. इतरही क्षेत्रात भारताची लष्करी ताकद पाकिस्तानपेक्षा उजवीच आहे. भारताने बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित करून, आधीच समस्याग्रस्त पाकिस्तानला कैचीत जखडले आहे. सरकार विरुद्ध लष्कर, लष्कर विरुद्ध आयएसआय आणि सरकार विरुद्ध अतिरेकी संघटना यांच्यात कुरघोडी सुरू असताना, या नव्या संकटाचा सामना पाकिस्तान कसा करतो, हे बघावे लागणार आहे. गुजरातजवळच्या समुद्रात पाकिस्तानी नौका आणि त्यावर स्वार नऊ जणांना अटक झाली आहे. अशा क्लृप्त्या शत्रुराष्ट्राकडून अपेक्षितच आहेत. पण त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सजग राहाणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी समुद्रमार्गेच प्रवेश केला होता, यापासून भारताने घ्यायचा तो बोध घेतलेलाच आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या जरी अद्याप आपण आवळलेल्या नसल्या, तरी सिंधू पाणीवाटप कराराचा फेरआढावा घेण्याच्या घोषणेनेच पाकिस्तानचे पाय लटलटायला लागले आहे. उभय देशांमधील व्यापारी उलाढालीवरही चर्चा झालेली आहे. बलुचिस्तानशिवाय आणखी एका आघाडीवर भारताने जय मिळवून पाकिस्तानला कोंडीत पकडले आहे. दहशतवादाच्या मुद्यावर हा देश जगात एकटा पडल्याचे सध्या दिसत असलेले चित्र हा भारताच्या मुत्सद्देगिरीचाच विजय मानला जात आहे. आज केवळ चीन हा एकमेव देश त्याचा पाठीराखा उरलेला आहे. तो देखील आणखी किती दिवस त्याची सोबत करेल, याची खात्री देणे शक्य नाही. पाकिस्तान जोवर आपली वृत्ती बदलत नाही, तोवर त्याला देशातील समस्यांवर मात करणे शक्य नाही. आता त्यांच्या देशातील नागरिकच सरकारविरुद्ध बंड करून उठलेले आहेत. त्यामुळे ही बंडाळी मोडून काढण्यासाठी पाकिस्तानने बाह्यदृष्टीवर भरवसा न ठेवता अंतर्मनात झाकून पाहण्याची गरज आहे. यातून जो संदेश मिळेल त्यावर पुढील दिशा ठरवून भारताशी शत्रुत्व की मित्रत्व याचाही निर्णय घेता येईल. पाकिस्तानचे अस्तित्व जगाच्या नकाशावर कायम ठेवायचे असेल, तर भारताशी मैत्री हाच एकमेव पर्याय ठरू शकतो

No comments:

Post a Comment