Total Pageviews

Wednesday 12 October 2016

चिनी वस्तूंचा बहिष्कार ही काळाची गरज!


चिनी वस्तूंचा बहिष्कार ही काळाची गरज! October 7, 2016039 Share on Facebook Tweet on Twitter चर्चा १९४७ मध्ये आपण स्वतंत्र झालो. पाकिस्तान व भारत अशी मोठी फाळणी झाली. तशातच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. तेथील राजा हरिसिंगाने भारताला मदत मागितली. भारताने पाकिस्तानला पळवून लावले. राजा हरिसिंगाने काश्मीरचे विलीनीकरण भारतात करवले. चीनने आधी तिबेट गिळंकृत केले. नंतर १९६२ साली भारतावर आक्रमण केले. त्या वेळी आपली सैन्यसंख्या कमी असल्याने आपण चीनशी मुकाबला करू शकलो नाही. परिणामी भारताचा हजारो चौरस कि. मी. भूभाग चीनने बळकावला. त्या युद्धापासून आपण धडा घेतला व सावरायचा प्रयत्न करीत नाही तोच, पाकिस्तानने तीन वर्षांनंतर १९६५ साली भारतावर आक्रमण केले. तेव्हा मात्र आपण पाकिस्तानची ऐसीतैसी करत लाहोरपर्यंत मुसंडी मारली. पुढे पाकिस्तान-भारत यांच्यात सहा वर्षांनी म्हणजे १९७१ मध्ये युद्ध झाले. तेव्हा मात्र पूर्व पाकिस्तानवर आपण मात केली व नव्या बांगलादेशाचा उदय झाला. त्या युद्धात पाकिस्तानचे ९० हजार सैनिक आपल्या कब्जात होते. इंदिरा गांधी यांनी त्या सर्व सैनिकांना मुक्त केले. कारगिल युद्धातही आपण पाकिस्तानला चांगला धडा शिकविला. तेव्हापासून भारताचा सर्वनाश, हा एकच उद्देश लक्षात ठेवून पाकिस्तानने छुपे हल्ले सुरू केले. या सगळ्या गोष्टींना चीनचे समर्थन आहे. कारण, पाकिस्तानने चीनला गुलाम काश्मीरमधील काही भूभाग दिला आहे. तिथे चीन रस्ते बांधत आहे. ग्वादार बंदराचा तो विकास करीत आहे. या भागाला चीनच्या घशात घालण्यास भारताचा विरोध आहे. भारताच्या वाढत्या प्रभावावर चीन खुष कसा राहणार? म्हणून भारताच्या ‘युनो’मधील स्थायी सदस्यत्वावर चीनचा नेहमी आक्षेप असतो. एवढेच नव्हे, तर मध्ये एन. एस. जी.च्या मुद्यावरसुद्धा सगळे अण्वस्त्रधारी देश भारताला पाठिंबा देत असताना चीनने विरोधच केला. आता नुकताच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरात उरी कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात आमचे १८ भारतीय सैनिक शहीद झाले. त्यानंतर बारामुल्ला येथील राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर हल्ला केला. याचा बदला नुकताच भारताने गुलाम काश्मीरात घुसून घेतला आहे. पाकिस्तानच्या विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली होती की, ‘‘खून और पानी एकसाथ बहाया नही जायेगा!’’ म्हणजे काश्मीरमधून सिंधू नदीचे जे पाणी पाकिस्तानला फुकट जाते, त्या पाण्यावर सिंधू कराराप्रमाणे अंकुश घालण्यात यावा. कराराप्रमाणे भारताच्या हिश्शातील २० टक्के पाणी भारत रोखू शकतो. पाकिस्तान घाबरला. परंतु, त्याला लगेच चीनने साथ दिली. चीनने म्हटले की, ‘‘पाकिस्तानचे पाणी रोखले तर आम्ही ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखू.’’ हा चीन भारताचा कधीच मित्र म्हणून राहिला नाही, हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. भारत हा विकसनशील म्हणून झपाट्याने प्रगती करत आहे. भारत म्हणजे जगातील मोठी व्यापारपेठ आहे. येथे चीन आपल्या वस्तू पाठवून पैसा कमवतो. चीनचीसुद्धा अर्थव्यवस्था भारताच्या बाजारपेठेवर काही प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे. अशा वेळी आपण सारे नागरिक मिळून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतो. त्याचा मार्ग म्हणजे, चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकणे. ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. विद्युत उपकरणे, मोबाईल, बॅटरी, फटाके, डेकोरेशन, खेळणी… इ. कितीतरी चिनी वस्तू बाजारात दिसतात. या सर्वांवर बंदी आणायला हवी. आपले सैनिक रात्रंदिवस चीनच्या सीमेवर पहारा देतात. अतिथंडीत, पाण्यात, बर्फात, ते कुटुंबापासून दूर राहून स्वत:चा जीव धोक्यात टाकून आपले रक्षण करतात. त्यंाच्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो, याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असायला पाहिजे. आता दसरा-दिवाळी जवळ येत आहे. आपण दरवर्षीप्रमाणे आपले घर रंगवून सजावट करतो, विद्युत रोशनाई करतो. त्या वेळी प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे की, चीनच्या वस्तू प्रकर्षाने नाकारायला हव्यात. रोशनाईसाठी भरपूर चिनी दिवे बाजारात असतील. तेव्हा चार दिवे कमी वापरले तरीही चालेल, पण चिनी बनावटीचे दिवे नकोतच! ही भूमिका घ्यायला हवी. याचा परिणाम नक्कीच होईल. चीनलासुद्धा वाटायला पाहिजे की, भारतात त्यांच्याविरुद्ध लाट आहे. या लेखाचा उद्देश हाच की, मोठ्या व्यापार्‍यांनीच याची दखल घ्यायला हवी. म्हणजे चिनी वस्तू खुल्या बाजारात उपलब्ध राहणारच नाहीत! ही एक प्रकारची देशसेवाच होय. चिनी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे आपण आपल्या सैनिकांना आतून साहाय्य करणे. याउलट, चिनी वस्तूंचा वापर म्हणजे आपल्या सैनिकांचा अपमान करण्यासारखे होईल. हे प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवे…

No comments:

Post a Comment