Total Pageviews

Saturday 22 October 2016

अरिहंत’मुळे वाढली नौदलाची ताकद-pudhari | Publish Date: Oct 21 2016


संपूर्ण देशी बनावटीची ‘आयएनएस अरिहंत’ ही आण्विक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. भविष्यात आण्विक युद्धाचा प्रसंग आलाच, तर पहिला वार भारत करणार नाही, हे आपले ब्रिद आहे. ‘अरिहंत’ म्हणजे शत्रूंचा नाश करणारा. याच नावाची अण्वस्त्रवाहू पाणबुडी म्हणजेच ‘आयएनएस अरिहंत’ संपूर्णपणे देशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करणारा भारत हा जगातील सहावा देश ठरला आहे. ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखलसुद्धा झाली आहे. भारतातच आराखडे काढून येथेच निर्माण केलेली ही भारताची पहिली पाणबुडी होय. या यशाबरोबरच भारताने आणखी एक बहुमान मिळविला आहे. तो म्हणजे, भारत आता जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातूनही मारा करू शकणारा देश ठरला आहे. कोणत्याही अण्वस्त्रसंपन्न देशाच्या दृष्टीने पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याची क्षमता अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण अण्वस्त्रयुद्धाची वेळ ओढवलीच, तर जमिनीवरील अण्वस्त्रे सुरक्षित राखणे अवघड असते. परंतु पाण्याखालील अण्वस्त्रे सुरक्षित राहू शकतात. शिवाय, पाण्याखालीच असल्यामुळे शत्रूला कल्पनाही करता येणार नाही, अशा ठिकाणावरून हल्ला करता येतो. शत्रूने पहिल्याच हल्ल्यात जमिनीवरील अण्वस्त्रे आणि अण्वस्त्रवाहू विमाने नष्ट केली, तरी पाण्याखालून वार करून शत्रूला नामोहरम करता येते. कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रहल्ला भारत स्वतः करणार नाही, ही आपली भूमिका आहे. ‘आयएनएस अरिहंत’ने या भूमिकेला बळकटी दिली आहे. कारण शत्रूने जर पहिल्यांदा अण्वस्त्रहल्ला केला, तर आपली अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठीच तो असेल, असे गृहीत धरले जाते. त्यामुळे प्रतिहल्ला करण्याची क्षमताच नष्ट होण्याची शक्यता असते. परंतु समुद्रतळाशी असलेल्या पाणबुडीवर हल्ला चढवून ती नष्ट करणे जवळजवळ अशक्य असते. वस्तुतः डिझेल आणि विजेच्या साह्याने चालणार्याळ पाणबुड्यांना काही दिवसांनंतर समुद्राच्या पृष्ठभागावर यावेच लागते. आण्विक पाणबुडीला तेही गरजेचे नाही. आण्विक रिअॅ क्टर्सवर चालणारी आण्विक पाणबुडी महिनोन्महिने खोल समुद्रात बुडी मारून बसू शकते. त्यामुळे शत्रूला या पाणबुडीचा शोध घेणे जवळजवळ अशक्य असते. ही क्षमता मिळविण्यासाठी ‘आयएनएस चक्र’ ही आण्विक पाणबुडी भारताने रशियाकडून भाडेकरारावर घेतली होती. परंतु या पाणबुडीवरून अण्वस्त्र डागता येणे शक्य नाही. परंतु ‘आयएनएस अरिहंत’ ही पाणबुडी एकाच वेळी सोळा अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे आपल्यासोबत वागवू शकते आणि वेळ पडल्यास एकाच वेळी ही अण्वस्त्रे डागून शत्रूला भुईसपाट करू शकते. या पाणबुडीवर 750 किलोमीटर अंतरावरून मारा करणारी ‘के-15 सागरिका’ आणि 3500 किलोमीटरवरून मारा करू शकणारी ‘के-4’ ही क्षेपणास्त्रे लावली गेली आहेत. ही दोन्ही क्षेपणास्त्रे पाण्याच्या खालून, म्हणजे समुद्रतळापासून डागता येतात. अर्थात, ही ताकद मिळविण्यासाठी भारताला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. कारण आण्विक पाणबुडीचे तंत्रज्ञान भारताला देण्यास कोणताही देश राजी नव्हता. परंतु, सहा हजार टन वजनाची ‘अरिहंत’ पाणबुडी देशातच तयार करण्यात भारताने यश मिळविले. हा प्रकल्प नव्वदीच्या दशकात सुरू झाला होता. 2006 मध्ये कलपक्कम येथे अरिहंतसाठी 83 मेगावॅटचा छोटा आण्विक रिअॅमक्टर बसविण्यात आला. तीन वर्षांनंतर 2009 मध्ये विशाखापट्टणम येथे अरिहंतला सर्वप्रथम पाण्यात उतरविण्यात आले. अरिहंतसारख्याच आणखी दोन पाणबुड्या भारत तयार करीत आहे. नौदलाच्या दृष्टीने देशाच्या संरक्षणासाठी ही स्वयंपूर्णता अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ‘अॅरडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसेल्स’ कार्यक्रमांतर्गत अरिहंत पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. विशाखापट्टणमनजीक नौदलाच्या डॉक यार्डमध्ये बनविलेल्या या पाणबुडीसाठी सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्च आला आहे. रशियन बनावटीची ‘आयएनएस चक्र-2’ ही आण्विक युद्धनौका तीन वर्षांपूर्वीच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली होती. मूळ स्वरूपात ‘के-152 नेरपा’ नावाने तयार केलेली ‘अकुला-2’ श्रेणीतील ही युद्धनौका रशियाकडून एक अब्ज डॉलरचा सौदा करून भारताने दहा वर्षांसाठी भाडेकराराने घेतली होती. आता आयएनएस-चक्र आणि ‘आयएनएस-अरिहंत’ या दोन युद्धनौका हिंदी महासागरात असल्यामुळे लष्करी स्थिरतेच्या बरोबरीनेच देशाच्या लष्करी आणि आर्थिक हिताच्या दृष्टीनेही आपण दोन पावले पुढे टाकली आहेत

No comments:

Post a Comment