Total Pageviews

Wednesday 15 March 2017

आक्रमण : माओवाद्यांचे व दहशतवाद्यांचे-– राजाभाऊ पोफळी


March 16, 2017010 प्रासंगिक जागतिक पातळीवर माओवादी विचारांचा मंच तयार करून लोकशाही विकासाला खीळ घालण्याचे स्वप्न बाळगणार्‍या प्रा. साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याच्या वृत्ताने पुरोगामित्वाचा बुरखा फाडला गेला आहे. सर्व प्रकारचा विरोध, धमक्या दूर सारून चिकाटीने पुरावे गोळा करणारे पोलिस अधिकारी बावचे आणि साडे आठशे पानाचे अभ्यासपूर्ण निकाल देणारे जिल्हा व सत्र न्या. शिंदे यांचे लोकाशाहीप्रेमी नागरिक अभिनंदनच करतील. साईबाबाच्या शिक्षेनंतर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सेमिनार, न्यायालयीन मार्ग यंाचा वापर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चाळीस वर्षांपूर्वीची पाळेमुळे सिरोंचा भागातील या माओवादी कारवायांचा प्रारंभ १९७८- ७९ च्या दरम्यान झाला. इंदिरा गांधी यांच्या राजवटीत बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पोलादी हाताने बंगालमधील माओवाद्यांचे उच्चाटन केल्यानंतर ते आंध्र, तामिलनाडूच्या सीमावर्ती जंगलात ठाण मांडते झाले. नंतर त्यांनी जुना मध्य प्रदेेेश (आजचा जुना बिहार, झारखंड, छत्तीसगड) व महाराष्ट्र सीमेवरील जंगली भागात तेंदू ठेकेदारांकडून वनवासी लोकांच्या शेाषणाविरुद्धच्या लढ्याच्या निमित्ताने पाय रोवण्यास प्रारंभ केला. यापूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावातील मोहन हिराबाई हिरालाल व त्यांच्या मित्रमंडळींनी प्राणहिता नदीच्या घनदाट जंगलात पदयात्रा करून वनवासी जीवनाचा अभ्यास करून रचनात्मक कार्याचा प्रारंभ केला होता. या तरुणांनी आमच्या गावात आमचे सरकार ही भूमिका घेऊन लेखा मेंढा भागात जागरण कार्य सुरू केले होते. बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखली सोमनाथ हेमलकसा भागात कार्य सुरू होते. त्यांच्या कार्याच्या वातावरणाचा फायदा घेऊन माओवाद्यांनी शोषणाविरुद्धच्या लढ्याचा मुखवटा धारण केला होता. मला त्यावेळी तरुण भारताचा अविभाजित चंद्रपूर जिल्ह्याचा प्रतिनिधी होण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला इंडियन एक्सप्रेसचे मधुकर आपटे आणि युगधर्मचे प्रतिनिधी खत्री गुरुजी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. खत्री गुरुजींनी चंद्रपुरातील नक्षली कारवायांबद्दल भरपूर माहिती दिली. त्यावेळी जंगल ठेकेदारी पद्धती व वनवासी कामगारांचे होणारे शोषण याविरुद्ध माझ्या लेखणीचा वापर होत असे व सरकारने वनवासी विकासाकडे लक्ष द्यावे या मागणीचे समर्थन मी करीत असे. अशा वेळी एका तरुण व्यक्तीने माओवाद्यांचे खरे रूप माझ्यासमोर प्रकट केले. ती व्यक्ती म्हणजे इन्सपेक्टर गवई! गवई खत्री गुरुजींच्या मित्राचे चिरंजीव असल्याने त्यांनी विश्वासाने माओवाद्यांच्या अंाध्र-तामिलनाडू सीमेवरील हिंसक कारवायांच्या हालचालींची सचित्र माहिती दिली. त्यावेळी माओवादी तामिलनाडू आंध्र सीमेवर सक्रिय होते. बँकांची कॅश लुटणे, सरकारी खजिन्यावर हल्ले करणे, स्फोट घडवून अशांतता निर्माण करणे आदी कारवाया करीत होते. तामिलनाडू व आंध्र पोलिसांच्या कारवाईपासून बचाव म्हणून महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील सिरोंचा- बस्तर भागात नक्षल्यांनी आपले अड्डे तयार केले होते. ते दहशत निर्माण करून सरकार नव्हे ‘आम्हीच तुमचे संरक्षक तारणहार’ असा विश्वास आदिवासींत ते प्रस्थाापित करीत होते. एका वार्ताहराचा हात तोडून आणि पोलिस खबर्‍या म्हणून काहींची हत्या करून आदिवासींत दहशत निर्माण केली होती. नक्षल्याशी भेट एकदा अहेरी सिरोंचा भागात मी भटकत असता दहशतीचा प्रत्यक्ष अनुभव मला मिळाला. सिरोंचाला निघालेली बस अहेरीला पोहोचली व बंद पडली. शेवटी रस्त्यावर उभे राहून सिरोंचाकडे जाणारा मालवाहू ट्रक गाठला व निघालो. मार्गात एका ठिकाणी रस्त्यावरच्या व्यक्तीने ट्रक रोखला. तो इसम चढून माझ्या शेजारी बसला व त्याने संवाद सुरू केला. ड्रायव्हर मुकाट्याने तिरप्या नजरेने आमच्याकडे पाहात- ऐकत ड्रायव्हिंग करीत होता. मला प्रश्नामागून प्रश्न होेत होते. संवाद सुरू होता. ट्रक झिमल कट्ट्याजवळ आला. ड्रायव्हरला थांबायला सांगून तो उतरला. ट्रक सुरू झाला. आतापर्यंत स्तब्ध असणारा ड्रायव्हर म्हणाला, ‘साहेब आज तुमची अन् माझी खैर नव्हती. तो कुख्यात नक्षली अन्ना होता.’ यासंबंधीचा माझा ‘सिरोंचा भागात माओवाद्यांचे प्रतिसरकार’ हा लेख प्रसिद्ध होताच नागपुरातील माओवादी कार्यकर्त्यांनी वि. सा. संघाच्या गडकरी सभागृहात सभा घेऊन या लेखाचा अंक जाळला होता. वनवासी विकास कार्याला विरोध पुढे गडचिरोली जिल्हा झाला. प्रशासन वनवासीच्या जवळ आले. वनवासी विकासाची कामे सुरू झाली. आता माओवाद्यांचा पंचायत समिती व राज्य निवडणुकांवर बहिष्कार सुरू झाला. रस्ते बांधणी, पूल बांधणी आदी विकास कार्याला आणि वनवासी विकास विषयक स्वयंसेवी संस्थांच्या विधायक कार्याला विरोध सुरू झाला व त्यांची लपलेली माओवादी नखे बाहेर दिसू लागली. पोलिस आणि माओवादी यांचे संघर्ष आणि मानवाधिकाराच्या नावाखाली पोलिस कारवायांना विरोध याचे वातावरण सुरू झाले. विकास कामामुळे काही स्थानिक समस्या निर्माण होतात. त्याचे भांडवल करून जनआंदोलनाचे मार्ग अनुसरले व अडथळे निर्माण केले. आता तर माओवाद्यांचा मुखवटा उघड झाला असून त्यांनी आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करून राष्ट्रद्रोह विरुद्ध प्रतिबंधक कारवाईचा कायदा रद्द करा, ही मागणी सुरू केली आहे. प्रा. साईबाबा प्रकरणाचा निकाल येताच छत्तीसगढ येथे पोलिसांवर हल्ला करून व १२असैनिकांचा बळी घेऊन व दिल्ली विद्यापीठातील डाव्या विद्यार्थ्यांच्या गटाने युद्ध आरंभले आहे. मुंबई मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सेमिनार आयोजित करून यु.पी.ए. कायदा रद्द करण्याची नक्षलसमर्थकांनी मागणी केली आहे. प्रा. साईबाबावरील कारवाईला विरोध केला आहे. सजग जनशक्ती हवी. आतंकवाद्यांद्वारे भारतावर प्रॉक्सीवार लादली जात असतानाच आंतरराष्ट्रीय माओवाद्यांनी आता अंतर्गत युद्ध सुरू केले आहे. त्या विरुद्ध सजगता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही माओवादी व आतंकवादी आक्रमणाला तोंड देत आहे. भारत-पाक सीमेवर व चीन-भारत सीमेवर प्राणाची बाजी लावून या आक्रमणाविरुद्ध सैनिक लढत आहेत. त्याचवेळी गुण्या गोविंदाने लोकशाहीत वावरणार्‍या नागरिकांची दिशाभूल करून, आतंकवादी कट्टर धार्मिकवादाच्या हस्तकांचे जाळे तयार करून देशात घुसून लोकशाहीला नख लावीत आहेत. तसेच देशांतर्गत माओवादी राष्ट्रविरोधी विचारांचे नेटवर्क अधिक व्यापक करीत आहेत. या दोन्ही आक्रमणाविरुद्ध केवळ सीमेवरच्या सैनिकांवर संरक्षण सोपवून आणि अंतर्गत सुरक्षा सरकारवर सोपवून लोकशाहीप्रेमी नागरिकांना स्वस्थ बसून चालायचे नाही. चिनी आक्रमण आणि पाक युद्धाचे वेळी संपूर्ण देश जसा राष्ट्र संरक्षण आघाडी तयार करून देशरक्षणासाठी तयार झाला होता तशी सजगता व सज्जता आज आवश्यक आहे. नागपूरच्या पोलिस अधीक्षकांनी जसे नगरातील पोलिस बिट प्रमुखांवर अंतर्गत सुरक्षा सोपविण्याचे धोरण अमलात आणले आहे तसेच गावागावात, मोहल्ल्यात मोहल्ल्यात या आक्रमणाविरुद्ध नागरिकांच्या गटा-गटाने जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जागतिक महाशक्ती होण्याच्या दिशेने विकासाच्या मार्गक्रमणातील हे अडथळे पार करण्याची व या आक्रमणाविरुद्ध उभे ठाकण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment