Total Pageviews

Wednesday 26 September 2018

PAK NUCLEAR WEAPONS


https://www.youtube.com/watch?v=HUs2Cy9fCGA&t=31s
या विडियो च्या माध्यमाने प्रत्येक आठवड्यात देशाच्या सुरक्षा करता महत्वाच्या असलेल्या विषयांवर डिफेन्स  एक्सपर्ट किंवा देशाच्या सुरक्षेचे तज्ञ यांचे कॉमेंट्स दिले जातील जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांकडे पाठवावा आणि यु ट्यूब वरती खालती सबस्क्राईब नावाचं बटण आहे तिथे क्लिक करा व त्यामुळे या पुढचे येणारे व्हिडिओ ऑटोमॅटिकली आपल्या इनबॉक्समध्ये येथील जय हिंद
29 तारीख हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करावा अशी विद्यापीठे कॉलेजेस आणि शाळांना माहिती देण्यात आली आणि त्यावर ती काही तज्ञांनी विरोध केला त्यांचे म्हणणे हे असे करू नये कारण यामुळे आपण युद्धखोर देश म्हणून जगाला वाटू सरकारचे म्हणणे होते की अशा प्रकारचा दिवस साजरा करून आपण देशांमध्ये देशभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत देशभक्ती म्हणजे नेमके काय?

पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांची दर्पोक्ती;
क्षेपणास्त्रे, अणूबॉम्ब यांचे आधुनिकीकरण करत राहाणे गरजेचे
भारताची राजधानी दिल्लीला पाचच मिनिटांत "लक्ष्यकरण्याची अण्वस्त्रधारी पाकिस्तानमध्ये क्षमता असल्याची दर्पोक्ती पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादीर खान यांनी केली आहे. पाकिस्तानच्या 1998 मध्ये झालेल्या पहिल्या अणुचाचणीच्या स्मृतिनिमित्त येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ही अणुचाचणी खान यांच्याच देखरेखीखाली झाली होती. काहुता येथे पाकिस्तानचा युरेनियम प्रक्रिया प्रकल्प आहे
पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांची संरक्षणतज्ज्ञांकडून खिल्ली
भारताचे माजी लष्करप्रमुख आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या थिंक टँकचे संचालक जनरल एन. सी. विज यांनी म्हटले की, अशा प्रकारची विधाने करणे हे अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. अण्वस्त्रे प्रत्यक्ष वापरासाठी नसतात तर ती केवळ धाक दाखवण्यासाठी असतात. भारताकडेही अल्प काळात संपूर्ण पाकिस्तानला लक्ष्य करण्याची क्षमता आहे. मात्र आम्ही त्याची जाहीर वाच्यता करत नाही.
दिल्लीतील इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडिज अँड अ‍ॅनलिसिस या संस्थेतील वरिष्ठ अभ्यासक ब्रिगेडिअर गुरमित कंवल यांनी म्हटले की, अशा प्रकारची बेताल वक्तव्ये आणि अतिशयोक्तीपूर्ण दावे करण्याची खान यांना सवयच आहे. पाकिस्तानच्या अस्तित्वाला गंभीर धोका उद्भवल्यासच त्यांच्याकडून अण्वस्त्रांचा वापर होईल. वादासाठी गृहीत धरले की पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अगदी उद्या भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याचे आदेश दिले तरी त्यांना सर्व जुळवाजुळव करून हल्ला करण्यासाठी किमान सहा तासांचा वेळ लागेल.अण्वस्त्रे प्रत्यक्ष वापरासाठी नसतात हे पाकिस्तानी राज्यकर्ते जाणतात. पण ए. क्यू. खान केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपले महत्त्व वाढवण्यासाठी अशी विधाने करत आहेत. त्यांच्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही.

पाकिस्तानला अणूबॉम्ब सहजतेने वापरता येणे शक्य नाही
पाकिस्तान हा बेभरवश्याचा आणि धोकादायक देश आहे. याशिवाय सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे प्रस्थ आज खूप वाढलेले आहे. त्यामुळे जगाला अशी भीती वाटते की पाकिस्तानकडे असणारे अणूबॉम्ब दहशतवाद्यांच्या हातामध्ये पडले तर जगाच्या शांततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जरी पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असले तरी त्याबरोबर सर्व जग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानकडे असणारे अणूबॉम्ब त्यांना इतक्या सहजतेने वापरता येणे शक्य नाही.
अणूबॉम्बला एक राजकीय शस्त्र म्हटले जाते. अणूबॉम्बचा वापर १९४४च्या दुसर्या महायुद्धात फक्त दोन वेळा झाला होता आणि त्यानंतर त्याचा वापर पुढे कधीही झाला नाही.त्यामुळे अणूबॉम्ब हे लढाईत वापरण्याचे शस्त्र नसून सध्या ते एक धमकी देण्याचे शस्त्र बनले आहे. पण पाकिस्तानच्या अणूकार्यक्रमामध्ये गेल्या काही वर्षांपासून एक नवीन बदल होत आहे. तो म्हणजे पाकिस्तान आता टॅक्टीकल न्युक्लिअर वेपन म्हणजे छोटे अणूबॉम्ब तयार करत आहे. मोठ्या अणूबॉम्बचा वापर हा मोठ्या शहरांवर किंवा एखाद्या मोठ्या लक्ष्यावर मारा करण्यासाठी केला जातो. पण ज्यावेळेस भारत-पाक सैन्यात समोरासमोरची लढाई सुरू होईल तेव्हा मोठे अणूबॉम्ब वापरले जाऊ शकत नाहीत. म्हणून आता पाकिस्तानने छोटे अणूबॉम्ब ज्याला इंग्रजीत "टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन" म्हटले जाते हे तयार केलेले आहेत. या अणूबॉम्बला पाकिस्तानने नासेर हतफ ९ अशी नावे दिलेली आहेत. नासेर हा छोटा अणूबॉम्ब, हतफ ९ या क्षेपणास्त्राच्या मदतीने ५० ते ६० किलोमीटर इतका लांब फेकला जाऊ शकतो.
पाकिस्तानवर हल्ला केला तर छोट्या अणूबॉम्बचा वापर
पाकिस्तानचे असेही म्हणणे आहे की भारताने एक नवीन प्रकारची युद्धनीती तयार केलेली आहे. त्याला इंग्रजीत कोल्ड स्टार्ट डॉक्टरीन असे म्हटले जाते. कोल्ड स्टार्ट डॉक्टरीन म्हणजे, जर भारतावर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला तर भारत आपल्या सीमेवर असलेल्या सैन्यानिशी लगेच पाकिस्तानवर हल्ला करेल. सैन्य शांतताकाळात देशामध्ये अनेक ठिकाणी पसरलेले असते. ते जोपर्यंत एकत्र होऊन सीमेवर पोहोचत नाही, तो पर्यंत लढाईला सुरूवात होत नाही. ऑपरेशन पराक्रममध्ये  हेच झाले.सैन्याची सिमेवर जमवाजमव करण्याकरता सात ते दहा दिवसांचा अवधी लागू शकतो. पण आता कोल्ड स्टार्ट डॉक्टरीन या रणनितीमुळे जे ५० टक्के सैन्य सीमेवर आहे त्याचा वापर करून लढाईला लगेच सुरूवात केली जाईल.

म्हणजेच जर गरज पडली तर आपण पारंपरिक पद्धतीचा हल्ला पाकिस्तानवर लगेच एक ते दोन दिवसातच करू शकतो. अशा प्रकारचा अचानक होणारा हल्ला करुन भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसले तर त्यांच्या विरुद्ध"टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन"  याचा वापर केला जाईल.पाकिस्तानच्या या सर्व अणूबॉम्बचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे सगळ्या जगाला घाबरवून सोडणे.ज्यामुळे सर्व जग भारतावर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानशी बोलणी चालू ठेवण्यासाठी दबाव आणतील. त्याचबरोबर जर भारताने  झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल पाकिस्तानवर हल्ला केला तर त्याच्या विरुद्ध छोट्या अणूबॉम्बचा वापर करता येइल.
येत्या दहा वर्षांत पाकिस्तानकडे कमीतकमी २५० अण्वस्त्रे तयार असतील, यामुळे पाकिस्तान हा अण्वस्त्रे बाळगणारा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनेल, अशी माहिती अमेरिकेच्या अण्वस्त्र शास्त्रज्ञ संघटनेने दिलेली आहे. "पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता २०१५" या नावाचा एक विशेष अहवाल अमेरिकेतील अण्वस्त्र शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. या अहवालाप्रमाणे पाकिस्तानकडे सध्या ११० ते १३० अण्वस्त्रे असावीत आणि २०११ पेक्षा या संख्येत खुप जास्त वाढ झालेली आहे.
 १० ते १५ नवीन अणूभट्ट्या उभारण्यास चीनी मदत
सध्या पाकिस्तानकडे अशा चार अणूभट्ट्या आहेत ज्यातून युरेनियमचा वापर करुन प्लुटोनियम हे बायप्रॉडक्ट म्हणून निर्माण होते. अणूबॉम्ब बनवण्याकरिता प्लुटोनियमची गरज असते. एक अणूभट्टी एका वर्षात जेवढे प्लुटोनियमचे उत्पादन करते त्यात दोन ते तीन अणूबॉम्ब बनू शकतात. म्हणजे पाकिस्तानकडे प्रत्येक वर्षी आठ ते बारा नवीन अणूबॉम्ब बनवण्याची ताकद आहे. तसेच चीनने पाकिस्तानला वीज निर्मितीसाठी आजून १० ते १५ नवीन अणूभट्ट्या उभारण्यास मदतीचे आश्वासन आहे. यामुळे येणार्या काही वर्षांत अणूबॉम्ब निर्मितीसाठी लागणारा प्लुटोनियमचा साठा पाकिस्तानमध्ये खुपच वाढण्याची शक्यात आहे.

अण्वस्त्र वाहून नेण्यासाठीही तीन प्रकारच्या वाहनांचा वापर केला जातो. एक तर विमानाने अणूबॉम्ब नेऊन शत्रू राष्ट्रावर टाकणे. यासाठी एफ १६ व इतर अत्याधुनिक विमानांची गरज आहे आणि अशा प्रकारची विमाने पाकिस्तानमध्ये तयार आहेत. यातील एफ १६ हे अत्याधुनिक विमान अमेरिकेनेच पाकिस्तानला पुरवलेले आहे. अणूबॉम्ब वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा वापर करता येतो. त्यामध्ये शाहीन १ आणि शाहीन ३ या दोन क्षेपणास्त्रांची निर्मिती पाकिस्तानमध्ये जोरात सुरू आहे आणि तिसरा प्रकार म्हणजे पाणबूडीतून डागता येणारी क्षेपणास्त्रे. ही क्षेपणास्त्रे मात्र पाकिस्तानकडे अजून उपलब्ध नाहीत आणि अशा प्रकारची क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी पाकिस्तानला अजून पुष्कळ वेळ लागू शकतो.

सेकंड स्टाईक केपेबिलिटी आहे
पाकिस्तान भारताला सांगू इच्छिते की, भले आम्ही तुमच्यावर कितीही दहशतवादी हल्ले करू पण तुम्ही आमच्यावर हल्ला करायचा नाही आणि जर तसा तुम्ही प्रयत्न केलात तर आम्ही तुमच्या विरुद्ध छोट्या अणूबॉम्बचा वापर करू. यामुळे सगळे जग घाबरून भारत आणि पाकिस्तानचे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतील. काही तज्ज्ञांना असे वाटू लागले की आता पारंपरिक पद्धतीने युद्ध करता येणे शक्य नाही. पण बरोबर आहे का? आपण पाकिस्तानला सांगितले पाहिजे की फक्त दहशतवादी हल्ले किंवा अणूयुद्ध हे दोनच युद्धाचे पर्याय नसून पारंपरिक युद्ध हा सुद्धा प्रत्युत्तर म्हणुन एक पर्याय आहे आणि जर गरज पडली तर भारत पारंपरिक युद्धाचा देखील वापर करू शकतो.
अणूबॉम्बबाबत भारताची निती आहे, ‘नो फस्ट यूज म्हणजे, आम्ही स्वतःहून कुठल्याही शत्रूवर अणूबॉम्बने हल्ला करणार नाही. पण जर आमच्यावर शस्त्रराष्ट्राने अणूबॉम्बने हल्ला केला तर नक्कीच आम्ही त्या देशावर अणूबॉम्बनी हल्ला करू शकतो. आपल्या देशाकडे सध्या सेकंड स्टाईक केपेबिलिटी आहे. म्हणजेच शत्रूने आपल्यावर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे होणारे नुकसान सहन करून आपण त्या शत्रूवर अणूबॉम्बने मोठ्या प्रमाणावर हल्ला करू शकतो.या शिवाय भारत शत्रुच्या मिसाइलच्या विरुध्द संरक्षण करण्याकरता मिसाइलशिल्ड तयार करत आहे. पण ते फ़ार खर्चिक असते. व संरक्षण फ़ार तर एखाद्या शहराला देता येइल.
भारताशी बरोबरी करण्याच्या उद्दिष्ठाने पाकिस्तान इतका पछाडलेला आहे की त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. भारताला अमेरिका आणि इतर देशांची मदत घेऊन पाकिस्तानमध्ये तयार होत असलेल्या आणूबॉम्ब आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर नजर ठेवावी लागेल.एक सुज्ञ देश म्हणून भारताने आपली पारंपरिक युद्ध करायची तयारी ठेवायलाच हवी आणि त्याचबरोबर आपली क्षेपणास्त्रे आणि अणूबॉम्ब यांचे आधुनिकीकरण करत राहाणे गरजेचे आहे. पाकिस्तान तयार करत असलेल्या नवीन अणूबॉम्बला आपले प्रतिउत्तर काय असेल याचीही तयारी करून ठेवली पाहिजे. कारण पाकिस्तान हा धोकादायक देश आहे आणि पाकिस्तानबरोबर शांतता अनेक वर्षे प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणून आपण सगळ्या सुरक्षात्मक उपाययोजना करून ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे पाकिस्तानने कधीही हल्ला केल्यास त्याला प्रतिउत्तर देण्यास आपण तयार असू.




No comments:

Post a Comment