Total Pageviews

Friday 27 April 2018

लहानपणी सक्तीने एरंडेल पाजले जायचे

  • लहानपणी सक्तीने एरंडेल पाजले जायचे. 
    बुळबुळीत लागले तरी गिळावे लागायचे.
    नंतर लोटापरेड होणे अनिवार्य असायचे. 
    आज उतारवयातही पचनशक्ती उत्तम आहे *त्या एरंडेलाचे महत्त्व आता जाणवतेय (१)*
    लहानपणी पाढे तोंडपाठ करावे लागायचे.
    कविता, श्लोक घोकावेच लागायचे.
    सणावळ्यांनाही विशेष महत्त्व असायचे.
    आज उतारवयातही स्मरणशक्ती उत्तम आहे. *त्या पाठांतराचे महत्त्व आता जाणवतेय (२)*
    लहानपणी शाळेत पायी जावे लागायचे.
    कॉलेजसाठी सायकलशिवाय वाहन नसायचे.
    सगळे खेळही भरपूर धावपळीचे असायचे.
    आज उतारवयातही अंगकाठी सडसडीत आहे. *त्या पायपिटीचे महत्त्व आता जाणवतेय. (३)*
    लहानपणी जेवणात आवड-निवड नसायची.
    वरण, भात, भाजी, पोळी खावीच लागायची.
    ताजे ताक, फोडणीच्या पोळीचीही सक्ती व्हायची.
    आज उतारवयातही भूक, बीपी, शुगरचा त्रास नाही.*त्या चौरस आहाराचे महत्त्व आता जाणवतेय. (४)*
    लहानपणी तिन्हीसांजेला सायंप्रार्थना असायची.
    पंधरावा अध्याय म्हणायची सक्ती व्हायची.
    रामरक्षा, भीमरूपीपासून तर सुटकाच नसायची.
    आज उतारवयातही मन अत्यंत निर्भय आहे. *त्या भीमरूपीचे महत्त्व आता जाणवतेय. (५)*
    लहानपणी खोटे बोलायची शामत नसायची.
    फुकटचे काही घेतले तर शिक्षाच व्हायची.
    उधारी-उसनवारी लाजीरवाणी वाटायची.
    आज उतारवयातही स्वाभिमानाने जगतो आहे. *त्या शिकवणीचे महत्त्व आता जाणवतेय. (६)*
    लहानपणी अभ्यास स्वतः करावा लागायचा.
    ट्यूशन, गाईड, कॉपीचा तर विटाळच असायचा.
    कमी मार्क मिळाल्यावर मार खावा लागायचा.
    आज उतारवयातही बुद्धी भ्रष्ट झाली नाही.*त्या स्वाध्यायाचे महत्त्व आता जाणवतेय. (७)*
    लहानपणी मोठ्यांचा मान राखावा लागायचा.
    उलट उत्तर देण्याचा तर प्रश्नच नसायचा.
    मग रागावलेला माणूसही आशीर्वाद देऊनच जायचा.
    आज भरल्या घरात अत्यंत सन्मानाने राहतोय.*त्या संस्कारांचे महत्त्व आता जाणवतेय. (८)*
    लहानपणी शिस्तीसाठी आईचा धपाटा खाल्ला.
    किशोरवयात त्यासाठीच वडिलांकडून खाल्ला.
    शाळेत प्रत्येक चुकीला शिक्षकांकडूनही खाल्ला.
    आज उतारवयातही शिस्तबद्ध जीवन जगतोय. *त्या खाल्लेल्या माराचे महत्त्व आता जाणवतेय. (९)*
    लहानपणी एकत्र कुटुंबपद्धती असायची.
    घरोघरची आई 'श्यामची आई' च असायची.
    वडिलांची करडी नजर प्रेमापोटीच असायची.
    आज त्याची उणीव ठायीठायी जाणवतेय. *त्यांच्या वात्सल्याचे महत्त्व आता जाणवतेय (१०)*
    लहानपणी वाढदिवस साधेपणाने साजरा व्हायचा.
    एखादेच चॉकलेट, पण मोठ्यांचा आशीर्वाद मिळायचा.
    आई-बाबा- आजी-आजोबांचा हात मस्तकावरून फिरायचा.
    आज अमृतमहोत्सवाकडे आरामात वाटचाल करतोय. *'आयुष्मान भव' चे महत्त्व आता जाणवतेय. (११)*

No comments:

Post a Comment