Total Pageviews

Tuesday 16 August 2016

MUST READ-श्रीनगरमधील तणावपूर्ण स्थितीचा आढावा घेतला उपमिता वाजपेयी यांनी. वाचा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट... बुजुर्ग म्हणाले : दगड फेकणाऱ्यांना रोखले तर ते आम्हाला थापड मारतात दिवस, भागावरून दगडफेक्यांचे भाव; अफू, चरसच्या डोसच्या बदल्यात फेकतात दगड आंदोलनात या, अन्यथा महागात पडेल; मुलांचे टोळके घरात घुसून धमकावते! दगडाचे उत्तर चेंडूने जखमी जवानाचे आर्जव, फोटो काढू नका, घरी समजेल सहज सर्व मिळते, संचारबंदी कसली?


श्रीनगरमधील तणावपूर्ण स्थितीचा आढावा घेतला उपमिता वाजपेयी यांनी. वाचा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट... बुजुर्ग म्हणाले : दगड फेकणाऱ्यांना रोखले तर ते आम्हाला थापड मारतात दिवस, भागावरून दगडफेक्यांचे भाव; अफू, चरसच्या डोसच्या बदल्यात फेकतात दगड आंदोलनात या, अन्यथा महागात पडेल; मुलांचे टोळके घरात घुसून धमकावते! दगडाचे उत्तर चेंडूने जखमी जवानाचे आर्जव, फोटो काढू नका, घरी समजेल सहज सर्व मिळते, संचारबंदी कसली? सव्वा महिन्यापासूनच्या संचारबंदीचा परिणाम केवळ श्रीनगरच नाही तर जवळपासच्या भागात जाणवत आहे. रस्ते सुनसान आहेत. चौकात जिकडे-तिकडे दगड आणि जळालेल्या वाहनांचे अवशेष लढाई सुरू असल्याची जाणीव करून देतात. गल्लीतील खिडक्यांचे तुटलेल्या काचातून भीती डोकावते. चार भींतीआड सामान्य नागरिक चिडलेले, घाबरलेले आणि रागावलेले आहेत आणि रस्त्यावर पोलिस, सीआरपीएफचे जवान. दगडफेकीत गंभीर जखमी होऊनही ते दररोज १८ ते २० तास ड्युटी करत आहेत. श्रीनगरमधील तणावपूर्ण स्थितीचा आढावा घेतला उपमिता वाजपेयी यांनी. वाचा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट... श्रीनगर : काश्मिरात संचारबंदीला ३९ दिवस झाले आहेत. ६५ जण मारले गेले आहेत. एक दिवसही संचारबंदीत शिथिलता नाही. कदाचित देशातील ही सर्वात मोठी संचारबंदी असावी. २०१० मध्येही हिंसाचार चार महिने चालला. तेव्हा अधूनमधून संचारबंदी शिथिल होत होती. मात्र या वेळी...? याच कारणांचा शोध घेण्यासाठी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला डाऊन टाऊनमध्ये १२ तास घालवले. परिसरात दोन प्रकारचे चेहरे दिसले. एक- असहाय व भयभीत आणि दुसरे संतापललेले. आम्ही युवा, महिला व बुजुर्गांशी चर्चा केली. डाऊन टाऊनचा महाराजगंज काश्मीरचा सर्वात मोठा बाजार. बंद दुकानाबाहेर बसलेले बुजुर्ग सांगतात, ९० च्या दशकापासून संचारबंदी येथील जीवनाचा भाग आहे. संचारबंदी व धरपकड आधीही होत होती. दगडफेक झाली नाही असा एकही शुक्रवार पाहिला नाही. मात्र या मुलांना एवढे बेफाम पाहिले नव्हते. दगडफेक्यांना का समजावत नाही? असे विचारता ६५ वर्षींय बुजुर्ग म्हणाले,‘आम्ही त्यांना रोखले तर ते आम्हालाच थापड मारतात. ते दुसऱ्या मोहल्ल्यातून येथे येऊन जवानांवर दगड फेकतात. आम्ही त्यांना ओळखतही नाही. ते तोंड बांधून धुडगूस घालतात. मशिदीतून लोकांना मोर्चात येण्यासाठी, अर्ध्या रात्री दार ठोठावून रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करा म्हणून धमकावतात.’ तेथे बसलेल्या आणखी काही बुजुर्गांनी होकार देत आमची मुले अशी नाहीतच, अशी हमी दिली. दगडफेक येथील पेशाच बनला आहे. काश्मीर खोऱ्यात जिथून दहशतवाद सुरू झाला तो हाच डाऊन टाऊन भाग. त्याला श्रीनगरचा गाझाही म्हटले जाते. दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या या ५० वर्ग किमीच्या भागात ६ पोलिस ठाणी आहेत. सर्वाधिक दगडफेके येथेच आहेत.बुलेटप्रूफ गाड्यांची वाट रोखण्यासाठी रस्त्यावर भले मोठे दगड पडलेले आहेत. अनेक ठिकाणी ‘बुरहान आबाद... पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा लिहिल्या आहेत. मीरवाइज उमर फारूखच्या बंद कार्यालयाबाहेरच्या चौकात पाकिस्तानचा झेंडाही फडकत आहे. नंदनवनात कशी आहे परिस्थिती, कर्फ्यू आणि हिंसेचा बाजार, जनता आणि सैन्यांवर कसा पडत आहे प्रभाव तसेच निवडक फोटोंमधून पाहा काय सांगत आहे परिस्थिती. दिवस, भागावरून दगडफेक्यांचे भाव; अफू, चरसच्या डोसच्या बदल्यात फेकतात दगड पोलिसांनी अटक केलेल्या काही दगडफेक्यांनी सांगितले की, काही तरुण अफू, चरस व अमली पदार्थांच्या डोसच्या बदल्यातही दगडफेक करतात. दगडफेक्यांचा प्रत्येक मोहल्ल्याचा एक प्रमुख आहे. तो तरुणांना पैसे देतो. दर दिवशी- दर मोहल्ल्यात दगडफेकीचे वेगवेगळे भाव आहेत. पूर्ण दिवसाचा भाव वेगळा. पाकिस्तानचा झेंडा फडकवायला जास्त पैसे मिळतात. या तरुणांनी त्यांची एक असोसिएशन बनवली आहे. हीच असोसिएशन निवेदन जारी करून धमक्या देते.स्कूटी चालवणाऱ्यांना मुलींना स्कूटीसह जाळून टाकण्याची धमकीही यांनीच दिली होती. आंदोलनात या, अन्यथा महागात पडेल; मुलांचे टोळके घरात घुसून धमकावते! दक्षिण काश्मीरमध्ये अशांततेची धग कायम आहे. याच भागात बिजबिहेडा गाव आहे. हे गाव दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध म्हणता येईल. एकतर येथे चिनारांच्या बागा असून दुसरे म्हणजे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे हे गाव. याच गावात मुख्य महामार्गाच्या शेजारील घरात सबिना एकट्या बसल्या होत्या. त्यांचा मुलगा वडिलांना श्रीनगरमधील रुग्णालयात घेऊन गेला होता. शुक्रवारी दुपारनंतर आंदोलन करणाऱ्या तरुणांचा जथ्था सबिना यांच्या घरात घुसला आणि तुम्ही निषेध करण्यासाठी रस्त्यावर का उतरत नाही, असे विचारले. पण गुडघे दुखत असताना मी कसे येऊ? असे उत्तर सबिना यांनी दिले. प्रत्येक घरातून एक व्यक्ती निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरणे आवश्यक असल्याचा नियम येथील दगडफेक करणाऱ्या उपद्रवींनी केला आहे. जे आंदोलन करत नाहीत त्यांना याचे परिणाम भोगावे लागतात. शिक्षिका असलेल्या असिया म्हणाल्या, २०१० मध्ये आंदोलनादरम्यान त्यांच्या मामाचा मृत्यू झाला; पण आजवर दगडफेक करण्यासाठी कोणीही रस्त्यावर उतरले नाही. आपण भारतात आनंदी आहोत. मुलांनी शिक्षण थांबवावे आणि शिक्षकांनी शिकवू नये म्हणून रस्त्यावर उतरणारे लोक असे काम करत आहेत. शाळा बंद असली तरी असिया घरात ४० च्या जवळपास मुलांना शिकवत आहेत. दगडफेक आणि निषेध करणारे उपद्रवी लोक सोडले, तर जवळपास ८० टक्के लोक हिंसेच्या विरोधात आहेत; परंतु नाविलाज असल्याने शांत राहावे लागत आहे. मशिदीतून स्वातंत्र्याचे गाणे वाजताच घरातून लोक बाहेर पडतात. भडकावणाऱ्या घोषणा दिल्या जातात. शासकीय कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, अशी घोषणा एके दिवशी बटमालूच्या मशिदीतून करण्यात आली. रुबिना यांच्यानुसार पाकिस्तानसोबत जाणे चांगले नसल्याचे काश्मिरी जनतेला उत्तमरीत्या माहिती आहे; परंतु तरीही भारताला डिवचण्यासाठी असे प्रकार केले जातात. बेटा, तू येथे का आली? यंदा दिल्लीतून खूप कमी लोक काश्मीरला जात आहेत. त्यामुळेच दोन उड्डाणे रद्द करून सर्वांना एकाच विमानात समायोजित करण्यात आले. विमानात सीआरपीएफ, सैन्य दल आणि हवाई दलाचे काही लोक आणि त्यांचे कुटुंबीय आणि काही काश्मिरी होते. यातीलच ६-७ वर्षांच्या काश्मिरी मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. शाळेला सुट्या असल्याने ती आत्याकडे दिल्लीला आली होती. शाळेला सुटी का? याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, तेथे दगडफेक होते. दगड का मारले जातात, असे विचारले तेव्हा तिने माझ्याकडे बोट केले. त्याच वेळी सगळे हसायला लागले. सायंकाळी सहा वाजता श्रीनगर विमानतळावर उतरलो. बाहेर आल्यानंतर केवळ तीन टॅक्सी दिसल्या. मला बटमालूला जायचे म्हटल्यानंतर प्रिपेड टॅक्सी काउंटरवाल्याने नकार दिला. नंतर टेंगपोरा चौक बायपासपर्यंत जाण्याची तयारी दर्शवली. पण आंदोलन होताना दिसले तर पुलाच्या पहिलेच उतरून टाकणार असल्याचे त्याने म्हटले. जास्त पैशाचे आमिष दाखवले तेव्हा एक लाख दिले तर येणार नसल्याचे त्याने म्हटले. विमानतळावरून निघाताच काही अंतरावर टॅक्सी थांबली. श्रीनगरच्या बटमालू-टेंगपोरा भागात एका मित्राच्या घरी पोहचले. या भागाला आता काश्मिरचा बगदाद म्हटले जाऊ लागले आहे. गल्ल्यांमध्ये सकाळपासून संचारबंदी आणि सायंकाळी दगडफेक असे वातावरण झाले आहे. मित्राची आई मला पाहताच म्हणाली, “येथे लढाई सुरू आहे, तू येथे का आली बेटा?’ मुलगा सुरक्षित घरी परतावा म्हणून मी दररोज अल्लाहकडे प्रार्थना करत असल्याचे ती म्हणाली. पैसे उकळण्यासाठी मुले देतात थेट पोलिसांनाच धमक्या काश्मीरमधील संवेदनशील भागात पोलिस आणि सैन्य अधिक प्रमाणात तैनात असतात. शुक्रवारी यात आणखी वाढ होते. सायंकाळच्या वेळी सैन्य आणि पोलिस कॅम्पमध्ये परतत असतात तेव्हा मुले मागून त्यांच्यावर दगडफेक करतात. हा प्रकार रोजचाच असतो. जवानसुद्धा त्यांना दगडानेच प्रत्युत्तर देतात, परंतु जेव्हा मुले गाडी आणि कॅम्पच्या जवळ येतात तेव्हा मात्र अश्रू गॅस आणि रबर बुलेटचा वापर केला जातो. गर्दी आवाक्याबाहेर जाते तेव्हा पॅलेट गनचा वापर केला जातो. गर्दीतून अनेकदा कुऱ्हाडी फेकण्यात येतात. मागील एक महिन्यात तीन ते चार वेळा एके-४७ ने फायरिंग झाली. ग्रेनेडचा माराही केला. मोर्चा आणि रॅलीचे सर्वात मोठे आव्हान आहे. एक पोलिस कर्मचारी म्हणाली, नोकरीत असलेल्या काश्मिरी लोकांची मज्जा आहे. मागील एक महिन्यापासून त्यांना फुकटात पगार मिळताे. पण सर्वात जास्त त्रास आम्हाला आहे. आम्हाला स्वत:चीच सुरक्षा करावी लागत आहे. सीआरपीएफचे जवान पहाटे तीन वाजता उठतात आणि ड्यूटीच्या मार्गाला लागतात. त्यानंतर १५ ते २० किलोमीटर दूर असणाऱ्या पोलिस ठाण्यात जाऊन रिपोर्ट करावा लागतो व दिलेल्या ठिकाणी बंदोबस्तावर जावे लागते. रात्री दहा वाजता पुन्हा कॅम्पमध्ये परतावे लागते. सुटी तर नाहीच. अनंतनागमध्ये राहणारे पोलिस जवान अब्दुल माजिद गेल्या महिनाभरात फक्त एकदा घरी गेले होते. ते म्हणाले, आम्ही रात्री ११ वाजता श्रीनगरमधून निघालो आणि एक वाजता घरी अनंतनागला पोहोचलो. त्यानंतर दोन दिवस घरातच लपावे लागले. कुणाला मी पोलिस असल्याचे कळले असते तर माझे काही खरे नव्हतेे. त्यांचा एक सहकारी गेल्या आठवड्यात बांदीपोराहून परतत होता. रस्त्यात त्याला एका १० वर्षांच्या मुलाने थांबवून आयकार्ड मागितले. पोलिस असल्याचे कळल्यावर त्याने १५ वर्षांच्या प्रमुखाची भेट घेण्यास भाग पाडले. जवळचे सगळे पैसे द्या, नसता आम्ही पाकिस्तानचा झेंडा लावू आणि तुम्ही पोलिस असल्याचे सर्वांना सांगू, अशी धमकीच त्या मुलांनी दिली. दगडाचे उत्तर चेंडूने नौहट्टाच्या एका सीआरपीएफ चौकीने दगडफेक्यांपासून वाचण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. गल्लीतून दगडांचा मारा सुरू झाल्यावर जवानांनी जमा केलेले फुटबॉल, टेनिस बाॅल मुलांवर फेकले. मुले चेंडू घेऊन घरी पळाले. सर्व सीआरपीएफ जवानांना शिव्या, दगड आणि गोळीचा सामना करावा लागत आहे. महिन्यापासून पूर्ण झोप मिळत नसतांनाही ते १८-१८ तास कर्तव्य बजावत आहेत जखमी जवानाचे आर्जव, फोटो काढू नका, घरी समजेल ९२ सैनिकी रुग्णालय कॉट क्रमांक ११,१२, १३. ब्रिटिशकालीन इमारतीमधील या लष्करी रुग्णालयात जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. सीमा सुरक्षा दल (सीआरपीएफ) व जम्मू-काश्मीर पोलिस दलातील जवानांचा त्यात समावेश आहे. सैनिकी रुग्णालयाचे कमांडंट ब्रिगेडियर एम.एस.तवाटिया यांनी सांगितले की, गेल्या महिनाभरात ५७ जवानांना येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यापैकी ५० जणांना उपचाराअंती सुटी देण्यात आली आहे, तर सात जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात दगडफेकीत जखमी झालेल्या जवानांचाही समावेश आहे. एक आमदार खलील यांच्यावरही येथे उपचार करण्यात आले. सीआरपीएफचे सुमारे ४० हजार जवान काश्मीरमध्ये तैनात आहेत. या जवानांना सध्या दगडफेक्यांचे थेट शिकार व्हावे लागत आहे. याच तुकडीचे सर्वाधिक १६०० जवान जखमी झाले आहेत. परंतु काश्मिरात सीआरपीएफचे एकही रुग्णालय नाही. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी लष्कराच्या ९२ छावणी रुग्णालयात जावे लागते किंवा बीएसएफच्या हुमहमा रुग्णालयात. सीआरपीएफचा जवान रूपचंद बांदीपुरामध्ये तैनात होता. ३१ जुलै रोजी दगडफेकीत डोळ्याला जखम झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोळ्याजवळील हाड तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कॅमेऱ्यात फोटो काढू लागताच तो म्हणाला, कृपया माझा फोटो माझी मुले व पत्नीला दाखवू नका. ते विनाकारण चिंता करतील. मी जखमी झालोय म्हणून त्यांना सांगितलेले नाही, असे म्हणत त्याने चेहरा झाकून घेतला. त्याच्या जवळच्या बेडवर जम्मू - काश्मीर पोलिस दलाच्या एका जवानावर उपचार सुरू होते. कॅमेरा पाहताच त्यानेही चेहरा झाकून घेतला. तो म्हणाल की, जर लोकांना त्याच्याबाबत कळले तर ते लोक त्याचे घर जाळून टाकतील व कुटुंबीयांना मारून टाकतील. दगडफेक्यांचा मुकाबला करताना एका अपघातात त्याला त्याचा एक पाय गमवावा लागला आहे. हवाई सेवेद्वारे त्याला येथे भरती करण्यात आले. कॅमेरा बंद करताच तो रडायला लागला. तो म्हणाला, त्याच्याकडे पैसेच नाहीत व पोलिस खात्याने त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याबाबत अद्याणप काहीही सांगितलेले नाही. पोलिसांना फुटीरतावादी नेता सय्यदअली शहा गिलानीनेही धमकी दिली आहे. खन्नाबलचे एसएचओ तौसिफ मीर यांच्या नावाने प्रसिद्धिपत्रक जारी करून म्हटले आहे की, तौसिफने पॅलेट गनचा वापर केला आहे. त्यामुळे दगडफेक्यांनी त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केला पाहिजे. पोलिसांनी महत्प्रयासाने त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले सहज सर्व मिळते, संचारबंदी कसली? काश्मीरमध्ये एक हंगाम संचारबंदीचाही असतो. दिवसा सुरक्षा रक्षकांची तैनात शिथिल होते. त्यामुळे गरज पडेपर्यंत लोक घराबाहेर पडत नाहीत. सकाळी तैनात शिथिल होण्यापूर्वी ५ ते ७ वाजे दरम्यान दुकाने उघडतात. भाजी बाजार लागतो. जीवनावश्यक सर्व वस्तू मिळतात. आैषधांची दुकाने २४ तास सुरू असतात. दिवसा रुग्णालयात जाता येते. सरकारी नोकरांचाही संचार सुरू असतो. काही परिसर ग्रीन झोन म्हणून घोषित केले आहेत. येथे दगडफेक होत नाही. येथे दिवसभर सर्वसामान्य वाहतूक सुरू असते. सध्या दुपारची वेळ आहे. रस्त्यावर एखाद-दूसरे वाहन दिसते. यात बहुतांश रुग्णवाहिका किंवा हजसाठीची वाहने आहेत. सर्वत्र दहशत आहे. तुटलेल्या खिडक्यांच्या तावदानातून आत हालचाल दिसत नाही. आम्ही सुन्न मनाने डाऊन टाऊनचा फेरफटका मारत आहोत. सर्वत्र समान दृश्य आहे.

No comments:

Post a Comment