Total Pageviews

Friday 27 March 2015

होय, हे ब्रेन वाशिंगच आहे- pakistan artists

होय, हे ब्रेन वाशिंगच आहे भारतीय कलावंतांचं पाकिस्तानात नेहमीच जंगी स्वागत होतं. तिथे त्यांना भरभरून प्रेम मिळतं. याउलट पाकिस्तानातील कलावंतांना मात्र, भारतात शत्रुत्वाची वागणूक मिळते. कारण इथे पाकिस्तान हा आपला शत्रू असल्याचे ब्रेन वॉशिंग सतत केले जाते... ही मुक्ताफळे उधळली आहेत, भारतीय रसिकांनी डोक्यावर घेतलेले एक प्रथितयश कलावंत नासिरुद्दीन शाह यांनी. आपल्या एका पुस्तकाचे प्रमोशन करायलाही ज्यांना अजूनही पाकिस्तानात जावेसे वाटते, त्या नासिरुद्दीन शाह यांना त्या देशाविषयी प्रेमाचे भरते येणे तसे स्वाभाविकच. आणि; ज्या देशात जायचे, तिथे त्यांचे गोडवे गाणेही ओघाने आलेच. पण म्हणून तसे करताना आपल्या मातृभूमीला शिव्याच मोजल्या पाहिजेत असे कुठे आहे? पण दुर्दैवाने भारतीय कलावंतांना तसे करणे कधी जमलेच नाही. दरवेळी इतरांच्या पदरात स्तुतिसुमनांचे दान टाकताना आपल्या लोकांना पायदळी तुडवलेच पाहिजे, तरच त्या स्तुतिसुमनांचा दर्जा उंचावतो, असा समज इथल्या काही बड्या लोकांनी करून घेतलेला दिसतो. नासिरुद्दीन यांचे बरळणे तसल्याच प्रकारात मोडणारे आहे. पाकिस्तानी कलावंतांच्या कलाकृतींना पाकिस्तानात तितकासा ‘भाव’ मिळत नसल्याने त्यांनी भारताकडे पावलं वळवली असल्याची आणि भारतीय रसिकांनी मात्र त्यांना डोक्यावर उचलून धरत त्यांच्या कलाकृतींना हृदयात स्थान आणि बाजारात भरपूर किंमत दिली असल्याची बातमी शाह यांच्या कानावरून गेलेली दिसत नाही अद्याप. मुळात असले बिनबुडाचे आरोप करताना नासिरुद्दीन शाह यांनी एकदा मागे वळून बघायला हवे होते. भारतीय रसिकांच्या हृदयाचा ठाव एकदा घ्यायला हवा होता. कारण, या बरळण्यातून भारतीय रसिकांच्या कलासक्तीवरच त्यांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. मेहदी हसन यांच्या गझलांवर मनापासून प्रेम करणार्‍या भारतीय रसिकांवर अन्याय करणारा आरोप नासिरुद्दीन यांनी केला आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कमी पडणारा निधी जमविण्यासाठी पाकिस्तानात गाण्याचे कार्यक्रम आयोजित करणार्‍या जगजितसिंहांवर अन्याय करणारा आरोप नासिरुद्दीन यांनी केला आहे. गायक अदनान सामी, लेखक आतिश तासीर, गायिका सलमा आगा, बॉलीवूडमधील कलावंत सारा लॉरेन, अली जफर, वीणा मलिक, सोनी राझदान, झेबा बक्तियार, सोमी अली, जावेद शेख, मीशा शफी, मोहसिन खान यांना काय भारतात स्थान मिळाले नाही की रसिकाश्रय मिळाला नाही? की शिव्यांची लाखोलीच वाहिली लोकांनी आजवर त्यांना? याउलट पाकिस्तानात जाऊन नाव कमावणार्‍या अन् पाकिस्तानी रसिकांनी तिथे डोक्यावर घेतलेल्या भारतीय कलावंतांची वानगीदाखल तरी नावे जाहीर करावीत शाह यांनी एकदा. कलावंतांना जात, पंथ, धर्म, भाषा, देश या मर्यादेबाहेर ठेवले पाहिजे हे मान्य नासिरुद्दीन साहेब आम्हाला. हे भारताने सदासर्वकाळ मान्य केले आहे. नव्हे, त्याबरहुकूम वागणूकही राहिली आहे भारतीयांची. एक कलावंत म्हणून मायकल जॅकसनला डोक्यावर घेताना आणि त्याच्या संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचताना तो भारतीय नसल्याची बाब कधी आडवी आली नाही, की इथल्या रसिकांनी त्याच्या वैयक्तिक जीवनातल्या बाबींवरही कधी आक्षेप नोंदवला नाही. उलट भारतीयांइतके विशाल हृदयाचे रसिकजन अख्ख्या जगात कुठे नसल्याचा प्रत्यय प्रत्येक वेळी अनुभवायला आला आहे. हा रसिक भीमसेन जोशींच्या खड्या आवाजातील भजनंही तल्लीन होत ऐकतो अन् फरीदा खनूमच्या आर्त स्वरातील ‘आज जाने की जीद ना करो’ ऐकूनही तो त्याच्याही नकळत फक्त दादच देतो. फरीदा पाकिस्तानी असल्याची बाब त्याच्या स्मरणातही राहात नाही त्यावेळी. नुसरत फतेह अली खानांच्या आवाजाची जादू मनाला भुरळ घालते तेव्हा, त्यांचा देश कोणता, हे लक्षातही राहात नाही, नासिरुद्दीनजी आमच्यासारख्या सामान्यजनांच्या. पण या सार्‍या गोष्टी आपल्यासारख्या महान म्हणवणार्‍या कलावंतांच्या मात्र हमखास लक्षात राहतात. कारण, मुळात ते आपल्या मनातच असते बहुधा. म्हणूनच या गोष्टी अशा पद्धतीने बाहेर येतात योग्य वेळी! मुलामा उगाच इथल्या ब्रेन वॉशिंगचा असतो, आपल्या मनातली घुसमट यानिमित्ताने व्यक्त होत राहते, एवढाच त्याचा स्पष्ट अर्थ असतो. राहत फतेह अली खान असो वा मग अतिफ असलम, अबीदा परवीन असो वा मग शफाकत अली, आपण म्हणता त्याप्रमाणे पाकिस्तानी कलावंत म्हणून भारतीयांनी त्यांची हेटाळणी केली असती, तर त्यांचे काय हाल झाले असते कुणी सांगू शकेल? नासिरुद्दीनजी तुम्ही तर कधीमधी पाकिस्तानात जाता, तेव्हा तिकडे होणारे स्वागत वाट्याला येते तुमच्या. इथे तर आम्ही रोज मेहदी हसन अन् फरीदाच्या आवाजातल्या गझला उशाशी घेऊन निजतो. चश्मेबद्दूर मधला अली जफर बघताना आम्ही, तो पाकिस्तानी म्हणून नाकं मुरडली नाहीत कधी, की सलमा आगाच्या करड्या आवाजातली गाणी टाकून दिली नाहीत, की मोहसिनखानच्या चित्रपटांकडे पाठ फिरवली नाही. पाकिस्तानी कलावंतांच्या कलाकृतींनी सजल्या म्हणून काही भारतातल्या आर्ट गॅलरीतली रसिकांची गर्दी कमी झाली नाही. उलट इथे मिळणारा भरघोस प्रतिसाद आणि रसिकाश्रयामुळेच तिकडचे कलावंत इकडे गर्दी करताहेत. मग सांगा नासिरुद्दीनजी, भारतात पाकिस्तानी कलावंतांना न्याय मिळत नसल्याचा आणि भारतीय रसिक त्यांना तितकीशी दाद देत नसल्याचा जावईशोध तुम्ही कसा अन् कशाच्या आधारे लावला? ज्या देशाने तुम्हाला सर्व चौकटींच्या पलीकडे जाऊन आजवर न्याय दिला, तुमच्या कलेची कदर केली, तुमच्या अभिनयाला सतत दाद दिली, त्या देशाच्या माथी असली बदनामी कशाला लादता नासिरुद्दीन साहेब? अन् राहिला प्रश्‍न कधीमधी संताप व्यक्त होण्याचा अन् त्यात पाकिस्तानी म्हणून कुणी भरडले जाण्याचा, तर ती त्या त्या वेळची प्रतिक्रिया असते. ती जगात कुठल्याही देशात उमटते. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांना मध्यंतरीच्या काळात सतत मारहाण व्हायची म्हणून काही तो देश भारतविरोधी ठरत नाही. मग तुम्ही का म्हणून तमाम भारतीयांना पाकिस्तानद्वेष्टे ठरवायला निघालात? असामात बांगलादेशी मुस्लिमांच्या सतत वाढत चाललेल्या लोकसंख्येविरुद्ध पुकारल्या गेलेल्या लढ्याची प्रतिक्रिया मुंबईतल्या आझाद मैदानावर उमटू शकते, तर मग पाकिस्तानातून आलेल्या कसाबने मुंबईत पुकारलेल्या लढ्याची संतप्त प्रतिक्रिया देशभरात कशी उमटणार नाही नासिरुद्दीनजी? कसाबच्या आक्रमणाबद्दल आपण तेव्हा किंवा त्यानंतरही कधी संताप व्यक्त केल्याचे ऐकिवात नाही. याउलट पाकिस्तानी कलावंतांना भारतात सहन कराव्या लागणार्‍या कथित हालअपेष्टांची आपल्या मनातली चिंता मात्र जाहीरपणे व्यक्त होते, तेव्हा त्या व्यक्त होणार्‍या भावनाही आपसूकच संशयाच्या वलयात घेरल्या जातात. इथल्या लोकांनी ज्यांना हृदयात स्थान दिले, अशा कलावंतांची हातभर लांब होईल अशी यादी जाणीवपूर्वक विसरायची अन् ज्यांच्याविरुद्ध कधीतरी कारणिक संताप व्यक्त झाला, ती नावं मात्र व्यवस्थितपणे लक्षात ठेवून त्याचाच सतत जप करायचा, ही शैली अन् त्या आडून पाकिस्तानप्रती व्यक्त होणार्‍या आपल्या मनातल्या प्रेमाच्या सुप्त भावना, तुम्ही कितीही प्रयत्न केला, तरी दडवता येत नाहीयेत् नासिरुद्दीन साहेब आपल्याला. या भावनांचा आपल्या धर्माशी काहीएक संबंध नसल्याचे आपण कितीही ओरडून सांगितले, तरी त्यावर लोकांचा विश्‍वास बसणार नाही. मुळात असली विधाने करताना आपल्याला तसला खुलासा करावा लागतो, यातच सारे आले. राहिला प्रश्‍न ब्रेन वॉशिंगचा, तर ऐकून घ्या नासिरुद्दीन साहेब, पाकिस्तानसोबतचे राजकीय संबंध सुधारावेत याबाबत इथे कुणालाच आक्षेप नाही. असण्याचे कारण नाही. पण त्यांनी हल्ले करायचे अन् आम्ही मात्र शांततेच्या गप्पाच हाणायच्या, ही असली षंढ अपेक्षा तुम्हालाच लखलाभ. असल्या वागणुकीवर पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देण्याच्या भूमिकेचा प्रसार म्हणजे तुमच्या लेखी ब्रेन वॉशिंग असेल, तर होय! होते या देशात पाकिस्तानविरुद्ध ब्रेन वॉशिंग! अन् तुमच्यासारख्या मोजक्या लोकांचा अपवाद सोडला, तर कुणालाच त्यावर आक्षेप नाही, हे लक्षात घ्या शाह साहेब

No comments:

Post a Comment