Total Pageviews

Monday 23 March 2015

कसबची बिर्यानी आणी उज्ज्वल निकम

अजमल कसाबच्या बिर्याणीबाबत वक्तव्य करून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नव्याने चर्चा घडवून आणली आहे. मुंबईवरील २६/११चा हल्ला हा संपूर्ण देशासाठी अतिशय संवेदनशील विषय आहे. माणुसकीला काळिमा फासणारा क्रूर आणि भयावह कृत्य कसाब आणि त्याच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता. पाकपुरस्कृत दहशतवादाचा नवा चेहरा या निमित्ताने पुढे आला होता. कसाबला जिवंत पकडल्याने पाकिस्तानचा मुखवटाही गळून पडला. कसाबवर रीतसर खटला भरून न्यायालयात सुनावणी करून त्याला फाशीही देण्यात आली आहे. कोठडीत असताना त्याने बिर्याणीची मागणी केली होती आणि त्याची पूर्तता केली गेली, अशी चर्चा होती. भारतीयांना मारणाऱ्या कसाबला बिर्याणी का खाऊ घालायची, अशी भावना त्यानंतर निर्माण झाली होती. प्रत्यक्षात त्याने बिर्याणीची मागणी केलेली नव्हती, असा खुलासा निकम यांनी नुकताच केला आहे. 'कसाबबद्दल सहानुभूती निर्माण होईल, अशा प्रकारचे वृत्त माध्यमांमधून येत असल्याने त्याच्याबद्दलचे जनतेचे मत बदलले जाऊ नये म्हणून तो बिर्याणी मागत असल्याचे वक्तव्य मी केले होते,' असे निकम यांनी म्हटले आहे. कसाबचे प्रकरण संपल्यानंतर त्यांनी हा खुलासा का केला हे कळायला मार्ग नाही. त्यांचे हे वक्तव्य तपासून पाहणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. या तपासातून काय निष्पन्न व्हायचे ते होईल; परंतु अशा संवेदनशील विषयावर जाहीर वक्तव्य करून वाद निर्माण करणे कितपत उचित याचाही विचार व्हायला हवा. २६/११ प्रकरणी भारताने कसाबच्या विरोधात अतिशय पारदर्शी पद्धतीने खटला चालविला. त्याला त्याची बाजू मांडण्याची संधीही दिली. विशेष न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा सर्व टप्प्यांनंतर त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण उकरून काढून जगाचे लक्ष वेधून घेण्यात काहीही अर्थ नाही. त्याचबरोबर या निमित्ताने दहशतवाद आणि बिर्याणी यांच्यात प्रतीकात्मक नाते तयार होते आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. कसाबच्या बिर्याणी प्रकरणापासून बिर्याणीला एक प्रतीकात्मक रूप आले आहे. भारताच्या दिशेने निघालेली पाकिस्तानी बोट बुडविण्याचा निर्णय तटरक्षक दलाने मध्यंतरी घेतला तेव्हाही, 'त्यांना बिर्याणी का खाऊ घालायची,' असे म्हटले गेले होते.

No comments:

Post a Comment