Total Pageviews

Saturday 21 March 2020

ही नागरिकांच्या परीक्षेची घडी आहे. ही बाब ओळखून, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध पुकारून, कोरोनाला पिटाळून लावू या...!-TARUN BHARAT

नागरिकांच्या परीक्षेची घडी...
देशातच नव्हे जगात आज कुठेही गेलात, तरी तुमच्या कानी कोरोनाची चर्चा पडल्याशिवाय राहायची नाही. चीनमार्गे जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. दररोज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढत असून, तो आटोक्यात आणण्यासाठी सार्‍या जगाने पुढाकार घेतलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, या रोगाची व्याप्ती बघता या संकटाला महामारी म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारनेही तातडीने पावले उचलून आपल्या देशाला आणि येथील नागरिकांना या जीवघेण्या रोगाचा फटका बसू नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत. जगात 2 लाख कोरोनाग्रस्त आढळले असून, भारतात 153 जणांना या विषाणूंची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील लागण झालेल्यांची संख्या 49 वर पोहोचली आहे. जगातील तब्बल 120 देशांना कवेत घेणार्‍या या रोगाची लक्षणे कोणती, पॉझिटिव्ह लक्षणे आढळलेल्यांनी कुठली काळजी घ्यावी, कोरोना संशयितांनी कुठली पथ्ये पाळावी यासह स्वच्छतेबाबत कोणती काळजी घेतली जावी, याच्या सूचना सरकारतर्फे आणि आरोग्य मंत्रालयातर्फे जारी होत आहेत. सर्वाधिक लागण झालेल्या आणि मृत्यू झालेल्या चीनने तर या रोगावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आता जबाबदारी भारतीयांचीही आहे.

भारतात लोकशाही आहे आणि त्यामुळेच आपली जबाबदारी जास्त आहे. सरकार कुठलीही बळजबरी करून निर्णय लादू शकत नाही. पण, म्हणून सरकारच्या निर्णयांवर विनाकारण टीका करणे योग्य ठरणार नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार ज्या काही उपाययजोना करीत आहे, त्या आपल्यातील अनेकांना अनावश्यक वाटत असतील किंवा काही जण सरकारने अतिरेक करू नये, अशा टीकेपर्यंतही आले असतील. पण ही कृती बरी नव्हे. आज प्रत्येक भारतीयाने कोरोनाविरुद्धच्या सरकारने पुकारलेल्या युद्धाचे सैनिक म्हणून त्यात सशस्त्र सहभागी झाले पाहिजे. सरकारच्या युद्धात आरोग्यरक्षकांचा सहभाग अनन्यसाधारण आहे. डॉक्टर्स, परिचारिका, अटेंडण्टस्‌ यांची भूमिका अहम्‌ आहे. कोरोनाग्रस्तांकडे हेटाळणीच्या दृष्टीने बघण्याच्या या काळात ही मंडळी रुग्णांची तपासणी करून, त्यांची विचारपूस करून, त्यांना काय हवे, काय नको याची आस्थेने विचारपूस करून, आपले कर्तव्य बजावत आहे. रुग्णांना आणि संशयितांना धीर देत आहेत. हा विषाणू ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांच्या आतील मुलांना लक्ष्य करतो. त्यामुळे अशा वयोगटातील लोकांची विशेष काळजी देशवासीयांनीच घ्यायला हवी. आरोग्ययंत्रणेला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्व सामान्य जनतेची आहे. कारण जोवर प्रजा सहकार्य करणार नाही, तोवर या देशातील कोणताही राजा, कुठल्याही प्रकारच्या युद्धावर जय मिळवू शकणार नाही.




कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने जमावबंदी लागू केली आहे, त्यामध्ये आपण प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आहे. अशा वेळी आपल्या घरचे धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, आपापले व्यवसाय काही दिवस बंद करणे, शिक्षकांनी गरज असेल तरच शाळेत जाणे अशी कृती अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुट्या या मजा मारण्यासाठी नसून, त्याचा सदुपयोग करायला हवा. उगाच सहली काढून पर्यटनस्थळी गर्दी करू नये. प्रवास टाळावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, आपला वेळ अभ्यास, वाचन अथवा छंद जोपासण्यासाठी सत्कारणी लावावा. सरकारने हॉटेल्स, बार, क्लब, रस्त्यांवरील छोटी चहा-नाश्त्याची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशातच होस्टेलवर राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या जेवणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना डबे पोहोचविण्यासाठी पुण्याच्या काही स्वयंसेवकांनी फेसबूकवरून मोहीम चालविली आहे. अशी मोहीम खरोखरीच राज्यभरही उपयोगी ठरू शकते आणि त्यातून गरजूंना मदतीचा हात दिला जाऊ शकतो. कोरोनाच्या भीतिपोटी अथवा उपाययोजना म्हणून छोटी हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाच्या टपर्‍या, क्लब, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. कामबंदीमुळे आमदनीही बंद पडणार आहे. यामुळे मजूर िंकवा छोटे विक्रेते यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहील. अशांच्या उदरभरणाची काही दिवसांची सोय करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. राष्ट्रीय कर्तव्य काय असते, हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. आपण आपल्या अधिकारांसाठी नेहमी जागरूक असतो. मग अशा संकटकाळी आपण सरकारची, नागरिकांची मदत करून आपली जबाबदारी ओळखायला नको?

गर्दी टाळा, स्वच्छता राखा, वर्क फ्रॉम होम, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, प्रतिकारक्षमता वाढविणारी औषधे घेणे... अशा अनेक उपाययोजना सरकारने सुचविल्या आहेत. पण, सरकारने सांगूनही आपण सूचनांचे पालन करणार नसू तर सरकारला प्रसंगी कठोर पावले उचलावी लागतील. दंडुकेशाहीचा वापर करावा लागेल. वर्क फ्रॉम होमचा शासकीय आदेश असताना व शक्य असतानाही पुण्यातील काही कंपन्या हा आदेश धुडकावून आपल्या कर्मचार्‍यांना कंपन्यांमध्ये कामासाठी बोलवत आहेत. सुशिक्षितच अशा आडमार्गाचा वापर करणार असतील, तर मग अशिक्षितांकडून काय ती अपेक्षा करावी? लोकांनी गर्दी टाळलीच नाही तर सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णयही सरकारला घ्यावा लागेल. मुंबईत लोकल बंद पडल्या तर लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न निर्माण होतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी काही कंपन्यांनी स्वतःची उत्पादन निर्मिती वाढविण्याचे प्रयत्न केल्यास ते गर्दीला आणि प्रसंगी रोगाला आमंत्रण देणारे ठरतील. कोरोनाच्या दुसर्‍या फेजमधून आपण तिसर्‍या फेजमध्ये जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त पसरू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केले तर हा रोग पसरणार नाही. तुमच्या भागात जे कुणी सर्दी, तापानं आजारी असतील त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगायला हवे. आपल्या भागात असे कुणी रुग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याला त्याची कल्पना द्यायला हवी.

नागपुरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आणि उपचारादरम्यान त्याच्या प्रकृतीत सुधारणाही दिवस आहे. मात्र, तो रुग्ण ज्या वस्तीत राहतो, तेथील नागरिकांनी त्याच्या कुटुंबावर जणू बहिष्कारच घातला आहे. त्यांच्या घरी येणे-जाणे, त्यांच्याशी बोलणे आणि त्यांच्याशी व्यवहार करणे थांबविले. ही कुठली माणुसकी म्हणावी? अखेर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी यातून मार्ग काढून या रुग्णाच्या घरी भेट दिली आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत, असा धीरही त्या रुग्णाच्या कुटुंबाला दिला. महापौरांची ही कृती निश्चितच स्वागतार्ह आणि एक नवा पायंडा पाडणारी म्हणावी लागेल. काहीही झाले तरी मी माणुसकी सोडणार नाही, असा प्रणच कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या निमित्ताने उद्भवलेल्या पार्श्वभूमीवर करण्याची गरज आहे. आज जगात महायुद्ध होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण, कोरोनाच्या विषाणूंनी संपूर्ण जगाविरुद्ध युद्ध पुकारून युद्ध झाल्यास काय परिस्थिती उद्भवू शकते, याची प्रचीती आणून दिली आहे. ही नागरिकांच्या परीक्षेची घडी आहे. ही बाब ओळखून, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध पुकारून, कोरोनाला पिटाळून लावू या...!

No comments:

Post a Comment