Total Pageviews

Wednesday 4 July 2018

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांनी काश्मीरमध्ये लष्करावर आत्मघातकी हल्ला करण्यासाठी गेल्या वर्षी मोठ्या संख्येने निरागस मुले आणि किशोरवयीन तरुणांची भरती केली-मिलिंद सोलापूरकर -


 
पाकिस्तानमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांनी काश्मीरमध्ये लष्करावर आत्मघातकी हल्ला करण्यासाठी  गेल्या वर्षी मोठ्या संख्येने निरागस मुले आणि किशोरवयीन तरुणांची भरती केली आहे. अनकेदा या संघटना आणि लष्कर यांच्यादरम्यान झालेल्या संघर्षात त्यांचा वापर केल्याचे पाहण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या ‘मुले आणि सशस्त्र संघर्ष’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. अहवालानुसार मुलांना दहशतवादाचे शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये 15 वर्षांचा अल्पवयीन मुलगा मारला गेला होता. हा अहवाल जानेवारी 2017 ते डिसेंबरपर्यंतचा आहे. मुंबईच्या ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला दहशतवादी अजमल कसाब सामील होता आणि तोदेखील अल्पवयीनच होता, हे या निमित्ताने नव्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. 
जानेवारी 2017 मध्ये तेहरीक-ए-तालिबान या संघटनेने एक व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये मुलींसह लहान मुलांनाही आत्मघाती हल्ले कशा प्रकारे केले जातात, याचे प्रशिक्षण दिले जाते असल्याचे दिसते. आत्मघाती हल्ल्यांसाठी भरती केली जाणारी मुले ही पाकिस्तानातीलच आहेत; मात्र या अहवालात जगभरात होणार्‍या बालहक्कांच्या उल्लंघनाची 21 हजार प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या वर्षी जगभरात झालेल्या संघर्षामध्ये 10 हजारांहून अधिक 
मुले मारली गेली किंवा दिव्यांग झाली. 8000 हून जास्त मुले दहशतवादी, नक्षलवादी आणि विद्रोही संघटनांनी भरती करून घेतली आहेत. ही मुले युद्धग्रस्त असलेल्या सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, फिलिपीन्स, नायजेरिया यांसह भारत आणि पाकिस्तानसह एकूण 20 देशांमधील आहेत. 

दुसरीकडे, काश्मीरमधील फुटीतरतावादी संघटना जम्मू-काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी बनवण्याची मोहीम चालवत आहेत, हे सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी या गोष्टीला अधिक बळ मिळाले, जेव्हा अरशिद माजिद खान या 20 वर्षीय दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले. अरशिद महाविद्यालयात उत्तम फुटबॉल खेळाडू होता; पण काश्मिरातील बिघडलेल्या परिस्थितीत धर्म ही अफूची गोळी ठरली आणि त्याचा मार्ग बिघडला. तो थेट ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये सामील झाला. तो दहशतवादी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांचे जे हाल झाले, ते पाहून अरशिदचे मन पालटले आणि तो घरी परत आला. 
काश्मिरी तरुणांना दहशतवादाकडे ओढणे हा पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे संरक्षण असलेल्या दहशतवादी संघटनांचा अनेक वर्षांपासूनचा कुटिल प्रयत्न आहे. काश्मीरमधील गरीब, लाचार मुले, किशोरवयीन मुले आणि तरुण यांना धर्माच्या नावाने भडकवून दहशतवादी बनवण्याचे काम तेथील मदरशांमध्ये केले जात असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असणारे हे तरुण आहेत. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारत-पाक सीमेवर ते कार्यरत असतात. कारगिल युद्धातही याच दहशतवाद्यांनी मुख्य काम केले होते. पाकिस्तानचे माजी लेफ्टनंट जनरल आणि पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआयचे सेवानिवृत्त अधिकारी असलेले शाहिद अजीज म्हटले होते की, कारगिल युद्धातून पाकिस्तानने काहीच धडा घेतला नाही. वास्तविक, आमच्या चुकीची किंमत आपल्या मुलांना आपल्याच माणसांचे रक्त सांडून चुकवावी लागते आहे. 10 लाखांचे इनाम ठेवलेल्या बुर्‍हान वनीला भारतीय लष्कारने ठार मारल्यानंतर त्या शहीद ठरवण्यासाठी जी निदर्शने केली, त्यात 100 काश्मिरी लोकांना आपला जीव गमवावा लागला. 
काश्मीरमधील मार्ग चुकल्या तरुणांना मार्गावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि लष्कर तसेच विविध स्वयंसेवी संस्थांकडून खूप प्रयत्न करण्यात आले; पण तरीही सीमेपलीकडून या तरुणांना प्रोत्साहन आजही मिळतच आहे. तरुणांची माथी भडकवण्याचे काम करणार्‍या बहुतेक फुटीरतावाद्यांची घरे काश्मीरमध्ये नाहीत. त्यांचा कुटुंबकबिला दिल्लीतील अलिशान घरांमध्ये राहतो. त्यांची मुले चांगल्या शाळेत शिकतात किंवा परदेशात चांगल्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या करतात. या फुटीरतावाद्यांशी निगडित समाजमाध्यमे आहेत, ज्याच्या माध्यमातून तरुणांना गैरमार्गाला लावले जाते. याच कारणाने रमजानच्या महिन्यात सरकारने युद्धबंदीचा निर्णय घेतला होता. त्याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी लष्कराला दगडफेकीचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे, तर युद्धबंदीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी औरंगजेब या रायफल मॅनची आणि संपादक शुजात बुखारी यांची निर्घृण हत्याही केली होती. परिणामी, सरकारने युद्धबंदी उठवली. तसेच जम्मू-काश्मीर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि पीडीपीबरोबरची युतीही तोडली. 
सध्या मात्र एक वेगळीच मागणी दहशतवादी करत असल्याचे ऐकायला मिळते आहे. पूर्वी दहशतवादी स्वातंत्र्याची मागणी करत होते. आता त्यांना स्वातंत्र्य नव्हे, तर इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर असे स्वतंत्र राज्य हवे आहे. पूर्वी काश्मीरमधील अस्वस्थ युवक आपल्याच लोकांना लक्ष्य करत नव्हते आणि पर्यटक, पत्रकार यांनाही हात लावत नव्हते. सध्याची परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे. त्यांच्या मार्गात अडथळा ठरणार्‍या कोणत्याही व्यक्तीचा जीव घेण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. या यादीत औरंगजेब आणि शुजात बुखारी यांच्या आधी बळी गेलेे ते उपनिरीक्षक गौहर अहमद, लेफ्टनंट उमर फैय्याज आणि डीएसपी अयबू पंडित यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सुरुवातीला जे तरुण दहशतवादी होत असत ते अशिक्षित होते; पण हल्लीचे तरुण दहशतवादी उच्च शिक्षित आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मिरीयत, जम्मूरीयत आणि मानवतावाद यांसारख्या मानवतावादी हिताच्या गोष्टी लक्षात घेऊन काश्मीरप्रश्‍नी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता; पण पाकिस्तानच्या दुष्टनीतीमुळे त्याचा फारसा परिणाम झाला नाही. उलट, आगर्‍याहून परतल्यानंतर तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची तयारी केली. मनमोहन सिंगांच्या कार्यकाळातही चर्चेतून मार्ग काढण्याची नीती अवलंबिली होती. आता मोदी सरकारकडून अपेक्षा आहेत; मात्र दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी तेथील तरुणांचे प्रबोधन गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांना भडकावणार्‍या, दहशतवादाकडे वळवणार्‍यांचा बंदोबस्त करायला हवा

No comments:

Post a Comment