Total Pageviews

Wednesday 14 June 2017

नक्सल प्रभावित छत्तीसगडमध्ये रोजगार-शिक्षणाचा प्रभाव - Parashuram Patil


Posted: 7:55 PM, 14/06/2017 by RAMANSINGH SIDE ARTICLE PHOTO Share छत्तीसगडच्या दुर्गम-ग्रामीण भागात वाढत्या नक्षली प्रभावावर होणारे मोठय़ा प्रमाणातील जीवित आणि आर्थिक नुकसान टाळून नक्षलवाद आणि नक्षलवाद्यांचा बीमोड करतानाच नक्सल्यांच्या जीवघेण्या हल्यांना बळी पडलेल्या स्थानिक वनवासी-ग्रामीणांच्या निराधार मुलांना योग्य प्रमाणात शिक्षण-रोजगारासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याला अनेकार्थांनी तोड नाही. या साऱयाच्या मुळाशी आहे ती छत्तीसगड सरकारद्वारा प्रामुख्याने व दूरदर्शी विचारांसह सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री बाल सुरक्षा योजना. 2010 मध्ये सुरू करण्यात आलेली ही सामाजिक योजनाच मुळी विशेषत्वाने राज्यातील नक्षलग्रस्त जिह्यांसाठी लागू करण्यात आली आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. अशा प्रकारे सुरू करण्यात आलेल्या छत्तीसगड राज्यस्तरीय मुख्यमंत्री बाल सुरक्षा योजनेत प्रामुख्याने नक्सल प्रभावीत जिह्यातील निराधार बालके आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणून आस्था, निष्ठा, सहयोग व प्रयास या चार प्रकारच्या कार्यवाहींचा टप्पावार पद्धतीने समावेश करण्यात आला असून या टप्प्यानुसार करण्यात येणारी उपायोजना व अंमलबजावणी पुढीलप्रमाणे. आस्था : या पुढाकारामध्ये नक्सल्यांच्या हल्ल्यात बळी ठरलेल्या ग्रामीणांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी 1 ली ते 10 व्या इयत्तेपर्यंतच्या ‘गुरुकुल’ पद्धतीच्या शिक्षणाची विशेष सोय करून देण्यात आली आहे. अनाथ मुलांसाठी अशा प्रकारच्या निवासी शाळांमुळे गरजू-ग्रामीण विद्यार्थांच्या मूलभूत शिक्षणाची मोठी सोय ‘आस्था’ पूर्वक करण्यात आली आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. निष्ठा : ‘निष्ठा’ या शब्दाप्रमाणेच नक्सलप्रभावित क्षेत्रात काम करणाऱया स्वयंसेवी वा सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शिक्षणाच्या नेमक्या गरजा जाणून त्यानुसार शैक्षणिक सुविधा वा पाठबळ पुरविण्यात येत असते. सहयोग :या उपक्रमामध्ये गरजू विद्यार्थांना त्यांच्या शालेय शिक्षणानंतरच्या वा महाविद्यालयीन शिक्षणाची सोय त्यांच्या गरजा वा अपेक्षानुरूप करून देण्यात येते. प्रयास : ‘प्रयास’च्या प्रयत्नातून नक्षलग्रस्त विद्यार्थांसाठी निवासी स्वरुपाच्या शिक्षण-रोजगार मार्गदर्शन केंद्राची सुरुवात केली गेली आहे. अशा प्रकारचे पहिले केंद्र छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये गेल्या सहा वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत आहे हे विशेष. ‘प्रयास’ शैक्षणिक-मार्गदर्शन केंद्रामध्ये नक्षल क्षेत्रातील प्रत्येक जिह्यातील 30 निवडक विद्यार्थ्यांची त्यांचा कल जाणून व त्यांना प्रोत्साहन देऊन निवड केली जाते. या संदर्भातील आकडेवारीसह सांगायचे झाल्यास सध्या छत्तीसगडमध्ये 6 ‘प्रयास’ केंद्र यशस्वीपणे कार्यरत असून यामध्ये राजधानी रायपूरमध्ये खास मुलींसाठी असणाऱया केंद्रासह 2 केंद्रे असून त्याशिवाय राज्यातील अंबिकापूर, जगदलपूर, दुर्ग व बिलासपूर या प्रत्येक जिह्यास्थानी प्रत्येकी 1 प्रयास केंद्र कार्यरत असून ‘प्रयास’ केंद्रांच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद पण मिळत आहे. ‘प्रयास’च्याच पुढील प्रवासात 2011 मध्ये रायपूर येथे खास विद्यार्थीनींसाठी सुरू केलेले शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी यासंदर्भात एक प्रमुख टप्पा ठरेल. याच्याच जोडीला छत्तीसगडच्या नक्सलप्रभावित अशा 16 जिह्यांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात येत असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना त्याद्वारे शैक्षणिक-रोजगार विषयक असे दुहेरी स्वरुपाचे मार्गदर्शन मिळत आहे. यावर्षी 26 विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ प्रवेश पात्रता यशस्वीपणे पूर्ण केली असून यापैकी 13 विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत तर 2 विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आहे हे विशेष. आजमितीस छत्तीसगडमधील 6 ‘प्रयास’ शाळांमध्ये सुमारे 650 विद्यार्थी शैक्षणिक आणि प्रवेश परीक्षा मार्गदर्शन विषयक शिक्षण घेत असून त्याचे लाभार्थी ठरले आहेत. हे सारे विद्यार्थी निवासी स्वरुपाच्या ‘प्रयास’ शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने त्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाशिवाय त्यांच्या सहकाऱयांच्या सहभाग-सहकार्याचा दुहेरी लाभ मिळत आहे. सामाजिक संदर्भात सांगायचे झाल्यास सध्या ‘प्रयास’ मध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांमध्ये वनवासी विद्यार्थ्यांची संख्या 50… असून 30… विद्यार्थी हे अनुसूचीत जाती वर्ग गटातील आहेत. त्यामुळेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ‘प्रयास’चा प्रयोग म्हणजे नक्सलप्रभावित क्षेत्रातील विद्यार्थ्यांची केवळ शासकीय सोय नसून या विद्यार्थ्यांना ‘प्रयास’द्वारा प्रयत्नपूर्वक समाज जीवनाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी करण्यात येणारे सातत्यपूर्व प्रयत्नांचे सामूहिक-सामाजिक फलित होय. अशा प्रकारच्या आगळय़ावेगळ्य़ा शाळांच्या संचालनालयाचे काम अर्थातच तेवढय़ाच प्रमाणावर आव्हानास्पदपण आहेत. यामध्ये मुख्य आव्हान असते ते ग्रामीण-वनवासी विभागातील नक्सलवाद्यांच्या क्रूर कारस्थानांमुळे अचानकपणे अनाथ झालेल्या ग्रामीण व मर्यादित स्वरुपात शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांची निवड करून, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अशा परिस्थितीत गाव-घरापासून दूर येऊन शिक्षणासाठी तयार व प्रवृत्त करणे व त्यानुसार त्यांची पुढील शैक्षणिक-उच्च वाटचाल सुरू ठेवणे. विद्यार्थ्यांनी ‘प्रयास’ शाळांमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना नव्या अभ्यासक्रमाचा सराव करणे व विशेषत: इंजिनिअरिंग वा तत्सम उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना इंग्रजीचे मर्यादित शिक्षण ही सुद्धा एक अडचण ठरते. यासाठी ‘प्रयास’तर्फे संस्थेतील विद्यार्थ्यांना भाषाविषयक शिक्षण देताना इंग्रजीचे विशेष शिक्षण-मार्गदर्शन देण्यात येत असल्याने त्याचा फायदा हे विद्यार्थी यशस्वीपणे घेत आहेत. रायपूरच्या ‘प्रयास’च्या महिला शाळेच्या प्राचार्या मंजुळा तिवारी यांच्या मते त्यांच्या संस्थेतील विद्यार्थीनीपण आता घर-कुटुंबाची वाताहत झाली असतानासुद्धा सारे दु:ख गिळून व भावी भविष्याच्या दृष्टीने हिरिरीने व प्रयत्नपूर्वक पुढे येत असून त्यांना त्यामध्ये यशपण प्राप्त होत आहे. त्यांच्या मते गेल्या वर्षी त्यांच्या संस्थेतील दोन विद्यार्थीनींची निवड इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमात झाली होती. त्यापैकी एकीने वैयक्तिक कारणावरून आयआयटीटीमध्ये प्रवेश घेतला नसला तरी अन्य विद्यार्थिनी मात्र पदवी अभ्यासक्रम करीत आहे. छत्तीसगडच्या वनवासी कल्याण विभागातर्फे नक्सलप्रभावित क्षेत्रातील गरजू व अनाथ विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करण्याबरोबरच त्यांना ‘प्रयास’च्या माध्यामातून पुढील मदत-मार्गदर्शन करण्यासाठी शालांत परीक्षेनंतर व विशेषत: अभियांत्रिकी-तंत्रज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रम करणाऱया विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीची योजना आखली असून या योजनेच्या पहिल्या वर्षातच 100 वर विद्यार्थ्यांनी त्याचा घेतलेला लाभ अर्थातच उत्साहवर्धक ठरला आहे. थोडक्यात म्हणजे छत्तीसगड सरकारने आपल्या पुढाकारातून नक्षलग्रस्त क्षेत्रातील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी सरकारी चाकोरी टाळून ‘आस्था’पूर्वक, ‘निष्ठे’सह, ‘सहयोगा‘च्या आधारे व प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्न-प्रयासांमुळेच छत्तीसगडमधील नागरिक एकीकडे दुर्दैवाने नक्सली चळवळीचे शिकार होत असले तरी या दुर्दैवी पार्श्वभूमीवर नवी पिढी मात्र नव्या स्वरुपात शिक्षित-विकसित होत आहे हे या योजनेचे मोठेच फळ म्हणावे लागेल

No comments:

Post a Comment