Total Pageviews

Thursday 15 September 2011

GOVT SEVANTS CONTINUE TO GET PAY FOR HARRASSING COMMON INDIANS

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर
सर्वसामान्यांना महागाईचे चटके देण्याचे सत्र केंद्र सरकारने सुरूच ठेवले आहे. एकीकडे आपल्या कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्ता जाहीर करताना, पेट्रोलच्या किमतीतही प्रति लिटर ३.१४ रुपयांनी वाढ जाहीर केली. सरकारच्या या निर्णयाचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला असून, महाराष्ट्र भाजपाने राज्य सरकारला राज्यात ही दरवाढ लागू करू नये, असे आवाहन केले आहे. सरकारच्या अखत्यारीतील तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर ३.१४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ आज (गुरुवारी) मध्यरात्रीपासूनच अंमलात आली आहे. चार महिन्याआधी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा दोन रुपयांची वाढ जाहीर केली होती. आता डॉलरच्या तुलनेत रुपयांचे प्रचंड अवमूल्यन झाल्याचे कारण पुढे करून पेट्रोलच्या दरात तीन रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कालपर्यंत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०३ डॉलर इतकी होती. आज मात्र ही किंमत ११० ते १११ डॉलर प्रति बॅरलच्या घरात गेली आहे. रुपयात झालेली घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतातील तेल कंपन्यांना प्रचंड नुकसान होत असून, हे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे नसल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. गेल्या चार महिन्यांच्या काळातील पेट्रोलमध्ये करण्यात आलेली ही तिसरी मोठी वाढ आहे. १५ मे रोजी सरसकट ५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलच्या विक्रीत दररोज आम्हाला १५ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. प्रतिलिटर पेट्रोलमागे २.६१ रुपयांचे नुकसान होत आहे. यात विक्री कर किंवा व्हॅट जोडल्यानंतर होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ करणे भाग पडले, असे तेल क्षेत्रातील एका अधिकार्‍याने सांगितले. प्रत्येक शहरात आकारण्यात येणारा विक्री कर किंवा व्हॅट आणि स्थानिक करानुसार या शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती ठरतील, असेही हा अधिकारी म्हणाला. महागाईचे चटके आणखी काही महिने : मुखर्जी वर्षभरात कांद्याच्या किमती ४३ टक्क्यांनी आणि आलूच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महागाईने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाही अर्थमंत्री चिदम्बरम यांनी मात्र महागाई कमी होण्यासाठी आणखी काही महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे वक्तव्य केले. ३ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्याकरिता खाद्यान्न महागाईचा अहवाल जाहीर करण्यात आला. यात कांदा आणि आलूच्या किमतीतील वाढीचा दर नमूद करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहे. ही बाब सरकारच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. सरकारने या दिशेने काही पावले उचलली आहेत. तथापि, महागाई कमी होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे, असे मुखर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जागतिक बाजारात उडालेला महागाईचा भडकाही देशातील महागाईसाठी कारणीभूत ठरलेला आहे. यामुळेच गेल्या महिन्यात खाद्यान्न महागाईच्या दराने गेल्या १३ महिन्यांतील विक्रम मोडित काढला आहे, असे ते म्हणाले

No comments:

Post a Comment