Total Pageviews

Tuesday 31 October 2017

हिंसक युगुरांमुळे चीनची डोकेदुखी! तरुण भारतSunday, October 29th,


काराकोरम महामार्गाचा वापर दहशतवादी गट युगूर मुसलमानांना मदत करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे चीनने युगुरांचे बंड हाणून पाडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. एकीकडे त्यांनी मुस्लिमांच्या हजला विरोध केला, तर दुसरीकडे युगुरांचे लोकसंख्येचे संतुलन बघिडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना चिरडून टाकण्याचा इरादा चीनने व्यक्त केला असला, तरी युगुरांना मुस्लिम दहशतवाद्यांकडून धोरणात्मकदृष्ट्या मिळालेली रसद कशी काय थांबविली जाऊ शकते, यावरच चीनचे स्थैर्य अवलंबून आहे.
China Xinjiang Uygur Muslim
China Xinjiang Uygur Muslim
जागतिक महासत्ता होण्याची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्या दिशेने पावले टाकण्यासाठी चीनने आपली अर्थव्यवस्था खुली केली असून, विदेशी गुंतवणुकीतही प्रचंड वाढ केली आहे. सामरिकदृष्ट्या जगावर दबाब वाढविण्यासाठी हा देश एकापाठोपाठ एक अर्थव्यवस्थेत कमजोर देशांमध्येेच नव्हे, तर अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्येही आपली उत्पादने मर्यादेपेक्षा जादा प्रमाणात ओतून राहिला आहे. शेजारी देशांवर वचक राहावा म्हणून त्याने रस्तेबांधणी, बंदर विकास, ऊर्जा प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञानातील मदत, आपल्या चलनाचे अवमूल्यन अशा क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. वरवर पाहता कम्युनिस्ट चीनची शहरे जागतिकीकरणाशी स्पर्धा करताना आणि शांत, सुसंस्कृत दिसत असली, तरी बौद्ध संस्कृतीचा वारसा सांगणारा हा देश अनेक अंतर्गत समस्यांनी पोखरला जातो आहे. कामगारांचे प्रश्‍न, बेरोजगारी, लोकसंख्येचा स्फोट, लोकशाहीवादी आंदोलनांना विरोध, व्यक्तिस्वातंत्र्यावरील बंधने, फुटीरवादी आंदोलने आणि कम्युनिस्ट राजवटीखालची मुस्कटदाबी या काही समस्या वानगीदाखल देता येतील. देशातील वांशिक तणाव चीनची अस्वस्थता अधिकच वाढवत आहे. झिंगयांग प्रांतात हान वंशियांच्या हाती सत्तासूत्रे एकवटली असल्याने बिगर हान बांधवांमध्ये नाराजी आहे. या असंतुष्टीतून हान आणि बिगर हान यांच्यात संघर्ष होत राहतात. तिबेटी विस्थापितांचा प्रश्‍न चीनला भेडसावतोय् आणि तिबेटींची चळवळ मोडून काढण्यासाठी या देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रयत्न सुरू आहेत. मंगोलियामध्ये फुटीर कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. देशाच्या झिंगयांग प्रांतातील युगूर मुस्लिमांचा प्रश्‍न सध्या ऐकणीवर आला आहे. चीनने मुस्लिमांविरोधात अतिशय कठोर कायदे तयार केले असून, या अंतर्गत संपूर्ण चीनमध्ये मुस्लिमांना हॉटेल्समध्ये राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. यापुढे हॉटेल्समध्ये मुक्काम करणार्‍या मुस्लिमांची माहिती पोलिसांना दिली जाणार आहे. एखाद्या व्यक्तीचा संशय आल्यास पोलिस त्याला हॉटेलच्या बाहेर जायला सांगू शकतात. त्यामुळे कट्टर इस्लामिक देश असलेल्या पाकिस्तानशी घनिष्ठ मैत्री असल्याचा दावा करणार्‍या चीनचा मुस्लिमद्वेषी चेहराही समोर आला आहे. झिंगयांग प्रांतात युगूर मुस्लिमांची संख्या ८० लाख आहे. त्यांच्याविरोधात चीनने मोहीमच उघडली असून, दहशतवाद, कट्टरपंथाला आणि हिंसाचाराला उत्तेजन देण्याचे काम हा समाज करीत असल्याचा चीनचा दावा आहे. १९९१ साली सोव्हिएत युनियनचे तुकडे झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या कझाकिस्तान, अझरबैझान, ताजिकीस्तान, किर्गिस्तान यांच्यासह मंगोलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या आठ देशांच्या सीमांशी झिंगयांग प्रांताची सीमा जोडलेली आहे. येथील युगूर लोकांचा धर्म मुस्लिम असून, त्यांची भाषा तुर्कस्तानशी मिळतीजुळती आहे. या अस्वस्थ प्रांताची सीमारेषा मुस्लिम देशांशी भिडलेली असल्याने तेथे फुटीरवाद्यांनी डोके वर काढले आहे. या चळवळीने चिनी राज्यकर्त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे. युुगूर मुस्लिमांना इस्लामी देशातील फुटीरवाद्यांची साथ आहे, हे सांगायलाच नको. त्यामुळेच चिनी राज्यकर्ते ही चळवळ दडपून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. पण, यात त्यांना फारसे यश मिळालेले नाही.
मुस्लिमांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या चीनने रमझान या पवित्र सणावर निर्बंध घातले आहेत. या आदेशान्वये मुस्लिम कुठल्याही मशिदीत एकत्र येऊन मोठ्या आवाजात अजान देऊ शकत नाहीत. मुस्लिमांना रोझे ठेवण्यासही बंदी असून, त्यांना कार्यालयात दुपारच्या वेळी जबरदस्तीने भोजन करावे लागते. रोझे ठेवणारी व्यक्ती निदर्शनास आल्यास तिची वार्षिक पगारवाढ थांबविली जाते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुस्लिम युवकांनी रोझे ठेवले तर त्यांना दंड ठोेठावण्यात येतो. चीन सरकारचा आरोप आहे की, युगूर मुस्लिमांना झिंगयांग चीनपासून स्वतंत्र करून, त्याला मुस्लिम राष्ट्राचा दर्जा द्यायचा आहे. इस्लामच्या साम्राज्यवाढीच्या धोरणामुळे भारताला अफगाणिस्तानपासून हात धुवून बसावे लागले, पुढे भारताचे तुकडे करून पाकिस्तान आणि बांगलादेशची निर्मिती झाली आणि आता जम्मू-काश्मीरमध्ये ही मंडळी विघटनवादी कारवाया करून तेथे अस्वस्थता निर्माण करीत आहे, ही बाब चीन पुरता ओळखून असल्यानेच, या देशातील राज्यकर्ते मुस्लिमांना डोके वर काढू देण्यास तयार नाहीत. झिंगयांग प्रांतात सतत दहशतवादी हल्ले होत असतात. जानेवारी २०१७ मध्ये दक्षिण झिंगयांग प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जण मारले गेले होते. या हल्ल्यामागे युगूर बंडखोरांचा हात असल्याचा चीन सरकारचा कयास आहे.
युगूर मुस्लिमांच्या समस्येचा प्रारंभ १९४९ सालापासून सुरू झाला. माओने मार्सवादी क्रांतीनंतर तिबेटप्रमाणे झिंगयांग प्रांतात सैन्य घुसवले व हा प्रांत कायमस्वरूपी चीनशी जोडून घेतला. तिबेटमध्ये ज्याप्रमाणे हानवंशियांना स्थायिक करून तेथील लोकसंख्येचे समीकरण बदलण्यात आले, अगदी त्याच धर्तीवर झिंगयांगमध्येही हान वंशियांना वसवण्यात आले. युगूर हे तुर्की मुसलमान असून, सध्या त्यांची लोकसंख्या ४५ टक्के आहे. हान वंशियांना सातत्याने येथे वसवण्यात आल्याने त्यांची लोकसंख्या वाढून ४० टक्के झाली आहे. त्यामुळे युगूरांना आपली संस्कृती नष्ट होण्याची भीती वाटू लागली आहे. या भयापोटीच येथे १९९१ पासून सातत्याने हिंसाचार सुरू आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे तिबेट, हेन्नान आणि झिंगयांच प्रांतातील धार्मिक आणि वांशिक तणाव आता हिंसाचारात बदलू लागला आहे. आता या घटनांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचेही लक्ष केंद्रित झाल्यामुळे चीन सतर्क झाला आहे. आपल्याकडे मोठी आंतरराष्ट्रीय शक्ती म्हणून जगाने बघावे म्हणून सुरू असलेल्या चीनच्या प्रयत्नांना या घटनांमुळे तडे जाण्याची शक्यता आहे. सोबतच य घटना भोगोलिक एकतेला तडा देणार्‍यादेखील आहेत.
मध्यंतरी कनिमग रेल्वेस्थानकात झालेल्या दहशतवादी हत्याकांडामुळे भारतासारख्या देशांचे दु:ख चीनला नक्कीच समजले असेल! रेल्वेस्थानकातील नेहमीच्या गर्दीत अचानक सुमारे दहा दहशतवादी घुसले आणि समोर दिसेल त्याला हातातील लांब सुर्‍यांनी कापत सुटले. त्यात बरीच प्राणहानी झाली आणि अनेक जण जमखीदेखील झाले. या दहशतवादी हल्ल्यामागे झिंगजांग प्रांतातील युगुरांचेच डोके असल्याचे चीनने म्हटले होते. २००८ साली झिंगयांग प्रांतातील कशघर येथे झालेला हल्ला चीनमध्ये होऊ घातलेल्या बीजिंग ऑलिम्पिकला गालबोट लावण्यासाठीच झालेला होता. २ संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांच्या तुकडीवर एक भरधाव ट्रक घातला आणि त्यांच्यावर अंदाधुंद बॉम्ब फेकून १७ सैनिकांचे बळी घेतले. यात काही विदेशी नागिरकांचाही बळी गेला आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. या हल्ल्यामागे युगूर मुस्लिमांचाच हात असल्याचे पुरावे नंतर चीनने जगाला दिले. मध्यंतरी
अफगाणिस्तानात काही युगूर दहशतवाद्यांना अमेरिकी फौजेने पकडले होते. किरगिझमध्ये एका चकमकीत युगूर दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. या घटना झिंगयांगमधील वातावरण सांगण्यास पुरेशा आहेत. चीनचे प्राबल्य सहन न झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून झिंगयांग प्रांतातील युगूर चीनपासून वेगळे होऊ इच्छित आहेत. या प्रांतात तेल, कोळसा आणि इतर खनिजे विपुल प्रमाणात सापडतात. चीनच्या आर्थिक प्रगतीचे इंजीन त्यावर धावत आहे.
पण, या खनिज संपत्तीचा काडीचाही फायदा युगुरांना मिळत नाही. आर्थिक विकासाची कोंडी झाल्यामुळे युगूर दारिद्र्य आणि बेरोजगारी या समस्येत अडकलेला आहे. ज्याप्रमाणे तिबेटींना स्थलांतरण करावे लागले, तसेच ते आज युगुरांनाही करावे लागत आहे. चीनने सरकारी मोक्याच्या जागा हान वंशियांना दिल्याने युगुरांचा जळफळाट झालेलाच आहे. चीनच्या दडपशाही वृत्तीमुळे स्थलांतरणाचे प्रमाण इतके वाढले आहे की, १९५० साली झिंगयांगमध्ये असलेली युगूर मुस्लिमांची ९० टक्के लोकसंख्या घटून २००० मध्ये फक्त ४८ टक्के झाली आहे. युगुरांचे पलायन अजूनही सुरूच असून येणार्‍या जनगणनेत त्यांची लोकसंख्या आणखी घटलेली बघायला मिळू शकते. ज्याप्रमाणे हान वंशियांची संख्या येथे वाढविण्यात आली त्याचप्रमाणे युगुरांवर नजर ठेवायला मोठ्या प्रमाणात चीनच्या फौजी तुकड्या येते तंबू ठोकून आहेत. १९६० च्या दशकात पाकिस्तानने चीनला पाकव्याप्त काश्मीरमधील जमिनीचा मोठा तुकडा आंदण म्हणून दिला. पाकिस्तानच्या उपकाराच्या ओझ्याखाली त्यामुळे चीन झुकला आणि तेव्हापासून चीन व पाकिस्तान यांच्यात भारतविरोधी भक्कम आघाडी निर्माण झाली.

चीनने या भागातून काराकोरम महामार्ग बांधला. यामुळे चीनला भारतविरोधी कारवायांसाठी एक मोठे केंद्र मिळाले. चीनव्याप्त जम्मू काश्मीर अर्थात अक्साई चीनवरील ताबा मजबूत करण्यासदेखील काराकोरम मार्ग कामात आला. पण आता याच काराकोरम महामार्गाचा वापर दहशतवादी गट युगूर मुसलमानांना मदत करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे चीनने युगुरांचे बंड हाणून पाडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. एकीकडे त्यांनी मुस्लिमांच्या हजला विरोध केला, तर दुसरीकडे युगुरांचे लोकसंख्येचे संतुलन बघिडविण्याचा प्रयत्न केला. सोबतच आता त्यांच्या हॉटेलमधील रहिवासावरदेखील निर्बंध घातले. या सार्‍या निर्बंधांबाबत युगुरांची काय प्रतिक्रिया राहते, हे बघावे लागणार आहे. सोबतच त्यांना चिरडून टाकण्याचा इरादा चीनने व्यक्त केला असला, तरी युगुरांना मुस्लिम दहशतवाद्यांकडून धोरणात्मकदृष्ट्या मिळालेली रसद कशी काय थांबविली जाऊ शकते, यावरच चीनचे स्थैर्य अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment