Total Pageviews

Friday 6 October 2017

चेंगराचेंगरी कशी टाळावी?डॉ. अरुण बापट

२९ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईला रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि नेहमीप्रमाणे आरोप आणि प्रत्यारोप करणे सुरू झाले. रेल्वेमंत्र्याने राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली जात आहे; पण यासाठी शास्त्रीय पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे, असे अजिबात म्हटले जात नाही, याची खंत वाटते.

लाखोंच्या संख्येने लोक जमल्यानंतर गर्दीच्या नियंत्रणासाठी विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चेंगराचेंगरी टाळण्यासाठीच्या काही सूचना.

जेव्हा मोठ्या संख्येने लोक जमतात, तेव्हा त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, दर्शनाच्या ठिकाणची व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. तितकेच महत्त्व गर्दीच्या नियंत्रणांचे आणि माणसांच्या लोंढ्याच्या हालचालीचे आहे. यामध्ये काही चूक झाल्यास गर्दीवरील नियंत्रण बिघडल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते.
१ फेब्रुवारी २०१३ रोजी अलहाबाद रेल्वे स्टेशनवर एकाएक गाडीचा प्लॅटफॉर्म बदलला गेला आणि चेंगराचेंगरी झाली.

अशा प्रकारच्या चेंगराचेंगरीच्या घटना २००३ ते २००५ या काळात हज यात्रेच्या वेळी होत होत्या; पण योग्य उपाययोजनेनंतर तेथे अशा दुर्घटना झालेल्या नाहीत.
गणित व गर्दी व्यवस्थापनानुसार एक चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत पाच माणसे व्यवस्थित उभी राहू शकतात. गर्दीचा लोंढा चलित अथवा पुढे/मागे सरकत असेल, तर जास्तीत जास्त सहा माणसे एक चौरस मीटर क्षेत्रात चलित अवस्थेत अल्पकालीन अवधीत असू शकतात; पण जर अचलित अवस्थेचा काळ जास्त म्हणजे १० ते १६ सेकंदांपेक्षा जास्त झाल्यास धक्काबुक्की, रेटारेटी सुरू होऊ शकते. चलित अथवा अचलित अवस्थेत एक चौरस मीटरमध्ये सात व्यक्ती अथवा अधिक व्यक्ती झाल्या, तर चेंगराचेंगरी सुरू होते.

२००३ तथा २००६ च्या दरम्यान हज यात्रेत दोन वेळा आग लागली आणि चेंगराचेंगरीच्या तीन घटना झाल्या. त्या वेळच्या सौदी अरबियाच्या राजाने अमेरिकेस विचारले, ‘यावर काही उपाय होऊ शकतो काय? अमेरिकी टीमने तेथील व्हिडिओ चित्रफीत पहिली आणि शिफारस केली की एक वर्ग मीटर क्षेत्रामध्ये तीन ते चार माणसे उभे राहू शकतात. जेव्हा ही संख्या पाच किंवा सहा अथवा त्यापेक्षा अधिक होते, त्या वेळी चेंगराचेंगरी सुरू होते. याशिवाय प्रवेश आणि गमन यासाठी वेगळे मार्ग असावेत. यानंतर हज यात्रेत चेंगराचेंगरी झाली नाही.

रेल्वे प्रशासनाने एका वेळी स्टेशनवर किती माणसे असावीत व एका वेळी पुलावर किती माणसे असावीत याचे गणित ठरवावे. जसे लिफ्टमध्ये जास्त माणसे झाल्यास सूचना मिळते तशा प्रकारची व्यवस्था करावी. रेल्वेचा प्लॅटफॉर्म वेगळ्या प्रकारे बनवावा. गाडीच्या दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म असावा. जसे चर्चगेट स्टेशनवर आहे. गाडी आली, की एका बाजूची दारे उघडावीत आणि सर्व लोक खाली उतरतील. नंतर त्या बाजूची दारे बंद करून दुसऱ्या बाजूची दारे उघडावीत. तेथे चढणारे लोक चढतील. याशिवाय यामुळे चेंगराचेंगरी होण्याचा धोका कमी होईल

No comments:

Post a Comment