Total Pageviews

Monday 25 April 2011

INDIAN EXODUS FROM ARAB WORLD DUE TO UNREST

NATIONAL SECURITY IS A MOVEMENT WHICH MUST REACH ALL PATRIOTIC INDIANS 
PASS IT ON TO ALL YOUR FRIENDS & RELATIONS
http://brighemantmahajan.blogspot.com/
NATIONAL SECURITY IS A MOVEMENT WHICH MUST REACH ALL PATRIOTIC INDIANS 
PASS IT ON TO ALL YOUR FRIENDS & RELATIONS
http://brighemantmahajan.blogspot.com/अरब देशांतून हिंदुस्थानींचे पलायन!- मुजफ्फर हुसेन
अरब देशांमध्ये आलेल्या विद्यमान संकटामुळे अरब देशांतील परिस्थिती आणखीच बिकट बनत चालली आहे. आता तेथे मंदीचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे नव्या लोकांची भरती तर दूर, आता तेथे जे कार्यरत आहेत, त्यांचे आणखी कष्टप्रद दिवस सुरू होणार आहेत...! मुस्लिम देशांमध्ये राजकीय अस्थिरता सुरूच आहे. या वर्षीच्या फेब्रुवारीत सर्वप्रथम ट्युनेशियापासून क्रांतीला सुरुवात झाली. ठिणगीचा वडवानल झाल्याचे आधी इजिप्तमध्ये दिसले आणि शेवटी क्रांतीच्या ज्वाळा लिबियापर्यंत पोहोचल्या. सुदानसुद्धा आफ्रिका खंडातीलच एक मुस्लिम देश आहे. आता सुदान उत्तर आणि दक्षिण सुदानमध्ये विभागला गेला आहे. आशिया खंडातील जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनपर्यंत ही आग पोहोचली आहे. आपल्याकडेही हा ज्वालामुखी भडकण्याच्या भीतीने अल अमिरात आणि कुवैतमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र बहारीनमध्येही क्रांतीचा आवाज घुमू लागला, तेव्हा सर्वाधिक चिंता निर्माण झाली. बहारीन सौदी अरबच्या अतिशय जवळ आहे. ही आग सौदी अरबमध्ये पोहोचली तर असे काही अराजक माजेल, की जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. इराणमध्येही परिस्थिती ठीक नाही. तेथील धार्मिक कट्टरता सत्ताबदलाचे प्रमुख कारण बनू शकते. इराक तर आधीच युद्धाच्या घेर्‍यात सापडला आहे. जगातील महाशक्ती इराकचेही हिस्से करण्याची शक्यता आहे. थोडक्यात समस्त इस्लामी ब्लॉक नावाने ओळखल्या जाणार्‍या मध्यपूर्वेत उलथापालथ सुरू आहे. या देशातील जनतेने क्रांती केली खरी; परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनत चालली आहे. जे परदेशी लोक तेथे काम करत होते, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे परदेशी लोकांचे पलायन स्वाभाविक आहे. अरब प्रायद्वीप आणि लिबियासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानी लोक काम करीत होते. आता तेथील हिंदुस्थानी लोकांचा प्रवाह स्वदेशाकडे वाहू लागला आहे. आता लिबियात कुणीही हिंदुस्थानी काम करू इच्छित नाही. त्यामुळे ज्यांना संधी मिळाली, त्यांनी तेथून पलायन केले. हिंदुस्थानी सरकारने त्यांच्यासाठी विमानांची व्यवस्था केली. असंख्य हिंदुस्थानी स्वदेशी परतले आहेत. त्यात त्रिपोलीतील हिंदुस्थानींची संख्या सर्वाधिक आहे. राजधानी असल्याने तेथे आता कर्नल गडाफींचे समर्थक आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. लिबियातून परतलेल्या हिंदुस्थानींच्या म्हणण्यानुसार, आता तेथे जाणे म्हणजे मोठाच धोका आहे. लिबियाच्या पाच मोठ्या शहरांमधून परतलेल्या हिंदुस्थानींची संख्या १२ हजार असल्याचे सांगितले जाते. अजूनही हा प्रवाह थांबलेला नाही. एकेकाळी दीड लाख हिंदुस्थानी लिबियात काम करत होते. अरब देशांमध्ये जी उलथापालथ सुरू आहे त्यामुळे सर्वच मुस्लिम राष्ट्रे त्रस्त झाली आहेत. हिंदुस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेशातच नव्हे, तर फिलिपाइन्स, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशियाचे मुस्लिम लोक आपला जीव वाचवून स्वदेशात परतत आहेत. आतापर्यंत सौदी अरबमधून कुणी परत आल्याचे कळलेले नाही; परंतु बहारीनमध्ये आता कुणी हिंंदुस्थानी राहण्याची आणि तेथे काम करण्याची जोखीम घेईल असे वाटत नाही. दुबईतीलअल खलिफा’चे भाव वेगाने घसरत आहेत. कामधंदा थंड असल्यामुळे तेथे गेलेले बाहेरचे लोक त्रस्त झाले असून, त्यांचे स्वदेशात पलायन सुरूच आहे. मुंबईत काम करणार्‍या एका टॅ्रव्हलिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दोन आठवड्यापूर्वीपर्यंत हिंदुस्थानात परतणार्‍यांची संख्या २५ हजारांपर्यंत पोहोचली होती.दुबईत मागील तीन वर्षांपासून आर्थिक मंदीमुळे असंख्य विदेशींवर परिणाम झाला आहे. स्वगृही परतणार्‍यांच्या संख्येत वाढ तर होत आहेच, शिवाय तेथे गेलेले अनेक लोक आत्महत्या करत आहेत. दुबईतील आकडेवारीनुसार २००८ पासून आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २००८ मध्ये दुबईत आत्महत्या करणार्‍यांची संख्या १४८ होती. त्यात ११० हिंदुस्थानींचा समावेश होता. २००९ मध्ये आत्महत्या करणार्‍यांची संख्या ९९ होती. त्यात ७१ हिंदुस्थानी होतेे. २०१० च्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी ते जूनपर्यंत ९४ लोकांनी आत्महत्या केल्या. त्यात ५६ हिंदुस्थानी होते. टक्केवारीत सांगायचे तर आत्महत्या करणार्‍या हिंदुस्थानींचे प्रमाण ६५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हिंदुस्थानी सरकारने आतापर्यंत या आकडेवारीवर कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु अमिरातीतून मिळालेल्या माहितीनुसार इमारत बांधकामासाठी गेलेल्या हिंदुस्थानी कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. धोकेबाज ट्रॅव्हलिंग एजंट त्यांना तेथे मोठमोठी स्वप्ने दाखवतात, परंतु अमिरातीला पोहोचताच या कामगारांचे वाईट दिवस सुरू होतात. निवासस्थानापासून ते पगारापर्यंत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अमिरातमध्ये केवळ दुबईच नव्हे तर शारजा, अबुधाबीसारख्या सात राज्यांचा समावेश आहे. त्यांचे आपापले शेख आहेत आणि त्यांची स्वतंत्र सत्ता आहे. अशी वागणूक हिंदुस्थानींनाच मिळते असे नाही. पाकिस्तानी, बांगलादेशी, फिलिपिनी यासारख्या अनेक देशातील लोकांचा त्यात समावेश आहे. अर्थात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची भाषा त्यांना समजते. त्यामुळे त्यांच्याशी ते बोलू शकतात. इतरांवर कोणता प्रसंग येत असेल ते ईश्‍वरालाच ठाऊक! हिंदुस्थानी वृत्तपत्रांमध्ये तर हिंदुस्थानी कामगारांविषयी काहीच छापले जात नाही. मात्रअल खलीज आणि एमेरेट्स’सारख्या दैनिकात याची माहिती प्रकाशित होत असते. अमिरात सरकार या प्रकारचे इमारत निर्माते, इतर क्षेत्रात काम करणार्‍या एजंट आणि मालकांकडे कसलीही विचारपूस करत नाही. अरब देशांमध्ये आलेल्या विद्यमान संकटामुळे अरब देशांतील परिस्थिती आणखीच बिकट बनत चालली आहे. आता तेथे मंदीचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे नव्या लोकांची भरती तर दूर, आता तेथे जे कार्यरत आहेत, त्यांचे आणखी कष्टप्रद दिवस सुरू होणार आहेत...!

No comments:

Post a Comment