Total Pageviews

Monday 5 March 2012

NAXAL SPREAD TO CITIES

http://www.saamana.com/
नक्षलींचे हातपाय मुंबई, पुणे, डोंबिवलीकडे...!महाराष्ट्रातील नक्षलींच्या कारवाया फक्त चंद्रपूर, गडचिरोली किंवा फार तर विदर्भापुरत्या मर्यादित आहेत अशा भ्रमात यापुढे राहण्याचे कारण नाही. आता त्यांनी आपले पाय मुंबई, पुणे, डोंबिवली, नाशिकपर्यंत पसरले असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचाच अहवाल सांगतो. नक्षलग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्रातील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे गृहमंत्रालयाने नमूद करणे हे महाराष्ट्र प्रशासनाला ‘हाय अलर्ट’ देण्यासारखे आहे. हा धोका लक्षात घेऊन ही कीड नष्ट केली पाहिजे.डोंबिवली येथे गेल्या आठवड्यात दहशतवादविरोधी पथकाने पकडलेले चौघे संशयित हे खरोखरच नक्षलवादी चळवळीतील दहशतवादी असतील तर धोक्याची घंटा घणघणते आहे. देशाच्या सहा-सात राज्यांमध्ये या सशस्त्र माओवाद्यांनी चांगलाच जम बसविला असून महाराष्ट्राचा विदर्भही त्यातून सुटलेला नाही. मात्र या नक्षलवाद्यांना आजवर तरी मोठ्या शहरांत नक्षलवादी धुमाकूळ घालता आलेला नाही. हीच स्थिती भविष्यात राहील का? असा गंभीर प्रश्‍न विचारणारी डोंबिवलीतील कारवाई आहे. नक्षलवाद्यांमधील ‘कोचीर दलम’ ही टोळी तंत्रकुशल आहे. ती हिंस्र कारवायांसाठी शस्त्रे व इतर सामग्री पुरविते. डोंबिवलीच्या गांधीनगरात सापडलेल्या लोखंडी नळ्या, ऍल्युमिनियम पट्ट्या हे गावठी पिस्तुलांचे सुटे भाग असू शकतात. याशिवाय सापडलेले २३ लाख रुपये म्हणजे या भागात कामाचे जाळे विणण्यासाठी आलेले ‘भांडवल’ आहे डोंबिवली परिसरातील ‘ती’बातमी खरी आहे का? हे विचारण्यासाठी वर्तमानपत्राकडे दूरध्वनी केले. ‘नक्षलवादी हे गडचिरोलीत राहतात ना, मग ते डोंबिवलीत कसे आले?’ या अनेकांच्या भाबड्या प्रश्‍नावरून समाजाची मानसिकता लक्षात येते.
नक्षलवाद्यांनी पुणे परिसरातील दोन तरुणांना गडचिरोलीतील नक्षलवादी भागात प्रशिक्षणासाठी पाठवल्याची धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे. या तरुणांचे ब्रेन वॉशिंग करण्यात आले असून प्रशिक्षणानंतर त्यांना ‘दलम’मध्ये सामील करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून फरारी असलेली अँजेला सोनटक्केला ‘एटीस’ने पिरंगूटमधून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अटक केली होती. तिच्या अटकेनंतर नक्षलवाद्यांची पुण्यातील पाळेमुळे खणून काढण्यात ‘एटीएस’ला यश आले. नक्षलवादी कारवाई करण्यासाठी परस्परांना पाठविलेली पत्रे तसेच चार लाख रुपये आरोपींकडून जप्त केले. या आरोपींच्या ताब्यातून दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्यामध्ये माहिती होती. पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटांत आरोपी असलेल्या आणि रांजणगाव ‘एमआयडीसी’ परिसरातील एका कंपनीत नोकरी करत असलेल्या दहा संशयित माओवाद्यांना ‘एटीएस’ने अटक केली व हे आरोपी पश्चिम बंगाल पोलिसांच्या हवाली केले गेले.
पश्चिम बंगालमध्ये घातपाती कारवायांत भाग घेतल्यानंतर पुण्यात आश्रयाला आलेल्या सिद्धू कानू दलमच्या दहा नक्षलवाद्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात शिरूर येथून अटक केली. मजुरांच्या बरोबर आलेले हे नक्षलवादी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ पुण्यात वास्तव्य करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, सात जिवंत काडतुसे आणि माओवादी विचारसरणीचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींपैकी रॉबी हन्सदा हा पीपल्स गोरिला लिबरेशन आर्मी (पीजीएलए) या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य आहे. पुण्यात झालेल्या या अटकेच्या कारवायांमुळे नक्षलवादी व दहशतवाद्यांच्या स्लिपर सेलचे जाळे पुण्यात पसरत असल्याची गंभीर बाब पुढे येत आहे. एटीएसने माओवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याला पण अटक केली.
आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा शाप भोगणार्‍या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांत वर्गसंघर्षाचा नारा देत नक्षलवादी चळवळ रुजली आणि फोफावली. आपल्या हिंसक चळवळीला साम्यवादी विचारांचे तात्त्विक अधिष्ठान देणार्‍या नक्षलवाद्यांनी शेजारील नेपाळमध्ये कशा पद्धतीने सत्ता काबीज केली हे सर्वश्रुत आहे. आपल्याकडील माओवादी नक्षलींचे तेच उद्दिष्ट आहे. काही महिन्यांपूर्वी नक्षलवादी चळवळ इतर दहशतवादी संघटनांशी संधान साधत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. नक्षलवादी हे ‘सामाजिक न्याया’साठी लढत असल्याने त्यांचा दहशतवाद हा ‘लोकहिता’चा असल्याचा दावा हे बुद्धिमंत करतात, पण नक्षलवाद्यांना सगळी व्यवस्थाच उलथवून फेकून द्यायची आहे. त्यांच्या लढ्याचे प्रतीक असणारी विषमता, अन्याय, अत्याचार हा या समस्येचा दुसरा गंभीर पैलू आहे. तो मात्र सरकार, नोकरशाही, राजकीय कार्यकते, पोलीस व उद्योजक यांनी स्वत:चे वागणे तातडीने सुधारल्याशिवाय पुसला जाणारा नाही. समाजात जो जो मागे आहे, त्याच्या उन्नतीसाठी सर्वांनी झटायलाच हवे, सतत सनदशीर संघर्ष करायला हवा. हे शहाणपण येणार नसेल तर शहरांमध्ये नक्षली अड्डे फोफावण्याचा दिवस फार दूर नाही. एकही दिवस जात नाही की, हिंदुस्थानात नक्षलवादी कुठेतरी काहीतरी घातपाती कारवाया करतातच. हिंदुस्थानातील ४० टक्के भूभाग आणि ३५ टक्के लोकसंख्या ही नक्षलवादी चळवळीच्या विळख्यात आलेली आहे. जेव्हा मुंबई, पुणे किंवा नागपूर या शहरी भागांतून नक्षलवादी चळवळीशी संबंधित लोकांना अटक होते, याचा अर्थ शहरी भागही नक्षली लोकांनी व्यापायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील एकंदरच कायदा सुव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहता नक्षलवाद्यांना राज्यात मोकळे रान मिळाले आहे. २०११-१२ मध्ये नक्षलवादी हिंसाचारात घट होण्याऐवजी वाढच झालेली आहे. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी राज्य शासनाने जी नक्षलवादविरोधी यंत्रणा उभारली आहे, त्यातील वरिष्ठांपासून कनिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकार्‍यांपर्यंत कोणामध्येच नक्षलवाद्यांशी लढण्याची इच्छा नाही. प्रत्येक जण आपली बदली कशी होईल याच प्रयत्नात दिसतो. आपल्याकडे नक्षलवाद्यांना अटक केली जाते त्यात आंध्र प्रदेशातील पोलीस दलाचा सिंहाचा वाटा असतो. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमेवर समन्वय ठेवण्यातही त्यांना अपयश आले आहे

No comments:

Post a Comment