Total Pageviews

Saturday 29 February 2020

गनिमी युद्धाचे डावपेच - 29-Feb- भाऊ तोरसेकर

नाहीतरी चार वर्षांपूर्वी मणिशंकर अय्यर या काँग्रेस नेत्याने पाकिस्तानात जाऊन मुशर्रफ यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी पाकिस्तानची मदत मागितली होती. बहुधा त्याचा पहिला हप्ता म्हणून काँग्रेसने पाकला भारतातच हिंसा माजवण्यासाठी मदत देऊ केलेली आहे, अन्यथा या गनिमी युद्धात काँग्रेस नेते शाहीनबागेत जाऊन चिथावणीखोर भाषणे कशाला देत होते?

काश्मीरमध्ये भारताला पाकिस्तानने हैराण करून सोडले, ते त्यांच्या घुसखोर जिहादींमुळे नाही, तर त्यापेक्षा भारत किंवा भारतीय सेना थकून गेल्या, त्या काश्मीरमध्ये वसलेले पाकवादी व त्यांना हातभार लावणारे दिवाळखोर आपले काही राजकारणी यांच्यामुळे. कारण, थेट हल्ला करणार्‍यांना तोंड देता येते. पाकसेनेला भारतीय सेनेने अनेकदा पराभूत केलेले आहे. त्यामुळे भारताशी थेट लढणे अशक्य असल्याचे लक्षात आलेल्या पाकिस्तानने पुढल्या काळात गनिमी युद्धाचा साळसूदपणे पवित्रा घेतला. १९७१च्या युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांनी त्याची रणनीती आधीच लिहून ठेवलेली आहे. हजारो बारीक जखमांनी भारताला जायबंदी करून टाकायचे. मारायचे नाही, पण मरणासन्न करून टाकायचे, असे त्याचे व्यवहारी वर्णन करता येईल. इतक्या जखमांनी विद्ध झालेला सैनिक हातात कितीही भेदक शस्त्र असले, तरी त्याची लढायची उमेदच खचून जात असते.
म्हणूनच जिहादी व घुसखोरीतून घातपाताचे युद्धतंत्र पाकिस्तानने सरसकट वापरले. कधी सीमा ओलांडून भारतात घातपाती धाडले, तर कधी भारतातल्याच गद्दारांना हाताशी धरून हिंसक घटना घडवल्या किंवा बॉम्बस्फोट घडवून आणले. अशा हल्लेखोरांशी लढणे कुठल्याही सैन्याला अशक्य असते. कारण, समोरचा शत्रू सैनिक असला तरी गणवेशात नसतो आणि त्याला थेट शत्रू म्हणून मारताही येत नाही. तो अकस्मात हल्ला करतो, तेव्हा त्यातला शत्रू लक्षात येतो. त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय सैनिक वा पोलीस यंत्रणा सावज असते आणि तो शिकारी असतो. अशा घातपाती युद्धाला ‘गनिमी युद्ध’ म्हणतात. जिथे तुम्हाला बेसावध गाठून फडशा पाडायचा असतो. मागल्या तीन-चार दशकांमध्ये पाकिस्तानने तेच तंत्र वापरले आणि भारताने त्याला कायदे नियमाने आवर घालण्याचा मूर्खपणा केला. हे युद्ध कुठल्या रणभूमीत होत नाही, तर रितसर नागरी जीवनात होत असते. ते कसे?
कसाबची टोळी येऊन मुंबईत केलेला रक्तपात असो किंवा इथल्याच हस्तकांना चिथावण्या देऊन तीन दशकांपूर्वी घडवलेले बॉम्बस्फोट असोत, अशा घातपाती मानसिकतेला धार्मिक रूप देऊन राजकारण करणारे काही राजकीय पक्ष असोत किंवा त्यांना पाठीशी घालण्यासाठी आपली समाजातील प्रतिष्ठा पणाला लावणारे मान्यवर असोत. त्या लोकांना हाताशी धरून वा गद्दारीला प्रवृत्त करून पाकिस्तानने ही लढाई चालवलेली आहे. त्यापैकी काश्मीरमध्ये लढाई मोदी सरकारने उलट्या ‘गनिमी काव्या’ने निकालात काढलेली आहे. पण, आता त्याचे खरे रौद्ररूप दिल्लीच्या दंगलींनी समोर आणलेले आहे. आधी सत्याग्रहाचा देखावा उभा करून तयारी करण्यात आली आणि सर्व सज्जता झाल्यावर प्रत्यक्ष हिंसाचाराचा भडका उडवून देण्यात आला. त्याआधी सुरक्षा दले वा पोलीस यंत्रणेला गाफील ठेवणे भाग होते. म्हणूनच नानाविध अफवा आणि गदारोळ करण्यात आले. ‘नागरिकत्व कायद्या’च्या निमित्ताने जो विरोध उभा करण्यात आला, त्यात कुठलेही तथ्य नाही. पण, आज तो कायदा मान्य केल्यास उद्या त्याच्या पुढल्या टप्प्यात मुस्लिमांना व अन्य गरीब घटकांना भारतातून हाकलून लावले जाईल, असा भयगंड जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला. त्यात मदत होऊ शकेल असा विरोधी पक्ष उपलब्ध होता. मोदींना विरोध करण्यासाठी सर्व देशच रसातळाला गेला तरी चालेल, अशी मानसिकता आजच्या विरोधी पक्षात आहे. म्हणून तर या कायद्याला कडाडून विरोध करताना दिल्लीच्या हिंसाचाराला पोषक वातावरण निर्माण करण्याला विरोधी पक्षांनीच हातभार लावलेला आहे.

मात्र, परिणाम दिसल्यावर सरकारला नाकर्ते ठरवण्याच्या उलट्या बोंबाही सुरू झालेल्या आहेत. सरकार वा पोलिसांचे काय चुकले? आरंभी जेव्हा जामिया मिलिया वा नेहरू विद्यापीठात हिंसाचाराची शक्यता दिसली, तेव्हा पोलिसांनी तत्काळ हालचाल केली. पोलीस कशाला घुसले, असा प्रश्न विचारला जात होता. नेहरू विद्यापीठात पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही म्हणूनही दोषारोप झालेच. म्हणजे कसेही केले तरी पोलीस चूक आणि दंगेखोर बिचारे बळी असा एकूण देखावा उभा केला जात होता. हा घटनाक्रम बारकाईने अभ्यासला तर त्यात कुठूनही भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो आणि सरकारच अन्याय करते, असे चित्र रंगवण्याचा आटापिटा मोदी विरोधकांकडून चाललेला आहे. पाकिस्तानला नेमके तेच हवे असते आणि त्यांच्या गनिमी युद्धाच्या तंत्रामध्ये ती सर्वात मोठी मदत असते. जितका समाज व शासन यंत्रणा गोंधळलेली असते, तितके घातपाताचे तंत्र यशस्वी होत असते.
काल-परवा दिल्लीत अल्पावधीत ४० हून अधिक नागरिकांचा म्हणूनच बळी जाऊ शकला. पोलीस यंत्रणा झोपा काढत होती, अशी टीका नंतर झाली. पण जे कोणी पोलिसांपेक्षा जागरूक नेते बुद्धिमान आहेत, त्यांनी कधी समोर येऊन तशी शक्यता सांगितली होती का? नसेल तर त्यांनाही हे उशिरा सुचलेले शहाणपणच नाही का? किंबहुना, कायद्याचा बडगा उचलावा की नाही, अशा गोंधळात पोलीस व शासनाला ठेवायचे आणि त्याचा फायदा घातपात करणार्‍यांना मोकाट रान मिळू देण्यासाठी करायचा, हे युद्धतंत्र आहे. त्यासाठी नको असलेल्या जागी शासन व पोलीस यंत्रणेला गुंतवून ठेवण्यावर घातपाताच्या यशाची शक्यता अवलंबून असते. इथे शाहीनबाग परिसरातील सामान्य नागरिकांचे नित्यजीवनच सत्याग्रहाच्या नावाखाली ओलिस ठेवले गेले होते आणि त्यांच्यात उद्रेक होऊन इतरांनी धरणेकर्‍यांच्या अंगावर जावे हीच अपेक्षा होती. तिथेच नाही तर अन्य भागातही तशीच स्थिती निर्माण करून जमाव बेछूट व बेभान व्हावा, अशी रणनीतीच होती. पठाण नावाचा ओवेसींचा सहकारी उगाच १५ कोटी १०० कोटींना भारी पडतील, असे म्हणालेला नाही. ‘शेरनीया निकली तो पसिने छुटे, हम भी साथ आये तो क्या होगा’ अशा वाक्याचा आता संदर्भ लागू शकतो. बेसावध १०० लोकांना १५ हल्लेखोर भारी पडतातच. १५ तरी कशाला कसाबच्या टोळीत अवघे दहा लोक होते आणि ३५ हजार मुंबई पोलिसांना भारी पडलेले होतेच ना?
मात्र, ते तेव्हाच भारी पडू शकतात, जेव्हा अवघा समाज बेसावध बेफिकीर असतो. शाहीनबाग धरणेच्या निमित्ताने जे काही नाटक रंगवले जात होते आणि त्याला शासनापासून न्यायालयापर्यंत सर्वांनी सौम्य प्रतिसाद दिला, त्यातून यापेक्षा अधिक काही साध्य करण्याची अपेक्षाही नव्हती. त्या गोंधळात अवघी शासन यंत्रणा गाफील करणे इतकेच उद्दिष्ट होते आणि ते सफल झाल्यावर प्रत्यक्ष दंगलीचा अंक सुरू झाला. त्यात दंगेखोर दुय्यम भूमिकेत असतात. ते फक्त सज्ज केलेल्या परिस्थितीचा लाभ उठवतात. खरे कलाकार उर्वरित समाजाला बेसावध ठेवायचे काम बजावित असतात. म्हणूनच दंगलीत प्रत्यक्षात हिंसा करणारे दुय्यम गुन्हेगार आहेत, त्यापेक्षा खरे खतरनाक गुन्हेगार त्या नाटकाचे सूत्रसंचालन करणारे आहेत. त्यासाठी सहानुभूती निर्माण करण्यासाठी आपली बुद्धी खर्चणारे मोठे गुन्हेगार आहेत. कारण, त्यांनी दिल्लीकरांना गाफील बनवण्याचे काम पार पाडल्यावरच दंगलखोर रस्त्यावर आलेले आहेत. दिसायला चेहरा दंगलखोराचा दिसतो, पण प्रत्यक्षात त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणारे डावपेच खेळत असतात. काश्मीरमध्ये अशाच लोकांना मागल्या सहा महिन्यांपासून स्थानबद्ध करून ठेवण्यात आल्याने, तिथे कुठलाही हिंसाचार होऊ शकलेला नाही आणि दिल्लीत तेच चिथावणीखोर राजरोस उजळमाथ्याने वावरत होते. हे गनिमी युद्धाचे भेदक तंत्र आहे. पाकिस्तान आता आपले सैन्यही मैदानात उतरवल्याशिवाय युद्ध करू शकतो. त्यासाठी भारतीय साधने व माणसेही वापरू शकतो, हे यातून सिद्ध झालेले आहे. नाहीतरी चार वर्षांपूर्वी मणिशंकर अय्यर या काँग्रेस नेत्याने पाकिस्तानात जाऊन मुशर्रफ यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी पाकिस्तानची मदत मागितली होती. बहुधा त्याचा पहिला हप्ता म्हणून काँग्रेसने पाकला भारतातच हिंसा माजवण्यासाठी मदत देऊ केलेली आहे, अन्यथा या गनिमी युद्धात काँग्रेस नेते शाहीनबागेत जाऊन चिथावणीखोर भाषणे कशाला देत होते


No comments:

Post a Comment