Total Pageviews

Saturday 8 June 2019

अजित डोवल यांनी 'अग्रेसिव्ह डिफेन्स' म्हणजे नुसते स्वसंरक्षण न करता 'प्रतिकारात्मक स्वसंरक्षण'ही नवी संकल्पना मांडली -M TIMES-सनत कोल्हटकर

अजित डोवल यांनी 'अग्रेसिव्ह डिफेन्स' म्हणजे नुसते स्वसंरक्षण न करता 'प्रतिकारात्मक स्वसंरक्षण'ही नवी संकल्पना मांडली आणि तिचा लगेच स्वीकारही झाल्याचे दिसले. मग ते संपूर्णपणे नियोजनबद्ध असा 'सर्जिकल स्ट्राईक' असो अथवा काश्मीरमध्ये पाकिस्तानातील घुसखोरांचा नायनाट असो. अजित डोवल यांचा पाकिस्तानमधील 'भूमिगत' असा सात वर्षांचा कार्यकाळ बघितला असता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन जी काही माहिती गोळा केली आहे त्याचा आता भारताला जबरदस्त असा उपयोग होत आहे हे निश्चित. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अपेक्षेप्रमाणे अजित डोवल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून 'कॅबिनेट रँक' पदी नियुक्ती जाहीर झाली. अजित डोवल हे पंतप्रधानांच्या अतिशय विश्वासातले म्हणून गणले जातात. त्यांनी अनेकवार सांगितलेली 'आक्रमक बचाव नीती' चा कौतुकाने उल्लेख केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या चौघांशी अत्यंत समन्वय असणारे हे व्यक्तिमत्व आहे. 

मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक जिंकून भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या महत्वाच्या पदावर अतिशय अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जबरदस्त अनुभव असलेल्या अजित डोवल यांची निवड केली होती. डोवल यांच्या रणनीतीने आणि त्यांना पंतप्रधानांचा संपूर्ण पाठिंबा लाभल्याने भारताला जगामध्ये एक नवी सामरिक ओळख मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यापूर्वीचे भारतातील संरक्षणतज्ञ व मंत्री भारताच्या 'डिफेन्स' अर्थात स्वसंरक्षण भूमिकेबद्दल बोलत असत. पण अजित डोवल यांनी 'अग्रेसिव्ह डिफेन्स' म्हणजे नुसते स्वसंरक्षण न करता 'प्रतिकारात्मक स्वसंरक्षण'ही नवी संकल्पना मांडली आणि तिचा लगेच स्वीकारही झाल्याचे दिसले. मग ते संपूर्णपणे नियोजनबद्ध असा 'सर्जिकल स्ट्राईक' असो अथवा काश्मीरमध्ये पाकिस्तानातील घुसखोरांचा नायनाट असो. अजित डोवल यांचा पाकिस्तानमधील 'भूमिगत' असा सात वर्षांचा कार्यकाळ बघितला असता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन जी काही माहिती गोळा केली आहे त्याचा आता भारताला जबरदस्त असा उपयोग होत आहे हे निश्चित. त्यामुळेच पाकिस्तानी विविध दूरदर्शन वाहिन्यांवर डोवल याना सतत दूषणे दिली जातात. त्यांना तेथे भारताचा 'जेम्स बॉण्ड'ही म्हंटले जाते. अजित डोवल हे भारतातील तरुणांमध्ये 'एक दंतकथा' बनून राहिले आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरकारने अजित डोवल यांना 'नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल' ला मदत करणाऱ्या 'पॅनेल' चे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त केले होते. या पूर्वी हे पद 'कॅबिनेट सचिव' यांचेकडून सांभाळले जात होते. यावरून हे पद किती महत्वाचे होते आणि आहे हे लक्षात येऊ शकेल. अजित डोवल याना यापूर्वीच सैन्यातील 'कीर्ती चक्रा'ने सन्मानित केले गेले आहे. अजित डोवल यापूर्वी 'इंटेलिजन्स ब्युरो' चे मुख्याधिकारी होते. डोवल यांनी आत्ताच्या सरकारमध्ये राष्ट्री सुरक्षा सल्लागाराची जबाबदारी स्वीकारताच पाकिस्तानला इशारा दिला होता की, परत मुंबईवर अथवा भारतातील इतर कोणत्याही शहरामध्ये यापूर्वी २६/११ ला झालेल्या हल्ल्यासारखी घटना घडली तर पाकिस्तानला 'बलुचिस्तान' गमवावा लागेल. अजित डोवल यांचा जन्म उत्तराखंड मधील 'पौडी गढवाल' मध्ये २० जानेवारी १९४५ मध्ये झाला. त्यांचे वडील सैनिक होते. अजित डोवल यांचे प्राथमिक शिक्षण अजमेरमधील सैन्य महाविद्यालयात झाले. त्यांनी नंतर आग्र्यामधील महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भारतीय प्रशासनिक सेवेच्या परीक्षेसाठी पूर्वतयारी केली आणि १९६८ मध्ये ते केरळ केडर मधून भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. त्या वेळी ते केवळ २३ वर्षांचे होते. पुढील चार वर्षातच त्यांची कामातील तडफ पाहून त्यांना १९७२ मध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'मध्ये रुजू करून घेण्यात आले. त्या नंतर त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. 

डोवल यांनीच भारतातील एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या पाकिस्तानमधील अनुभवाबद्दल सांगितलेली माहिती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जाते. ते पाकिस्तानमध्ये 'अंडर कव्हर' म्हणून दाढी वाढवून स्थानिक मुस्लिम पेहेरावात वावरत असताना ते पाकिस्तानातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथील एका वृद्ध पण दाढी वाढवलेल्या आणि दाढी पांढरी झालेल्या गृहस्थाने त्यांना त्या कार्यक्रमात डोवल यांना एका बाजूला नेऊन सांगितले की ते 'हिंदू' आहेत हे त्याने ओळखले आहे. ते ओळखण्याचे कारण म्हणजे डोवल यांनी बालपणी त्यांचे टोचलेले कान. ते टोचलेले कान बुजवून घ्यायला त्या गृहस्थाने त्यांना सांगितले. तो गृहस्थही जन्माने हिंदू असला तरी त्याचा पेहराव तेथील स्थानिक मुस्लिमांप्रमाणेच होता हे विशेष. त्या गृहस्थाच्या संपूर्ण कुटुंबाचा तेथे खात्मा करण्यात आला होता. तो वृद्ध मनुष्य वेष बदलून तेथे राहत होता. 

साल १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार होण्यापूर्वी अमृतसरमधील सुवर्णमंदिरातून शीख अतिरेक्यांना बाहेर काढण्याच्या एका मोहिमेचे डोवल यांनी नेतृत्व केले होते. पंजाब पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्ड यांच्या सहयोगाने त्यांनी वेष बदलून सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांच्या निवासात प्रवेश मिळवला होता असे सांगतात. तेथून त्यांनी त्या अतिरेक्यांकडे असलेला शस्त्रसाठा, अतिरेक्यांची संख्या, त्यांची तयारी यांची संपूर्ण माहिती काढून भारतीय सैन्याला पुरविली होती. जम्मू काश्मीरमधील अनेक वाट चुकलेल्या अतिरेक्यांना शरणागती पत्करण्यासाठी डोवल यांनी यशस्वी प्रयत्नही केले होते. भारताच्या उत्तर पूर्व भागांमध्येही त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला होता. इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुखपद सांभाळत असतानाच ते साल २००५ मध्ये निवृत्त झाले. साल २००९ मध्ये ते 'विवेकानंद इंटरनेशनल फाउंडेशन' चे अध्यक्ष झाले. पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या अनेक घटनांच्यानंतर तेथे अजित डोवल यांचे नाव घेतले जाते. साल १९९० नंतर भारताचे पाकिस्तानमधील 'डीप स्टेट' चे अस्तित्वच संपूर्णपणे नष्ट झाले होते. त्या बद्दल भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात याबद्दल उल्लेख केला होता. 'डीप स्टेट'च्या माध्यमातून देशाला शत्रुदेशात काय हालचाली चालू आहेत यांची वेळोवेळी बित्तंबातमी मिळत असते. अजित डोवल यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कमीत कमी वेळात 'डीप स्टेट' उभारण्यात आघाडी घेतली असे सांगतात. 'डीप स्टेट' म्हणजे शत्रूराष्ट्रातील एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याला भारतासाठी काम करण्यासाठी तयार केले जाते. ह्या सर्व गुप्त गोष्टी असल्याने याचे कोठेही तपशील उपलब्ध नाहीत. शत्रुदेश आणि तेथील अतिरेकी यांच्या विचारपद्धतीचा अभ्यास करून आपण त्यांच्या कसे अनेक पावले पुढे राहिले पाहिजे याबद्दल डोवल यांनी आपल्या अनेक भाषांमधून जोरकस मांडणी केली होती. 

इराकमधून २६ नर्सेसची सुटका , श्रीलंकेमध्ये सिरीसेना अध्यक्षपदी येणे, मालदीवमध्ये अब्दुल्ला यामिन यांची त्यांच्या पदावरून गच्छंती असो, डोवल यांची भूमिका स्पष्टपणे बोलले गेले नसले तरी या सर्व घटनांमध्ये असावी असे सांगतात. भारताला अनुकूल अशा या सर्व घटना आहेत. इराकमध्ये तर डोवल स्वतः गेले होते असे सांगतात. 

भारतातील अनेक लोकांना डोवल यांच्याबद्दल गूढ आकर्षण आणि कौतुक आहे हे निश्चित. नुकतेच भारतातील 'आयसिस' च्या स्थानिक मोड्युलची वीट न वीट उद्ध्वस्त करण्यासाठी डोवल यांनी केलेले नियोजन आणि अंमलबजावणी सगळ्यांनी बघितली. शत्रूराष्ट्रामध्ये गुप्तपणे काम करून घडलेले आणि यशस्वी झालेले असे हे व्यक्तिमत्व आहे. 

No comments:

Post a Comment