Total Pageviews

Wednesday 20 February 2019

Pulwama Attack- गद्दारांचे काय? SAMNA-प्रभाकर पवार


कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवार, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी सवातीनच्या सुमारास पाकिस्तानी लष्कर, आयएसआय व जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याच्या इशाऱ्यावरून आरडीएक्स कारचा स्फोट घडवून केंद्रीय राखीव दलाच्या 40 कमांडोजची हत्या करण्यात आली. स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही (स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल) ही स्कॉर्पिओ मोटार सीआरपीएफ जवानांच्या बसवर आदळवून आदिल अहमद या अतिरेक्याने महासंहारक असा स्फोट घडवून आणला आणि एका क्षणात श्रीनगर-जम्मू महामार्गावर रक्तामांसाचा चिखल झाला.
आदिल अहमद हा फिदायीन अतिरेकी पुलवामा जिह्यातच राहणारा होता. कश्मीरमध्ये लष्करी जवान व त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याच्या आरोपावरून आदिलला कश्मीर पोलिसांनी बऱ्याचदा अटक केली होती. तरीही त्याच्या वर्तणुकीत काही फरक पडला नव्हता. वर्षभर पुलावामामधून बेपत्ता असलेल्या या हल्लेखोराला फिदायीन हल्ल्यात ‘मरण आले तर स्वर्गात पऱया उपभोगायला मिळतील. जो धर्मासाठी आपले प्राण देतो त्यालाच ‘जन्नत’ मिळते. तोच खरा भाग्यवान असतो!’ असा बुद्धिभेद पाकिस्तानी हॅण्डलरनी केला आणि आदिल अहमद लष्करी ताफ्यावर हल्ला करण्यास तयार झाला. आपल्या देशवासीयांच्या दुर्दैवाने त्याला त्यात यश आले. लष्करी जवानांप्रमाणे त्याच्याही शरीराच्या चिंधडय़ा झाल्या. परंतु हॅण्डलरनी सांगितल्याप्रमाणे मरणानंतर काही आदिल अहमदच्या शरीराच्या अवयवांना सुगंधी वास आला नाही. तो जन्नतमध्ये गेला नाही. मुस्लिम बेकार तरुणांचा फक्त कश्मीरमध्येच असा गैरवापर करून घेतला जातो असे नाही, तर साऱ्या हिंदुस्थानात बहकलेल्या स्थानिक मुस्लिम तरुणांचा मोठय़ा प्रमाणात स्लीपर सेल म्हणून वापर केला जातो. Logistic Support मुळेच पाकिस्तानी अतिरेक्यांनी आज आपल्या देशात धुमाकूळ घातला आहे.
‘26/11’ रोजी मुंबईतील हल्ल्यात सहभागी झालेल्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांना लश्कर-ए-तोयबाच्या हाफिज महमद सईद ऊर्फ हाफिज साब, झाकी ऊर रेहमान लकवी, आबू हमजा आदींनी अजमल कसाब व त्याच्या साथीदारांना ‘जन्नत’चे आमिष दाखवून 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत पाठविले होते, परंतु जिवंत पकडलेल्या कसाबने जेव्हा आपल्या साथीदारांचे शवागारात सडलेले मृतदेह पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. शवागारांत असलेल्या अतिरेक्यांच्या चेहऱयावर ना तेज होते ना सुगंधी वास, आपली हाफिज सईद या म्होरक्याने व त्याच्या साथीदारांनी दिशाभूल केल्याचे कसाबच्या लक्षात आले. या हल्ल्याच्या वेळीही पाकिस्तानी अतिरेक्यांनी स्थानिक मुस्लिमांची मदत घेतली होती. मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) मोतीलाल नगर येथे राहणाऱया फईम अर्शद मोहम्मद युसूफ अन्सारी या 35 वर्षीय गद्दाराने मुंबईवर हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांना मदत व्हावी म्हणून ‘रेकी’ केली होती, प्लॅन बनवला होता. तसेच ग्रॅण्ट रोड येथील पठ्ठे बापूराव मार्गावरील बटाटा चाळीत 14 क्रमाकांची खोलीही भाड्याने घेतली होती. अतिरेक्यांना कफ परेड येथील बधवार पार्क येथे होडीने उतरल्यानंतर ताज हॉटेल, नरीमन हाऊस, कॅफे लियोपोल्ड हॉटेल, ओबेरॉय हॉटेल येथे पटकन जाता यावे म्हणून लश्कर-ए-तोयबाला स्थानिक हस्तकांची मदत हवी होती. ती मदत अन्सारीने पुरविली होती. त्यात सबाऊद्दीन अहमद शब्बीर अहमद शेख हा बिहारच्या मधुबनीचा 24 वर्षीय भेकडही सामील होता. या दोन्ही हिंदुस्थानींना मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी देशद्रोह केल्याच्या आरोपावरून अटक केली होती, परंतु हे दोन्ही नामर्द पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सुटले, तर एकमेव कसाब फासावर लटकला.
मुंबईमध्ये आतापर्यंत 100 च्या वर बॉम्बस्फोट घडविण्यात आले आहेत व त्यात 600 च्या वर बळी गेले आहेत. त्यातील बहुसंख्य बॉम्बस्फोट मालिकेत पाकिस्तानचा सहभाग आहे. 1993 व 2006 सालातील मुंबईतील बॉम्बस्फोट तर कुणीच विसरलेले नाहीत. रक्त गोठविणारे हे बॉम्बस्फोट पाकिस्ताननेच स्थानिक फुटीरांच्या मदतीने घडवून आणले असून त्यात आरडीएक्सचा वापर केला गेलेला आहे. 1997 च्या सुमारास तर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर असलेल्या जुम्मा मशिदीतच बॉम्बस्फोटच्या ठिणग्या उडाल्या. हसन नावाचा एक पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत आला होता. त्याने गणेशोत्सव काळात बॉम्बस्फोट घडवून गणेशभक्तांमध्ये हाहाकार माजविण्याचा कट रचला होता, परंतु जुम्मा मशिदीतील प्रसाधनगृहात बॉम्ब बनवितानाच स्फोट होऊन त्यात हसन गंभीर जखमी झाला आणि त्याचा प्रयत्न फसला. तेव्हा जखमी अवस्थेतही हसन मशिदीच्या बाहेर पडला. त्यास कुणी रोखले नाही. जुम्मा मशिदीतून बाहेर पडून पळून गेलेल्या पाकिस्तानी हसनने सांताक्रुझ येथील गोळीबार रोड येथील झोपडपट्टीत आश्रय घेऊन तेथे उपचार सुरू केले. बरा झाल्यावर त्या परिसरातील 10-12 मुस्लिमांना मुंबई शहर व रेल्वेत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी तयार केले, परंतु त्याचा तोही प्रयत्न फसला. सांताक्रुझ गोळीबार रोड येथे राहणारा अस्पाक अहमद शेख व त्याचे साथीदार बॉम्ब बनवून त्याचा स्फोट घडविण्यासाठी घराबाहेर पडले असता अस्पाक ठेच लागून रस्त्यातच कोसळला आणि त्याच्याकडे असलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक निरपराध महिला व दोन पुरुष अशा तीन मुस्लिम व्यक्ती ठार झाल्या, तर अस्पाकचे दोन्ही पाय निकामी झाले. तत्कालीन मुंबई क्राइम ब्रँचचे पोलीस अधिकारी सुरेश वालीशेट्टी, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण गोसावी व त्यांच्या सहकाऱयांनी अस्पाक हा पाकिस्तानी हस्तक असल्याचे तपासाअंती उघडकीस आणले. अस्पाक जखमी अवस्थेत पकडला गेल्यानंतर हसनने सांताक्रुझ सोडले व पाकिस्तान गाठले.
महाराष्ट्र एटीएसने अलीकडेच मुंब्रा व संभाजीनगर आदी भागांत धाड टाकून (प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर) घातपात घडविण्याच्या कटात सामील असलेल्या सुमारे एक डझन मुस्लिम अतिरेक्यांना अटक केली. हे सारे स्थानिक असून इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेशी संबंधित आहेत. म्हणजे आपल्या देशाला फितुरीचा, गद्दारीचा किती मोठा शाप आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. तेव्हा अशांचा जोपर्यंत बंदोबस्त होणार नाही, त्यांना ठेचले जाणार नाही तोपर्यंत आपल्या देशात आरडीएक्सचे स्फोट होतच राहणार आहेत. दुःख एवढेच वाटते की, जे जवान आपल्या कुटुंबीयांपासून दूर सीमेवर असतात, देशाच्या रक्षणासाठी रक्ताचे पाणी करतात, ऊन-पावसावत खडा पहारा देतात अशा शौर्यशाली जवानांना आज ‘कायर’ धर्मांध भेकडांच्या हल्ल्यात शहीद व्हावे लागत आहे. हिंदुस्थानच्या सीमेपलीकडून आरडीएक्सचा साठा येतो. ती स्फोटके एखाद्या गाडीत assembled केली जातात आणि आरडीएक्सने भरलेली कार 50 च्यावर जवानांनी भरलेल्या बसवर ठोकून त्यातील जवानांच्या चिंधडय़ा उडवल्या जातात. हे फारच भयानक आहे. याचा बदला हा घेतलाच पाहिजे. तत्पूर्वी आपल्या हिंदुस्थानातील गद्दारांनाही ठेचले पाहिजे. आता अटकासटकांनी काही होणार नाही. थेट गोळय़ा घालणे हा एकमेव उपाय आहे. आपल्या देशातील उपद्रवी, कपटी गद्दारांचा नायनाट करणे हीच कायरांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या आमच्या भीमपराक्रमी जवानांना खरी श्रद्धांजली आहे. या देशाची फाळणी करून इंग्रज गेले तेव्हापासून पाकिस्तान कश्मीरवर आपला हक्क सांगत आहे. कश्मीरचा अतिरेकी मुकबूल बट्ट याने लंडनमधील हिंदुस्थानचे राजदूत रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. या गुह्यात त्याला 1984 साली फाशीही झाली. तेव्हापासून कश्मीरसह या देशात पाकिस्तानी अतिरेक्यांचा आतंक वाढला असून पाकिस्तानचे हे छुपे युद्ध आता प्रत्येक हिंदुस्थानीच्या घरापर्यंत पोहोचले आहे. कुठल्या घरात पाकिस्तानला मदत करणारा अतिरेकी सापडेल याचा नेम राहिलेला नाही. अगदी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर असलेल्या ‘हज’ हाऊसमधूनही कश्मिरी अतिरेक्यांना फंडिंग करणाऱया याह्या या मौलानाला मुंबई क्राइम ब्रँचने मागे अटक केली होती हे कुणीही विसरलेले नाही.

No comments:

Post a Comment