Total Pageviews

Friday 22 December 2017

पाकिस्तानातील शीख आज संकटात आहेत.आता पाकिस्तानातील शिखांची धर्मांतरे रोखायलाच हवीत!

 ज्यावेळी हिंदू धर्म संकटात होता तेव्हा याच शिखांनी इस्लामी शासकांना आपल्या तलवारीचे पाणी पाजून हिंदू धर्मीयांचे रक्षण केले होते. केंद्रातील हिंदुत्ववादी सरकारने या इतिहासाचे स्मरण करून आता पाकिस्तानातील शिखांची धर्मांतरे रोखायलाच हवीत!
पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या कायम चीड आणणाऱ्याच असतात. आताही तेच घडले आहे. पाकिस्तानातील शिखांची बळजबरीने धर्मांतरे घडवली जात आहेत आणि तेथील सरकार मूकदर्शक बनून शिखांचे हे इस्लामीकरण आनंदाने बघत आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याप्रकरणी पाकिस्तानशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या धर्मांतर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली हे स्वागतार्ह असले तरी पाकिस्तानातील ‘लातों के भूत’ चर्चेच्या ‘बातां’नी धर्मांतराच्या कारवाया थांबवतील काय, हा प्रश्नच आहे. पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या हिंदू, शीख आणि ख्रिश्चन धर्मीयांवर अत्याचार होत असल्याच्या घटना तशा नवीन नाहीत. धर्मांतरे आणि बिगर मुस्लिमांच्या छळाच्या बातम्या त्या देशातून अधूनमधून येतच असतात. मुळातच पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र आहे. हिंदुस्थानातून फुटून जन्माला आल्यापासून त्या देशातील बिगर मुस्लिमांची धर्मांतरे घडवण्याचे उद्योग तेथील धर्मांध मुसलमान कायम करीत असतात. धर्मांतराच्या या जिहादी कारवायांना पायबंद घालण्याऐवजी तेथील अधिकारीही आता धर्मांधांच्या बरोबरीने इस्लामीकरणाच्या कारवायांत सहभागी होत आहेत. पाकिस्तानच्या हंगू जिल्ह्यात शिखांवर अत्याचार करून त्यांना
इस्लाम ‘कबूल’ करण्यासाठी
भाग पाडले जात आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या भागात सुमारे सवाशे वर्षांपासून शीख धर्मीय मोठ्या संख्येने राहतात. मात्र अलीकडच्या काळात तेथील कट्टरपंथीयांना शिखांचे वास्तव्य खटकू लागले आहे. त्यामुळेच त्यांना मारूनमुटकून मुसलमान करण्याचे जुनेच इस्लामी तंत्र तेथील धर्मांधांनी सुरू केले आहे. पाकिस्तान सरकारचे अधिकारीच या धर्मांतरासाठी शिखांवर दबाव टाकत असल्याची तक्रार तेथील शीख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान सरकारकडे केली आहे. आपल्याकडील पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्याकडेही पाकिस्तानातील शीख बांधवांनी या इस्लामीकरणाची तक्रार केली. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ‘ट्विट’द्वारे परराष्ट्रमंत्र्यांकडे हा विषय मांडला आणि या विषयाला तोंड फुटले. त्याआधी पाकिस्तानातील ‘द ट्रीब्यून’ या दैनिकानेही खैबर पख्तूनख्वा प्रांतातील शिखांचे बळजबरीने धर्मांतर घडवले जात असल्याचा वृत्तांत प्रसिद्ध केला होता. पाकिस्तान सरकार आणि त्यांचे अधिकारी धर्मांतराच्या या घटनेबद्दल नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवत असले तरी हिंदुस्थान सरकारने मात्र हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी रक्त सांडणाऱ्या शिखांची ही धर्मांतरे रोखायलाच हवीत. शीख धर्मीयांची नानकसाहिब गुरुद्वारा, गुरुद्वारा करतार साहिब अशी अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे पाकिस्तानात आहेत. हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगभरातील शीख बांधव दरवर्षी पाकिस्तानात या तीर्थस्थळांना भेटी देत असतात. पाकिस्तानातील धर्मांधांच्या डोळ्यात नेमके हेच खुपत असावे. त्यामुळेच
बंदुकीच्या जोरावर
ल्पसंख्य असलेल्या शिखांना मुसलमान होण्यासाठी भाग पाडले जात आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात सुमारे २५ ते ३० टक्के हिंदू व शीख राहत होते. पाकड्यांच्या धर्मांतर मोहिमेमुळे आज तेथील हिंदू व शिखांची संख्या जेमतेम दोन-अडीच टक्क्यांवर आली आहे. एवढे हिंदू व एवढे शीख गेले कुठे? असा जाब आजवरच्या एकाही हिंदुस्थानी सरकारने पाकड्यांना विचारला नाही. त्यामुळेच पाकड्या धर्मांधांचे धाडस वाढले आणि तेथील हिंदू धर्मीय तसेच शिखांना ते नामशेष करत सुटले आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथी अचानक कुठल्याही हिंदू धर्मीयांच्या घरात घुसतात, गाय-बैलांचे मांस त्यांच्या तोंडात कोंबतात आणि मुसलमान होण्यासाठी दमदाटी करतात. पुन्हा तिथे राजवटही इस्लामीच असल्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे? पाकिस्तानातील हिंदू आणि शिखांची संख्या धर्मांतरामुळे नगण्य होत असतानाच इकडे हिंदुस्थानात मात्र फाळणीनंतर उरलेल्या अडीच ते तीन कोटी मुस्लिमांची संख्या आज २५ कोटींवर जाऊन पोहोचली आहे. एवढे होऊनही आपल्याकडील भंपक निधर्मी ‘अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात होsss’ असे गळे काढत असतात. पाकिस्तानातील शीख धर्मीयांच्या इस्लामीकरणावर मात्र यापैकी कोणीही बोलणार नाही. पाकिस्तानातील शीख आज संकटात आहेत. ज्यावेळी हिंदू धर्म संकटात होता तेव्हा याच शिखांनी इस्लामी शासकांना आपल्या तलवारीचे पाणी पाजून हिंदू धर्मीयांचे रक्षण केले होते. केंद्रातील हिंदुत्ववादी सरकारने या इतिहासाचे स्मरण करून आता पाकिस्तानातील शिखांची धर्मांतरे रोखायलाच हवीत!

No comments:

Post a Comment