Total Pageviews

Friday 17 August 2012

ईदनंतर काय?-सामना अग्रलेख
ईशान्येकडच्या जनतेची वेदना ही फक्त वेदना राहिलेली नाही, तर किंकाळी झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही!

हिंदुस्थानातील अराजकाचे भाकीत आम्ही जाहीरपणे यापूर्वीच केले आहे. ते अराजक कसे असेल याची सुरुवात आता झाली आहे. या देशात आज कुणीही सुखरूप नाही, सुरक्षित नाही. सर्वत्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. धर्मांध मुसलमानांनी निर्माण केलेली ही दहशत मोडून काढण्यास कॉंग्रेस सरकारे अपयशी ठरली, किंबहुना त्या धर्मांध शक्तींनाच मतांच्या मजबुरीपोटी बळ देत राहिली. परिणाम काय? तर मूठभर धर्मांध मुसलमान शिरजोर झाले असून त्यांनी देशालाच वेठीस धरले आहे. संपूर्ण देशभरातून ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांचे पलायन सुरू आहे. हे पलायन धर्मांध मुस्लिमांच्या धमक्यांमुळे सुरू आहे.
ईदनंतर तुमची विल्हेवाट लावू,’ अशा प्रकारचे मोबाईल संदेश सगळीकडे फिरत आहेत त्यामुळे ईशान्येकडील नागरिक आंध्र प्रदेश, कर्नाटक, पुण्यासारख्या शहरांतून आपल्या गावी पळू लागले आहेत.
ही बाब नुसत्या चिंतेची नाही, तर केंद्र सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या देशातील नागरिकांना स्वत:च्या जिवाची, घरादारांची खात्री वाटत नाही. ही गोष्ट सरकारची पत आणि विश्‍वासार्हता यावर प्रश्‍नचिन्ह लावणारी आहे. सरकार नेहमीप्रमाणे सांगत आहे की, ‘घाबरू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. सुरक्षेचा संपूर्ण बंदोबस्त केला आहे’! पण या भेकड बेशरम सरकारवर विश्‍वास ठेवायचा कसा? आसामातील हिंसाचाराचे हे पडसाद आहेत. आसामातील हिंसा मुसलमान विरुद्ध हिंदू अशी नाही तर बांगलादेशी घुसखोर विरुद्ध स्थानिकबोडो’ अशी आहे. बांगलादेशी घुसखोर स्थानिक बोडो आसामींच्या छाताडावर नाचत आहेत. त्यांची रोजीरोटी हिसकावून घेत आहेत. ‘पाकी’ अतिरेकी कारवायांत सहभागी होत आहेत. म्हणून हा हिंसाचार होत आहे, पण सरकार ठामपणे उभे आहे ते बांगलादेशी घुसखोरांच्या बाजूने. कारण हे लाखो बांगलादेशी मतदारयादीतही घुसले असून आपल्या उपकारकर्त्या कॉंग्रेसलाच मतदान करून आसामात सत्तेवर आणत असतात. त्यामुळे तेथील मूळ निवासी हिंदू किंवा बोडो आदिवासींना विचारतेय कोण? बांगलादेशींचा प्रश्‍न कॉंग्रेसनेच चिघळवला आहे त्याचा फटका देशाला बसतो आहे. ईशान्येकडील सात राज्यांच्या सीमा बांगलादेशाशी जोडल्या आहेत, कुठे चीन किंवा ब्रह्मदेशाशी जोडलेल्या आहेत. चीनमध्ये तर मुसलमानांवर बंधने आहेत. तेथे आपल्याप्रमाणे रोजे, इफ्तार पार्ट्यांचे बार उडवले जात नाहीत. राहायचे असेल तर शिस्तीत इमानाने राहा नाही तर तुरुंगाच्या काळकोठडीत मरेपर्यंत सडत राहा, हा लाल चिन्यांचा खाक्या आहे. ब्रह्मदेश म्हणजे म्यानमारातही धर्मांध मुस्लिमांचे बंड लष्कराच्या मदतीने मोडून काढले गेले.
अशावेळी हिंदुस्थानमधील धर्मांध मुसलमानांनी रस्त्यावर येऊन हिंसा करावी हे कसले लक्षण समजायचे? आम्ही तर यास देशद्रोहच मानतो. ईशान्येकडील लोकांना धमक्या देण्याचा प्रकार हासुद्धा या धर्मांध शक्तींचा मस्तवालपणाच आहे. मिझोराम, नागालॅण्ड, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, आसाम ही ईशान्येकडील राज्ये देशापासून लांब आहेत, तुटलेली आहेत. त्यांच्या भावना समस्या समजून घेण्याची तसदी उर्वरित हिंदुस्थान घेत नाही. राष्ट्रीय ऐक्याची अखंडतेची भाषणे झोडणे सोपे असते, पण ही भाषणे फक्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी असतात. राष्ट्रीय ऐक्य फक्त मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्यापुरतेच उरले असल्याने मुसलमानांच्या धमक्यांनंतर ईशान्येच्या लोकांची जी पळापळ सुरू आहे ती अस्वस्थ करणारी आहे. फाळणीच्या वेळी जे चित्र दिसत होते तेच आता बंगळुरू, पुणे, हैदराबादच्या रेल्वे फलाटांवर दिसत आहे. रेल्वेच्या डब्यात गुरांसारखे कोंबून घेत हे लोक आपापल्या राज्यांत पळून जात आहेत. ईशान्येकडील जनतेला संपूर्ण देशाने सामावून घेतले आहे. या देशात आपले कुणीच नाही संकटसमयी कुणाचा आधार नाही ही भावना त्यांच्या मनात वाढीस लागू नये यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. सरकारच्या पोकळ आश्‍वासनांवर भरवसा नसल्यानेच हे लोक निघून जात आहेत. ‘ईदनंतर बघून घेऊ’ ही धमकी म्हणजे अफवा असल्याचे देशाचे गृहमंत्री सांगतात,
पण या देशाला गृहमंत्री आहे हीच एक अफवा ठरल्याने लोकांनी जीव वाचविण्यासाठी पलायन सुरू केले आहे. ईशान्येकडच्या जनतेची वेदना ही आता फक्त वेदना राहिलेली नाही, तर ती किंकाळी झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

No comments:

Post a Comment