Total Pageviews

Tuesday 24 July 2012

भुकेचा अणुबॉम्ब
कॉंग्रेजी राज्यकर्त्यांचा नादानपणा!
देशात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असल्याची धोक्याची घंटा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाजवली आहे. दुष्काळ असला तरी परिस्थितीशी दोन हात करण्यात सरकार सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बोलण्याकडे देश आता गांभीर्याने पाहात नाही. केंद्रात ज्या प्रकारचा पोरखेळ चालला आहे तो पाहता सरकारातच अकलेचा व गांभीर्याचा दुष्काळ पडला आहे असे म्हणणे भाग आहे. कृत्रिम पाऊस पाडता येईल, अन्नधान्य आयात करता येईल, पण अकलेचा पाऊस कसा पाडणार? मनमोहन म्हणतात, दुष्काळाशी दोन हात करण्यास सरकार सज्ज आहे! या सज्जतेचा वेळोवेळी कसा फज्जा उडतो हे देशाने पाहिले आहे. मुळात केंद्रातले सरकार हे असून नसल्यासारखे झाले आहे. दुष्काळ निवारणाची, अन्नधान्य उत्पादन व पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते अन्न व कृषिमंत्री राजीनामा देऊन घरी बसले आहेत. कॉंग्रेसशी भांडण झाल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. सध्या या देशाला अन्न व कृषिमंत्री नाही. दुष्काळ निवारणाची यंत्रणा काम करीत नाही. दिल्लीतील राजे व सरदार लोक ‘उत्सवा’त मग्न आहेत. प्रतिभाताई पाटील यांचा सूर्य मावळला म्हणून जेवणावळी झडल्या व प्रणव मुखर्जी यांचा सूर्य उगवला म्हणून मेजवान्या झडत आहेत. या देशाची किमान ६० टक्के जनता गरिबी रेषेखाली जगत आहे. हजारो माणसांचे भूकबळी पडत आहेत. कुपोषणाने मुले तडफडून मरत आहेत. या परिस्थितीशी ज्यांना इतक्या वर्षांत दोन हात करणे जमले नाही ते पोपटराव दुष्काळाशी दोन हात करण्याच्या गोष्टी करीत आहेत, हे ढोंग आहे. मनमोहन सिंग म्हणतात देशात
पाऊस नाही म्हणून महागाई भडकत आहे. मग पेट्रोलच्या दरवाढीचा जो पुन्हा भडका उडविण्यात आला आहे तोदेखील पाऊस कमी झाल्यामुळेच असे जनतेने समजायचे का? म्हणजे पाऊस कमी झाला म्हणून पेट्रोलच्या विहिरी आटल्या आणि उत्पादन घटले. त्यामुळे पेट्रोलचे दर एका लिटरमागे ७० पैशांनी वाढविणे सरकारला भाग पडले असे मनमोहन सरकारला सांगायचे आहे का? अकलेचाच दुष्काळ असल्याने ही मंडळी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत असे अजब तर्कटही मांडू शकतात. दुष्काळ, पावसाची कमी, अन्नधान्य उत्पादन आणि महागाई यांचा परस्पर संबंध नाही असे कुणीच म्हणणार नाही. मात्र आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून महागाईचा जो नुसता आगडोंब उसळला आहे तो केवळ विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणामुळेच. गेल्या वर्षी देशात अन्नधान्याचे विक्रमी म्हणजे २५२.५६ दशलक्ष टन उत्पादन झाले होते, पण म्हणून देशात विक्रमी स्वस्ताई झाली असे घडले नव्हते. महागाईचे पाप केंद्रातील सत्ताधार्‍यांचेच आहे. त्यासाठी दुष्काळाला जबाबदार धरण्याचा प्रकार म्हणजे दुसर्‍यावर खापर फोडण्यासारखे आहे. मनमोहन सिंग यांची सद्दी संपली आहे. त्यांचे मंत्रिमंडळ म्हणजे देशाला भार बनले आहे. दुष्काळाशी सामना करण्याची क्षमता या सरकारमध्ये खरंच आहे काय? नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने देशातील दुष्काळी स्थितीबाबत केंद्र सरकारला इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, हरयाणा आणि राजस्थान या सहा राज्यांत दुष्काळग्रस्त स्थिती असल्याचे म्हटले आहे. यातूनही महाराष्ट्राला का वगळले? दुष्काळाच्या झळा महाराष्ट्रालाही बसत आहेत. मग महाराष्ट्र कोठे अदृश्य झाला? गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे देशातील नद्या व तलाव कोरडे पडल्याने महागाई वाढल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले, हा मोठा विनोद आहे. मग इतकी वर्षे नद्या-नाले तुडुंब भरले होते
तेव्हा कुठे स्वस्ताईचा महापूर आला होता? मनमोहन सिंग यांना विश्रांतीची व उपचाराची गरज असून त्यांनी आता उगाच ताणून धरू नये. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन निधी ४५२४ कोटी रुपयांचा असल्याचे मनमोहन सिंग सांगतात. यातले महाराष्ट्राच्या वाट्याला किती व कधी येणार हे आधी सांगा. महाराष्ट्रातील दुष्काळ भयंकर व भीषण आहे. पिण्याच्या पाण्याची व चार्‍याची टंचाई तर आहेच; पण लोकांनी घरेदारे, गुरे सोडून स्थलांतर केले. महाराष्ट्रातला दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती असून मनमोहन सिंग यांच्या खिजगणतीतही महाराष्ट्र नाही. लोक भूक, पाणी, चारा यासाठी आक्रोश करीत असताना त्यांचा टाहो दिल्लीच्या कानाचे पडदे फाडीत नसेल तर मराठी जनतेला दिल्लीविरुद्ध बंड करावे लागेल. महाराष्ट्राच्या मुर्दाड कॉंग्रेजी सरकारकडून चार आण्याची अपेक्षा नसल्यानेच आम्ही दुष्काळप्रश्‍नी दिल्लीश्‍वरांचे दरवाजे ठोठावीत आहोत. महाराष्ट्राची प्रजा तळमळत असताना मुख्यमंत्री व त्यांचे माणिकराव खुर्च्या सांभाळायच्या कसरती प्रयोगात रमले आहेत. आम्ही म्हणतो, मराठी जनता जगली तर महाराष्ट्र राहील. महाराष्ट्र राहिला तर खुर्च्या राहतील. कर्णास जन्मत:च कवचकुंडले लाभली होती तशा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या पार्श्‍वभागास जन्मताच खुर्च्या चिकटून आल्या नव्हत्या. लोक भडकले आहेत. खुर्च्या उलथवून तुमच्या पाठीवर रट्टे मारल्याशिवाय राहणार नाहीत. पोटातील भुकेचा आगडोंब हा अणुबॉम्बपेक्षा भयंकर असतो. महाराष्ट्रात व देशात भुकेचा अणुबॉम्ब फुटायला वेळ लागणार नाही. आम्ही काय सांगतोय हे ‘कॉंग्रेजी’ राज्यकर्त्यांच्या लक्षात येतेय ना?
 

No comments:

Post a Comment