Total Pageviews

Sunday 7 June 2015

INDIAN ARMY JAWANS LIFE IS CHEAP- भारतीय जवानांची कत्तल!-रवींद्र दाणी

भारतीय जवानांची कत्तल! कारगिल युद्ध ज्या कॅप्टन सौरभ कालियामुळे सुरू झाले त्याच्या हत्याकांडाच्या चौकशीसाठी भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार नाही, या भारत सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारच्या भूमिकेत लगेच बदल झाला. आंतरराष्ट्रीय कायदा या बाबी गौण मानल्या जातात. सौरभ कालियाच्या मुद्यावर भारत सरकार आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार नाही, हे सरकारचे विधान कायद्याच्या तरतुदींना धरून असले, तरी जनभावनेला धरून नव्हते. आणि; म्हणूनच काही तासांच्या आत सरकारला त्याबाबत खुलासा करावा लागला. युद्धाचा प्रारंभ कारगिल युद्धाचा प्रारंभच सौरभ कालियाच्या बेपत्ता होण्यामुळे झाला होता. १९९९ च्या मेच्या मध्यात कालिया आपल्या तुकडीला घेऊन नियमित टेहळणीवर गेला होता. त्याची तुकडी परत आली नाही. ती का परतली नाही हे पाहण्यासाठी दुसरी तुकडी पाठविण्यात आली, तेव्हा पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमेत कब्जा केल्याचे दिसून आले आणि मग त्यांना बाहेर काढण्यासाठी २६ मे रोजी ऑपरेशन विजय सुरू झाले होते. जे कारगिल युद्ध म्हणून ओळखले गेले. आणि अजय आहुजा कारगिल युद्धाच्या पहिल्या दिवशी भारताने एक मिग विमान गमावले होते. त्या विमानाचा वैमानिक स्वॉड्रन लिडर अजय आहुजा पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडला. त्याला ठार करण्यात आले. त्यावेळी भारत सरकारने हे प्रकरण पाककडे उपस्थित केले होते. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग यांनी जिनेवा कराराचा हवाला देत हा मुद्दा उपस्थित केला होता. दुर्दैवाने नंतर भारत सरकारला याचा विसर पडला. ना सौरभ कालिया प्रकरणात काही झाले, ना अजय आहुजा प्रकरणात काही झाले. त्याच सुमारास आणखी एक घटना घडली होती. बांगला देश रायफल्सच्या जवानांनी भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या करून नंतर त्यांना मृत जनावरांना उलटे टांगतात तसे टांगून भारताच्या स्वाधीन केले होते. तरीही भारत सरकारचे रक्त उसळले नाही. भारत सरकारने यापैकी कोणत्याच घटनेचा पाठपुरावा केला नाही. एक दुदैवी योगायोग म्हणजे सौरभ कालिया प्रकरण ताजे असताना मणिपूरमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करून २० जवानांना ठार करण्यात आले. मागील ३३ वर्षांतील हा सर्वात भीषण हल्ला मानला जातो. या कारणासाठी भारतीय लष्कराच्या इतिहासात ४ जूनची तारीख काळ्या अक्षरांनी लिहिली जाईल. मणिपूरमध्ये भारतीय लष्कराच्या एका तुकडीवर हल्ला करून २० जवानांना ठार करण्यात आले. भारत- पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगिल युद्धातही एका दिवसात एवढे जवान शहीद झाले नव्हते. नक्षलवादी भागात केंद्रीय राखीव पोलिसांच्या तुकड्यांवर झालेल्या हल्ल्यात एका दिवसात ६०-७० जवान शहीद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, लष्कराच्या तुकडीवर हल्ला करून एकाच घटनेत २० जवान ठार झाल्याची घटना मोठी मानली जाते. हल्ला पूर्वनियोजित भारतीय जवानांवर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे सरकारमधून सांगितले जात आहे. म्यानमारमध्ये आश्रयास असलेल्या काही अतिरेकी संघटनांनी या हल्ल्याची आखणी केली, कोणत्या ठिकाणी हल्ला करावयाचा हे ठरविले, भारतीय जवानांना घेऊन जाणारा जवानांचा ताफा केव्हा जाणार याची माहिती मिळविली आणि त्यानंतर हे हत्याकांड घडवून आणले. याचा अर्थ या अतिरेकी संघटनांचा गुप्तचर विभाग भारत सरकारच्या गुप्तचर विभागापेक्षा अधिक सक्रिय होता. बैठकींचे सत्र मणिपूरमधील घटनेनंतर तातडीने सरंक्षण मंत्री, गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्करप्रमुख यांची बैठक बोलविण्यात आली. त्या बैठकीत यावर व्यापक चर्चा करण्यात आली. घटनेचा निषेध करण्यात आला. दुखवटा व्यक्त करण्यात आला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठी कारवाई सुरू करण्याचा आदेश लष्कराला देण्यात आला आहे. १९४९ मध्ये मणिपूरचा भारतात विलय करण्यात आला. त्या विलयाला विरोध करणार्‍या काही संघटनांनी राज्यात भारतविरोधी ज्या कारवाया चालविल्या, त्याचा एक भाग म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. पूर्वोत्तर भागातील भारतविरोधी कारवाया हा एक मुद्दा राहात आला आहे. मणिपूरमधील या घटनेने भारत सरकारला या कारवायांकडे तातडीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. एका जवानासाठी काही महिन्यांपूर्वी इस्रायल व पॅलेस्टिन यांच्यात तुंबळ युद्ध झाले होते. मागील काही वर्षांत दोन देशात एवढा निकराचा संघर्ष झाला नव्हता. या युद्धाचे कारण काय होते? पॅलेस्टिनी लोकांनी इस्रायलच्या एका जवानाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले होते. त्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने पॅलेस्टिनी नेत्यांना धडा शिकविण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केली होती. इस्रालयने आपली कारवाई बंद करावी यासाठी कितीतरी देशांनी त्या देशावर दबाव आणला. तो सारा दबाव झुगारून इस्रायलने पॅलेस्टिनविरुद्ध आपली कारवाई सुरूच ठेवली होती. इस्रालयने एका जवानासाठी हे सारे केले होते. भारतात झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात नक्षलवादी भारतीय जवानांचे शिरकाण करतात, काश्मीर, मणिपूरमध्ये भारतीय जवानांवर हल्ले केले जातात. भारत सरकारकडून निषेधाचे एक पत्रक प्रसिद्ध केले जाते. नंतर काय होते हे मात्र कुणालाच कळत नाही. श्रीनगरमध्ये वर्षभरापूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात एक युवक ठार झाला होता. लगेच त्या जवानाचे कोर्ट मार्शल करण्यात आले. त्याला अटक करण्यात आली. आणि; काही दिवसाच्या आत लष्कराच्या एका ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला करून आठ जवानांना ठार केले. त्याबद्दल कुणाला अटक झाली? कुत्राही मोलाचा भारतीय जवानांवर हल्ले करणारे नक्षलवादी असोत की अतिरेकी, या सर्वांना शोधून त्यांना ठार करण्याचे धोरण भारत सरकार जोवर राबवीत नाही, जवानांवर हल्ले होत राहणार आहेत. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी जी मोहीम आखली होती त्याचा मुख्य बिंदू होता अमेरिकन जवानांची सुरक्षा. एकाही अमेरिकन जवानाला प्राण गमवावे लागू नयेत, याची काळजी घेण्यात आली होती. या जवानांसोबत पाठविण्यात आलेल्या कुत्र्यालाही बुलेट प्रुफ जॅकेट घालण्यात आले होते. त्या कुत्र्याला इजा होता कामा नये, याची काळजी घेतली गेली होती. आणि; भारतात एका दिवसात ५०-५० जवानंाची कत्तल केली जाते. आणि; हे करणारे मोकाट असतात. याला पूर्णविराम लागावा, अशी जनतेची मोदी सरकारकडून अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच बिहारचे राष्ट्रकवी स्व. दिनकर यांच्या संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ‘समर शेष है’ या दिनकर यांच्या कवितेचे अनेकांना स्मरण झाले. दिनकर यांची आणखी एक गाजलेली कविता आहे, क्षमा शोभती उस भुजंग को, जिसमे गरल हो (गरल म्हणजे विष ) नही उसे, जो विनीत, विनम्र और सरल हो! -

No comments:

Post a Comment