Total Pageviews

Tuesday 9 June 2015

म्यानमारच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराची कारवाई-

म्यानमारच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराची कारवाई?नवी दिल्ली : आम्ही नुसते इशारे देत बसणार नाही, हा काही दिवसांपूर्वी दहशतवादी व त्यांच्या सर्मथकांना दिलेला इशारा कृतीत उतरवताना भारताने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये लष्कर घुसवले. भारतीय लष्कराने तेथे जाऊन काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये आपल्या जवानांवर हल्ला करणार्या १५ पेक्षा अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. लष्करी सार्मथ्याची आणि युद्धरणनीतीची ही चुणूक दाखवताना केंद्र सरकारने भारतात सतत दहशतवादी कारवाया करणार्या पाकिस्तानला यानिमित्ताने थेट गंभीर इशारा दिल्याचे मानले जात आहे. लष्कराच्या या कारवाईने भारतावरील हल्लेखोरांचा बदला घेण्याबरोबरच म्यानमारमध्ये होणारा मोठा दहशतवादी हल्लादेखील टळला आहे. यामुळे या कारवाईचे भारताबरोबरच म्यानमारमधूनही अभिमानाने प्रचंड कौतुक होत आहे. मणिपूरच्या चंदेलमध्ये ४ जून रोजी भारतीय लष्कराच्या तुकडीवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताच्या १८ जवानांच्या प्राणाची आहुती गेली. यामुळे केंद्र सरकारसह लष्करही प्रचंड संतापले होते. यातून काही झाले तरी हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचामणिपूर हत्याकांडाचा बदला संकल्प करण्यात आला. तशी रणनीती देखील आखण्यात आली. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल रणबीर सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मणिपूर हल्ल्यापूर्वी परिसरात भारतीय लष्कराने हाय अँलर्ट जारी केला होता. भारताच्या हद्दीत घुसून हल्ल्याचे कटकारस्थान रचले जात असल्याची विश्वसनीय माहिती लष्कराला होती. प्रत्यक्षात अतिरेक्यांनी चंदेलमध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाहन ताफ्याला निशाणा बनवले होते. या हल्ल्यानंतर मात्र लष्कराने थेट कारवाईचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी ठोस माहितीच्या आधारावर लष्कराने नागालँड आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात म्यानमारमध्ये दोन विविध ठिकाणी अतिरेक्यांवर कारवाई केली. कारवाई करण्यात आलेले अतिरेकी जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही सिंग यांनी स्पष्ट केले. अतिरेकी ठार झाल्याची निश्चित माहिती त्यांनी दिली नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ पेक्षा अधिक अतिरेकी ठार झालेले आहेत. त्यांच्या साहित्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यातून हा गट पुन्हा उभे राहण्याची शक्यता देखील नसल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी भारतातील अतिरेकी कारवायांबाबत बोलताना आम्ही बोलत बसणार नाही तर थेट कारवाई करू, असा इशारा दिला होता. त्यांचा हा इशारा भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या पाकिस्तानला होता. आता म्यानमारमध्ये थेट लष्कर घुसवून कारवाई करताना भारताने पाकिस्तानला याची चुणूकदेखील दाखवून दिली आहे. भारतात होणारे बहुतेक अतिरेकी हल्ले पाकिस्तानच्या थेट मदतीतून तसेच प्रोत्साहनातून झालेले आहेत. यामुळे यापुढे अतिरेकी हल्ले केले तर तुमच्या हद्दीत घुसूनदेखील भारतीय लष्कर कारवाई करू शकते, असा थेट इशारा म्यानमारमधील कारवाईने पाकिस्तानला देण्यात भारत यशस्वी झाल्याचे सुरक्षातज्ज्ञ मानत आहेत

No comments:

Post a Comment