Total Pageviews

Friday 12 July 2013

BLACK DAY FOR MUMBAI POLICE

मुंबई पोलिसांसाठी काळाकुट्ट दिवस! असत्यमेव जयते!! कोण कुठला ‘उपरा’ गँगस्टर लखनभय्या; त्याचे एन्काऊंटर केले म्हणून... प्रदीप सूर्यवंशी आणि बहाद्दर १२ पोलिसांसह २१ जणांना जन्मठेप मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) - मुंबई पोलिसांसाठी आजचा दिवस काळाकुट्ट ठरला! अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा हस्तक खतरनाक गँगस्टर रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याची खोट्या चकमकीत हत्या केल्याचा ठपका ठेवत सत्र न्यायालयाने ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी आणि इतर १२ पोलिसांसह २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश व्ही. डी. जाधवार यांनी हा निकाल दिला तेव्हा पोलिसांच्या कुटुंबीयांनी भर न्यायालयात एकच आक्रंदन केले. कोण कुठला उपरा गुंड... त्याचे एन्काऊंटर केले म्हणून पोलिसांना शिक्षा. हा कुठला न्याय? असा सवाल न्यायालयाच्या परिसरात विचारला जात होता. लखनभय्याच्या एन्काऊंटरचा हा खटला प्रचंड गाजला. खतरनाक गँगस्टरचे पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच होते हे जनमत आहे. मात्र न्यायालयात ही चकमक खोटी ठरली. या चकमकीप्रकरणी लखनभय्याच्या हत्येची सुपारी दिली म्हणून बिल्डर जनार्दन भांगे आणि सात खबर्‍यांनाही पोलिसांसह जन्मठेपेची सजा सुनावताना या सर्वांना एकूण सहा लाख ८० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. याआधी दोन्हीकडच्या वकिलांचे युक्तिवाद गाजले. दोषी ठरवण्यात आलेल्या १३ पोलिसांसह दोन खबर्‍यांना फाशीची शिक्षा ठोठवावी असा जोरदार युक्तिवाद विशेष सरकारी वकील विद्या कासले यांनी गेल्या मंगळवारी न्यायालयात केला होता तर आरोपींच्या वकिलांनीही त्याचा प्रतिवाद करताना सहानुभूती दाखवून कमीत कमी शिक्षा करावी अशी कळकळीची विनंती केली होती. त्यावेळी पोलिसांनीही न्यायालयासमोर म्हणणे मांडले होते. दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश जाधवार यांनी राखून ठेवलेला निकाल आज दिला. एक तास या निकालाचे वाचन चालले. जन्मठेप ठोठावण्यात आलेल्यांची नावे ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, नितीन सरतापे, दिलीप पालांडे, गणेश हरपुले, आनंदा पाताडे, अरविंद सरवणकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी देसाई, रमाकांत कांबळे, विनायक शिंदे, देवीदास सकपाळ, प्रकाश कदम, पांडुरंग कोकम, संदीप सरदार, बिल्डर जनार्दन भांगे, खबरी शैलेंद्र पांडे ऊर्फ पिंकी, हितेश सोलंकी, अकिल खान ऊर्फ बॉबी, मनोज ऊर्फ मनोज मन्नू राज, सुनील सोळंकी, मोहम्मद मोईद्दीन शेख. प्रदीप शर्मा यांना ताबडतोब सोडा! या चकमकीप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले. शिवाय शर्मा यांच्याविरुद्ध अन्य कोणताही खटला प्रलंबित नसल्यास त्यांना ताबडतोब सोडून देण्याचे आदेशही न्यायालयाने तुरुंगाधिकार्‍यांना दिले. लखनभय्या एन्काउंटर हे पोलिसांनी केलेल्या खुनाचे प्रकरण ठरवून त्यात दोषी ठरलेल्या १३ पोलिसांसह २१ जणांना मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व एक महत्त्वाचा पायंडा पाडणारा निकाल दिला. मुंबईत सत्तरीच्या दशकात गुंडगिरीचा फैलाव झाल्यानंतर पोलिसांनी एन्काउंटर करून गुंडांना ठार मारण्याचे प्रकार सुरू झाले. गुंडगिरीचा त्रास आणि गुंडांची दहशत याची धास्ती घेणार्‍या सामान्य माणसास हे एन्काउंटर म्हणजे वरदानच वाटले. परंतु त्यामुळे गुंडगिरी कमी झाली असे नाही. आजही ती चालूच आहे. पण एन्काउंटर हे मात्र पोलिसांसाठी एक नवे अस्त्र ठरले. त्याचा वापर कसा व केव्हा करावा याचे काही नियम नव्हते. पण एन्काउंटर नावाच्या चकमकीत ठार होणारे लोक गुंड व गुन्हेगार असल्यामुळे त्याबद्दल फारशी तक्रार नव्हती. पण नंतर एका गुंड टोळीच्या सांगण्यावरून दुसर्‍या गुंड टोळीच्या गुन्हेगारांना ठार करण्याचे प्रकार वाढू लागले आणि अचानकपणे एन्काउंटरचे प्रमाण वाढले. काही वेळेला तर एखाद्या नवख्या, तरुण गुंडाला अचानकपणे घरातून रात्री उचलून त्याचा एन्काउंटर केल्याच्या तक्रारी यायला लागल्या. त्यामुळे एन्काउंटरचे अस्त्र अनिर्बंधपणे वापरण्यात येत आहे, हे सर्वांच्या लक्षात येऊ लागले. मीडियामधून मानवी हक्कवाद्यांनी त्याविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली. दीर्घकाळ या आवाजाकडे कुणी लक्षही देत नव्हते. पण असे ठार करण्याचे अधिकार पोलिसांना दिल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर प्रत्येक एन्काउंटरच्या खरेखोटेपणाची चर्चा मीडियातून सुरु झाली. त्यापासून धीर एकवटून गुंडांच्या नातेवाइकांनीही एन्काउंटरविरोधात दाद मागण्यास सुरुवात केली. लखनभय्या या गुंडाच्या नातेवाइकांनी त्याच्यापुढे जाऊ न न्यायालयातच दाद मागितली. त्याची परिणती या जन्मठेपेची शिक्षा देणार्‍या निकालात झाली आहे. यामुळे आता पोलिसांना एन्काउंटरच्या धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. तसेच एन्काउंटरवर निर्बंध आले म्हणून गुंडांविरुद्धच्या कारवाईत हयगयही करता येणार नाही. उलट आता गुंडांना पकडून शिक्षा व्हावी यासाठी तपास अधिक काळजीपूर्वक करून पुरावे जमविण्याचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. एन्काउंटर हा अशा तपासाला आणि पुरावे जमविण्याच्या कष्टाला फाटा देणारा शॉर्टकट होता, आता हा शॉर्टकट बंद झाला आहे. इशरत जहाँ व तिचे अन्य साथीदार यांच्या एकाउंटरचेही प्रकरण असेच गाजते आहे. दहशतवादाने सध्या देश त्रस्त असल्यामुळे दहशतवाद्यांना असेच ठार मारणे योग्य आहे, असे सामान्य माणसाला वाटते. पण मारले गेले ते खरेच दहशतवादी आहेत हे कशावरून, हा साधा प्रश्न कुणाला पडत नाही. दहशतवाद्यांना ठार करण्याऐवजी त्यांना पकडून व त्यांची कसून चौकशी करून त्यांच्या कटाचे सर्व धागेदोरे माहीत करून घेणे आवश्यक असताना, त्यांना ठार करून कसे चालेल? खरा पोलीस अधिकारी कोणत्याही दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचाच प्रयत्न करील. पण इशरत जहाँ प्रकरणाला काही वेगळाच वास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्ण चौकशी होणे आवश्यक आहे. त्यात इशरत जहाँ दहशतवादी असल्याचे सिद्ध झाले तरी तिच्या एन्काउंटरचे सर्मथन होऊ शकत नाही. कोणताही गुंड वा दहशतवादी पोलिसाच्या तावडीतून सुटण्यासाठी गोळीबार करतो हे खरे व अशा वेळी पोलिसांना काही वेळा बचावासाठी उलट गोळीबारही करावा लागतो. पण तो गुंडाला जायबंदी करण्याच्या उद्देशाने केलेला असतो. कारण गुंडाला पकडून त्याची चौकशी करणे महत्त्वाचे असते. त्या चौकशीतून त्याच्या अन्य साथीदारांचीही माहिती मिळते. शिवाय हा गोळीबार रात्री सर्वजण झोपलेले असताना व निर्जनस्थळीच होतो असे नाही. पण अलीकडचे अनेक एन्काउंटर कुणालाही माहीत नसलेल्या निर्जनस्थळी झाले आहेत. राजीव गांधी हत्येतील दहशतवाद्यांनाही पोलिसांना ठार करावे लागले, पण हा गोळीबार भरदिवसा, सामान्य लोकांच्या समक्ष, बंगळुरू शहरात दिवसाढवळ्या झाला होता. त्यामुळे सर्व जनतेने पोलिसांचे तेव्हा कौतुक केले होते. तसा प्रकार मुंबईतील एन्काउंटरच्या बाबतीत कधी घडल्याचे ऐकिवात नाही. मुंबई हे रात्रंदिवस गजबजलेले शहर असते; पण मुंबईतला एन्काउंटर पाहण्याचे भाग्य सामान्य मुंबईकरांच्या वाट्याला अभावानेच आले असेल. या निकालामुळे पोलिसांना अकारण कुणाला ठार करण्याचा अधिकार नाही हे स्पष्ट झाले आहे आणि ते महत्त्वाचे आहे.

No comments:

Post a Comment