Total Pageviews

Sunday 12 May 2013

BRING INDIAN POWs BACK FROM PAKISTAN

१९७१ पासुन पाकिस्तानी तुरुंगांत असलेल्या भारतिय सैनिकाना परत आणा
पाकिस्तानी कैद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सरबजीत सिंगमुळे पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय जवानांची स्थिती किती दारुण आहे, हे कळाले. पाकिस्तानच्या तुरुंगात मरण पावलेल्या चमेलसिंहमुळे तेथील कैद्यांना भोगाव्या लागणार्‍या यातनांचा विषय चर्चेत आला. या कैद्यांना खाण्या-पिण्याच्या सोयी तर उपलब्ध नसतातच; पण शुद्ध हवा आणि शुद्ध प्रकाश हाही त्यांना उपलब्ध होत नाही. ते जिवंत असल्याचे पुरावे त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारला सादर करूनही सरकारने त्यांच्या सुटकेसाठी औपचारिक पत्रव्यवहाराशिवाय कोणतीही पावले उचललेली नाहीत.पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांपैकी ५४कैद्यांचा शोध लागलेला नाही, याची कबुली सरकारने संसदेत अनेकदा दिली आहे. या कैद्यांचे पाकिस्तानच्या तुरुंगात असण्याचे अनेक पुरावे पाकिस्तान सरकारला सादर केले आहेत; पण हे पुरावे पाकिस्तानी सरकारने अमान्य केले आहेत. या तुरुंगाची संयुक्त तपासणी करण्याचे काम जेव्हा -जेव्हा झाले तेव्हा या कैद्यांना अन्यत्र हलवले गेले.
महाराश्ट्राचे अनेक लष्करी अधिकारी पाकिस्तानी तुरुंगात १९७१ च्या युद्धात जे भारतीय जवान कैद करण्यात आले, त्यात ६ मेजर, १ कमांडर, २ फ्लाईंग ऑफिसर, ५ कॅप्टन, १५ फ्लाईट लेफ्टनंट, १ सेकंड कमांडर, ३ स्क्वाड्रन लीडर, १ नेव्ही पायलट , ३ लान्सनायक व ३ जवानांचा समावेश आहे. बेपत्ता मेजर अशोककुमार सुरी यांचे वडील डॉ. आर.एल.एस. सुरी यांच्यापाशी आपला पुत्र पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचे पुरावेही आहेत. अशोककुमार सुरी यांनी पाठविलेल्या एका पत्रात आपल्यासमवेत २0 भारतीय लष्करी अधिकारीही तुरुंगात असल्याचा उल्लेख आहे. पाकिस्तानी तुरुंगात अनेक महिने राहून सुटून आलेल्या मोहनलाल भास्कर या गुप्तहेराने बेपत्ता असलेल्या विंग कमांडर एच. एस. गिल यांना पाकिस्तानच्या तुरुंगात बघितल्याचा दावा केला होता. फ्ला. लेफ्टनंट व्ही. व्ही. तांबे यांना पाकिस्तानी फौजेने जिवंत पकडल्याचे वृत्त संडे पाकिस्तान ऑब्झर्वरने ५ डिसेंबर १९७१ च्या अंकात प्रसिद्ध केले होते. पाकिस्तानचे दिवंगत पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्ता यांना फाशी देण्यात आल्यानंतर बी.बी.सी.च्या प्रतिनिधी व्हिस्टोरिया शोफील्ड यांनी भुत्तो : ट्रायल अँण्ड एक्झिक्युशनया पुस्तकाच्या५९ व्या पानात भुत्तो यांच्या शेजारच्या बॅरेकमधून कैद्यांच्या किंचाळण्याचे स्वर ऐकू येत होते असे लिहीले. भुत्तोच्या वकिलांनी माहिती मिळविली तेव्हा त्या बराकीत भारतीय कैद्यांना ठेवण्यात आले असल्याची व त्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पाकिस्तानच्या तुरुंगात 1971चे भारतीय युध्दकैदी खितपत पडले आहेत. त्यांच्यात पुण्याचे फ्लाईट लेफ्टनंट अशोक ढवळे फ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे,फ्लाईट लेफ्टनंट अशोक ढवळे,फ्लाईट लेफ्टनंट मनोहर पुरोहित आणि फ्लाईट लेफ्टनंट श्रीकांत महाजनही आहेत. ‘जिनिव्हा कन्व्हेन्शनप्रमाणे त्यांची सुटका कधीच व्हायला हवी होती. ते सध्या कोठे आहेत? त्यांचे काय झाले आहे? ते जिवंत आहेत वा नाहीत? याविषयी काहीही स्पष्ट शब्दात विचारायला आपले सरकार तयार नाही . फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे यान्च्या पत्नी आणी बॅडमिंटनच्या राष्ट्रीय विजेत्या, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्काराच्या मानकरी दमयंती तांबे देहलीत स्थायिक असून त्यांनी पतीच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले, शिवाय त्या अनेकदा पाकिस्तानात जाऊनही आल्या आहेत; मात्र पाकने त्यांची आणि त्यांच्या पतीची भेट होऊ दिली नाही.
१९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान वायुदलात कार्यरत असलेले विजय तांबे यांचे विमान डिसेंबर १९७१ ला पश्चियम पाकिस्तानातील भागात पाडण्यात आले होते. या घटनेनंतर तांबे यांचा शोध लागला नव्हता. अचानक त्यांच्या घरच्यांना प्राप्त झालेल्या पत्रावरून विजय तांबे जिवंत असून ते पाकिस्तानच्या कारागृहात आहेत, अशी माहिती प्राप्त झाली होती. याशिवाय पाकिस्तानच्या कारागृहातून सुटून आलेल्या काही लोकांनीही आपण तांबे यांना तेथे पाहिले असल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे सौ. दमयंती तांबे यांनी पतीचा शोध चालू केला; मात्र अद्याप त्यांच्या पदरी यश आलेले नसले, तरी त्या निराश झालेल्या नाहीत, त्या त्यांच्यापरीने आजही (४० वर्षे) प्रयत्न करत आहेत. ९४,०००पाकिस्तानी कैद्यांना परत पाकिस्तानच्या स्वाधीन करताना, पाकिस्तानने सर्व भारतीय कैद्यांना परत करावे, अशी आग्रही अट मागणी सरकारने का केली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. संरक्षणमंत्र्यांची हे सुचविण्याची जबाबदारी नव्हती का? बेपत्ता जवानांचा शोध घेऊन त्यांना मायभूमीत चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रश्न आहे. पण हे कोण लक्षात घेतो? कुणीच नाही हे या प्रश्नाचे दुर्दैवी उत्तर आहे. भारतीय कैद्यांची, जवानांची, बेपत्ता जवानांची त्यांचे कुटुंबीय फार तर थोडे फार नातेवाईक यांनाच तेवढी काळजी आहे. बाकी जनता वृत्तपत्रे इले्नट्रॉनिक प्रसार माध्यमे, राज्य केंद्र सरकार, विरोधी पक्ष, संरक्षण मंत्री यांच्यापैकी कुणालाही थोडीशीही काळजी नाही.
तुरुंगातील छळामुळे मानसिक संतुलन ढासळले१९७१ च्या लढाईत पाकिस्तानने युद्धकैदी केलेले धर्मवीर १९८१ मध्ये जेव्हा सुटून परत आले तेव्हा तुरुंगातील छळामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळल्याचे दिसून आले. .शत्रुराष्ट्रांनी परस्परांचे कैदी पकडले तरी त्यांना कसे वागवावे याबद्दल काही आंतरराष्ट्रीय नियम आणि संकेत आहेत. शत्रुदेशाचा असला म्हणून कोणाच्याही मानवाधिकारांचा भंग करण्याचा अधिकार कोणत्याही देशास नाही. पाकिस्तानने याबाबतचे सर्व संकेत कायमच खुंटीला टांगले आहेत .संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्हिएन्ना करारानुसार युद्धाच्या समाप्तीनंतर रेडक्रॉसच्या देखरेखीखाली युद्धमान राष्ट्रांनी कैद्यांचे आदानप्रदान करायला हवे. या करारानुसार कैद्यांना क्रूरतेने वागवू नये, असेही संकेत आहेत. १९७२ साली आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांच्या तीन याद्या तयार केल्या होत्या; पण प्रत्यक्षात दोनच याद्या प्रकाशित करण्यात आल्या. तिसरी यादी नाहीशी करण्यात आली. त्या यादीत असलेल्या कैद्यांचे पुढे काय झाले, याची माहिती कधीच कळू शकली नाही.
पाकिस्तानी तुरुंगांमधले भारतिय सैनिक आणी ईतर कैद्यांची सुटकेचे प्रयत्न मिळेल त्या मार्गाने करणे हे देश म्हणून आपले कर्तव्य आहे. ते पार पाडण्यात आपण कुचराई करतो.पाकिस्तानला कोणत्या प्रकारे हाताळायचे याबाबत आपले धोरणच स्पष्ट नाही. पाकिस्तानी प्रश्न फक्त चर्चेनेच सुटेल असे सांगणाऱ्या भंपक विद्वानाची संख्या आपल्या देशात मोठी आहे.अनेक वर्तमान पत्रे आणी टीव्ही चनेलनी केलेल्या पहाण्यामध्ये ९९ % भारतियाना आपले पाकिस्तान धोरण पुर्णपणे चुकिचे वाटते आहे.
राज्यकर्त्यांच्या दुबळ्या मनगटात तेवढी हिंमत आज उरली आहे काय?देशाची अस्मिता तो देश आपले जे युद्धकैदी विदेशी तुरुंगांत आहेत त्यान्चे रक्षण कसे करतो यावर ठरावयाला पाहिजे. भारतिय सैनिक आणी ईतर कैद्यांची मिळेल त्या मार्गाने त्याच्या सुटकेचे प्रयत्न करणे हे देश म्हणून आपले कर्तव्य आहे.आता त्यांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न व्हायला हवेत. प्रत्यक्ष युद्धात लढण्याचा अनुभव किंवा तसा प्राणत्याग करण्याला जी प्रगल्भता लागते, प्रखर राष्ट्रप्रेम लागते ते आजच्या भारतातील किती राजकीय लोकांना आहे? जे सैनिक देशासाठी सर्वस्व अर्पण करतात, त्यांच्याविषयी असे उदासीन असलेले भारतीय राज्यकर्त्याना काय म्हणायचे.
 

No comments:

Post a Comment