Total Pageviews

Saturday 3 November 2012

हिंदुस्थानविरोधी दहशतवाद्यांनी सौदी अरेबियात आपला अड्डा स्थापन केला saamna
गेल्या काही काळापासून हिंदुस्थानविरोधी दहशतवाद्यांनी सौदी अरेबियात आपला अड्डा स्थापन केलेला आहे. येथे त्यांना केवळ पैसाच उपलब्ध होतो असे नव्हे तर धार्मिक सुरक्षिततासुद्धा लाभते. हिंदुस्थानात सध्या जे दहशतवादी घुसखोरी करीत आहेत, ते सौदी अरेबियातूनच प्रशिक्षण घेऊन येत आहेत. वास्तविक हिंदुस्थान सरकारने याबाबत धोरणात्मक भूमिका घ्यायला हवी. मात्र त्यांच्याकडून काही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.
दहशतवादी नेहमीच आपली जागा बदलत असतात. तो त्यांच्या रणनीतीचाच भाग असतो. प्रारंभी त्यांचा अड्डा अमेरिकेत होता. मग ते युरोपात स्थलांतरित झाले. हिंदुस्थानच्या विरोधात त्यांना खतपाणी मिळणे सुरू झाल्यानंतर ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात आले, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांचे मुख्यालय हे सौदी अरेबिया बनत चालले आहे. एक काळ असा होता की, ज्यांना दहशतवादी बनवले ते अशिक्षित असत, परंतु आता काळ बदलला तसा दहशतवादीही तयारीच्या हिशेबाने बदलला आहे. सध्याच्या काळात जे मुस्लिम दहशतवादी बनवण्यात येत आहेत, त्यांच्यात कुणी डॉक्टर असतो तर कुणी इंजिनीअर असतो. कुणी कुणी तर वैज्ञानिकसुध्दा असतो. बहुसंख्य दहशतवाद्यांनी देशविदेशातून पदवी प्राप्त केलेली असल्याचे आढळून येते. एवढेच नव्हे तर त्यांनी इस्लामचेही समग्र शिक्षण घेतलेले असते. पैशांसाठी दहशतवादी तयार केले जातातच, शिवाय त्यांना आपल्या धर्माची आणि आपल्या दर्शनशास्त्राची सेवा करण्याचीही संधी लाभते असे म्हटले जाते.जिथे त्यांचे धन सुरक्षित राहील आणि त्यांना सुरक्षित वातावरण लाभेल अशा भागात दहशतवादी राहतात. असे ठिकाण लाभावे म्हणून ते सतत आपली जागा बदलत असतात. पैसा ही त्यांची पहिली गरज असते. एकतर त्यांना नव्या अड्ड्यावर संपूर्ण पैसा उपलब्ध होतो किंवा मग हवाला किंवा त्यासारख्या माध्यमातून पैसा उपलब्ध होईल याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली असते. गेल्या काही काळापासून हिंदुस्थानविरोधी दहशतवाद्यांनी सौदी अरेबियात आपला अड्डा स्थापन केलेला आहे. येथे त्यांना केवळ पैसाच उपलब्ध होतो असे नव्हे, तर धार्मिक सुरक्षिततासुद्धा लाभते. वर्षातून एकदा आपसूकच त्यांची हज यात्रासुध्दा होऊन जाते. एवढेच नव्हे तर उमराच्या निमित्ताने ते केव्हाही सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर जाऊन येऊ शकतात.सौदी अरेबियाचे सरकार धार्मिक बाबतीत अतिशय कट्टर आहे. त्यांना हे माहीत आहे की, धर्माच्या नावाखाली दहशतवादी कधीही सौदी अरेबियात घुसखोरी करू शकतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा यंत्रणा अतिशय सतर्क असते. त्यामुळेच सौदी अरेबियात काही हिंदुस्थानविरोधी दहशतवादी ठाण मांडून बसल्याचे आणि सौदीत राहून ते हिंदुस्थानविरोधी कारवाया करीत असल्याचे त्यांना कळले. तेव्हा आपल्या सतर्कतेआधारेच त्यांनी गेल्या काही दिवसांत अशा हिंदुस्थानविरोधी दहशतवाद्यांना पकडण्यात यश मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी फसी मोहंमद नामक दहशतवाद्याला पकडण्यात यश मिळवले होते. फसी मोहंमद हा इंजिनीअर आहे. त्यानंतर नुकतेच सौदी सुरक्षा यंत्रणेने उस्मान गनी याच्या मुसक्या आवळल्या. हा उस्मान गनी डॉक्टर आहे. वास्तवात तो अतिशय भयंकर अतिरेकी आहे.दिल्लीत महाराष्ट्रातील ज्या तीन अतिरेक्यांना पकडल्याचे जाहीर करण्यात आले त्यांच्याविषयी ताजी माहिती अशी पुढे आली आहे की, या तिघांनाही सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आले आहे. पकडण्यात आलेले हे अतिरेकी फैयाज कागजी नावाच्या कुख्यात दहशतवाद्याच्या माध्यमातून रियाज तथा इकबाल भटकळ यांच्या संपर्कात आले होते. हा फैयाज कागजी कुख्यात दहशतवादी अबू जिंदाल याचा अतिशय जवळचा साथीदार आहे. भटकळ बंधूंनी या तिघांवर हिंदुस्थानच्या विविध शहरांत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी सोपवलेली होती. हेच भटकळ बंधू कित्येक वर्षांपासून सौदी अरेबियात राहतात.एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की, गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानात जे बॉम्बस्फोट होत आहेत त्यापैकी बहुसंख्य स्फोट हे भटकळ बंधूंच्याच इशार्‍यावर होत आहेत. अबू जिंदाल जो लश्कर--तोयबाचा अतिरेकी आहे आणि ज्याचा२६/११च्या मुंबईतील हल्ल्यात हात असल्याचे सांगितले जाते, त्यालाही सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आले होते. त्याच्याविषयी असेही सांगण्यात येते की, सौदी अरेबियामध्ये येण्यापूर्वी कितीतरी वर्षे तो पाकिस्तानात राहत असे. एवढेच नव्हे तर त्याला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे संपूर्ण सहकार्य मिळालेले होते. एवढेच नव्हे तर अबू जिंदाल याला सौदी अरेबियात स्थलांतरित करण्याची योजनासुध्दा आयएसआयनेच आखली होती. ही योजना फुटली, त्यातूनच हे रहस्य पुढे आले की, या दहशतवादी कारवायांत सौदी अरेबियात असलेला एक हिंदुस्थानी इंजिनीअर फसी मोहम्मद हासुध्दा सहभागी आहे. फसी मोहंमदला हिंदुस्थानात आणण्याचा एवढा डंका वाजला की, पुढे या फसी मोहंमदचे नेमके काय झाले हे कळू शकले नाही. आता हे कळायला मार्ग नाही की, फसी मोहंमद हा हिंदुस्थानी जेलमध्ये आहे की, त्याला मुद्दाम सौदीमध्येच ठेवण्यात आले आहे. आता हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणेकरिता सौदी सरकारची ही भूमिका केवळ आश्‍चर्यकारकच नव्हे, तर अतिशय त्रासदायकसुद्धा ठरत आहे.अबू जिंदालच्या अटकेनंतर हिंदुस्थानात मोठे प्रसन्नतेचे वातावरण होते. सौदी सरकारच्या या भूमिकेमुळे हिंदुस्थान सरकारला आणि सुरक्षा यंत्रणेला असे वाटत होते की, आता पाकिस्तान प्रशिक्षित त्या अतिरेक्यांना पकडणे अतिशय सोपे होईल, जे पाकिस्तानातून स्थलांतरित होऊन आता सौदी अरेबियात राहायला आले आहेत. हे दहशतवादी आता नोकरीच्या माध्यमातून सौदी अरेबियात आपले पाय मजबूत करीत आहेत, परंतु आता सौदी सरकारच्या बदलत्या भूमिकेमुळे अतिरेक्यांना पकडणे अवघड होत आहे. परिणामी आता असे बोलले जाऊ लागले की, जगभरातील दहशतवाद्यांचा सौदी हा एक अतिशय मजबूत अड्डा झाला आहे. एवढेच नव्हे तर जगभरात ज्या काही दहशतवादी कारवाया होत आहेत, त्या सर्व सौदी अरेबियातूनच संचालित केल्या जात आहेत.हिंदुस्थानात सध्या जे दहशतवादी घुसखोरी करीत आहेत, ते सौदी अरेबियातूनच प्रशिक्षण घेऊन येत आहेत. पाकिस्तानी दैनिकांमध्ये असे छापून येत आहे की, सौदी अरेबियावर एक प्रकारचा दबाव निर्माण करण्यात येत आहे. फसी मोहंमदबाबत सौदी सुरक्षा यंत्रणेने त्याला हिंदुस्थान सरकारला सोपवण्याची जी भूमिका घेतली आहे त्यापासून त्याला माघार घ्यावी लागावी याकरिता प्रयत्न सुरू आहेत. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट हिंदुस्थानने लक्षात घेतली पाहिजे ती ही की, आपण एखादा अतिरेकी हवा असल्यास त्याच्या बाबतीत हिंदुस्थानी सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा जो अहवाल संबंधित देशाला पाठवते, त्यात अतिशय त्रुटी असतात. असे रिपोर्ट दिल्याच्या बातम्या प्रसिध्दीला देऊन स्वत:ची पाठ थोपटून घेता येत असली तरी त्याच्याने प्रत्यक्षात फायदा काही होत नाही. उलट हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणेची प्रतिष्ठा पणाला लागते. सौदी अरेबिया पाकिस्तानातून येणार्‍या अतिरेक्यांचा अड्डा होत असताना हिंदुस्थान सरकारने त्याबाबत धोरणात्मक भूमिका घ्यायला हवी. मात्र हिंदुस्थान सरकारकडून काही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानातील न्यायालयांमध्ये निर्णय किंवा आदेश देताना जो तांत्रिक कारणांमुळे (टाळता येण्याजोगा) विनाकारण विलंब होतो, त्याचा लाभ अतिरेकी प्रवृत्तींना होऊ शकतो. पकडलेले दहशतवादी इकडे जेलमध्ये जरी असले तरी त्यांच्याबाबतचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्या संघटना रात्रंदिवस एक करत असतात. त्यावर तात्काळ कारवाई हाच एक इलाज आहे अन्यथा विदेशी सरकार, ज्या देशातील ते दहशतवादी आहेत ते पाकिस्तानसारखे देश आणि त्यांच्या संघटना अशा दहशतवाद्यांविरुध्द समोर आलेले पुरावे नष्ट करण्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत.

No comments:

Post a Comment