Total Pageviews

Saturday 22 July 2017

केवळ मोर्चे काढून, चीनचा झेंडा जाळून काहीही होत नसते. चिनी मालाच्या दुकानांची तोडफोड करूनही काहीच फायदा नसतो. अशा वेळी खरे तर आमचे राष्ट्रीय चारित्र्य उघड व्हायला हवे. चिनी मालाची दुकाने फोडणे फार सोपे आहे. वृत्तपत्रात बातमी येते, प्रसिद्धी होते, एवढेच. यावर रामबाण उपाय आहे व तो म्हणजे, चिनी मालावर बहिष्कार टाकणे.


चीनलाही युद्ध नको आहे. त्याला धाक दाखवून भारताला घाबरावयाचे आहे. हे न समजण्याइतपत आंतरराष्ट्रीय समुदाय खुळा नाही. भारत आणि चीनमधील सीमारेषा निश्‍चित ठरली नसल्यामुळे, चीन वारंवार अशा कुरापती करीत असतो, हे सर्वश्रुत आहे. चर्चेच्या माध्यमातून भारत आणि चीनमधील सीमा ठरविण्यात यावी, असे ठरले असतानाही असले प्रकार चीनकडून घडत असतात. त्यात केवळ चीनलाच दोष देऊन चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे झालीत, अजूनही सीमारेषा ठरली नाही, हे लांच्छनास्पद आहे. मोदी सरकार चीनच्या आक्रमणावर काही ठोस पावले उचलत नाही, असे ओरडणारे कॉंग्रेस नेते, याबाबतीत मात्र एक शब्दही बोलत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की, भारत-चीन संबंधांबाबत भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे धोरण पार फसले आहे. चीनचा विषय कॉंग्रेस नेत्यांना नको असतो. कॉंग्रेस राजवटीत कम्युनिस्ट विचारवंतांच्या व मुत्सद्यांचा वरचष्मा असल्यामुळे असेल कदाचित, भारत-चीन सीमावाद सुटलेला नाही. प्रत्येक वेळी काहीतरी थातुरमातुर करून वेळ टाळायची, असेच कॉंग्रेस सरकारने केले आहे. एखाद्या प्रकरणाचा विचका करायचा आणि आता मोदी सरकारविरुद्ध शंख करायचा, असेच सध्या सुरू आहे. २०१२ साली भारत, चीन व भूतान यांच्यात जो करार झाला, त्यानुसार ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे ठरले. हा करार, कॉंग्रेसच्या राजवटीत झाला. त्या कराराचा भंग चीनने केला आणि भारत, चीन व भूतान यांच्या सीमेजवळील भागात पक्का रस्ता बांधण्यासाठी बुलडोझरसहित बांधकाम साहित्य आणले. भूतानने चीनकडे रीतसर तक्रारही दाखल केली. पण, चीन ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याला या प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावायचा आहे, असे दिसते. भारत किंवा भूतान हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न करीत नाहीत, हे बघून एकतर्फीच निकाल लावण्याची चीनला घाई झालेली दिसून येते. एक तर त्याची आर्थिक ताकद प्रचंड वाढली आहे. त्यामुळे चीनची गुर्मी वाढणे स्वाभाविक आहे. तो काही गांधी किंवा बुद्धाचा देश नाही. ताकद वाढली की आजूबाजूचे प्रदेश गिळंकृत करायचे, एवढेच त्याला समजते. पाश्‍चात्त्य देशांनीदेखील इतिहासात हेच केले आहे. त्यामुळे आता हे पाश्‍चात्त्य देश चीनला कुठल्या तोंडाने सल्ला देणार? चीनही त्यांचे कशाला ऐकणार? अशी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय करारांचे पालन दुबळ्या देशांनी करायचे असते. जे बलवान देश असतात, ते आपल्या सोयीनुसार या करारांचे पालन करतात किंवा करारांना कचर्‍याच्या टोपलीत भिरकावून देतात. या प्रकरणात, भारत तसेच चिनी मीडियाने भडक बातम्या देण्याचा असा काही सपाटा लावला की, आता लवकरच भारत-चीन युद्ध भडकणार, असे चित्र उभे केले. युद्ध कुणाच्याच हिताचे नसते. पण, जे अटळ असते ते स्वीकारण्यास कचरण्याचे कारण नाही. चीनने रस्ता बांधण्याचा ठाम निर्धार केला असताना, त्याला भारताने जो खंबीर विरोध केला, ते चीनला अनपेक्षित होते. १९६२ सालचा भारत आज राहिला नाही, हे खरे आहे. पण दुसरे महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत. कॉंग्रेस किंवा इतर पक्षाची कणाहीन व्यक्ती नाही. हे कदाचित चीन विसरला असावा किंवा नरेंद्र मोदी यांच्या कणखरपणाची थोडी परीक्षा त्याला घ्यायची असावी. भारत स्वाभिमानाने ताठपणे उभा होत आहे, हे चीन कसे सहन करणार? तसेही जगातील कुठल्या देशाला भारताने समर्थ व्हावे, असे वाटते? हे असले गांडुळासारखे चकतीला चकती लावून जीवन जगणारे विचारवंत, धोरणकर्ते आम्ही आतापर्यंत पोसून ठेवले आहेत. दादापुता करून, हातीपायी पडून, प्रश्‍न तिथल्या तिथे विझवायचा आणि कसेबसे दिवस पुढे रेटायचे, याचीच सवय असलेल्या या मंडळींना भारताने कणखर भूमिका घेतलेली सहन होत नाही. स्वाभिमान वगैरे शब्द बोलायला खूप सोपे असतात; परंतु तो प्रदर्शित करण्यासाठी काही किंमत मोजावी लागते, याला या मंडळींची तयारी नसते. कुठलेही मूल्य असे अनायास सिद्ध होत नसते. भारताच्या कणखर भूमिकेची नोंद चिनी मीडियाने त्वरित घेतली. भारतातच चीनबाबत सहानुभूतीची भूमिका घेणारे भरपूर प्रमाणात असतील, तर चीनला कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. आता चिनी मीडियाने ‘हिंदू राष्ट्रवादा’चा मुद्दा उकरून काढला आहे. हिंदू राष्ट्रवादामुळेच भारत-चीन यांच्यात वादाची स्थिती उत्पन्न झाली, असे चिनी वृत्तपत्रे म्हणत आहेत. हे वाचून, भारतातील सेक्युलर मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. राष्ट्रवादाची भावना व्यक्तीला कणा प्रदान करीत असते. युद्धात शस्त्रे तेव्हाच सरस ठरतात, जेव्हा त्यांना चालविणारे कणखर असतात. हा कणखरपणा राष्ट्रवादाच्या भावनेतूनच येतो. हिटरलचे सैन्य सेंट पीटर्सबर्गच्या सीमेवर पोचले, तेव्हा लेनिनलादेखील सैनिकांना राष्ट्रवादाचे आवाहन करावे लागले. तेव्हा कुठे रशिनय सैन्य त्वेषाने लढले आणि हिटलरच्या सैन्याचा पाडाव झाला. याच राष्ट्रवादाच्या बळावर टिचभर इस्रायल, सभोवतालच्या विराट मुस्लिम देशांना पुरून उरला आहे. आपल्या भारतीय विचारवंतांना राष्ट्रवादाचे इतके वावडे का आहे, कळत नाही. कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव असावा. चीनने काही आगळीक केली की, भारतीय समाजात चीनविरुद्धची भावना भडकविण्याचा प्रयत्न होतो. तो काही प्रमाणात आवश्यकही आहे. पण नेमके तेच आम्ही करीत नाही. स्वस्त मिळतो म्हणून चिनी माल घेणार आणि चिनी मालाच्या दुकानांची तोडफोडही करणार! हे कसे चालणार? भारताच्या सुरक्षेची काळजी असणार्‍या प्रत्येक नागरिकाने एवढे जरी केले तरी पुरेसे आहे.

No comments:

Post a Comment