Total Pageviews

Thursday 3 January 2013

या ‘रझाकारा’च्या मुसक्या बांधा!

या ‘रझाकारा’च्या मुसक्या बांधा!

होय, रझाकारच! हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हैदराबाद संस्थानातील बहुसंख्य जनतेची तीव्र इच्छा, भारतमातेच्या स्वातंत्र्यासोबत आनंदोत्सव करत, अभिमानाने भारतमातेचे पुत्र असल्याचे जगजाहीर करण्याची असताना, या जनतेवर अत्याचार करत, त्यांना हुसकावून लावून, स्वतंत्र पापीस्तान करण्यासाठी एक अतिरेकी संघटना त्या वेळी हैदराबाद संस्थानमध्ये अतिरेकी कारवाया करत होती. तिचे नाव होते- मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन आणि त्याचा संस्थापक होता कासीम रझवी! या रझवीवरून या संघटनेच्या अतिरेक्यांना नाव पडले होते- रझाकार! तेलंगणा, कर्नाटकातील काही भाग आणि मराठवाडा या प्रदेशाचा अंतर्भाव असलेल्या हैदराबाद संस्थानमध्ये गावोगावी या रझाकारांनी त्या वेळी नुसता उच्छाद मांडला होता. हिंदूंची घरे लुटणे, महिलांची छेड काढणे, त्यांच्या अब्रूवर हात घालणे, हिंदूंचे सर्रास खून पाडणे अशा गोष्टी गावोगावी घडत होत्या. त्यांनी सर्व हिंदूंचे कत्ल-ए-आम करण्याचे दुष्ट मनसुबे रचले होते. हैदराबादचा निजाम उस्मान अली आणि त्याचे पोलिस या रझाकारांना सामील होते. मात्र, भारताचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी या भागात लष्कर पाठविले. त्याला ‘पोलिस ऍक्शन’ असे नाव दिले. या पोलिस ऍक्शनमध्ये लष्कराचे रणगाडे आणि जवानांनी या भागात घुसून रझाकारांना टिपायला सुरुवात करताच, वाट फुटेल तिकडे हे रझाकार पळून गेले. लपून बसले. पाहता पाहता तीन दिवसांत लष्कर हैदराबादमध्ये पोहोचले. निझाम उस्मान अली, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापुढे झुकून शरण आला. हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन हिंदुस्थानात सामील झाले. कासीम रझवी पळून गेला. रझकारांच्या मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेवर बंदी घातली गेली. त्यानंतर या स्वतंत्र हिंदुस्थानात बोकाळलेल्या ढोंगी सेक्युलॅरिस्टांच्या लाचार, लांगूलचालनाच्या राजकारणाचा परिणाम म्हणून, पुन्हा त्याच नावाने, या रझाकारी वृत्तीच्या लोकांनी राजकीय पक्षच धडधडीत स्थापन केला- ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन! एमआयएम! तेच हिंदुद्वेषाचे राजकारण. तोच देशद्रोही वृत्तीचा नंगानाच तेव्हापासून सुरू झाला आहे. कायद्याच्या भीतीने केवळ मुस्लिम वस्त्यांमधून चाललेला हा फूत्कार टाकण्याचा प्रकार आता एका घटनेने उघड झाला आहे. या एमआयएम संघटनेचा आंध्रप्रदेश विधानसभेतील गटनेता आ. अकबरुद्दीन ओवेसी याचे आदिलाबादमधील निर्मल टाऊनमध्ये मुस्लिम जमावासमोर केलेले भडक भाषण यू-ट्यूबवर आले आहे. हे भाषण अतिशय विषारी, जात्यंध, द्वेषाने भरलेले, देशद्रोहाचे फूत्कार टाकणारे आहे. रझाकारांच्या वृत्तीचे आहे. त्या काळच्या कत्ल-ए-आमच्या घाणेरड्या वृत्तीची आठवण करून देणारे आहे. संविधानाची शपथ घेणारा हा आमदार या भाषणात म्हणतो की, ‘‘पंधरा मिनिटे देशातील पोलिस हटवा म्हणजे २५ कोटी मुस्लिम शंभर कोटी हिंदूंना संपवून टाकतील!’’ मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध माणसांना मारणार्‍या अझमल कसाबचा कळवळा सांगत, हा आमदार म्हणतो की, ‘‘त्या बच्चा कसाबला फाशी दिली, मग गुजरातमध्ये हजारो लोक दंगलीत मेले तेथील नरेंद्र मोदी मात्र पंतप्रधान होण्याचे स्वप्न कसे काय पाहू शकतात? त्यांना फासावर का लटकवले नाही?’’ त्याच्याही पुढे जाऊन हा चिथावणीखोर भाषा वापरत म्हणतो की, ‘‘आंध्रच्या मुसलमानांचा देशातल्या मुसलमानांना संदेश आहे की, आमच्यासारखे एक व्हा आणि २५ कोटी मुसलमान एक झाले, तर मोदी फाशीच्या तख्तावर लटकलेले दिसतील!’’ इतके भयानक, चिथावणीखोर, राष्ट्रद्रोहाने आणि घटनाद्रोहाने भरलेले हिंसक भाषण करणारा हा माणूस- आठ डिसेंबर, २४ डिसेंबरला ही भाषणे करून अजून मोकाटच फिरतो आहे. या भाषणाची चित्रफीतच यू-ट्यूबवर प्रसारित झाल्याने, आता गदारोळ उठला आहे. या अकबरुद्दीन ओवेसीवर आता आदिलाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेही एका नागरिकाने त्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर!
हे भाषण यू-ट्यूबवर आलेच नसते, तर हा माणूस असेच विष पेरत मोकाट सुटला असता. अशा प्रकारचे कितीतरी लोक अशाच प्रकारची भाषणे देत लोकांना भडकावीत, देशाविरोधात दहशतवादाचा वणवा पेटवत, देशातील तरुणांची माथी भडकवीत फिरत असतात, याची दखल देशाच्या सरकारांना, प्रशासनांना आहे काय? याची माहिती असली, तरी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धैर्य प्रशासनात आहे काय? अल्पसंख्यकांची गठ्ठा मते पाहताच, लाचारीची लाळ तोंडातून टपकते आणि मग मती गुंग झाल्यासारखे हे लोक गुडघे टेकून या मंडळींची मगरुरी निमूटपणे सहन करतात की काय? अशा प्रश्‍नांची मालिका या निमित्ताने उभी राहिली आहे. एकतर या अकबरुद्दीन ओवेसीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. या रझाकाराच्या आता तातडीने मुसक्या बांधल्या पाहिजेत. त्याचबरोबर हा भडक माथ्याच्या मुस्लिम युवकांचा मसीहा बनता कामा नये, हेही पाहिले पाहिजे. लांगूलचालनाच्या राजकारणाने या देशात अशा प्रकारच्या रझाकारीला प्रोत्साहित केले आहे, हे जरा लक्षात घेऊन, राजकीय पक्षांनी हे लांगूलचालन सोडून दिले पाहिजे. मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन हे रझाकारांच्या संघटनेचेच नाव धारण करून, आपला इरादा जाहीर करत स्थापन झालेल्या या राजकीय पक्षावर तातडीने बंदी घातली पाहिजे.
एक चांगली गोष्ट ही की, या अकबरुद्दीन ओवेसीच्या विरोधात दिल्लीतही एक गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. तो दाखल केला आहे तो शबनम हमजा या पुरोगामी वृत्तीच्या मुस्लिम महिलेच्या तक्रारीवरून! शबनम हमजा या बहुसंख्य मुस्लिमांचे प्रातिनिधिक प्रतीक बनल्या पाहिजेत. या देशात आपापली इस्लामिक प्रार्थनापद्धती आणि जीवनपद्धती आचरणात आणूनही देशप्रेम, सहजीवन, सामाजिक सौहार्द कायम राखता येते, हे शबनम हमजा, असगरअली इंजिनीअर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अशा अनेक मुस्लिम विचारवंत, राजकारणी यांनी आदर्शपणे उदाहरण दाखवून दिले आहे. मोठ्या संख्येने अनेक सामान्य मुस्लिमांचेही असेच मत आणि आचरण आहे. मात्र, अकबरुद्दीन ओवेसीसारख्या भडक आणि रझाकारी वृत्तीच्या लोकांनी मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा जणू विडा उचलला आहे. अशा प्रकारचे लोकच जबीउद्दीन अन्सारीसारख्या अतिरेकी वृत्तीला प्रोत्साहन देत आहेत. ‘सर्व मुसलमान अतिरेकी नाहीत, मात्र बहुतेक सर्व अतिरेकी मुसलमान आहेत,’ हे कटु वास्तव या अकबरुद्दीनसारख्या विषारी लोकांनी जन्माला घातले आहे. गोध्रासारख्या सामाजिक शांतता बिघडवणार्‍या घटना अशा वृत्तीमुळेच होत आहेत.
‘‘हँस के लिया पाकिस्तान, लड के लेंगे हिंदुस्थान,’’ अशा घोषणा देणार्‍या पाकिस्तानातील नापाक इराद्याच्या लोकांनी, भारताला रणांगणात पराभूत करता येत नाही, उलट आपल्यालाच सपाटून मार बसतो, याचा अनुभव घेतल्यानंतर, भारताच्या विरोधात रडीचा डाव सुरू केला आहे. भारतातील अशा देशद्रोह्यांना हेरून त्यांचेच हत्यार बनवून त्यांना भारताच्या विरोधात वापरण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे. एमआयएमसारखे राजकीय पक्ष या दुष्ट कारस्थानांना प्रोत्साहन मिळेल असे वातावरण, अशा प्रकारचे विषारी विचार पेरून तयार करत आहेत. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या देशविरोधी कारस्थानाला हाणून पाडले पाहिजे. राजकारणातील, शासनातील, प्रशासनातील सर्वांनी देश वाचविण्यासाठी या प्रवृत्तीला संपविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशभक्तांनी देशभर एक संघटित, जागरूक शक्ती या देशद्रोही कारस्थानाला परास्त करण्यासाठी उभी करण्याची गरज आहे. हे भाषण ऐकल्यानंतर याची गरज आणि तीव्रता लक्षात आल्याशिवाय राहत नाही. या रझाकारीविरोधात आता सर्व देशभक्त नागरिकांनी निकराने उभे राहिलेच पाहिजे

No comments:

Post a Comment