Total Pageviews

Monday 11 June 2012

सिद्दिकीचे काय झाले?

संघटित टोळ्यांना, त्यांच्या पैशाला आणि भाईगिरीच्या सत्तेला या देशातले तुरुंग बांधून ठेवू शकत नाहीत. आता तरी तुरुंग प्रशासनातील सुधारणा तातडीने हाती घेतल्या पाहिजेत.

महंमद कतिल सिद्दिकीच्या हत्येने या देशातल्या तुरुंग व्यवस्थेविषयी काही प्रश्‍न पुन्हा निर्माण झाले आहेत. तुरुंगातल्या अतिसुरक्षित अशा "अंडा सेल'च्या परिसरात अन्य दोन गुन्हेगारांकडून मारला गेलेला सिद्दिकी हा काही चिंधीचोर नव्हता. दिल्ली आणि बंगळूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधला तो संशयित आरोपी होता.

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कटासंदर्भात तपास यंत्रणांच्या हाती लागलेला तो एकमेव दुवा होता. देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांची महत्त्वाची माहिती त्याच्याकडून तपास यंत्रणांना मिळणे अपेक्षित होते. येरवडा तुरुंगातल्या सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात त्याचा खून झाल्याने येरवडा तुरुंगातल्या सुरक्षा व्यवस्थेची आणि प्रशासनातल्या संबंधित प्रत्येक घटकाच्या विश्‍वासार्हतेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैदी, पोखरलेली व्यवस्था, अपुरे मनुष्यबळ आणि तुरुंग सुधारणांच्या प्रस्तावांना केंद्र आणि राज्यांकडून वेळोवेळी लावल्या गेलेल्या वाटाण्याच्या अक्षता, यामुळे देशातल्या सर्वच तुरुंगांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

हैदराबादमधील अतिसुरक्षित चेर्ल्लापल्ली तुरुंगात ठेवलेल्या काही गुन्हेगारांनी काही महिन्यांपूर्वी बराकींची झडती घेणाऱ्या तुरुंगरक्षकांवरच हल्ला चढवला होता. "हुजी' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या एका संशयित दहशतवाद्याने तुरुंगातून थेट सौदी अरेबियात फोन केल्याचे उघडकीस आले होते. आणखी एक कैदी उत्तर प्रदेशातल्या आणि महाराष्ट्रातल्या काही टोळ्यांच्या संपर्कात होता. महाराष्ट्रातही नाशिक रोड आणि आर्थर रोडसारख्या तुरुंगांमधून काही विशिष्ट टोळ्यांनी त्यांचे उद्योग सुखेनैव चालवल्याची प्रकरणे यापूर्वीही उजेडात आली आहेत. तुरुंगात सराईत गुन्हेगारांकडे मोबाईल आणि अमली पदार्थ सापडण्याच्या घटना आता दुर्मिळ या सदरात मोडेनाशा झाल्या आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांचे कट तुरुंगातच रचले गेल्याचेही तपासात उघड झाले आहे. सिद्दिकीच्या खुनानंतर प्राथमिक तपासात अंडा सेलमध्येही देवदेवतांचे फोटो आणि उदबत्त्या मिळाल्याचे दिसून आल्याने येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये कैदी फक्त अंगावरच्या कपड्यांनिशीच जाऊ शकतो, या समजालाही धक्का लागला आहे. नऊ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस्‌ या ऑस्ट्रेलियातील तुरुंगातून पळालेल्या कैद्याच्या आत्मकथनाची डूब असलेल्या "शांताराम' या कादंबरीत मुंबईतल्या तुरुंगांमधील वातावरणाची काही वर्णने आहेत. तशी ती बॉलिवूडमधल्या देमारपटांमधूनही पाहायला मिळतात.

सुरक्षा यंत्रणांशी किंवा अगदी कच्च्या कैद्यांशी संवाद साधला, तर आजारपणाच्या नावाखाली रुग्णालयातल्या वास्तव्यापासून ते दोन टोळ्यांच्या मारामाऱ्यांपर्यंत असंख्य घटनांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळतात. कादंबऱ्या आणि चित्रपटातील वर्णनांना "अतिरंजित' असा शिक्का मारून मोडीत काढायचे ठरवले; तरी संघटित टोळ्यांना, त्यांच्या पैशाला आणि भाईगिरीच्या सत्तेला या देशातले तुरुंग बांधून ठेवू शकत नाहीत, हे वास्तव उरतेच. तुरुंगांतून सापडणारे अमली पदार्थ, चालवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या आणि सुरक्षा व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून चालणारे गैरप्रकार, यामुळे हे वास्तवच ठळकपणे समोर येते. या पार्श्‍वभूमीवर "अंडा सेल'मध्ये सिद्दिकीचा खून झाल्यामुळे तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेलाच े आव्हान मिळाले आहे. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या दोन स्थानिक गुन्हेगारांकडून झालेल्या सिद्दिकीच्या खुनाचे कारण अद्यापही समजलेले नाही. गुन्ह्याच्या तपासात ते समजेलच. तथापि, केवळ कारण पुढे आल्याने सिद्दिकीच्या खुनामुळे निर्माण झालेले सर्वच प्रश्‍न सुटणार नाहीत. अंडा सेलच्या परिसरात क्‍लोज सर्किट टीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना का बारगळते, इथपासून अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधायला लागणार आहेत. या हत्येनंतर तर्कवितर्कांना ऊत आलेला आहे. तपास यंत्रणांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापासून ते दहशतवादाला विशिष्ट रंग देण्यापर्यंत हा लंबक झुलतो आहे. या परिस्थितीत कोणत्याही अवास्तव भूमिका, दावे-प्रतिदावे, आरोप यांना महत्त्व न देता तपास करावा लागणार आहे. सुरू असलेल्या खटल्यांमधले तपासातील निखळलेले दुवे सांधण्याचे अवघड कामही करावे लागणार आहे. दिल्लीतल्या ज्या घटनेत सिद्दिकीचा हात असल्याचा आरोप आहे; त्याबद्दलचे आरोपपत्र सिद्दिकीच्या खुनाच्या एकच दिवस अगोदर न्यायालयात दाखल झाले होते. सुरक्षा यंत्रणांना अजूनही हुलकावणी देणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांपर्यंत पोचण्याचा तो एक दुवा ठरू शकला असता, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर तपास यंत्रणांना कदाचित कामाची दिशा पुन्हा निश्‍चित करावी लागेल. दहशतवादाशी लढण्यासाठी हे करावे लागेलच. पण, त्याबरोबरच देशातल्या तुरुंगात चालवल्या जाणाऱ्या दहशतवादाच्या आणि गुन्हेगारीच्या "शाळा'ही बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील

No comments:

Post a Comment