Total Pageviews

Saturday 18 May 2024

युक्रेन युद्धापासून भारताकरता सर्वात मोठ्ठा धडा: युद्धकाळात सैनिकांची कमी कशी पूर्ण करणार?

 


मोठ्या विमानवाहू नौका, महागडी  फायटर विमाने, रणगाडे - पांढरे हत्ती

आज जगात ६० ठिकाणी युद्ध सुरू आहेत .या मधल्या दोन महत्त्वाच्या युद्धभूमी आहेत, युक्रेन-रशिया युद्धभूमी आणि  इजराइल-हमासची युद्धभूमी. या युद्धभूमीवरती वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे ,तंत्रज्ञान वापरले जात आहे .या युद्धभूमी प्रयोगशाळा बनल्या आहेत. कुठले तंत्रज्ञान जास्त प्रभावी आहे आणि कुठले नाही, हे स्पष्ट होत आहे. विमाने विरुद्ध एंटी एयरक्राफ्ट क्षेपणास्त्रे यामध्ये क्षेपणास्त्रांचा विजय झाला आहे.

रणगाडे विरुद्ध एंटी टॅंक क्षेपणास्त्रांमध्ये क्षेपणास्त्रे जिंकली आहेत. रणगाड्यांची बरबादी ही दोन्ही देशांच्या रणगाडा लढाईत झाली नाही. त्यांना छोट्या, कमी किमतीच्या, लपून आणि लांबून फायर केलेल्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांनी  बरबाद केले. हे क्षेपणास्त्र फ़ायर करणारे तरुण साहसी सैनिक होते . 

रशियाच्या काळ्या समुद्रातील मोठ्या विमानवाहू नौका, इतर युद्ध नौका, लांबून फायर केलेल्या क्षेपणास्त्रांनी डुबवल्या आणि त्यानंतर रशियन नौदल लढण्याकरता पुढे आलेच नाही.

क्षेपणास्त्रांमुळे होणारे नुकसान असह्य झाल्यामुळे रशियन हवाई दलाने या लढाईमध्ये फारसा भाग घेतला नाही. ड्रोन्स हवाई दलापेक्षा कितीतरी जास्त पटीने प्रभावी ठरलेले आहेत.

महागडी लढाऊ जहाजे, फायटर विमाने, रणगाडे हे पांढरे हत्ती बनले आहेत. 

शत्रूची जहाजे, फायटर विमाने, रणगाडे, मोठी शस्त्रे जी आकाशातून ओळखता येतात, त्यांना लांबून क्षेपणास्त्रे फायर करून बरबाद करता येते.

युक्रेन युद्धामुळे अजून एक बाब सिद्ध झाली. केवळ सरकार आणि सैन्य लढाई करू शकत नाही. शत्रूंशी लढाई करण्याकरता देशातील इतर संस्था आणि नागरिकांची मदत अत्यंत गरजेची आहे. 

देशाच्या युद्धभूमीवर इतर देशांच्या सॅटॅलाइट्सचे सुद्धा लक्ष

युक्रेनला सॅटेलाईट मार्फत मिळालेली सर्वात जास्त माहिती, अमेरिकन अब्जाधीश ‘इलोन मस्क’ यांच्या  सॅटेलाईटनी दिली. 

म्हणून भारतालासुद्धा आपली युद्धक्षमता आणि जास्त दिवस युद्ध लढण्याचा स्टॅमिना वाढवण्याकरता, देशात असलेल्या इतर संस्थांचा कसा वापर करता येईल, यावर लक्ष द्यावे लागेल. याशिवाय मित्र देशांकडून मिळणारी गुप्तचर माहितीसुद्धा आपल्या युद्ध नियोजनात सामील करावी लागेल.

मात्र या युद्धामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे. पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की शस्त्रे आणि शस्त्र चालवणारा सैनिक यामध्ये, सैनिक हा जास्त महत्त्वाचा आहे. 

रशियामध्ये लढण्याकरता लढाऊ युवकांची कमी

रशियामध्ये लढण्याकरता लढाऊ युवकांची कमी पडत आहे कारण श्रीमंत रशियन पहिलेच रशिया  सोडून युरोप आणि इतरत्र पळून गेलेले आहेत. अनेक रशियन युवक सैन्यात भरती व्हायचे नाही म्हणून देशामध्ये कुठेतरी लपून बसलेले आहेत. युद्ध थांबवा म्हणून रशियामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने होत आहे. 

रशिया मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट आर्मीज (mercenaries) म्हणजे भाडोत्री सैनिक वापरत आहे, तरीपण त्यांना लढणाऱ्या सैनिकांची कमी भासत आहे. 

सैन्यात नोकरी करणे सगळ्या युवकांना अनिवार्य केलेले आहे, तरीपण मारून मुटकून पाठवलेले सैनिक युद्धभूमीवर पुरेशा प्रमाणामध्ये लढताना दिसत नाही. 

थोडासाही कठीण प्रसिद्ध आला, तर ते पळून जातात किंवा शरणागती पत्करतात.

अनेक भारतीय तरुणसुद्धा या लढाईमध्ये अडकलेले आहेत कारण त्यांना सैनिक म्हणून रशियाने युद्धभूमी वरती पाठवले होते. वेगवेगळ्या लढाऊ जमाती म्हणजे गुरखा वगैरेसुद्धा या युद्धभूमीवरती प्रवेश करत आहेत, परंतु त्यांची संख्या कमी पडत आहे. 

युक्रेनच्या सैनिकांचे सरासरी वय ४५ वर्षे

सैनिकांच्या बाबतीत युक्रेनची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. त्यांना पण लढणाऱ्या सैनिकांची कमी पडत आहे, कारण हजारो मारले गेलेत किंवा जखमी झालेत. युक्रेनचे अनेक नागरिक विविध कारणे काढून निर्वासितांबरोबर युक्रेनच्या बाहेर पळून गेले आहेत. युक्रेनचे अनेक युवक युद्धभूमीवर जायला तयार नाहीत. 

असा प्रचार करण्यात आला होता की, युक्रेनचे नागरिक हे देशावरती जास्त प्रेम करतात आणि देशाकरता लढण्याकरता पण तयार आहेत. मात्र हे काही प्रमाणातच सत्य आहे. अनेक नागरिक स्वतःचा प्राण वाचवण्यामध्येच गुंतलेले आहेत.

तरुणांची कमी असल्यामुळे युक्रेनच्या सैनिकांचे सरासरी वय आहे ४५ वर्षे. याचाच अर्थ, तरुणांच्या ऐवजी मध्यमवयीन सैनिक युद्धभूमीवर जास्त आहेत. ४५ वर्षाच्या मध्यमवयीन सैनिकाची जर पंचवीस वर्षीय तरुण सैनिकांशी मूठभेड झाली, तर काय होईल? अर्थातच तरुण सैनिक जिंकेल. युरोपमधल्या अनेक लहान देशात सैन्यात जाण्याकरता तरुण मंडळीच उरलेली नाही. 

युद्धभूमीवर कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती महत्त्वाची

चीनचीसुद्धा अवस्था अशीच दयनीय आहे आणि चिनी नागरिकसुद्धा सैन्यामध्ये जायला मागत नाही. एक श्रीमंत देश झाल्यामुळे बहुतेक चिनी नागरिक हे श्रीमंत मध्यमवर्गीय झालेले आहेत आणि यामुळे ते शहरात राहणारे नाजूक युवक बनले आहेत, जे ‘तिबेट’सारख्या युद्धभूमीवर जायला तयार नाही.

सध्या चीनबरोबरचा संघर्ष हा लडाख, अरुणाचल, सिक्कीममध्ये होत आहे. या युद्धभूमीवर आधुनिक शस्त्रांचा फारसा उपयोग नाही. इथल्या सैनिकांमध्ये ताकद, सहनशीलता, स्टॅमिना, वेगवेगळ्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता, यांची गरज आहे. भारतीय सैन्यात हे गुण आढळतात.

चिनी सैनिक एक वर्षाचे प्रशिक्षण घेतात, त्यात ३ महिन्याचे प्रशिक्षण हे साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते कसे व्हावे, हे असते. चिनी सैनिक प्रशिक्षण घेऊन फक्त दोन वर्ष सैन्यात असतात. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्याने रोजीरोटीसाठी काय कमवायचे याची काळजी त्यांना असते. परिणामी युद्धात लढण्यास त्या सैनिकांना रस नाही.

सैनिक आणि अधिकारी यांच्यात दुरावा  आहे. भारतीय सैन्याधिकारी आणि सैनिक यांच्यातील संबंध अत्यंत उत्तम आहेत. ते एखाद्या बटालियन किंवा रेजिमेंटमध्ये एकत्र असतात. ते आपल्या बटालियन किंवा रेजिमेंटला स्वतःचे दुसरे घरच समजतात. पूर्ण आयुष्यभर त्यांची रेजिमेंट, बटालियन हीच त्यांची ओळख असते. ही मैत्री शेवटपर्यंत सुरू असते.

चिनी सैनिकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे सत्तर टक्के चिनी सैनिक हे एकल कुटुंबातील आहेत. चीनच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा परिपाक म्हणून एका कुटुंबात एकच मूल असल्याने त्यांना युवराजासारखे मोठे कऱण्यात आलेले असते. परिणामी सैन्यात आलेल्या सैनिकांमधे शिस्त नाही, आरामाची जीवनशैली, कॉम्प्युटरचे गेम खेळणे, मोबाईलचे वेड इ. अनेक वाईट सवयी चिनी सैनिकांमध्ये दिसून येतात.

‘गलवान’मध्ये आपले कमांडिग अधिकारी कर्नल बाबू यांच्यावर चिनी सैनिकांनी हल्ला केला तेव्हा कुठल्याही परिणामांचा विचार न करता संख्येने कमी असलेल्या भारतीय सैनिकांनी चिन्यांवर हल्ला करून त्यांना कसे रक्तबंबाळ केले हे आपण पाहिले आहे.

युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांचे नेतृत्व सर्वात पुढे राहून

भारतीय सैन्याची सर्वात मोठी ताकद आहे त्यांचे अधिकारी किंवा ऑफिसर्स.  अधिकाऱ्यांची परंपरा आहे की ते युद्धजन्य परिस्थितीत आपल्या सैनिकांचे नेतृत्व  सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच दरवर्षी अनेक सैऩ्याधिकारी देशासाठी प्राणाचे बलिदान देतात. त्यांच्या पराक्रमामुळे देशाला विजय मिळतो. सैनिकांना लढण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन, आक्रमकता ही अधिकाऱ्यांमुळे येते, ह्याचा चिनी सैन्यामध्ये अभाव आहे.

युक्रेन रशिया, इजराइल हमासपासून भारत काय शिकू शकतो?

आपल्याकडे युवकांची काहीच कमी नाही. अजून सुद्धा सैन्याची भरती म्हटली, म्हणजे हजारोच्या संख्येने युवक सैन्यात भरती होण्याकरता येऊन पोहोचतात, ज्यामध्ये फारच थोड्या युवकांना सैन्यात घेतले जाते. 

मात्र चीन पाकिस्तानबरोबर लांब चालणाऱ्या महायुध्दाकरता मोठ्या संख्येने सैनिकांची गरज भासेल. त्या वेळी सैन्यात भरती होण्याकरता नागरिकांच्या मनामध्ये आपल्याला देशाकरता काहीतरी करण्याची वृत्ती, देशभक्ती, देशप्रेम हे जागृत करावे लागेल. तसे झाले तरच ते धोकादायक परिस्थितीमध्ये सैन्यात भरती होतील. यामुळे महायुद्धाच्या वेळेस सैन्यात सैनिकांची कमतरता जशी रशिया, युक्रेन, युरोप आणि इतर देशात निर्माण झाली आहे, तशी भारतात निर्माण होणार नाही.

जगात चाललेल्या वेगवेगळ्या युद्धांमुळे अनेक देशात युवकांची कमी होत आहे. याचा फायदा घेऊन भारताने आपल्या तरुणांना सक्षम बनवून काम करण्याकरता इतर देशात पाठण्याकरता एक वेगळेच मंत्रालय उघडायला पाहिजे.

 

 

No comments:

Post a Comment