Total Pageviews

Monday 28 October 2013

ISI, RAHUL GANDHI COMMUNAL RIOTS

मुंबईतील दंगलीत आयएसआयने शस्त्र पुरविल्याची माहिती आम्ही याच स्तंभात दिली होती तेव्हा कॉंग्रेसवाल्यांनी हे आरोप नाकारले होते. आज ‘युवराज’ राहुल मुझफ्फरनगरच्या दंगलीबाबत तीच भूमिका मांडत आहेत. ते चुकून खरे बोलले आहेत. म्हणून त्यांना झोडपलेच पाहिजे असा नियम नाही. आयएसआय आणि युवराज सत्य झाकू नका! कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या वादळ निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी एखादे विधान करावे व त्यावरून मोदी यांनी खिल्ली उडवावी अशा प्रकारचा प्रचारी धुरळा गेल्या काही दिवसांपासून उडत आहे, पण या धुरळ्यात यावेळी सत्य हरवताना दिसत आहे. राहुल गांधी हे कोणी तत्त्वचिंतक किंवा झुंजार नेते नाहीत. त्यांची भाषणे व मुक्ताफळे नेहमीच हास्यास्पद ठरत असतात, पण इंदूरच्या सभेत त्यांनी मुझफ्फरनगर दंगलीवरून केलेल्या विधानांवर इतका गदारोळ माजविण्याचे कारण काय? कॉंग्रेसचे युवराज अजाणतेपणे सत्य बोलून गेले आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले, ‘‘मुझफ्फरनगरच्या दंगलीत आयएसआयचा हात आहे आणि दंगलीच्या झळा बसलेले मुसलमान युवक आयएसआयच्या संपर्कात आहेत.’’ युवराजांनी या देशातील धर्मांध मुसलमानांच्या बाबतीत जे सत्य सांगितले आहे त्यात धक्का बसावे असे काही नाही. आयएसआय व धर्मांध मुसलमानांविषयी युवराजांनी मांडलेले विचार नवीन नाहीत. यापूर्वीही अनेकदा अनेक हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी नेत्यांनी ‘आयएसआय’च्या येथील कारवायांवर आग ओकली आहे. खुद्द शिवसेनाप्रमुखांनी सरसकट नव्हे तर पाकधार्जिण्या मुसलमानांवर बेधडक हल्ले करून देशात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानातील प्रत्येक दंगा व दहशतवादी कारवाईमागे पाकड्या आयएसआयचा हात हा असतोच व त्यामुळे मुझफ्फरनगरच्या दंगलीतही तो हात अदृश्यपणे किंवा उघडपणे फिरत होता. मुसलमान तरुणांची ‘डोकी’ भडकवून त्यांना माथेफिरू बनवून ‘देशद्रोही, दहशतवादी’ कारवायांत गुंतवण्याचे काम आयएसआय करीत आली आहे. ‘जिहाद’साठी तरुणांना तयार करून त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात दहशतवादी प्रशिक्षणासाठी नेले जाते व नंतर परत येथे पाठवून देशविरोधी कारवायांसाठी त्यांचा वापर केला जातो. आयएसआयच्या या कारवायांत गोपनीय असे काही नाही. मुंबईतील १९९२ च्या दंग्यात व नंतरच्या प्रत्येक बॉम्बस्फोट मालिकेमागे फक्त ‘आयएसआय’ होती. माहीमच्या दर्ग्याजवळ राहणारे ‘मेमन बंधू’ हे आयएसआयचे हस्तक म्हणूनच वापरले गेले व शेवटी आयएसआयच्या छत्रछायेखालीच पाकिस्तानात राहू लागले. ‘टुंडा’ व ‘भटकळ’ या खतरनाक दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. देशातील किमान ५० दहशतवादी कारवाया व स्फोटांत या दोघांचा हात होता. टुंडा व भटकळ हे आयएसआयचेच सुभेदार होते ना! हैदराबादचा ओवेसी खुलेआम हिंदूंच्या कत्तली घडविण्याचे फर्मान सोडतो. ती जिहादी भाषा पाकड्या ‘आयएसआय’ची आहे. मुंबई, दिल्ली, गुजरात, आसाम आणि हैदराबादसह कश्मीर खोर्‍यातील मुसलमानांच्या मनात विद्वेषाचे जहर पसरवून त्यांना हिंदुस्थानविरोधात उभे करण्याचे जोरदार कारस्थान रटारटा शिजत आहे. मुसलमानांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ नये यासाठी जितके प्रयत्न कॉंग्रेस, सपासारखे बेगडी ‘निधर्मी’ पक्ष करीत असतात त्यापेक्षा जास्त कारस्थाने ‘आयएसआय’चे येथील हस्तक करीत असतात. पुन्हा हिंदू-मुसलमानांची जातीय फाळणी व्हावी व त्या फाळणीतून आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावे हेच ‘आयएसआय’चे भयंकर कारस्थान आहे, पण या कारस्थानाच्या चिंधड्या उडविण्याऐवजी आपण सगळेच याप्रश्‍नी मतांचे व धर्माचे राजकारण करण्यात धन्य धन्य मानीत असू तर या देशाला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही. हिंदुस्थानात लश्कर-ए-तोयबा, अल कायदा, सिमी, बांगलादेशी हुजी, इंडियन मुजाहिद्दीन, हिजबुलसारख्या धर्मांध संघटना मुसलमान तरुणांची माथी भडकवीत आहेत व या सर्व सैतानी संघटनांचा बाप ‘आयएसआय’ आहे. या सैतानांपासून देशातील मुसलमानांनी दूर राहावे व स्वत:स कलंकित होण्यापासून वाचवावे, पण मुसलमानी समाजास सन्मार्गी लावणारा नेता आज तरी दिसत नाही. उलट मुसलमान आज आहे त्यापेक्षा अधिक धर्मांध कसा बनेल व तो स्वत:ला जास्तीत जास्त असुरक्षित कसा मानेल यासाठी राजकीय डावपेच आखले जात असतात. याचाच फायदा पाकिस्तान व त्यांचे आयएसआय घेत असते. अनेकदा ‘आयएसआय’ला हवे असलेले प्रताप कॉंग्रेस व सपावाले करतात. भडकत्या आगीवर पाणी ओतण्याऐवजी तेल टाकणारे असल्यावर मुसलमान समाज हा सदैव खदखदतच राहील. तेच देशाच्या मुळावर आले आहे. मुसलमानी मतांसाठी राजकारणी कोणत्याही थरास जाऊ शकतात व सत्तेसाठी देशाची द्रौपदी करून स्वातंत्र्य आणि अखंडता पणास लावू शकतात. राहुल गांधी यांनी धर्मांध मुसलमान व आयएसआयचा संबंध दाखवून अजाणतेपणे ‘सत्य’ समोर आणले. मुसलमानांतील धुरिणांनी हे सत्य स्वीकारून या कलंकापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्यांचेच हित आहे. भारतीय जनता पक्ष व मोदी यांनी ‘राहुल गांधी’ यांना ‘आयएसआय’प्रकरणी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले हे त्यांच्या धोरणास धरूनच आहे, पण दंगली व दहशतवादामागे आयएसआयचा हात आहे हे जसे गुजरातच्या दंगलीत सिद्ध झाले तसेच इशरत जहां, सोहराबुद्दीन यांना गुजरात पोलिसांनी ठार केले तेदेखील त्यांचा पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध उघड झाल्यामुळेच. राहुल गांधी यांचे वक्तव्य नीट तपासून पाहिले तर इतकेच दिसते की, त्यांनी ‘दंगापीडित’ मुसलमान तरुणांशी आयएसआय संपर्कात असल्याचे म्हटले. मुंबईतील दंग्याच्या वेळी आयएसआयने हेच केले होते व दंगलीत आयएसआयने शस्त्र पुरविल्याची माहिती आम्ही याच स्तंभात दिली होती तेव्हा कॉंग्रेसवाल्यांनी हे आरोप नाकारले होते. आज ‘युवराज’ राहुल मुझफ्फरनगरच्या दंगलीबाबत तीच भूमिका मांडत आहेत. ते चुकून खरे बोलले आहेत. म्हणून त्यांना झोडपलेच पाहिजे असा नियम नाही

No comments:

Post a Comment