Total Pageviews

Saturday 26 May 2018

क्रॉसकंट्रीची नवी स्टार ‘संजीवनी’!- अमित डोंगरे- प्रभात वृत्तसेवा



 -

नाशिकच्या वीस वर्षीय संजीवनी जाधवने चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत इतिहास घडवला. महिलांच्या आठ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत ब्रॉंझपदक जिंकणारी संजीवनी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. याच स्पर्धेत भारताने सांघिक गटातही ब्रॉंझपदक पटकावत आणखी एक योग जुळवून आणला. या कामगिरीच्या जोरावर संजीवनी येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेत जर तिने पदक मिळविले, तर तिचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न देखील साकार होईल.
संजीवनी ही नाशिकच्या भोसला मिलीटरी स्कूल आणि महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती विजेंदरसिंग यांच्याकडे सराव करते. 2013 साली मलेशिया येथे झालेल्या आशियाई शालेय स्पर्धेत संजीवनीने पंधराशे आणि तीन हजार मीटर स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. हीच तिच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी घटना ठरली होती. त्याचवर्षी ब्राझिलमध्ये झालेल्या जागतिक शालेय स्पर्धेतही तिने रौप्यपदक पटकावत जाणकारांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवताना तिने 28 मिनिटे 19 सेकंद अशी वेळ दिली. केवळ काही सेकंदांनी तिचे रौप्यपदक हुकले.
2017 हे वर्ष संजीवनीसाठी स्वप्नवत ठरले आहे. दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत तिने वीस वर्षांखालील गटात दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर भुवनेश्‍वर येथील
स्पर्धेत पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझ पदकाची कमाई केली. त्यानंतर तैवानमधील स्पर्धेत रौप्यपदक मिळवले, ही स्पर्धा जागतिक स्पर्धा होती म्हणूनच तिच्या पदकाचे महत्त्व जास्त ठरले. या स्पर्धेत तिने स्वतःची सर्वोत्तम वेळ 33 मिनिटे 22 सेकंद अशी नोंदवली होती. आंतरविद्यापीठ स्तरांवर ज्या स्पर्धा होतात, त्यात संजीवनी आता पुण्याचे प्रतिनिधित्व करते.
यात तिने सलग तीन वर्षे पाच आणि दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. यंदाच्या वर्षी गंटूर येथे झालेल्या 57व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेतही तिने दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. एकूण काय तर ललिता बाबरप्रमाणे संजीवनीच्या रूपाने महाराष्ट्राला आणखी एक लॉंग डिस्टन्सरनर गवसली आहे. चीनमधील एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने आज संजीवनी खऱ्या अर्थाने स्टारबनली आहे. या स्पर्धेत चीनच्या ली डॅनने सुवर्णपदक तर जपानच्या ऍबे युकारीने रौप्यपदक पटाकवले. या आठ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत एकूण पंधरा स्पर्धेक सहभागी झाल्या होत्या.
क्रॉसकंट्री स्पर्धेसाठीचा रस्ता यंदा वेगळाच होता. टेकडी, सपाट रस्ता पुन्हा टेकडी अशा रस्त्यांवरून ही स्पर्धा झाली, त्यात अखेरच्या क्षणी संजीवनी मागे राहिली आणि तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेच्या सांघिक गटातही भारताने ब्रॉंझपदक पटकावले, त्यातही संजीवनीचा मोठा वाटा आहे. वैयक्‍तिक शर्यतीतील एकाच देशाच्या सर्वोत्तम तीन खेळाडूंच्या कामगिरीवरून सांघिक पदक ठरले. भारतीय संघात संजीवनीसह मानांकीत खेळाडू ललिता बाबर, स्वाती गाढवे आणि झुम्मा खातुन या देखील होत्या. ललिताने 32 मिनिटे 53 सेकंद, झुम्माने 32 मिनिटे 14 सेकंद, स्वातीने 30 मिनिटे 18 सेकंद अशी वेळ दिली.
संजीवनीने जी वेळ दिली त्याच्या जवळपास जरी या तिघींनी वेळ नोंदवली असती तरी भारताला सांघिक गटातही सुवर्ण अथवा रौप्यपदक पटकावता आले असते. जपानने बारा गुणांसह सुवर्ण, चीनने 14 गुणांसह रौप्य तर भारताने 28 गुणांसह ब्रॉंझपदक मिळवले. गुणांचा हाच फरक चांगली कामगिरी करूनही संजीवनीला निराशा करणारा ठरला.
खरेतर या स्पर्धेत संजीवनीपेक्षा जास्त अपेक्षा ललिता बाबर आणि स्वाती गाढवेवर होत्या. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ललिता स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत पोहोचली होती त्यामुळे तीच चमत्कार घडवेल असे वाटले होते. खूप काळानंतर स्वाती आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत होती त्यामुळे तिच्यावर साहजिकच दडपण होते मात्र हेच दडपण असताना अनपेक्षितपणे संजीवनी जाधवने जाणकारांना आश्‍चर्याचा धक्का देते ः वैयक्तिक ब्रॉंझपदक पटकावले. 1991 मध्ये वैयक्तिक गटात भारताला चार पदके मिळाली होती त्यानंतर इतक्‍या वर्षांनी संजीवनीने देशाला पदक मिळवून दिले. तिच्या आजवरच्या वाटचालीत ओरिसातील आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील अपयश तिला सलत होते त्याची भरपाई तिने आता चीनमध्ये केली. तिची आदर्श पी. टी. उषा असली तरी कारकीर्द मात्र शंभर मीटर शर्यतीपेक्षा लॉंग डीस्टन्स शर्यतीत घडवायचे तिचे ध्येय आहे. दिल्ली मॅरेथॉनमध्ये जेव्हा ती दुसरी आली तेव्हाच तिने आपली सहकारी पूनम राऊत आणि ललिता बाबर यांना आव्हान दिले होते.
सध्या ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असून त्यांचेच विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधित्व करते. केवळ पाच फुट उंची असलेली ही खेळाडू मूर्ती लहान पण कीर्ती महानकरण्याच्या ट्रॅकवर आहे. अंतर विद्यापीठ स्पर्धेपासून तिची कामगिरी खऱ्या अर्थाने नावाजली जावू लागली. या स्तरावर सलग तीन वर्षे तिने विजेतेपद मिळविले व आपले वर्चस्व सिद्ध केले. वयाच्या केवळ 22 व्या वर्षीच तिने वरिष्ठ खेळाडू ललिता बाबर, स्वाती गाढवे आणि कविता राऊत या खेळाडूना आव्हान दिले. लांब पल्ल्याची धावपटू म्हणून नावारूपाला येत असताना तिने जे यश मिळविले आहे त्यातून ती खरेच इंडिया मटेरियल असल्याचे सिद्ध होत आहे. 1996 साली जन्मलेल्या संजीवनीने चीन मधल्या आशियाई क्रॉसकन्ट्री स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवत इतिहास घडविला आता हेच सातत्य तिने इंडोनिशियात ही दाखवले तर तिला देखील ऑलिम्पिक पात्रता मिळण्याची संधी आहे.
स्पोर्टस्‌नेस्ट यांच्या सहकाराने संजीवनी विविध स्पर्धामध्ये सहभागी होत असते. वरीष्ठ खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंदरसिंग हेच संजीवनीला देखील मार्गदर्शन करतात. केवळ 5 फूट 1 इंच इतकीच उंची असलेली संजीवनी लॉग डिस्टन्स रनर म्हणून यशस्वी होईल का असा प्रश्‍न विचारला जात होता मात्र आशियाई पदक मिळविल्यानंतर तिने सर्व टीकाकारांना आपल्या कामगिरीने दमदार उत्तर दिले. तिच्या उंचीचा फटका संजीवनीपेक्षा इतर खेळाडूना जास्त बसला. ललिता बाबरसह अनेक नावाजलेले खेळाडू अपयशी ठरत असताना संजीवनीने मिळविलेले पदक देशासाठी खूपच महत्वाचे ठरते.
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाहिलेली सर्व स्वप्ने क्रमाक्रमाने संजीवनी पूर्ण करत आहे. सप्टेंबरमध्ये होणारी आशियाई स्पर्धा तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पाच हजार आणि दहा हजार मीटर शर्यतीत आज तरी संजीवनी वगळता अन्य कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. या स्पर्धेत तिने पदक मिळविले व त्यानंतर होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखले तर तिला ऑलिम्पिकला जाण्याची संधी मिळेल. मैदानी स्पर्धेत भारताला आजवर म्हणावे तितके यश लाभलेले नाही अशा स्थितीत संजीवनीसारख्या खेळाडूवरच सर्व आशा केंद्रित होतात तिने जर यश मिळविले तर भारतासाठी ती नव्या युगाची नांदी ठरेल.
मिल्खा सिंग, पी. टी. उषा आणि शायनी विल्यम यांच्यानंतर संजीवनी हीच केवळ भारतासाठी पदकाचे आशास्थान ठरत आहे. गेल्यावर्षी आशियाई ऍथलॅटिक स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवत संजीवनीने आपल्यावरील विश्‍वास सार्थ ठरविला आहे. दिवसेंदिवस ती प्रगती करत आहे आता तिचा समावेश टीओपीमध्ये (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम) झाला पाहिजे. देशाची लोकसंख्या पाहता संजीवनीसारख्या खेळाडूना अधिकाधिक प्रोत्साहन दिले तरच ऑलिंपिक पदकामध्ये देखील वाढ होईल.
मैदानी स्पर्धा या खरे तर मदर ऑफ ऑल स्पोर्टसमजल्या जातात त्यामुळे अन्य खेळाबरोबरच मैदानी स्पर्धेवरच जास्त प्रमाणात लक्ष्य केंद्रित केले गेले पाहिजे. संजीवनीचा आता सामान्य खेळाडू ते असामन्य खेळाडू असा प्रवास सुरू झाला आहे. आशियाई स्पर्धेपाठोपाठ जर ती ऑलिम्पिकमध्येही यशस्वी ठरली तर तो तिच्या कारकिर्दीचा कळसाध्याय ठरेल.


No comments:

Post a Comment