स्थळ : मुंबई
काळ : कोणताही
ट्रेनवर, हॉटेलांवर, इमारतींवर, चौकांमध्ये, बसमध्ये, स्कूटरमध्ये, कारमध्ये, कुकरमध्ये अशा विविध प्रकारांनी बाँबस्फोट कसे करावेत, याची बारमाही कार्यशाळाच चालू असावी, अशी या शहराची स्थिती. आधीच्या स्फोटांनंतर, हल्ल्यांनंतर किमान पेपरात नावं-फोटो छापण्यासाठी काही संशयित तरी सापडायचे. आता तर तीही पद्धत बंद झाल्यात जमा आहे. कोणीही यावं स्फोट करूनी जावं, अशी आपली स्थिती.
अमेरिकेतल्याप्रमाणे दहशतवादी आणि गुन्हेगारी जगत यांच्यात थेट संबंध नाही, असं तर इथं अजिबातच नाही. उलट इथल्या गुन्हेगारी जगताचे सम्राटच शेजारच्या देशांच्या आश्रयानं दहशतवादाचे आका बनलेले आहेत, हे जगजाहीर आहे. त्यांचे इथे स्लीपर सेल आहेत, त्यांना पैसाअडका, खोटी कागदपत्रं, इतर सामग्री, आत शिरण्याच्या, पळून जाण्याच्या वाटांची माहिती, सुसज्ज यंत्रणा आणि ‘एस्कॉर्ट’ इथल्या गुन्हेगारी जगताकडूनच पुरवले जातात, याबद्दलही शंका नाही. पण कितीही स्फोट झाले, हल्ले झाले तरी इथल्या गुन्हेगारी जगताचा ‘बाल भी बांका’ होणार नाही, हे पक्कं.
गुन्हेगारी जगत वगैरे फार लांबच्या गोष्टी.
जव्हेरी बाजार हा गुजरातीबहुल इलाका असल्यानं दहशतवाद्यांचा आवडता परिसर आहे. चिंचोळे रस्ते, त्यांवरचं बेशिस्त पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेली खाऊ गल्ली यामुळे हा सगळा परिसर सतत गर्दीनं गजबजलेला असतो. इथं यापुढे दिवाळीचा अॅटमबाँब जरी वाजला तरी पळापळीत चार लोक जिवाला मुकतील, अशी स्थिती आहे. दहशतवाद्यांना जास्तीत जास्त माणसं मारण्यासाठी हीच गर्दी आणि बेशिस्त हवी आहे.. तीच या हल्ल्यांमध्ये मरण्याची पाळी ज्यांच्यावर येणार आहे, त्यांनाही हवी आहे. परवाचा बॉम्बस्फोट झाल्यावर सध्या इथे गाडय़ा पार्किंग करू दिल्या जात नाहीत, खाद्यपदार्थाचे ठेले हटवण्यात आलेत. पण हे चित्र किती दिवस राहिल?
नाइन इलेव्हननंतर 10 वर्षात ‘अल् कइदा’नं अनेकदा डरकाळ्या फोडूनसुद्धा अमेरिकेच्या भूमीवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही..
आणि..
आपल्या भारतवर्षात, मुंबई शहरात मनाला येईल तिथं, वाटेल त्या आकारा-प्रकाराचा बाँब फोडण्याची स्पर्धा ठेवता येईल आणि नंतर हवं तर मान्यवर मौलाना मसूद अझर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरणही करता येईल, अशी स्थिती आहे..
दोन्हीकडची स्थिती 11 सप्टेंबर 3001 रोजीही यापेक्षा वेगळी असण्याची शक्यता फार कमी आहे.. ..हा योगायोग नाही
No comments:
Post a Comment