Total Pageviews

Sunday 28 May 2017

शालवाल्यांचे दगड आणि मेजर गोगोई-काश्मीरची लढाई आता दिल्लीच्या मीडियातील एक घटक लढत आहे. अठरा जवान आणि नागरिकांना वाचविणार्‍या मेजर गोगोई यांच्याविरोधात या मीडियाने त्या दगडफेक्या ‘डार’ला (की धर?) उभे केले. या दगडफेक्याला मेजर गोगोई यांनी जीपसमोर बांधले होते. संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी जो सैनिक सरकारी कर्तव्याचे पालन करीत होता, त्याला खोटा आणि दुष्ट सिद्ध करण्यासाठी ते लेखक आणि पत्रकार प्रयत्नरत आहेत, ज्यांची परंपरागत सहानुभूती दगडफेक करणार्‍या फुटीरतावाद्यांना आहे. मेजर गोगोई यांना लष्करप्रमुखांनी गोगई यांनी सन्मानित केले. मात्र, एका अमेरिकन पासपोर्टधारक भारतीय संपादकाने याला लज्जास्पद संबोधले. काश्मिरी फुटीरवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणारी एक महिला पत्रकार म्हणाली, ‘‘याद्वारे आम्ही काश्मिरी जनतेला कुठला संदेश देत आहोत? एका चॅनेलचा पत्रकार तर जीपला बांधलेल्या व्यक्तीच्या घरी त्याच्या आईची व नातेवाईकांची मुलाखत घ्यायला गेला. ‘‘मी तर शाल विणत होतो, ती पूर्ण होत आली होती, मी दगडफेक केली नाही, मला दिवसभर पाणीही देण्यात आले नाही…’’ वगैरे बरीच बडबड या माणसाने मुलाखत देताना केली.


May 28, 2017035 Share on Facebook Tweet on Twitter अन्वयार्थ हे परमेश्‍वरा, हे भारतीय लष्कर किती निष्ठुर, खोटारडी व स्वार्थी आहे. बिचार्‍या काश्मिरींवर किती अत्याचार करीत आहे, असेच जणू सार्‍या जगाला वाटावे असे वातावरण निर्माण करण्याचे या दुष्ट मंडळींचे प्रयत्न होते आणि आहेत. भारतीय जवानांचा विश्‍वासघात करून त्यांच्यावर हल्ले करणार्‍या तसेच त्यांच्यावर दगडफेक करणार्‍या लोकांना या पत्रकारांनी, तुम्ही दगडफेक कशासाठी करीत आहात, असा आतापर्यंत एकतरी प्रश्‍न विचारला आहे काय? मेजर गोगोई एक शूर व धाडसी लष्करी अधिकारी आहेत. ते शिस्तबद्ध आणि संवेदनशील आहेत. फारूक डार लोकांना सैनिकांविरुद्ध भडकवीत होता. तो शाल वगैरे विणत नव्हता, ही बाब गोगोई यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे. ज्या बडगाव येथे मतदान सुरू होेते ते गाव फारूक अहमद डारच्या घरापासून २० किलोमीटर दूर आहे. जिला तेथे मतदानच करायचे नव्हते ती व्यक्ती या वेळी त्या गावात काय करीत होती, असा प्रश्‍न कुणीच विचारला नाही. अतिशय खवळलेल्या आणि सैनिकांना रक्तबंबाळ करण्यास आतुर झालेल्या जमावापासून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी या जवानांनी काय करायला हवे होते, हे कुणीच सांगत नाही. दगडफेक करणार्‍यांसमोर त्यांनी दयेची भीक मागायला हवी होती? किंवा घाबरून हत्यारे तशीच टाकून पळून जायला हवे होते? (आणि जर जवानांनी तसे केले असते तर याच ढोंगी पत्रकारांनी त्याचे मोबाईलवर शूटिंग करून ते फोटो सर्वत्र व्हायरल केले असते.) अगदी शेवटचा उपाय म्हणून जर जवानांनी अनियंत्रित जमावावर गोळीबार केला असता, तर याच पत्रकारांनी व माध्यमांनी ‘बघा ‘इतक्या’ लोकांना ठार केले,’ असा अपप्रचार केला असता. मेजर गोगोई यांनी ‘जशास तसे’ या तत्त्वाप्रमाणे दगडफेक करणार्‍यांपैकी एकाला पकडून जीपवर बांधले आणि अन्य जवान व नागरिकांचे प्राण वाचविले. हाच मेजर गोगोई यांचा गुन्हा मानायचा काय? तद्दन खोटारड्या आणि दगडफेक करणार्‍या फारूकचे वक्तव्य टीव्ही वाहिन्यांवर वारंवार झळकवून मीडियाने आपल्याच एका धाडसी लष्करी अधिकार्‍याला त्याच्याविरुद्ध उभे करण्याचे पाप केले आहे. कथित पुरोगामी व सेक्युलर पत्रकारांचा भाईचारा एवढा मजबूत असतो की, ते एकाच सुरात सूर मिळवतात. ‘‘गल्लोगल्लीत मुसलमानांचा पाठलाग करून त्यांना मारले जात आहे, भारत सरकार त्याकडे लक्ष का देत नाही?’’ असे ट्विट एका पत्रकाराने केले होते. या ट्विटवरून देशभरात वादळ उठले, लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पण, या सेक्युलर मीडियाने लोकांचा हा आवाज दाबून टाकला. दंगल भडकविणार्‍या व लोकांना चिथावणार्‍या लोकांविषयी मीडियाने तोंडातून ‘ब्र’देखील काढला नाही. यासंदर्भात पत्रकारांनी ‘परस्पर बंधुत्वा’ची भूमिका पार पाडली. मात्र, देशाच्या संरक्षणाची घटनात्मक जबाबदारी जो पार पाडत आहे त्याला मात्र या सेक्युलर मीडियाने कधीच समर्थन दिले नाही. या सेक्युलर पत्रकारांच्या दृष्टीने तो लष्करी अधिकारीच खोटारडा आहे आणि हे दगडफेक करणारे खरे आहेत. कुपवाडा, शोपियॉं, भद्रवाह, हंडवाडा येथे रोजच जवान शहीद होत आहेत. पाकिस्तानच्या क्रूर हल्ल्यांत आमच्या जवानांचे शिर कापण्यात येते. मात्र, जे पत्रकार आणि जेएनयूछाप डावे कम्युनिस्ट विद्यार्थी फारूक अहमद डारला भारतीय लष्कराच्या क्रौर्याचे प्रतीक बनवून तसा प्रचार करीत आहेत, ते पाकिस्तानी अथवा इस्लामी जिहादी क्रौर्य व अमानुषतेविषयी तोंडातून एक शब्दही काढायला तयार नाहीत. जिहादींना क्रूर आणि मानवताविरोधी बनविणार्‍या मानसिकतेचे विश्‍लेषण हे डावे विचारवंत व विद्यार्थी कधीच करीत नाहीत. पाकिस्तानचे क्रौर्य व अमानुषतेविषयी यांनी तोंडातून ‘ब्र’ही कधी उच्चारला नाही. मात्र, भारतीय जवानांच्या बाजूने नेहमीच ठामपणे उभ्या राहणार्‍या गौतम गंभीरचे छायाचित्र अहमद डारच्या छायाचित्रावर चिकटवून त्याची थट्‌टा केली जाते. जर हे प्रामाणिक पत्रकार असते, तर त्यांनी दगडफेकीमागचे कारस्थान, फुटीरवाद्यांना पाककडून मिळणारी आर्थिक व लष्करी मदत तसेच भारतीय लष्कराकडून सर्वसामान्यांसाठी चालविण्यात येणारी सेवाकार्ये, विविध उपक्रम यांना आपल्या लेखणी आणि वाणीने काश्मीरी जनतेसमोर आणले नसते का? यावर प्रकाश टाकला नसता काय? श्रीनगरला आलेल्या प्रचंड पुराच्या वेळी कुणी मदत केली? गिलानीच्या दगडफेक करणार्‍या टोळक्याने संकटात सापडलेल्या आपल्या बंधू-भगिनींना मदत करण्यासाठी पुढे येण्याची हिंमत का दाखविली नाही? काश्मिरात लष्करातर्फे ४० हून अधिक दर्जेदार सद्भावना शाळा चालविण्यात येत आहेत. ज्यातून १४ हजारांपेक्षा अधिक काश्मिरी व जवळजवळ शंभर टक्के मुस्लिम मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यातील दहा शाळांना मी स्वत: भेट दिली आहे. शोपियॉंसारख्या दहशतग्रस्त क्षेत्रातही सद्भावना विद्यालय आहे. या शाळांचा दर्जा एवढा उच्च आहे की, आपल्या मुलांना तेथे प्रवेश मिळावा म्हणून तेथील नेते व अधिकारी अक्षरश: धडपडतात. प्रतिष्ठित लोकांची शिफारसपत्रे प्रवेशासाठी आणली जातात. काश्मिरात आर्मी हॉस्पिटल्स व डॉक्टर ग्रामीण जनेतेची नि:शुल्क आरोग्य तपासणी करतात. त्यांना सर्वप्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात जी कदाचित उर्वरित भारतातील ग्रामीणांनाही उपलब्ध होत नसेल. हजारो काश्मिरी युवक-युवतींना गृह मंत्रालय आणि लष्करातर्फे दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, उत्तराखंड येथे नि:शुल्क पर्यटन सफर घडविण्यात येते. या माध्यमातून त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मता आणि अखिल भारतीय दृष्टिकोन अर्थात हा भारत देश माझा आहे, ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. ओडिशा, केरळ व झारखंडच्या मुलांना ही सुविधा उपलब्ध नाही. जर तेथे लष्कर व पोलिस भरती असल्यास १०० जागांसाठी ५०-६० हजार अर्ज येतात. मागे मी एका काश्मिरी मुसलमान कुटुंबाला भेटलो. कुटुंबप्रमुखाची दोन्ही मुले जे. के. रायफल्समध्ये कार्यरत आहेत. एका कुटुंबातील तर सर्व तीनही मुले भारतीय लष्करात आहेत. शेकडो गावात लष्करातर्फे तेथील स्थानिक महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचे प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातील जवळजवळ सर्वच लाभार्थी मुस्लिम आहेत. काश्मिरी युवकांसाठी ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षण केंद्राबरोबरच शारीरिक क्षमता वाढावी म्हणून व्यायामशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे बहुतांश युवक, सामान्य नागरिक शांत व सुखी जीवन जगण्यास इच्छुक आहेत. मात्र, भारतीय मीडियातील पाकिस्तान समर्थक फुटीरवाद्यांचा समर्थक मीडियातील एक वर्ग संपूर्ण काश्मिरातच भारतीय लष्कराचे अत्याचार सुरू असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न आणि प्रचार करीत आहेत. भारतीय पत्रकारितेचे हे विद्रूप व विकृत चित्र नाही काय? भारतीय सैनिक खोटारडे आणि दगडफेक करणारे युवक तेवढे खरे, असे दुर्दैवी वातावरण बनविण्यात भारताचे काहीही हित नाही. उलट यामुळे लष्कराचे मनौधैर्य ढासळू शकते आणि यामुळे केवळ पाकिस्तान समर्थक मूठभर लोकांचे मनोबल वाढेल. – तरुण विजय

No comments:

Post a Comment