Total Pageviews

Friday 12 May 2017

पाकिस्तान म्हणजे विषारी सापच


परवा ‘आज तक’ या चॅनेलवर पाकिस्तानच्या जनरल परवेज मुशर्रफ यांचा इंटरह्य पाहिला. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने काही विशेष चौकशी न करता सरळ फाशीची सजा सुनावली. या विषयावर ‘आज तक’च्या अंजना ओम कश्यप यांनी मुशर्रफचे मत जाणून घेतले. पंधरा-वीस मिनिटांच्या त्या मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर मुशर्रफचे पाणीपाणी झाले. एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मुशर्रफांना देता आले नाही. त्यांचे एकच म्हणणे होते, ते म्हणजे ‘पाकिस्तानने योग्यच न्याय केला असावा’. खोलात जावून प्रश्न केल्यावर मुशर्रफांचे एकच म्हणणे, ‘मुझे उसमे ज्यादा जानकारी नही है’ तसे म्हणून खरे बोलणे टाळायचा प्रयत्न त्यांनी केला. जाधव यांच्याविरुद्ध पुरावे देण्यास पाकिस्तान टाळाटाळ का करतो असे विचारल्यावर मुशर्रफ म्हणाले ‘मुझे उसके बारे में डिटेल मालूम नही.’ मुशर्रफ सोडा पाकिस्तानच्या मेजर असीम बाजवाने कुलभूषण जाधव यांच्याकडून जबरदस्तीने कबुलनामा वदवून घेतला. व्हीडिओमध्ये परिवर्तन करून तो न्यायालयात दाखवला. न्यायाधीशासमोर मूळ व्हीडिओ दाखवला नाही. कसलीही चाचणी न घेता त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. भारताने न्यायालयाच्या निकालाची प्रत मागितली तर पाकने नेहमीप्रमाणे टाळाटाळ केली. संपूर्ण देश कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या निर्णयावर चिंतीत आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला. जाधवांना सोडवण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल असे जाहीर केल्याबरोबर पाकिस्तानने, त्याला धमकी समजून पाक पण जशास तसे उत्तर देऊ शकतो असे म्हणाला. काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हमला करून आपले १९ सैनिक मारले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून भारताने प्रथम सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करून ४०-५० अतिरेक्यांचा खात्मा केला होता. या गोष्टींवर जनरल मुशर्रफ हसले व म्हणाले, ये क्या आप सर्जिकल स्ट्राईक की बात करते है? ऐसे स्ट्राईक्स तो हम भी कर सकते है। पाकिस्तान पहले से काफी ताकतदार हो गया है, भारत को दुश्मनी महंगी पडेगी, असले विधान करत मूळ प्रश्नाचे उत्तर टाळायचे प्रयत्न करत होते मुशर्रफ. मुशर्रफ, नवाज शरीफ, असीम वाजवा इत्यादींनी भारताविरुद्ध गरळ ओकणे साहजिकच आहे. पाकिस्तानचे नागरिक पाकवर प्रेम करतात, हा त्यांचा धर्म आहे. धर्माचे पालन तर करायलाच पाहिजे हे आपण शास्त्र पुराणापासून पाहतो. संतसुद्धा वारंवार धर्माचे पालन करण्यास वेळोवेळी सांगत असतात. त्याप्रमाणे पाक नागरिकांचे कुठेच चुकत नाही. चुकते मात्र आपल्या भारतातील नागरिकांचे. आपले सैनिक प्रत्युत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक करतात. परंतु आपल्याच देशातील नेत्यांना त्याचे पुरावे हवे असतात. कशावरून सर्जिकल स्ट्राईक झाला? असे म्हणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीयच आहेत ना? काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेक करणारे तेथील तरुण बघा. जवानांनासुद्धा शस्त्र हातात असून कारवाई करता येत नाही. जवानांना एकटे दुकटे पकडून रक्तबंबाळ केल्याच्या ब-याच घटना आहेत. त्या काश्मिरी युवकांवर पॅलेट गनचा वापर केला तर आपल्या येथील तथाकथित बुद्धिजीवींच्या पोटात दुखते. त्या बिचा-या युवकांवर भारतीय सेना जुलूम करत आहे, अशी विधाने केली जातात. दगडफेक करणा-या काश्मिरी युवकाला जीप समोर बांधून आपल्या जवानांनी मिरवणूक काढली. उद्देश हाच की, इतर काश्मिरी युवक सावध व्हायला हवेत आणि आपल्या जवानांचे प्राण वाचावेत. परंतु आपल्या इथे बरखा दत्त यांना भारतीय सेनेचे ते अमानवीय कृत्य वाटते. बरखा दत्तसोबत भरपूर लोक आहेत. कुणा कुणांची नावे घ्यावी? असदुद्दीन ओवेसी, कविता कृष्णन, वामपंथी पत्रकार भरपूर आहेत. त्यांना सेनेचे अमानवीय कृत्य दिसते. परंतु काश्मीरचे दगड मारणारे, पाकिस्तानचा जयजयकार करणारे, भारत मुर्दाबाद म्हणणारे बिचारे गरीब, असहाय वाटतात. जे. एन. यू. चा कन्हैया हिरो बनतो. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे नेते लक्षात येत नाहीत. पाक कलाकारांचा पुळका येतो. ते पाक कलाकार भारतात येऊन पैसे कमावून पाकिस्तानात गेल्यावर भारताविरुद्ध गरळ ओकायला कमी करत नाहीत.सतत भारताला पाण्यात पाहणा-या पाकिस्तानला त्याचीच भाषा समजते. आपण नेहमी दयेचा सागर म्हणून भूमिका बजावतो. त्याची त्यांना सवय झाली आहे. भारत सिर्फ चिल्लाता है। मध्ये मध्ये बुक्याचा मार देऊन त्याला त्याची जागा दाखवणे गरजेचे ठरते. सापाला कितीही दूध पाजले तरी तो विषच ओकतो अशी पाकिस्तानची स्थिती आहे. त्याच्याकडून चांगले काही निष्पन्न निघेल ही आशा करणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. आतापर्यंत घडलेल्या इतिहासापासून आपण सावध होऊन पाकिस्तानविरुद्ध जास्तीत जास्त कठोर भूमिका घेणे गरजेचे ठरते. तेव्हाच आपल्या देशातील तथाकथित सेक्युलरवादी जागे होतील. पाकसर्मथक हा राष्ट्रद्रोही म्हणून कायदाच करायला हवा. नुसता कायदा कामाचा नसून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पाकिस्तानचे समर्थन करणा-यांनी चांगल्याप्रकारे समजायला हवे की ते राष्ट्र म्हणजे विषारी सापच आहे जे दुधाचे रूपांतर विषातच करते.

No comments:

Post a Comment