Total Pageviews

Sunday 1 July 2018

एनएसजीची काश्मीरमधील संभाव्य रणनीती-कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)-NAVPRABHA



आजवर एनएसजीला पर्सनल सिक्युरिटीकिंवा अर्बन अँटी टेरर ऑपरेशन्सशिवाय कुठेही, कशासाठीही तैनात केले गेलेले नव्हते. पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मिरमध्ये सुरू असलेल्या प्रच्छन्न युध्दात कार्यरत जिहाद्यांच्या सत्वर नायनाटासाठी सेनेच्या मदतीला आणि अर्ध सैनिक बल आणि पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी एनएसजीला खोर्‍यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे
काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी मागील ४५ वर्षे चालू असलेल्या प्रच्छन्न युध्दातील विदेशी दहशतवाद्यांचा सहभाग आता जास्तच धाडसी व धर्मवेडा होऊ लागला आहे. कोणताही देश आपल्या भूमीवर होत असलेले तथाकथित स्वातंत्र्यसैनिकांचे हिंसक चाळे पोलादी ताकद आणि हिंसक मार्गानी चिरडतो. एकाधिकारशाही / हुकूमशाही देशात अशा तथाकथित स्वातंत्र्य चळवळी हिंसक मार्गांनी दाबल्या गेल्यास कोणी काहीही म्हणत नाही. पण भारतासारख्या लोकशाही देशात दडपशाही मार्गांचा अवलंब करता येत नाही. काश्मीरमध्ये फुटिरतावादी संघटना व त्यांचे समर्थक राजकीय पक्ष कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटीला नाकारुन केवळ दहशतवादी मार्गच अवलंबत असल्यामुळे अशी काही विघटनकारी परिस्थिती निर्माण झाली आहे की, भारत सरकारला काश्मीरमधील आणि सीमापारहून आलेल्या जिहादी दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पोलिस फोर्स आणि सेनेचा वापर करावा लागतो आहे.
काश्मीरमधील जिहादी दहशतवादाला पाकिस्तान, तेथील राजकीय पक्ष, सेना, आणि आयएसआय खुला पाठिंबा देत संसाधनीय मदत करतात. अनेकदा पाकिस्तानचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सेनाध्यक्ष आणि मुल्ला मौलवी देखील काश्मीरमधील जिहादी कारवायांचे खुले समर्थन करीत भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचे कार्य करतात.
अलीकडेच भारत सरकारने रमझानसाठी एकतर्फा जाहीर केलेली कारवाई बंदी (संघर्षविराम) मागे घेतला आणि त्यानंतर काही तासांतच भारतीय जनता पक्ष काश्मीरमधील सरकारमधून बाहेर पडला. तेथे राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्याच दिवशी अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत मध्य पूर्वेतील आयसीस (के) चा (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया इन काश्मीर) भारतामधील म्होरक्या दाऊद सोंफीसह चार दहशतवादी मारले गेले. यामुळे लश्कर ए तोयबा आणि जैश ए महम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या मदतीला आयसीस व अल कायदा भारतात आल्याची खात्री पटली.
याच्या काहीच दिवस आधी हकुरामध्ये ईहा फाजली व खीरम श्रीगुफारामध्ये हे अनुक्रमे आयसीस व अल कायदाचे परदेशी जिहादी मारले गेले होते. त्यामुळे सरकारने सेनेच्या मदतीला आणि अर्ध सैनिक दल व काश्मीर पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या भारतीय स्पेशल कमांडो फोर्सला ऍडव्हाइस अँड असिस्टअंतर्गत काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला.
पुढील काही काळ एनएसजीला सेना व पोलिसांना मदत आणि जिहाद्यांचा नाश ही द्विस्तरीय कामगिरी करावी लागेल. यात अनेकदा सामरिक चढउतार येतील, काही अविश्‍वसनीय घटना घडतील, काही चुका होतील; पण प्रत्येक वेळी जिहाद्यांचा बीमोङ हेच एक ध्येय असेल. सुरक्षा दलांना अपारंपरिक उपक्रमी संकल्पना व पारंपरिक युद्धपद्धतीची सांगड घालून जिहाद्यांवर आक्रमक हल्ले करावे लागतील. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेली २१ अतिजहाल जिहाद्यांची यादी हा या नवीन कार्यपद्धतीचाच ओनामा आहे.
जिहाद्यांचा खातमा करण्याच्या या संयुक्त अभियानातील खतरनाक सामरिक चकमकी सुरक्षा दलांच्या खंबीर नेतृत्वाशिवाय शक्य होणार नाहीत. अशा प्रकारच्या सामरिक चकमकी आयसीस, लश्कर ए तायबा, जैश ए महम्मद आणि अल कायदा यांच्या जिहादी मनोवैज्ञानिक प्रणालीचा सखोल अभ्यास व आकलन आणि त्यानुसार होणार्‍या कारवाईनंतरच जिंकल्या जाऊ शकतील. या मनोवैज्ञानिक विश्‍लेषणाकरता एनएसजीचे सायकॉलॉजिस्ट सेनेची मदत करतील.
एनएसजीला अर्ध सैनिक बल आणि पोलिसांची सांगड सेनेच्या कार्यपद्धतीशी घालण्याचे काम करावे लागेल. सेना, अर्ध सैनिक बल आणि काश्मीर पोलिस यांची कार्यपद्धती आणि मनोवृत्ती वेगळी प्रकारची आहे. मागील ४५ वर्षे काश्मीरमध्ये भारतीय सेना चकमक करीत असताना अर्ध सैनिक बल आणि काश्मीर पोलिस केवळ बाह्य सुरक्षा कवच देत मदतगार बघ्याची भूमिका बजावत असत. त्यांच्या मनोवृत्तीत योग्य तो बदल आणून त्यांचा सेनेच्या काउंटर टेरेरिस्ट ऑपरेशन्समधील सक्रीय सहभाग वाढवण्याचे काम एनएसजीला करावे लागेल. जिहाद विरोधी अभियानात सेना येईपर्यंत जिहाद्यांना थोपवण्यासाठी पहिले पाऊल उचलण्याचा मान स्थानिक पोलिस व अर्धसैनिक बलांंचा आणि कार्यस्थळी पोचल्यावर पुढील कारवाईची जबाबदारी सेनेची असायची. पण या कामात, स्थानिक पोलिस जिहाद्यांना आणि दगडफेक्यांना तोंड देण्यास कुचराई करतात असा अनुभव सेनेला काश्मीरमध्ये अनेकदा आला आहे. एनएसजीला अर्ध सैनिक बल व पोलिसांची ही मानसिकता बदलून त्यांच्यात संयुक्त कारवाई दस्ता प्रणाली विचार (कंबाईंड जॉईंट टास्क फोर्स कंसेप्ट) रुजवून जिहाद्यांशी लढा देण्यास उद्युक्त करावे लागेल.
काश्मीरमधील जिहाद विरोधी अभियानात घेण्यात येणारे निर्णय, चकमकीची पूर्वतयारी आणि चकमकीच्या कार्यप्रणालीत एनएसजीचा प्रमुख वाटा नसेल. ती फक्त अर्ध सैनिक बल व पोलिसांची आणि जरुर पडल्यास सेनेची मदत करेल. ती जिहाद्यांशी प्रत्यक्ष लढा देणार नाही, कारण ग्राउंड ऑपरशेन्सकरणे हे एनएसजीचे काम नाही. ते फक्त खासम ्‌खास कारवायाच करतात. काही वेळा ते सेना व पोलिसांच्या मदतीला जाउन प्रत्यक्ष लढ्यातही सहभागी होतील, पण जिहाद्यांचा पहिला घाव अर्ध सैनिक बल आणि पोलिसांनाच झेलावा लागेल. एनएसजी बहुतांशऑब्झर्व्हर कंट्रोलर ट्रेनर मोडमध्ये राहात जिहादी कार्यप्रणाली अवगत करवून असणार्‍या व मिळालेल्या माहितीवर काय कारवाई करायची याचे खडतर प्रशिक्षण, अर्ध सैनिक बल व पोलिसांना देईल. अगदीच आवश्यक असल्याशिवाय एनएसजी प्रत्यक्ष चकमकीत सहभागी होणार नाही.
एनएसजीची प्लाटून आणि कंपनी कमांडर्स वेगवेगळ्या ठिकाणांमधून ऑपरेट करतील. उलटपक्षी जरुर पडल्यास एकच एनएसजी युनिट वेगवेगळ्या जागांवर देखील कार्यरत असू शकते. एनएसजीच्या विकेंद्रित, प्रेरक व चैतन्यशील आणि भिन्न कार्यप्रणालीमुळे सेनेची निर्णयक्षमता आणि जोखीम मूल्यमापन पद्धती वृध्दिंगत होईल. एनएसजी मध्यवर्ती भूमिका तयार करून सेना, अर्ध सैनिक बल आणि पोलिस मुख्यालय आणि तैनात ग्राउंड ट्र्रुप्सना इंटेलिजन्स पुरवेल आणि दहशतवाद विरोधी लढ्यात त्यांची ताकद वाढवेल. यासाठी एनएसजी एक प्रकारची इन कमांड बट आऊट ऑफ कन्ट्रोलची भूमिका अंगिकारेल. दहशतवादी लढ्यात लागणारा प्रचंड आशावाद आणि खंबीर इराद्यांची आवश्यकता एनएसजीने ग्राउंड ट्रूप्सना वेळेवर माहिती दिल्यामुळे पूर्ण होईल.
यासाठी एनएसजीला सांप्रत प्रचलनात असलेल्या चकमक/युध्दप्रणालीच्या परिघाला न डिवचता त्यांच्याशी संपर्क साधत राहाणे, सल्ल्याआधी मदत करणे, आपल्या उद्दिष्टांशी वंचना न करता ग्राउंड ट्रुप्सना सल्ला देणे आणि ग्राउंड ट्रुप्सकडून अवाजवी अपेक्षा न करणे ही तत्वे कसोशीने पाळावी लागतील. त्याचबरोबर, ग्राउंड ट्रूप्सच्या अनुभवांवर लक्षपूर्वक विचार करून त्यांना कारवाई आदेश आणि फिल्ड कमांडर्सना हवी असणारी माहिती द्यावी लागेल. हे सर्व सेनेजवळ असलेल्या सिग्नल सिस्टीमच्या माध्यमातूनच करावे लागेल.
दीर्घकालीन दहशतवादविरोधी कारवायांची सफलता आणि सहयोगातील सामरिक जबाबदारीच्या स्पष्टतेसाठी एनएसजीला सेना, अर्ध सैनिक बल आणि पोलिसांशी दृढ नातेसंबंध निर्माण करावे लागतील. चकमकींदरम्यान सेनेचे वरिष्ठ अधिकारी आणि एनएसजीमध्ये मतभिन्नता निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी एनएसजीला मुत्सद्दीपणाने आपला मुद्दा रेटत कॉम्बॅट सपोर्टद्यावा लागेल.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ मध्ये फेडरल कॉंटिन्जन्सी कॉम्बॅट युनिटच्या स्वरूपात उभी करण्यात आली. सेनेचे अधिकारी व जवान असणारा स्पेशल ऍक्शन ग्रुप (एसएजी)आणि अर्ध सैनिक बलांचे अधिकारी व जवान असणारा स्पेशल रेंजर्स ग्रुप (एसओजी)मध्ये एनएसजीची विभागणी करण्यात आली आहे. ही संघटना मुख्यत: जल, स्थल व वायुमंडलामधील अपहरण रोखणे, बॉम्ब आणि आयईडी निष्प्रभ करणे, कारणे जाणण्यासाठी स्फोटानंतरची तपासणी करणे आणि अपहरण झालेल्यांची सुटका करणे, त्याच प्रमाणे शहरी नागरिकी क्षेत्र आणि अपहरण विरोधात काम करण्यासाठी निर्माण करण्यात आली होती. मात्र काही काळानंतर एनएसजीला व्हीव्हीआयपी रक्षणाची जबाबदारी देखील देण्यात आली. कालौेघात ब्लॅक कॅट कमांडोंना आपल्या भोवती बाळगणे हे राजनेत्यांच्या प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आणि एनएसजीची मारक घातकता धोक्यात येऊ लागली. कदाचित त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय गृहमंत्री व एनएसएनी घेतला असावा असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.
१९८६ व ८८ मधील सुवर्ण मंदिर येथील ऑपरेशन ब्लॅक थंडर वन/टूची कारवाई, १९९३ मधील इंडियन एअरलाइन्सचे अपहरण, १९९८ मधील काठमांडू मुंबई विमान अपहरणातील अमृतसरच्या राजासांसी एअरपोर्टमधली कारवाई, २००२ मध्ये अक्षरधाम (गुजराथ) वरील जिहादी हल्ला, २००८ चा मुंबईवरील जिहादी हल्ला आणि २०१६ मधल्या पठाणकोट एयर बेसवरील जिहादी आत्मघातकी हल्ला यांमध्ये एनएसजीची कारवाई प्रशंसनीयच होती.
आजवर एनएसजीला पर्सनल सिक्युरिटीकिंवा अर्बन अँटी टेरर ऑपरेशन्सशिवाय कुठेही, कशासाठीही तैनात केले गेलेले नव्हते. काश्मीरमध्ये मानव किंवा संसाधन अपहरणाच्या घटना घडत नाहीत. सेना, जिहादी जेथे लपले आहेत, त्याच्या जवळ न जाता जवळपास १०० मीटर दुरून केलेल्या फायरद्वारे ती जागा उद्ध्वस्त करते. अशा परिस्थितीत एमपी ५ कार्बाइनच्या सहाय्याने अगदी जवळ जाऊन मार करणारी करणारी एनएसजी कितपत उपयुक्त ठरेल हा मोठाच प्रश्‍न आहे. कदाचित आपल्या पीएसजी रायफल्सद्वारे १००० ५०० मीटर्स दुरून गोळीबार करणारे एनएसजी स्नायपर्स काही महत्वाची भूमिका बजावू शकतील, असा निर्णयकर्त्यांचा होरा असावा. एक मात्र खरे की, जर खुबीने वापरली गेली तर एनएसजी सेनेसाठी फोर्स मल्टिप्लायरठरू शकेल


No comments:

Post a Comment